प्रचंड हुशार माणूस

ज्यांची मुलाखत घ्यायची ती माणसं दोन प्रकारची असतात एक तर ती खरोखरच हुशार असतात आणि आपल्याला त्यांच्याशी गप्पा व्हाव्याशा वाटतात. दुसरा प्रकार म्हणजे ही माणसं "भयंकर हुशार" असतात आणि आपण त्यांच्याशी गप्पा माराव्यात असं त्यांना वाटत असतं. अशा दुसर्या प्रकारातली माणसं भेटली की, "हेल" समजतो. असाच एक भयंकर हुशार प्राणी एकदा भेटला. (या माणसांचिही एक गंमत असते, त्यांची शिफ़ारस करणारी इतरच कोणीतरी असतात आपण बेसावधपणानं बळी पडतो आणि मग या माणसांच्या कचाट्यात सापडतो.) या प्राण्यानं कसलं तरी संशोधन केलेलं होतं, प्रसिध्दीला लाथाडणारा अशी त्याची ओळख माझ्यापर्यंत आली आणि अशा माणसाचं कार्य लोकांसमोर येणं किती गरजेचं आहे मला अगदी बेसावध क्षणाला पटलं. एका रम्य सकाळी (तेही रविवारच्या हो!) हे महाशय त्यांच्या लॆपटॊसह प्रकटले. प्रसिधिला लाथाडणारे हे महाशय अगदी तयारीनं आलेले होते. त्यांच्या संशोधनातलं काय काय प्रसिध्द व्हावं हे तर त्यांनी सविस्तरपणानं आणलंच होतं त्याशिवाय ते कोणत्या भाषेत मांडलं जावं याचंही त्यांच्याकडे टिपण होतं. प्रत्येक मुद्द्यानंतर ते तो मुद्दा नेमक्या कोणत्या शब्दात मांडला जावा याची माहिती देत होते. सुरवातीला मी दूर्लक्ष करत राहिले कारण ते माझ्या खास ओळखितल्यांचे नातलग होते. असं एकदम ताडकन बोलणं मला प्रशस्त वाटलं नाही म्हणून मी शालजोडीतली हाणायच्या उद्देशानं त्यांना म्हटलं, असं करा नाही तरी मला सध्या अजिबात वेळ नाही, तुम्हीच तुमची सविस्तर मुलाखत तयार करा आणि मला द्या पुढे काय करायचं मी बघेन. हा जोडा त्यांना बहुदा समजलाच नाही, ते म्हणाले की त्यापेक्षा तुम्हीच मुलाखत लिहून मला वाचायला द्या, त्यात बदल करून "सुधारून" मी तुम्हाला पाठवेन. साधारण दीड तासानंतर सहनशक्तीचा कडेलोट झाल्यावर त्यांना सांगितलं की हे सगळं छापायचं झालं तर एक पान भरेल आणि त्यासाठी जाहिरात विभाग तुमच्याकडून कॊलमसेंटीमिटरच्या रेटनं बिल वसूल करेल. आत्मस्तुतीत मग्न झालेल्या या महाशयांना कोणताच जोडा लागत नव्हता, बायकोला दणदणीत पगार असल्यानं त्यांचं संशोधन कार्य चाललेलं होतं, बाता जगाला सुधारण्याच्या आणि घराचा भार बायकोच्या डोक्यावर देऊन हे महाशय असे मोकाट. बरं संशोधन म्हणाल तर ते ही भरीव नाही. उथळ पाण्याचा हा खळखळाट काही मिनिटात लक्षात आल्यावर पुढे बोलण्याची उमेदच संपली. एरवी अनोळखी माणसाच्या बाबतीत असं झालं असतं तर त्याला कटवणं फ़ार कठीण नव्हतं पण इथे मामला दगडाखाली हात सापडल्यासारखा झालेला होता. संशोधनकार्याची सविस्तर माहिती झाली, कौटुंबिक माहिती झाली, तथाकथित समाजकार्य झालं आणि इतकं सगळं झाल्यावर त्यांना त्यांच्यातल्या कलागुणांचीही तारीफ़ हवी असल्यानं त्यांनी त्यांच्या मोजक्या कविता दाखवल्या, वर म्हणाले बघा असा संशोधक तुम्हाला भेटला होता का कधी? जो इतक्या रूक्ष संशोधनकार्यातही त्याच्यातल्या काव्यप्रतिभेची पालवी अलवार हातानं जपतो आहे (हे सगळे शब्द त्यांचेच आहेत) कमालिच्या थकव्यानं म्हटलं नाही "तुमच्यासारखा" माणूसच मला पहिल्यांदा दिसतो आहे. यावर ते जाम उत्साहीत झाले आणि म्हणाले, मग याचा उल्लेख करायला विसरू नका. दोन तासांचे टोले देऊन काटा पुढे जायला लागला तसा मला इतका मानसिक थकवा आला की अखेरीस सगळे शिष्टाचार विसरून त्यांना म्हटलं सध्यासाठी ही मुलाखत इथे थांबवुया बाकीचं जरा सविस्तर नंतर बोलू. अगदी सुदैवानं त्याचवेळेस मोबाईल वाजला, त्यावर फ़ोनकंपनिची सुंदरी केकटत होती की अमूक रिंग टोन घ्या आणि तमूक घ्या. संधीचा फ़ायदा उचलत मी अगदी घाईत उठले आणि मला जायला हवं जरा तातडीचं काम आहे म्हणून या भयंकर हुशार माणसाच्या तावडीतून सुटका करून घेतली. त्या दिवशी पहिल्यांदाच मला वेळीअवेळी केकाटणार्या मोबाईल सुंदरीबद्दल माया दाटून आली.
 

पुन्हा तेच?

मुंबईच्या माथीच इतकी संकटं का? या शहराला कोणी वाली आहे की नाही? इतजे दिवस बॊम्ब फ़ुटत होते सामान्य चाकरमन्याच्या पायात यावेळेस मात्र सोकॊल्ड एलाईट क्लासही या शहरात सुरक्षित नाही हे जाणवल्यावर पायाखालची जमिन नव्यानं सरकली. रोज सकाळी लोकलसाठी धावताना आजचा दिवस कसा जाईल याची चिंता पोटात दडपत धावणं कधी संपणार आहे की नाही? असं काही घडलं की घराबाहेर असणारया आपल्या माणसांची खुशाली समजेपर्यंतचे क्षण आणि ते माणूस घरी परतेपर्यंतचे तास मुंबईकर जीव मुठीत घेऊन घालवतात. दुसरया दिवशी नाईलाजानं पुन्हा त्याच रूटिनमध्ये परतावं लागतं आणि सगळं जग याला मुंबई स्पिरिट म्हणून नावाजतं. कसलं आलंय स्पिरिट? या शहरात कोणाच्याही पुढच्या मिनिटाच्या श्वासाची शाश्वती राहिलेली नाही. निर्लज्ज पुढारी आणि त्यांचं आंधळं सरकार यांनी सगळा देश जणू विकायला काढलाय. सगळ झाल्यावर पाकिस्तानला तंब्या दिल्या आणि दाऊदच्या अटकेची मागणी केली की कडा जवाब दिल्याच्या मस्तीत हे लोक पुढे चालत रहातात. दाऊदच्या गोवरया मसणात जायची वेळ आली तरी यांना तो सापडत नाही. तिकडे अमेरीका सद्दामला मुसक्या बांधून आणते. या देशातले सगळेच्या सगळे राजकारणी देश विकून विमान पकडून दाऊदप्रमाणेच एक दिवस फ़रारी होतील. एखाद दुसरा नेता सोडला तर सब घोडे बारा टक्के असा प्रकार झालाय. कोणाकडे पहायचं आम्ही? आम्ही निवडून दिलेल्या नेत्यांची वैयक्तिक प्रगती होत असताना आम्ही मात्र जिथे होतो तिथेच आहोत. यांना ए पासून झेड पर्यंतच्या सुरक्षा आहेत त्यामुळे यांच्या बुडाला काय आच लागणार? जीव जातो तो सामान्यांचा. यावेळेस तर बर्ड फ़्ल ची साथ आल्यासारखे सगळे राजकारणी बाश्कळ पकपक करत आहेत. एकेकाचा उद्दामपणा माणूसकिला लाज आणणारा आहे. वर जे वागतोय, बोलतोय त्याबद्दल ना खंत, ना खेद ना लाज. लाज वाटते आम्हाला अशा माणसांना आमचा "प्रतिनिधी" म्हणविण्याची. आम्ही असे नाही. शेजारच्या घरी मयत झालं तर आमच्या चेहरयावर चार दिवस हसू येत नाही आणि हे नेते खुशाल हसरया चेहरयानं बाईट देत सरेआम फ़िरत आहेत. अशा वेळेस खरं तर संयमानं परिस्थिती हाताळायला हवी. सामान्यांचा संताप लक्षात घेऊन त्यावर समजुतदारपणानं फ़ुंकर घालायला हवी. उलट यांचा उद्दामपणाच दिसून येतोय. तुम्हाला खुर्ची दिलिय ती आमच्या हितांचं रक्षण करण्यासाठी याची जाण ठेवा. या नेत्यांच्या लाल दिव्यांच्या गाड्या काढून घेऊन त्यांना लोकलनं प्रवास करण्याची सक्ती करायला हवी. मुंबईकरांवर झालेल्या या आणखी एका हल्ल्यानं चीड आलीय आणि कमालिचं हताशही वाटतंय? आम्हाला खरंच कोणी वाली राहिला नाही का?
 

यांचं काय करावं?

काहीजण खरंच खुप हुशार असतात आणि काहीजण इतके हुशार असतात की कधी कधी त्यांची हुशारीच त्यांच्या मार्गात आडवी यायला लागते. बरं पुन्हा स्वत:बद्दल यांची मतं इतकी पक्की असतात की त्यांना जरा खाली खेचून जमिनिवर आणणंही शक्य असत नाही. अशा हुशार लोकांच्या मुलाखती घेण्याचं कर्मकठीण काम पत्रकाराला करावं लागतं तेंव्हा जी हालत होते ती "जावे त्याच्या वंशा" की कायसं त्याप्रमाणे असते.
पत्रकारीता करताना ज्या अनेक गोष्टी नशिबातून चुकत नाहीत त्यापैकी एक म्हणजे मुलाखत घेणे. बरं नामवंत व्यक्तीची किंवा खरोखरच काही भरीव काम केलेल्यांची मुलाखत घेताना एक प्रकारचा आनंद होतो मात्र बर्याचदा काही सेटिंगमुळे सोम्या गोम्याची मुलाखत घ्यायची वेळ आली की अगदी डोक्यावरचे केस उपटून घ्यायची वेळ येते. पत्रकार म्हणून काम करत असताना तर असे अनेक नमुने भेटत रहातात. पत्रकार ही एक व्यक्ती अशी असते की जिला सगळ्या विषयातलं सगळं समजतं किंवा बहुतेकवेळा किमान आव आणण्यापुरतं तरी प्रत्येक विषयातलं समजतं असं भासवावं लागतं. त्यातून एखाद्या व्यक्तीची मुलाखत "असाईनमेंट" म्हणून आपल्या कुंडलीत मांडलेली असेल तर विचारूच नका. अनोळखी माणसांच्या मुलाखती घेणं मला तरी जाम मनोरंजक आणि त्याचवेळेस काटा आणणारं काम वाटतं. अशा मुलाखती एकतर अगदी टाईमपास करणार्या होतात किंवा जाम पकाऊ. उमेदवारीच्या काळात तर अशा भन्नाट अनुभवांचा प्रचंड साठाच माझ्याजवळ जमा झाला. सुरवातिला मीं मुलाखत घ्यायला जायची म्हटल्यावर प्रामाणिकपणानं त्या व्यक्तीबद्दलची किमान माहिती काढून जायची पण नंतर नंतर लक्षात आलं की बर्याचदा या मुलाखती मार्केटिंगवाल्यांच्या सेटिंगमुळे घडवून आणल्या जातात.
विद्यार्थी पत्रकार म्हणून काम करत असताना एकदा अशिच चमालध झाली. तोपर्यंत मी साक्षात अशी मुलाखत कोणाचिच घेतली नव्हती. कार्यालयात आल्यावर नावापुढे असाईनमेंट होती की, "ह.भ.प. अमूक ढमूक यांची मुलाखत." विषयाचं वाटप करणार्यानं एका ओळीत विषय मिटवून टाकला असला तरी माझ्यापुढे प्रश्नांची जंत्री. मुळात हे ह.भ.प. कोण, त्यांचं वय काय, त्यांचं कार्य काय आणि त्यांची मुलाखत घेण्याचं प्रयोजन काय? ते कुठे भेटतील आणि त्यांना काय विचारायचं हा तर खुपच दूरचा मुद्दा. आजुबाजुच्या चारजणांना विचारलं तर त्यांनी एक चमत्कारीक हसू देण्याव्यतिरीक्त काहीच मदत केली नाही. अखेरीस एक मार्केटिंगवालाच मदतिला धावला. त्याला ही व्यक्ती चक्क माहिती होती (असा त्याच्या बोलण्यावरून माझा समज झाला) त्याच्या बाईकवरून आम्ही ह.भ.प. महाशय भेटण्याच्या संभवित जागांवर जाऊन आलो.अर्धा एक तास भटकल्यानंतर अखेरीस गावात कुठेतरी पारायण सोहळा चालला होता तिथे ते भेटले. बरं मांडवातले सगळेच मला ह.भ.प. वाटत असल्यानं आम्हाला हवे असलेले कसे शोधायचे हा उपप्रश्न निर्माण झाला. अखेरीस एका व्यक्तीनं आम्हाला हव्या असणार्या ह.भ.प. ना भेटवलं. त्यांच्या समोर बसल्यावर मनात पहिला विचार आला की सुटले एकदाची आता पटपट प्रश्न विचारून आटपावं एकदाचं. सुरवात करावी म्हणून सरसावले आणि लक्षात आलं की नक्की काय विचारायचं यांना? आणि कशाबद्दल मुलाखत आहे? याचा पत्ताच नाहीए. बरं पारायण, किर्तन किंवा असल्या गोष्टींशी दूरचाही संबंध नसल्यानं मनात जरा भितीच होती की समजा समोर बसलेली व्यक्ती या क्षेत्रातली महान, आदरणिय व्यक्ती असायची आणि माझ्याकडून काही कमी जास्त विचारलं गेलं तर? मी आपली बिचकत बिचकत सुरवात केली. उगाच आपलं इकडचं तिकडचं बोलणं सुरू केलं. समोरून काहीही प्रतिसाद नाही. वाटलं आजोबा मनातल्या मनात नामस्मरण करतायत की काय. मी आणि मिस्टर मार्केटिंगवाले एकमेकाडे हैराण होऊन बघत असतानाच खोलीत एकजण चहा घेऊन आला तो भक्तीभावानं आम्हाला म्हणाला की,"आबांना ऐकाय जरा कमी येतंय तवा मोठ्यानी बोला" मी माझ्यापरीनं मोठ्यांदा बोलून पाहिलं पण काही उपयोग झाला नाही. मिस्टर मार्केटिंगवाल्यानं प्रयत्न केले त्याला जरा जरा यश आलं कारण आता आजोबा किमान "अं"? असा प्रश्न विचारायला लागले पण पहिल्या दहापाच प्रश्नांना "अं"? हेच उत्तर मिळाल्यावर आमची उमेदच खचली. इतक्यात मघासचे चहावाले परत एकदा देवासारखे धावून आले. त्यांना मिस्टर मार्केटिंगवाल्यानं पकडलं आणि त्यालाच प्रश्न विचारले. ज्याची माहिती त्याला नव्हती ती त्यानं आबांच्या शब्दश: "कानपटिला" बसून विचारली. तासाभरानंतर मुलाखत संपली आणि आम्हाला समजलं की अखेरच्या दिवशी समिती आमच्या पेपरात अर्धपान जाहिरात देणार असल्यानं या मुलाखतिचा घाट घालण्यात आला होता. पत्रकारीता शिकत असताना "मुलाखतिचे तंत्र आणि मंत्र" यावर अखंड साठ मिनिटं भजन ऐकल्याचं तात्पर्य त्यादिवशी समजलं की ते सगळं मार्क मिळविण्यासाठी असलं तरी प्रत्यक्षात मुलाखत हे प्रकरण भलतंच असतं. कार्यालयात आल्यावर कितीतरीवेळ आधी हसायलाच येत होतं. एका वरिष्ठाला हा प्रकार सांगितल्यावर त्यानं दिलेलं बोधामत तर आणखिनच चविष्ठ होतं तो म्हणाला ह.भ.प. यांची मुलाखत घ्यायला गेलेली जगातली तू एकमेव पत्रकार असशिल. विषय बघून ठरवायचं की प्रत्यक्ष जायला हवं की फोनवर काम होईल. वर पुन्हा प्रत्यक्ष जायला कोणी सांगितलं म्हणून हजेरी घेतली ती वेगळीच.बरं आता जाऊन आलोच आहोत तर लिहावी चांगली दणदणीत मुलाखत म्हणून रंगवून रंगवून मुलाखत खरडून ट्रे मध्ये टाकली आणि दुसर्या दिवशी उत्सुकतेनं पेपर उघडला तर दोन कॊलमात विषय मिटवून टाकला होता. सुरवातिची काही वाक्य आणि अखेरचा टप्पा यातच ह.भ.प. यांची मुलाखत संपवून उपसंपादक महोदयांनी मुलाखतिचं चिज केलं. मुलाखत या प्रांतातला माझा हा पहिला आणि माझ्यामते तरी भन्नाट अनुभव म्हणून सांगितला. आणखी काही नमुनेदार मुलाखतींबाबत सांगितल्याशिवाय रहावत नाहीए पण असं धावत पळत सांगण्यात काही अर्थ नाही. तेंव्हा त्यांच्याबद्दल जरा विस्तारानं नंतर.
 

नवरा येई मदतिला तोची दिवाळी दसरा

पुन्हा एकवार नवरा पुराण. काय करणार? जगातल्या सगळ्या पुरूषांना विनोद करण्यासाठी बायका पुरतात तसंच आम्हा बायकांनाही फ़ावल्या वेळेत काही लिहायचं म्हटलं की नवरयाचे प्रतापच सुचतात त्याला काय करायचं?आज आवरू उद्या आवरू करत घरात पसारा प्रचंड झाल्यावर कुठून आवरावं हे कळेनासं झालं की नवरयाला साद घालण्याशिवाय पर्यायच रहात नाही. संकटसमयी एखादा भक्त जसा गलितगात्र होउन भगवंताला साद घालतो तशीच साद नवरोबांना घातल्यावर तोही बि़चारा तत्परतेनं धावत येतो. त्याचा हेतू इतका प्रचंड चांगला असतो की त्या मदती दरम्यान जे घोळ होतात त्याबद्दल त्याच्यावर चिडावं की आपल्या डोक्यात दगड पडल्यासारखं त्याला मदतिला बोलवलं म्हणून स्वत:वरच चिडावं काही समजत नाही.
जरा दिवाळी तोंडावर आलीय म्हणून कधी नव्हे ते पडदे वगैरे धुवायचं काम अस्मादिकांनी कामवालीकडे न सोपविता स्वत:कडे घेतलं. आता उंचीवरचे पडदे काढण्याइतकी उंची नसल्यानं घरातल्या एकमेव जिवंत शिडीला साकडं घातलं. पडदे काढण्यासाठी पायाखाली खुर्ची हवी होती म्हणून ती ओढताना त्यावरचा कपड्यांचा ढीग ढबाककन खाली पडला. झालं. आमची शाळा सुरू. ही काय कपडे ठेवायची पध्दत झाली? अमूक आणि तमूक. इतकी छान सुवर्णसंधी लाभल्यावर गाडी आमच्या जवळपास दर रविवारच्या कपडे खरेदीवर घसरली नसती तरच नवल.इतकं सगळं होईपर्यंत पडदे काढायला चढलेला नवरा बारसहित उतरतो. म्हणजे पुन्हा बार चढविण्याचं काम वाढलं नाही का? बरं काही बोलायची सोयही नाही. किचन स्वच्छ करण्यासाठी किचमधली ट्रॊली बाहेर काढ म्हट्लं तर अशी बाहेर काढली की ती आत घालविण्यासाठी सुताराला बोलवायला लागलं. पुन्हा ट्रॊली काढतानाही याचा तोंडाचा पट्टा चालूच, हॊटेलातून पार्सल मागवल्यानंतर रिकामे डबे घासून त्यात काही बाही ठेवण्याची माझी मध्यमवर्गिय सवय, तर डब्यांचा हा ढीग पाहून त्याचं डोकं तडकलं, अगं किती हे डबे, कशाला हवेत हे रिकामे डबे? टाकून द्यावेत ना वेळच्यावेळी. असं म्हणत त्यानं भराभर डबे मोठ्या पिशवीत गोळा करायला सुरवातही केली.जीव तुटला हो तटतट. कुठून याला मदतिला बोलवलं असं झालं. किचन मधून हकलण्यासाठी व्हॆक्युम क्लिनर लाव म्हटलं तर याला जाम उत्साह चावला. हातात घुईं वाजणारा व्हॆक्युम क्लिनर घेउन दे दणादण सग्ळीकडे सैरवैरा धावत सुटला. या गोंधळात सोफसेट भिंत सोडून मैदानात आला, सेंटर टेबल पार बाहेर टेरेसमध्ये गेलं, वॊलयुनिटनं त्याची जागा सोडली थोडक्यात सगळ्या गोष्टिंनी त्यांची आसनं सोडली आणि अंदाधुंधी माजल्यासारख्या त्या इकडे तिकडे पस्ररल्य. सगळं घर घाम गाळून स्वच्छ केल्यानंतर त्याला व्हॆक्युम क्लिनर स्वच्छ करण्याची उचकी लागली. कसं करायचं हे सांगायच्या आत पिशवी काढून कचर्याच्या डब्यात ती उलटीही झाली होती. त्यातून उडालेली धूळ त्याच्या तोंडावर आणि आजुबाजुला पसरली. म्हणजे आता या सगळ्याच्या सफ़ाईचं जास्तिचं काम उगवलं. कुठून याला मदतिला बोलवलं असं झालं. घर आवरण्यापेक्षा जसं होतं तसंच बरं होतं म्हणायची वेळ आली. पुन्हा दोन तासात मला शिस्त कशी नाही हे त्यानं प्रत्येक काम करताना पटवून दिलं. आता मात्र रडायला यायला लागलं. एकतर आवरासावरीचा उत्साह ओसरला होता आणि पोटात भुकेनं कल्लोळ माजवला होता. आता आवर बाबा तुझं सफ़ाई अभियान असं म्हणावसं वाटलं. किल्ली दिलेलं खेळणं कसं किल्ली उतरेपर्यंत वाजतच रहातं वाजतच रहातं तसा हा किल्ली मारल्या सारखा आवरतच राहिला आणि सगळं पसरतच राहिला. अखेर एकदाची किल्ली उतरली आणि दमलो बुवा म्हणून हुश्श करून बसला. इतक्या पसारयात जेवणाचे बारा वाजले होतेच त्यामुळे बाहेरून मागा्वलेलं भुरकून खाताना म्हणतो कसा, बघ, आज मी होतो म्हणून तुझं आवरून झालं. नाहीतर तुझ्या एकटिच्यानं झालं असतं का सगळं? जेवण झाल्यावर हा घोरत पडला आणि मी त्यानं पसरलेलं आवरत बसले. दिवसभर आवरल्यानंतर डोकं इतकं भणभणायला लागलं की रात्री स्वप्नातही मी आवरतच होते.
 

जानुची गोष्ट : २

...........झालं ते झालं म्हणत त्या दिवसापासून जान्हवीनं घरातून लक्षच काढलं. एकाएकी तिला समरची आठवण यायला लागली. आपला निर्णय चुकला ही शंका ममाशी झालेल्या वादावादीनंतर पहिल्यांदाच आली आणि लग्नात कौतुकं पुरवून घेणार्या धनुला पाहून तिला खात्रीच पटली की आपण त्यागा बिगाच्या नशेतच होतो...फक्त आपण....धनू, आई, समर सगळे उघडे डोळे असणारे होते आणि आपल्याच डोळ्यावर गुंगी चढली होती. त्यानंतर पहिल्यांदाच तिनं कोणाकोणाकडून समरचा पत्ता घेतला, त्याचा ई-मेल मिळवला आणि थरथरत्या बोटांनी त्याला एका आवेशातच मेल लिहिली. तिच्या मेलला उत्तर म्हणून समरनं फोटो पाठवले होते, त्याच्या टुमदार बंगलिचे, ज्यात कदाचित जान्हवी राहिली असती, बंगलिसमोरच्या सुंदर बगिच्याचे, जो कदाचित जानुच्या हातांनी फुलला असता, सगळ चित्र समर-जान्हवीनं पाहिलेल्या चित्रासारखंच होतं, अचूक....मात्र त्यातल समरसोबतचा हसरा समाधानी चेहरा जान्हविचा नव्हता, त्या हसर्या चेहर्याशी चिमण्या मुठींनी मस्ती करणारा गोंडस जीव जान्हवीचा अंश नव्हता...चित्राची एक बाजू परिचित होती आणि दूसरी मन भयभित करणारी. तिच्या मेलला उत्तर देण्याची तसदिही समरनं घेतली नव्हती, तिनं जीव तोडून लिहिलेल्या शब्दांना उत्तर म्हणून त्यानं पाठवलेली चार छायाचित्रं तिला सैरभैर करून गेली. यथावकाश फोटोतल्या समाधानी चेहरयाचं आणि कडेवरच्या बाळाचं नावही समजलं. ज्यांच्या तिचा काहीच संबंध नव्हता. धनुच्या संसाराला मदत म्हणून गेलेली ममा तिकडेच रमली. तिच्या आयुष्यातलं धनुचं स्थान पहिल्यांदाच जानुला टोचायला लागलं. एरवी त्यांचं गुळपीठ हा तिच्या थट्टेचा विषय असायचा आता संतापाचा झाला.....



......आयुष्य कोणासाठी थांबतं? आपल्या गतीनं त्याला जितकं पुढे सरकायचं तितकं ते सरकतच रहातं. जानुचं आयुष्यही सरकत राहिलं, तिला नकोसं झालेलं असलं तरी. धनुचं लग्न झाल्यावरचा रितेपणाही हळू हळू सवयिचा झाला. आपली गरज खरं तर कोणालाच नसते हे सगळे आपण निर्माण केलेले पाश असतात....धनुच्या बायकोचं आणि ममाचं रितीप्रमाणे पटेनासं झालं. सुरवातिला त्यांना ममाची गरज होती. तितके दिवस त्यांनी तिच्याशी गोड बोलून काम साधून घेतलं. नंतर नंतर वाद व्हायला लागले. धनुची बायको, श्र्वेता, त्याला सुचवू लागली की तिकडे जानू एकटीच आहे. सगळ्या घरावर कब्जा करेल आपल्या माघारी, मग काय कराल? त्यापेक्षा तुमच्या आईला तिकडे पाठवा, त्यांच्यावर वचक राहिल. धनुलाही हे पटलं त्यानं निमित्त काढून आईला परत पाठवलं. तिला समजलं नव्हतं असं नाही पण धनुशिवाय तिच्या असण्याला तिच्यालेखी काही किंमत नव्हती. सगळं आयुष्य त्याच्याकडे पाहून काढल्यावर आता ती कोणासाठी जगणार होती? जानुकडे ती परतल्यावर या दोघिंचं असं आयुष्य पहिल्यांदाच चालू झालं. दोन टोकांवर रहाणार्या दोघीजणी आधीच एकमेकीसाठी परक्या होत्या. त्यात ममाला अलिकडे काय झालं होतं कोणास ठावून जानुचे पैसेही ती घरासाठी वापरायची नाही. धनुच्या पैशांची वाट पहात रहायची. सगळ्याचा एकीकडे त्रास होत असतानाच सवयही होत होती. श्र्वेताला दिवस गेल्याचे कळल्यावर ममा त्या आनंदाच्या भरात चक्क जानुशी चांगलं बोलली, गोड जेवण बनवलं आणि तिच्याचसोबत जेवायला बसली. दुसर्या दिवशी सकाळी उठून तिनं बॆग भरली, जानुनं विचारलं की बॆग का भरलीस? तर म्हणाली, धनुचा कधिही फोन येईल, तिच्या मदतिला जायला नको? जानूनं विचारलं,"अगं तिची आई आहे नां करायला? तू कशाला दगदग करतेस?" यावर कुठेतरी हरवलेली ममा म्हणाली,"एकच एक मुलगा, त्याचं सगळं व्यवस्थित झालं की मी डोळे मिटायला मोकळी"......
श्र्वेताला मुलगी झाली आणि आईनं तिच्या गर्भारपणातल्या तिसर्या महिन्यापासून सगळं घर सांभाळलं. श्र्वेताच्या आईनं बाळंतपण करायला जमणार नाही म्हणून सांगितलं तर हिनं आनंदानं केलं. बाळाला सांभाळणं, स्वयंपाक सगळं ममा जातिनं करायची. धनुची मुलगी, ईशा वर्षाची झाली. तिच्या वाढदिवसाला गेलेली जानू धनुच्या संसारात पहिल्यांदाच जात होती. बारशाच्यावेळेस अनोळखी माणसांच्या गर्दित हरवलेली जानू अंधार्या गॆलरीत एकटिच उभी होती आणि तिच्या कानावर आतल्या खोलितले संवाद पडले, आतल्या लोकांना बहुदा जानुच्या तिथं असण्याची कल्पना नसावी."अजून किती दिवस सासुला ठेवून घेणार आहेस? आलिय नां तुझी नणंद तिच्यासोबत पाठव तिला." एका पोक्त बाईचा आवाज होता."हो, नां, अगदी गळ्यातच पडल्यात लग्न झाल्यापासून. जरा म्हणून मोकळीक नाही. सतत आपलं धनू धनू करत यांच्यापाठी असतात. उगाच एका माणसाचा जास्तिचा खर्च आम्हीच काय म्हणून सोसायचा? तिकडे त्या मॆडम घरखर्चाला पैसेही देत नाहीत बहुतेक. सतत यांना फोन करत असतात, इतके पैसे दे आणि तितके पैसे दे. यावेळेस मी सरळ सांगणार आहे की आई दोघांची आहे नां, मग खर्चही निम्मा करा. शिवाय आमच्या घरावर कब्जा करून बसल्यात ते वेगळंच. आता या तिथे आयुष्यभर रहाणार म्हणजे ते घर विकताही येणार नाही आणि आम्ही तिकडे जाणार नाही म्हणजे आम्हाला त्याचा काही उपयोगही नाही. इकडे जरा मोठं घर घ्यायचा विचार होता पण तिकडचं घर विकलं तर पैसे वरच्यावर उभे रहातील नां, कुठलं काय या बाईसाहेब जोवर त्या घरात आहेत तोवर आम्हाला काही एक पैसा मिळू द्यायच्या नाहीत." हा आवाज नक्की श्र्वेताचा होता. खरं तर इतकं ऐकल्यावर संतापानं जानुच्या डोळ्यातून घळघळा पाणी यायला लागलं होतं. एकदा वाटलं सरळ समोर जाऊन जाब विचारावा पण मग तिनं ठरवलं की इथेच उभं राहून आणखी काय गरळ ओकतायत ते ऐकावं. आता श्र्वेताची आई म्हणाली,"तरी बरं, अधून मधून गोड बोलून तुम्ही दोघांनी सासुचे दागिने तरी किमान तुमच्याजवळ ठेवून घेतले ते. नाहितर सगळंच तुझी देखणी नणंद हिरावून घेउन बसली असती. स्वत:च्या रूपाचा इतका गर्व आहे तर लग्न का करत नाही? अजुनही किमान एखादा बिजवर तरी नक्की मिळेल" यावर श्र्वेता म्हणाली,"अगं त्यांना म्हणे कोणीतरी मुलानं धोका दिला त्यामुळे यांनी लग्न न करण्याचा निर्णय घेतला. अगदी लग्नापर्यंत प्रकरण आलेलं असताना तो पळून गेला म्हणे परदेशात, प्रकरण इतकंच होतं की पुढे गेलं होतं कोणास ठावूक" "तरी बरं बाई श्र्वेता तू बाळंतपण सगळं तुझ्या सासुच्या गळ्यात घातलंस, शिवाय वर्षभर बाळही सांभाळायला लावलंस. तेव्हढेच पैसे वाचले बेबीसिटिंगचे"यावर दोघी खिदळत बाहेर पडल्या. संतापानं लाही लाही झालेली जानू बाहेर आली. चार लोकांत मिरवणार्या श्र्वेताला बघून तिला तिडिक आली. एरवी वन्सं वन्सं करत गोड बोलणार्या श्र्वेताचा खरा चेहरा असा असेल याची तिला कल्पनाही नव्हती. कार्यक्रम संपल्यावर सगळे बसलेले असताना तिनं धनुला सांगितलं की सकाळी ती जाणार आहे आणि सोबत ममालाही घेउन जाणार आहे, हे सांगताना तिनं श्र्वेताकडे सहेतूकपणानं पहात म्हटलं की,"नाही तरी आता दुसरं मूल होईपर्यंत बेबीसिटिंगचं काम संपलेलंच आहे नाही का? शिवाय तिकडे माझ्याकडे आणि घराकडे लक्ष द्यायला आई हवीच नाही का?" माझ्याकडे आणि घराकडे यावर विशेष जोर देत तिनं श्र्वेताच्या आईकडेही जळजळीत नजरेनं पाहिलं. धनूला काहिच कल्पना नसल्यानं तो आपला म्हणत राहिला की,"पहिल्यांदाच आली आहेस तर रहा की आणखी काही दिवस. आलीस तेंव्हा तर म्हणत होतीस की निवांत राहिन म्हणून आता एकदमच काय झालं?" यावर काही न बोलता तिनं आईला बॆग भरायला सांगितली आणि अचानक आठवल्यासारखं धनुला म्हणाली की," धनू , इतके दिवस का माहित नाही पण ममा तू पाठवलेले पैसेच वापरायची, मी तिला दिलेले पैसे तिनं तिच्या कपाटात जसेच्यातसे ठेवले आहेत. पण आता तूच तिला सांग. महिन्याचा घरचा सगळा खर्च मी पाहिन आणि तिला खर्चाचे पैसे दोघेही निम्मे निम्मे देत जाऊ" आता मात्र श्र्वेता आणि तिची आई चपापल्या आणि सरळ स्वयंपाकघरातच निघून गेल्या. आईच्या मनात तिथेच रहायचं होतं पण जान्हविच्या रेट्यापुढे तिचं काही चाललं नाही आणि धनू किंवा त्याची बायकोही तिला रहा म्हणाले नाहीत तेंव्हा नाईलाजानं ती यायला तयार झाली. प्रवासात जानुनं ममाला श्र्वेता आणि तिच्या आईच्यातला संवाद जसाच्या तसा सांगितला त्यावर ममा म्हणाली,"तुझं आपलं काहीतरीच जान्हवी. चार माणसं म्हटली की चार तर्हा आल्या, त्याचा इतका बाऊ करू नये. त्या काही वेगळं बोलत असतील आणि तू आपलं अर्धं काही ऐकून डोक्यात राख घालून घेतली असशिल. धनुच्या सासुरवडिच्या लोकांना तुझ्यापेक्षा जास्त मी चांगलं ओळखते. सोन्यासारखी माणसं आहेत. तू ऊगाच नाही त्या शंका पसरवू नको" हे ऐकून जानुच्या डोक्यात तिडिकच गेली. ती ममाला म्हणाली,"तू, तुझा धनू आणि त्याची बायको, खड्ड्यात जा. मला वाईट वाटलं म्हणून बोलले. आज बोलले ते अखेरचं समज." त्या दिवसापासून जानुच्या आयुष्यातून घरगुत समस्यांना पूर्णविराम मिळाला....
 

जानुची गोष्ट

जानूनं दार उघडलं आणि रितूला "गुड नाईट" म्हणून निरोप दिला. रितूनं विचारलंही,"आर यू ओके बेबी?" त्यावर जानून हसत सांगितलं,"वन थाऊंजंड पर्सेंट, बा<<<य सी यू टु...मा....रो" म्हणत दार धाडकन लावून घेत ती तशीच भेलकांडत आत आली. तेव्हढ्या वेळातही बाजुच्या म्हातार्यानं दार उघडून तिच्या येण्याची दखल घेतल्याचं तिला जाणवलं आणि तोंडून कधी नव्हे ते प्रकट शिवी आली,"स्साला". कशीबशी आत येत ती बेडवर आडवी झाली आणि उलट सुलट विचारांच्या गरगरीनं झोपेच्या आधीन झाली. मनातले उलटे सुलटे विचार तिला झोपू देत नव्हते आणि मद्याचा अंमल तिला जागू देत नव्हता. अशाच भिरभिर अवस्थेत कधीतरी ती झोपून गेली. सकाळी जाग आली तेंव्हा सुलभामावशी घर आवरत होती. खरं तर तिला जाग आलीय की नाही हेच आधी समजलं नाही. तिच्या संवेदना जणू संपून गेल्या होत्या. मात्र "काफी करू का ताई?" असा सुलभामावशीचा परिचित आवाज कानावर पडला आणि खरंच जाग आलीय याची खात्री पटली. तिच्या अवताराकडे पाहून सुलभामावशी काळजिनं म्हणाल्या,"तब्येत बरी नाही का ताई?" तिला काही उत्तर न देताच जानू बाथरुममध्ये शिरली. गरम पाण्याच्या शॊवरखाली बरं वाटेल म्हणून उभी राहिली आणि उलट विचारांचा गुंता आणखिनच सुटा व्हायला लागला. सुधेंदू तर म्हणाला होता की,’एक दोन पेगनंतर यु विल बी ऒल राईट, ये गम, तकलिप सब हवा में उड जाएगा बेबी. हॆव इट’ रात्री काहीकाळ वाटलंही तसंच पण मग घरात आल्यावर पुन्हा त्याच गुंत्यात मेंदू गुरफटत गेलाच. आता अजून डोळे उघडले नाहीत तोवर परत तेच विचार आणि तेच कढ....रात्री गाडीत रितू विचारत होती,"तुला आशु गेलाय याचं वाईट वाटतंय की तो समरसारखाच गेला याचं? तू तुलना करतेयस तुझ्याच भूतकाळाची तुझ्या वर्तमानाशी. समर वॊज पास्ट आणि आशुही लवकरच तुझा पास्ट बनेल, कोणाच्या जाण्यानं कोणाचं आयुष्य थांबत नाही जान्हवी आणि ते थांबुही नाही. कोणा समर आणि आशुपुरतं आयुष्य जगायला देवानं तुला जन्माला घातलेलं नाही. जिसको जाना है बेबी वो जायेगाही तकलिफ में रहेगी तू. समरने अपनी जिंदगी ढुंढ ली आशुभी ढुंढही लेगा. तू अकेली हो जाएगी. ज्यादा सोच मत...." हे आणि असंच काही बाही रितू जानुला समजावत राहिली होती. त्यातलं काही डोक्यात शिरत होतं काही नव्हतं. सगळं पटत होतं आणि तरीही पटत नव्हतं. रात्री झोपेतही सतत आशु आणि समर आळीपाळीन दिसत राहिले. समर म्हणत होता,"कम ऒन जानू, तू एकटीच परदेशी सेटल होणार नाहीएस. तू तिकडे आलीस याचा अर्थ तू तुझी नाती तोडलीस, जबाबदार्या झटकल्यास असा होत नाही. थिंक शोनू. मी जाणार आहेच तुही बरोबर असावस असं वाटतं. आलीस तर तुझ्याबरोबर नाहीतर तुझ्याशिवाय....प्लिज जानू नाही म्हणू नको" समुनं लाख विनवण्या केल्य होत्या. पण त्यावेळेस आपल्याच डोक्यावर कसलं भूत चढलं होतं देव जाणे. भूत म्हणण्यापेक्षा जबाबदारी वाहून नेण्याची नशा चढली होती. बाबांच्यामाघारी बाबा बनून घराला सावरण्याची धुंदी. घरी येणारे जाणारे, नातेवाईक सगळेचजण नावाजत म्हणत, "जानू भक्कम आहे म्हणून बरं आहे." ते ऐकताना आणखी कणखर वाटायचं. धाकट्या भावाला, धनुला, शिकवायचं आणि त्याच्या पायावर उभं करायचं स्वप्न होतं. शिकवायचं म्हणजे खरं तर त्याचं शिक्षण शेवटच्या पायरीवर होतं. तरीही आपल्याशिवाय धनू आणि ममाला कोणी नाही ही जाणिव मनात कुठेतरी सुखीही करायची. त्याच धुंदीत तिनं समरला नकार दिला. धनुलाही भरून वगैरे आलं होतं, "यु डिझर्व्ह मच बेटर" म्हणत त्यानं धीर दिला होता. समरला नकार दिला तो दिवस जानू कधिही विसरली नाही. अखेरचा आणि निकराचा प्रयत्न करावा म्हणून समरनं तिला भेटायला बोलवलं होतं मात्र त्यावेळेस तर आणखिनच ठामपणानं नकार देउन जानू घरी आली होती. समरला ती म्हणाली होती,"मी पूर्ण विचारांती निर्णय घेतलाय समर. आता माझं पाऊल मागे ओढू नकोस" समर गेला त्या दिवशी तिला एक अनामिक रितेपणा जाणवायला लागला आणि नकळत डोळे घळघळा वहायला लागले. ममाला समजलं होतं कदाचित जानू रडतेय ते पण ती काही बोलली नाही. जानुला मनातून वाटत होतं की मामा येउन पाठीवरून हात फिरवून म्हणेल,"सगळं ठीक होईल बेटा" पण मामा खोलीत आली आणि जानुला झोपलेली पाहून दार ओढून घेउन परत गेली. त्यामुळे तिला आणखिनच तुटल्यासारखं झालं. समर गेल्यावर तो मेल करेल, फोन करेल याची तिला खात्री होती; पण प्रत्यक्षात तसं काहीच झालं नाही. जायच्या आदल्या दिवसापर्यंत तळमळणारा समर तिकडे गेल्यावर जणू हवेत विरघळून गेला. त्यानं सगळ्यांना मेल केले फोन केले पण जानुला एकही फोन कधिही केला नाही. जसं काही डायरीतलं नकोसं पान फाडावं तसं जान्हवी हे पान त्यानं काढून टाकलं असावं. हळूहळू हे शल्य जानुला बोचायला लागलं. एक दिवस बोलता बोलता ती निमाला बोललीही की समरनं तिला किमान एखादी मेल करायला हरकत नव्हती. त्यावर निमा म्हणाली,"हा निर्णय तुझाच होता जानू. समरला तू हवी होतीस तुलाच तुझा कोष तोडायचा नव्हता. आता तक्रार का करतेस? त्यानं तुझ्याशी संपर्क नाही ठेवला तरी खरं तर आता तुझं काही बिघडायला नकोय नाही का?"..................


........दिवस भराभर उलटून गेले. धनूचं शिक्षण झालंे, त्याला दिल्लीत चांगली नोकरीही मिळाली. त्यानंतर सहा आठ महिन्यातच त्यानं छान स्थळं वगैरे बघून लग्न केलं. त्याच्या लग्नाच्यावेळेस जानू म्हणालिही की,"काय गडबड आहे धनू? अजून एखाद दोन वर्षांनी लग्न नाही केलं तरी चालेल" त्यावर धनूनं तिला स्पष्ट शब्दात सांगितलं की,"मला एकटं रहायचा कंटाळा आलाय. तिकडे दिल्लीत मी एकटा असतो, माझे जेवणा खाण्याचे हाल होतात शिवाय आज काय आणि आणखी दोन वर्षांनी काय लग्न करायचंच आहे. मला तुझ्यासारखं आझाद पंछी रहायचं नाही बाबा". यावर जास्त वाद न घालता जानुनं रात्री जेवताना ममालां सांगितलं यावर कधी काही न बोलणारी ममा तिला तटकन म्हणाली,"हा ज्याच्या त्याच्या आयुष्याचा प्रश्न आहे जान्हवी, त्यात एकमेकांनी तोंड खुपसू नये." हे वाक्य ममा ज्या पध्दतिनं बोलली त्याची धार जान्हविच्या मनाला झर्रकन कापत गेली. एक सेकंदभर तर ममा आपल्याला काही टोला हाणू पहातेय कां असंही वाटलं. एकंदर धनुचं लग्न तापदायक प्रकरणच झालं. धनू आठ दिवसांच्याच सुट्टीसाठी आला होता, तेव्हढ्यात ममानं चार चार मेरेजब्युरोत त्याचं नाव नोंदवलं. मैत्रिणिंना फोन करकरून सांगितलं. ममाची ही धांदल जानुला ठुसठुसत होती हे असं कां हे तिलाही उमगत नव्हतं आणि एक दिवस त्याचा उलगडा अगदी अचाकनपणानं तिला झाला. त्या दिवशी प्रभामावशिला मामा धनुला स्थळं बघण्याविषयी सांगत होती. प्रभामावशी ममाला म्हणाली एकदम धनुचं लग्न कसं काढलंस? जानुचं लग्न नको व्हायला? त्यावर ममा म्हणाली,"तिल नवरा बघणं माझ्या कुवतीबाहेरचं आहे. आम्ही काय बाई सामान्य माणसं." एकाएकी असा वर्मी घाव बसल्यानं जानू विचारात पडली, याचा अर्थ काय? ममाला तिनं प्रभामावशीसमोरच विचारलं तर ममा म्हण;ाली,"तुझ्या आयुष्यातले सगळेव निर्णय तुझे तू घेत आलीस जान्हवी. बाबा होते तोपर्यंत तुम्हा दोघांचं सगळं चालायचं. मला कधी विचारलंत? साधं शाळेतल्या स्पर्धेत भाग घ्यायचा झाला तरी मला विचारायची तसदिही घेतली नाही, समरशी नातं मोडलंस त्यावेळेसही आधी एका शब्दानं सांगितलं नाहीस आणि नंतरही काही बोलली नाहीस. कदाचित तू माझ्याशी असलं काही बोलावं इतकी माझी लायकी तुला वाटली नसेल." संतापानं थरथरणारी ममा मोठा श्वास घेउन थांबली. तिचं हे रूप प्रभाला नवं होतं आणि जान्हविलाही. दोघी आवाक होउन पहातच राहिल्या. ममा पुढे म्हणाली,"मी तुझी आई होते जान्हवी. पहिल्या पहिल्यांदा मलाही तुझ्यापासून तुटलं जाण्याचा त्रास व्हायचा, तुझ्यात ना माझं रूप आलं ना गुण. तू तुझ्या बाबांची डुल्पिकेट म्हणून जन्माला आलीस आणि बाकिच्यांनीही याची जाणिव मला सतत करून दिली. मी अगदी सामान्य रूपाची आणि गुणाची होते पण मी तुझी आई होते याची जाण ना इतरांनी राखली ना तू. माझ्या आयुष्यातून तुला वजा करायला मला खुप कष्ट पडले जान्हवी पण तुला तर तो त्रासही झाला नाही कारण मी तुज्या आयुष्यात कधी नव्हतेच." इतकं बोलून ममा तिच्या खोलीत निघून गेली. आज पहिल्यांदाच जान्हविला आपल्या आयुष्यात काहीतरी विसंगती होती हे जाणवलं. विचार केला तर ही वस्तुस्थिती होती. तिनं ममाचा "आई" म्हणून विचार कमीच केला होता. ममाला "ममा" म्हणायचं हे देखिल बाबानंच ठरवलं होतं. बाबा दिसायला खुपच देखणा होता, हुशार होता आणि त्याच्या घरची परिस्थिती सधन होती याऊलट आई दिसायला अगदीच सामान्य म्हणावी अशी. शिक्षण म्हणायचं तर बीएची पदवी होती पण परिक्षा दिली आणि लग्न झाल्यानं तिनं बाहेरचं जगही पाहिलं नव्हतं. पहिल्याच वर्षात जान्हवी झाली. दिवस गेले तेंव्हा बाबानं खरं तर आईला खुपच झापलं होतं. इतकी कशी वेंधळी म्हणून हिणवलं होतं. इतकंच नाही तर हे मूल नको असंही सांगितलं होतं मात्र ममानं सगळा त्रास सहन करत जानुला जन्म दिला. बाळाला बघायला अनिच्छेनं आलेला बाबा बाळाचं गोंडस रूप पाहून हरवूनच गेला. बाळ बघायला येणारा प्रत्येकजण "बाबांसारखीच गोरीपान झालीय" म्हणून कौतुक करत होता. सुरवातिला ममलाही याचं काही वाटत नव्हतं पण जानू मोठी व्हायला लागली आणि तिच्या आयुष्यातलं बाबाचं स्थान पाहून मनात कुठेतरी झुरत राहिली. धनू झाल्यावर ती सावरली. धनू दिसायला ममासारखाच झाला होता. शिक्षणातही अगदी हुश्शार नाही पण ठीकच होता. नातेवाईक, सासूबाई सतत धनू आणि जानूची तुलना करत. जानू त्या स्तुतीनं सुखावत असे तर धनू आत येउन आईला बिलगत असे. धनू अगदी ममाज बॊय होता. सुरवातिला जानुचा तिरस्कार करणारा धनू वय वाढलं तसा जानुचा चांगला मित्र बनला. म्हणजे जनुला तसं वाटत राहिलं. बाबा असेपर्यंत सगळं ठीक चाललं होतं. पण अचानकच बाबा गेला आणि घडी विस्क्टली. ती सावरायची जबाबदारी कोणी न सांगता जानुनं स्वीकारली. त्यावेळेस तिनं असंच ग्रुहित धरलं होतं की बाबा गेल्यावर ममा एकटी सगळं सांभाळुच शकणार नाही. हे घर सांभाळणं आणि चालवणं ही आता आपली जबाबदारी आहे. त्यावेळेस आपण ममावर कुरघोडी करतोय असं तिला जाणवलंही नाही आणि आज ममानं इतक्या स्पष्टपणानं सगळं बोलल्यावर तिला आजवरचं तिचं जबाबदार असणं फुकाचं वाटायला लागलं. त्या दिवसांनंतर सगळं बिनसतच गेलं......
 

आमचा पहिला वहिला युथ फेस्टिव्हल

आमच्या डिपार्टमेंटनं आजवर कधिही युथफेस्टिव्हलमध्ये भाग घेतला नव्हता. त्यावर्षी आमच्यातलं "टॆलेण्ट" विभागातल्या एका उत्साही सरांच्या लक्षात आलं आणि ठरलं की युथ फेस्टिव्हल मध्ये यंदा आमच्या विभागाची टिम पाठवायचीच. दुसर्या एकाउत्साही सरांनी एकांकिका लिहायचं शिवधनुष्य उचललं. कलाकारांची निवड झाली. अर्थात अस्मादिक त्यात होतेच. ऐनवेळेस सगळं ठरल्यानं खुपच घाई झाली पण आम्ही माघार घ्यायला तयार नव्हतो. होस्टेलमधून खास परवानगी मिळवून तालिमीसाठी सगळ्याचजणी जायला लागलो. रात्री दहा साडेदहा पर्यंत तालमी चालू झाल्या. इथे भ्रष्टाचार करून मेलेले आणि नंतर स्वर्गात जाऊन तिथेही हा रोग पसरवणारे राजकिय नेते आणि त्यांच्या मागोमाग स्वर्गात गेलेल्या त्यांच्या बायका असा सगळा सावळा गोंधळ कथेत होता. सगळं धमाल जमलं होतं. त्यात सगळे हौशी कलाकार असल्यानं तालमिंच्यावेळेस धमाल यायची. इतकं सगळं करून, रात्री जागल्यानं पित्त वाढवून घेउनही काही फायदा झाला नाहीच. निवडचाचणित आम्ही बाहेर फेकलो गेलो.तरीही आम्ही शस्त्रं टाकली नाहीत. त्याच कथेत फेरफार करून दुसर्या एका स्पर्धेसाठी नाव दिलं. तिथेही आम्हाला फुटाची गोळी दिली. आता तर आमच्यावरचा अन्याय दूर करण्याचा किडा जोरात चावला. त्याच कथेत फेरफार करून तिथल्यातिथे तासाभरात आम्ही पथनाट्य बसवलं आणि चाचणीसाठी उभे राहिलो. इथे चक्क आमची निवड झाली कारण दुसरं कोणी आलेलंच नव्हतं. काही का असेना, आम्ही "आत" होतो हेच आमच्यासाठी महत्वाचं होतं. आता तालमी चालू झाल्या. पूर्वीचा बाज बदलून थोडं लाऊड करताना खुपच गंमती जमती व्हायला लागल्या. संवाद बोलताना मध्येच पुर्वीचा सूर धरला जाऊ लागला. हे सगळं घोटवत बसायला वेळही नव्हता कार अवघ्या काही दिवसांवर युथफेस्टिव्हल येउन ठेपला होता. अखेरच्या दिवशी आम्हाला एक चांगली बातमी समजली की आमची एकांकिकेसाठीही निवड झालेली आहे. एकच स्क्रिप्ट आम्ही दोन ठिकाणी दोन पध्दतिंनी सादर करणार होतो. आम्ही सगळे स्मिता पाटील, नासिरूद्दीन शहा यांचे बाप असल्यानं अभिनय करायला डगमगत नव्हतो. सांगा फक्त काय करायचंय? या आवेशात होतो. कळस म्हणजे युथफेस्टिव्हलच्या दिवशीही सकाळी एका मैत्रीणीच्य घराच्य गच्चीवर आमची तालिम रंगली होती. तिच्याच घरातलं कपाट उघडून ऐनवेळेस आम्ही कपडेपट बनवत होतो. कारण आमच्याकडे साड्या वगैरे आणि मुलांकडे झब्बे असायचं काही कारणच नव्हतं. त्यातून सगळेच होस्टेलवर रहाणारे त्यामुळे उत्साहाच्याभरात कपड्यांचं काय करायचं या मुख्य मुद्द्याकडे दूर्लक्ष झालेलं होतं. मैत्रीणिच्या आई, भाऊ आणि वडिलंनी उदार मनानं त्यांची कपाटं आम्हाला उघडून दिली म्हणून बरंय नाही तर पुढार्यांच्या बायका थेट जिन्समध्ये स्वर्गात गेल्या असत्या. एकिकडे संवादांची तालिम चालली होती तर दुसरीकडे ब्लाऊज दोन इंच धरावं की तीन याचा खल चाललेला होता. ते सगळं ऐकणं खुपच मौजेचं होतं. एकिकडे भारतातल्या भ्रष्टचारावर आसूड ओढले जत होते आणि त्याचवेळेस पलिकडे लांब पायजमा जरा आखुड कसा करता येईल याबाबत चर्चा चालू होती. आमच्यामते आमची तयारी झकास झालेली होती. सगळं सामानसुमान घेउन आम्ही नाट्यगरुहात पोहोचलो. तिथे आमच्यासाठी टाळ्या वाजवायला आलेली आमची दोस्त मंडळी हजर होती ती आम्हाला पाहून युरेका युरेका करत धावत आली आणि म्हणाली होत कुठे तुम्ही? म्हटलं कां? तर त्यांनी सांगितलं की ऐनवेळेस वेळापत्रकात बदल करून एकांकिका सकाळी घेतल्या आणि संध्याकाळी पथनाट्य आहे. त्यातून आमच्या गटाची एकांकिका पहिलीच होती आणि चार पाच वेळा आमचं नाव पुकारून अखेर पुढच्या गटाला बोलविण्यात आलं होतं. आता आत शेवटची एकांकिका चालू होती. पाय गळले काय करावं सुचेना. आमच्या मित्रमंडळानं आम्हाला सगळीकडे शोधलं होतं. आम्ही मात्र रंगीत तालिम करत होतो. ते तर झालंच आणि मग लक्षात आलं की, अरे देवा! कपड्यांची तासभर केलेली टाचाटाची फुकटच गेली म्हणायची. आम्ही संयोजकांना विनंती करून पाहिली पण काही उपयोग झाला नाही. अखेर संध्याकाळच्या पथनाट्यावर लक्ष केंद्रीत केलं. एव्हाना डोक्याचा भुगा झालेला होता. काही सुधरत नव्हतं. नक्की काय करायचं हा गोंधळ झाला होता तो वेगळाच. दोन दोन गोष्टी एकाचवेळेस करायला गेल्यानं संवादांची सरमिसळ झालेली होती. आम्ही अखेर रंगमंचावर गेलोच आणि पथनाट्य म्हणून आम्हाला जे योग्य वाटलं ते सादर करून परतलो. निकाल बिकाल ऐकायचं धाडसही केलं नाही. हे सगळं झालं तरी एक गोष्ट मात्र नक्की झाली की विभागात आम्ही एक इतिहास बनविला.आमची पहिलीच बॆच होती जी युथफेस्टिव्हलमध्ये गेली. तिकडे काय झालं याला इतरांच्या लेखी फार महत्व नव्हतं. असतं तरी काय फरक पडला असता म्हणा.....:)
 

एक विशेष सूचना

रूममधल्या पसार्याविशयी सांगताना जरा जास्त्च लिहिलं गेलं बहुदा आणि पोस्ट करताना ब्लोगलाही जरा जास्त्च झालं असावं. त्यामुळे अखंड लेखाचे तुकडे करून पोस्ट करावे लागले :) तर प्रथ अध्यापासून पित्ताच्या गोष्टीपर्यंत सलग वाचावे.
चू.भू.दे.घे.
 

रूम नं. १६ मधला "मेस" प्रथम अध्याय

......तर आमच्या रूममध्ये जवळपास अख्खं हाॅस्टेल ठिय्या मारून असायचं. याचं कारण म्हणजे, आमची रूम हाॅस्टेलमधे आल्या आल्या पहिलीच होती. डिपार्टमेंटपासून तंगडतोड करून आलेले थकलेले जीव घटकाभर टेकायला म्हणून रूममध्ये डोकावायचे. कोणी स्टडीमधून उशिरा परत यायचं आणि तोपर्यंत मेसवाली मावशी भांडी वाजवायच्या तयारीत असायची त्यामुळे भुकेले जीव पोळ्या तोडायला धाव घ्यायचे. घरातलं तूप, लोणचं चटण्यांसोबत मेसमधलं  पोळी नामक रबर खायचा प्रयत्न केला जायचा. प्रत्येकीचं लोणचं तूप वेगळं. हाॅस्टेल इकडे तीन मजले आणि तिकडे चार शिवाय चार विंगमधे  पसरलेलं. मग केवळ तूप लोणच्याची डबडी आणण्यासाठी इतकं चालणं जीवावर यायचं.
तिसऱ्या मजल्यावर रहाणाऱ्या पोरी त्यांच्या तुपा-लोणच्याच्या बरण्या आमच्याच खोलीत ठेवून जायचा. रोज इतकं "ओझं" उचलून आणायचे न्यायचे कष्ट वाचावेत म्हणून आमच्या "कोठी घरात" ही सगळी रसद साठवली जायची. बरं हेच नाही तर, कोणाचे इस्त्रीवाल्याला द्यायचे कपडे कोणाचे इस्त्रीचे आलेले कपडे..... असं सग्गळं  पोटात आनंदानं पचवून आमची खोली खऱ्या  अर्थानं नांदतं गोकूळ  होती. बरं, हे सगळं आमच्या खोलीत पडू द्यायला आमचं मोठं मन हे मुख्य कारण असलं तरिह एक उपमुख्य कारणही होतं. कारण हे जे इस्त्रीचे आलेले कपडे होते ते अक्षरशः लाईफ सेव्हर होते. काय व्हायचं की, बऱ्याचदा (म्हणजे खरंतर रोजच) आंघोळीहून  येईपर्यंत उशिर झालेला असायचा मग समोरच्या इस्त्रीहून आलेल्या गठ्यातून साधारण आपल्या अंगात जाईल असा ड्रेस उचलून तो चढवून धावत डिपार्टमेंट गाठायचो. गठ्ठ्यावर अडीचरूपये ठेवून जाण्याइतकं सौजन्य दाखवण्याइतक्या समंजस सगळ्याचजणी होत्या म्हणून बरंय. आमच्यात एक अलिखित करार होता, ड्रेस कोणाचा आहे बाहेर सांगायचं नाही. काही ड्रेस तर कमालिचे संशयास्पद होते. वर्गात हा ड्रेस नक्की कोणाचा आहे? यावर चर्चा व्हायची.  तर ते एक असो.
संध्याकाळी जेवणं झाल्यावर अड्डा जमायचा. हातात सगळ्यांच्या पुस्तकं असायची मात्र आज कोणाच्या डिपार्टमेंटमध्ये काय झालं याचे अपडेटस दिले-घेतले जायचे. "लफड्यांचे" अपडेट घेतले जायचे. जमलेली, जमू घातलेली आणि जमून तुटलेली प्रकरणं हा तर फेव्हरीट विषय. नऊ साडेनऊला मॅडम राऊंडला यायच्या. त्यावेळेस आम्ही सगळ्या अभ्यासात बुडून गेलेल्या असायचो. मॅडम यायच्या आणि बाकिच्या सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या खोलित हकलायच्या. "ए कन्या, चल आता रूमवर पळ, मी आईचा फोन आला तर सांगेन हं नुसती नाटकं चाललीत अभ्यसाची"  असं अनुनासिक स्वरात त्या सांगायच्या तेंव्हा आम्ही घाबरल्याचं नाटक मस्त वठवायचो. सगळ्याजणी आपापल्या खोलीत गेल्यासारखं करायच्या. पुढच्या खोल्यांपुढून जाताना मॅडम नुसत्याच, रूम १५,रूम११,रूम१०नअशी आरोळी द्यायच्या की आतून पोरी आहे मॅडम असं सांगायच्या.
आता कळतंय, पोरींना वाटायचं भोसलेमॅडमला गंडवलं पण खरंतर मॅडमलाही हे माहितच असणार पण ती गंडवलं गेल्याचं नाटक छान वठवायची. चार घरच्या चार पोरी कुटुंबापासून लांब केवळ शिकायला आल्यात तर राहू देत एकमेकीला धरून हे कळण्याइतकी क्यूट होती आमची भोसलेमॅडम. (छायाचित्र सौ. गुगल)

.
 

रूम नं १६ मधला "मेस" भाग २

........
जुनं आणि नवं अशा दोन इमारतींमध्ये हाॅस्टेल विभागलं होतं. आम्ही जुन्या इमारतीत रहायचो. या दोन इमारतिंना फरशा घातलेल्या पायवाटेनं जोडलं होतं. मॅडमची रूम नव्या इमारतीत होती. रात्रीचा राउंड झाला की,  दोन्ही इमारतींच्या मुख्य दरांना कुलुपं लावली जायची. चूकून तिकडची मुलगी इकडे किंवा इकडची तिकडे गेलेली असेल आणि मॅडम आलेली समजलं नसेल तर हमखास अडकून पडायला व्हायचं. किंवा कधी कधी मुद्दामच अडकून राहिल्याचं नाटक व्हायचं. आमच्या खोलीत अडकणारयांची संख्या लक्षणीय  होती आणि दिवसेंदिवस त्यात भरच पडत होती. त्यातून आम्ही पडलो हुश्शार मुली. मॅडमच्या हातात सापडायला तयार नाही.
पण हर कुत्ते का दिन आता ही है! एक दिवस मॅडम लवकर गेल्या, आम्ही मस्त ट्रॅन्झिस्टर लावून क्रिकेटची काॅमेंट्री ऐकत होतो. सचिन मस्त फाॅर्ममध्ये होता .मॅडम गेल्या असं वाटल्यानं गाफिल होतो, अंगावर पांघरूणं घेउन रेडिओ ऐकत होतो, जवळपास पुस्तकं वगैरे काही नाही आणि अचानकच दार टकटक वाजलं, एका पारूनं उठून बिनधास्त दार उघडलं तर बाहेर साक्षात अटीवर हात ठेवून मॅडम उभ्या. झाली का पंचाईत!
ही त्यांना आत घ्यायला तयार नाही, दारातून फुटाची गोळी द्यायच्या प्रयत्नात आणि आत आम्ही ट्रान्झिस्टर बंद करण्यासाठी पांघरूणाच्या आतून चाचपडत होतो, सगळ्यांनी एकदमच हालचाल केल्यानं तो एव्हढासा ट्रॅन्झिस्टर पांघरुणांच्या आणि उशांच्या ढिगाऱ्यात गायब तर झालाच पण इतका वेळ हळू आवाजात चाललेली काॅमेंट्री कोणाचा तरी हात बटनाला लागल्याने मोठ्या आवाजात ऐकायाला यायला लागली. आता  आम्हाला हॅण्डसअप करण्यावाचून पर्यायच राहिला नाही. मॅडम आत आल्या आणि त्यांनी आम्हाला उठून उभं रहायला सांगितलं, आम्ही धडपडत कशाबशा कोणी काॅटवर तर कोणी खाली अशा  उभ्या राहिलो. त्याबरोबर काॅटवरची पांघरूणं अर्धी खाली, अर्धी वर अशी लटकायला लागली. मॅडम म्हणाल्या इथे आत्ता रेडिओचा आवाज येत होता, कुठे आहे तो? पटकन द्या नाहीतर मी रेक्टरना सांगेन. आम्ही सगळ्याजणी जिवाच्या अकांतानं काॅट चाचपडायला लागलो रेडिओ सापडेना. मग मॅडम जातीनं शोधकार्यात सहभागी होण्यासाठी सरसावल्या तर त्यांचं पहिलं पाऊल आंघोळिच्या मगात अडकलं(एका पारूचा हा मग होता. तो मग म्हणजे एक छोटी बादलीच होती), त्यातून सावरत पुढे आल्या आणि मगातून पाय काढताना आधार म्हणून दारातल्या फडताळाला पकडलं तर कसा कोण जाणे धक्का लागून लोणच्याचा बाटला खाली पडला. त्याच्याकडे बघताना त्यांना खालच्या कप्यात ठेवलेली घासायची भांडी आणि धुवायच्या कपड्यांचा ढीग दिसला. तिथून अबाऊट टर्न मारेपर्यंत मॅडम ट्रॅन्झिस्टर आणि काॅमेंट्री साफ विसरल्या होत्या. आता त्यांनीच काॅमेंट्री द्यायला सुरवात केली. अगं अगं काय गं हे?मुली नां तुम्ही? उद्या संसाराला लागाल तर अशा रहाणार का? वेळच्यावेळी भांडी घासत जा, कपडे धुवत जा. आणि या इतक्या बाटल्या इथे का ठेवल्यात? अख्ख्या हाॅस्टेलच्या तुपाच्या आणि लोणच्याच्या बरण्या कशाला गोळा करून ठेवल्यात? (ही एक वेगळीच भानगड होती) अगं रूम आहे की कचरा कोंडाळं? रहावतं कसं तुम्हाला? अस म्हणत कशा बशा त्या टेबलपर्यंत पोहोचल्या. आता त्यांना बसा म्हणायचं तर खोलितल्या एकुलत्या एका खुर्चीवर असणाऱ्या फाईलचा ढीग, पुस्तकांचा गठ्ठा आणि ओढण्या, स्कार्फ, रूमाल सलवारी या सगळ्यांच्या प्रेमालाप दूर करणं भाग होतं. सवयीनं नेमकं एकीनं जे नको करायला तेच केलं. तिनं गुड गर्ल बनायच्या नादात खुर्चीवरचा सगळा ढीग उचलून पटकन काॅटच्या कोपऱ्यात फेकला. थंड होत आलेल्या मॅडम पुन्हा बरसो बरसो रे मेघा करत कडाडायला लागल्या. त्यांनी आता  कामालाच लावलं. सगळे कपडे घडी घालायला लावले. ते हॅन्गरला लावायला लावले. पुस्तकं जिथल्या तिथे गेली, खोली झाडून साफ झाली. हे सगळं होत असताना तिकडे बिचाऱ्या सचिनची विकेट पडून आपल्या टिमची गळती चालू झाली होती. रेडिओ चालूच होता . आता मॅडमच्या लक्षााात आलं की, त्या कशासाठी आत आल्या होत्या. त्यांनी खबदाडात पडलेला रेडिओ उचलून तो बंद केला. मला म्हणाल्या कोणाचा आहे गं कन्ये हा? मी म्हटलं काय की. आमच्या रूममध्ये होता कोणीतरी ठेवलेला.
मॅडम- असा कसा ठेवला? नियम माहित नाहीत? रेडिओ लावायचा नसतो. आता रेक्टरनी मला विचारलं तर काय सांगू? इतक्यात एव्हढ्या थंडीतही एका पारूची दिमाग की बत्ती पेटली. तिनं घाई घाईत सांगितलं, मॅडम कोणाला माहित नाही पण ,दुपारी मीच हा गावातल्या काकांकडून आणला होता. आम्ही या शहिद व्हायला निघालेल्या भीडूकडे साश्रु नयनांनी बघतच राहिलो. पण तिनं हुशारीला जगात  आम्ही कोणी तोंड उघडून माती खाण्यापूर्वी लगबगीत सांगितलं की, "मॅडम आम्हाला क्रिडाच्या बातम्या कव्हर करायला सांगितल्या आहेत. आता आम्ही कुठे जाणार? म्हणून आज अनायचे मॅच होती तर सर म्हणाले रेडिओ ऐका आणि उद्या न्युज आयटम बनवा." अक्षरश: भरून आलं तिच्या हुशारीमुळे. आम्ही हो त हो मिसळण्यात माहिर होतोच. मॅडमची समजूत कशी बशी काढली खरी पण एक धडा मिळाला,  अन्ना,  चोबीस घंटा चोकन्ना रेहेने का! (छायाचित्र सौ. गुगल)
 

रूम नं. १६ मधला "मेस" : काॅमेण्ट्रीचा शेवट

मॅडमचाही बिचारीचा जीव होता आमच्यावर, तिलाही पटलं. त्या म्हणाल्या,"काय तरीच बाई तुमच्या डिपार्टमेंटचा जगावेगळा अभ्यास. फार डोकं चालवावं लागतं नाही? इतर कन्या पुस्तकातून बघून अभ्यास करता पण तुमचं तसं नाही.  अगं पण आधी माझी आपली नाॅमिनल परवानगी घ्यायची नाही का? समजा आत्ता माझ्याऐवजी रेक्टर मॅडम आल्या असत्या आणि त्यांनी तुम्हाला विचारलं असतं की मला माहित आहे का म्हणून तर?" आम्ही साळसूदपणानं म्हणालो,"साॅरी मॅडम. आम्हाला माहितच नव्हतं की ,अशी परवानगी घ्यायची असते. इथून पुढे असं नाही होणार" तेव्हढ्यात संधी साधून एकजण म्हणालीच की "मॅडम आम्हाला गरज पडली तर आम्ही ट्रॅन्झिस्टर आणू शकतो ना?" मॅडम म्हणाल्या"आणा, पण उगाच सगळ्याजणींना जमवून बसू नका आणि आवाज तुमच्यापुरता ठेवा" सगळ सेटल झालंय असं वाटत असतानाच मॅडमचं मागे लक्ष गेलं, त्या ओरडल्या "काय गं चंदे तू यांच्या रूममध्ये काय करतेयस?" चंदा म्हणाली,"मी कुठे काय करतेय? तुमचा आवाज आला म्हणून आत आले." मॅडम कडाडल्या"माझा आवज ऐकून आत कशाला यायला हवंय? इथे काय चाललंय?पळ इथून" चंदा साळसूदपणानं म्हणाली,"मी इथेच नाही सगळीकडे जाऊन तुम्हाला शोधून आले. माझं गजराचं घड्याळ बंद पडलंय आणि रूमपार्टनर नाहीए, उद्या मला पहाटे उठायचंय. तुमच्याशिवाय दुसरं कोणी उठवेल यावर माझा विश्वास नाही. म्हणून ते सांगायला तुम्हाला शोधत होते. इथे तुम्ही पेटला होता. मध्ये बोलले असते तर माझ्यावरच रागवला असता म्हणून तुमचं संपायची वाट बघत होते." मॅडमला अर्थातच गहिवरून आलं. चंदाची सुटका झाली. तिच्यामागे असणारी "सू" दिसली तिच्यावर मॅडम खेकसल्या "तू गं कन्ये? तुझा काय निरोप?" बावरलेली सुवर्णा गप्पच उभी राहिली. तिच्या मदतिला आम्ही धावलो,"मॅडम सू ला आम्ही बोलवलं, तिला हे खेळाबिळातलं टेक्निकल समजतं नां? आम्हाला इतकं डिटेलमध्ये समजत नाही. बिचारीला आज लवकर झोपायचं होतं पण आमच्यासाठी बसलीय डोळे उघडे ठेवून" मॅडमला पुन्हा एकदा गहिवर आला. असं एक एक करत काहींना लटकावं लागलं
तर काही जणी सलामत शिरानिशी आपापल्या रूममध्ये गेल्या. जाताना मॅडम धमकी द्यायला विसरल्या नाहीत की ,उद्या जर खालच्या कप्यातला कपड्यांचा आणि भांड्यांचा ढीग स्वच्छ झाला नाही तर.....?असो. दुसऱ्या दिवशी आम्ही दुपारी लवकर येउन हे सत्कार्य उरकून टाकलं. जाऊदे आज काय आणि दोन दिवसांनी काय, कपडे धुवावे लागणारच होते नां!

..................
 

नॊक नॊक........रूम नं.१६.

माझी ऎसिडिटी
मला पित्ताचा त्रास सर्दी पड्शासारखा सतत व्हायचा. त्यातून मेसचं जेवण चालू झाल्यावर तर ही व्याधी मुक्कामालाच आली. एक दिवस मी डोकं गच्च बांधून आई गं ऊई गं करत झोपले होते आणि माझी पारू डोक्याला झंडू बाम लावून देत होती. मॆडम माझा आवाज ऐकून आत आल्या आणि काय होतंय म्हणून विचारायला लागल्या. डोकं पित्तानं दुखतंय समजल्यावर त्यांनी माझ्या पारूला त्यांच्या रूममध्ये नेलं आणि छोट्या वाटीत मोरावळा दिला. आम्ही तोअर्थातच वाटून खाल्ला. त्याची चव इतकी अप्रतिम होती की तो पुन्हा पुन्हा खावासा वाटायला लागला. मग आठवड्यातून एक दोन वेळा लोकाग्रहास्तव मला पित्ताचा भयंकर त्रास व्हायला लागला. तो ही नेमका केम्पसमधला दवाखान बंद झाल्यावर. आमचा मोरावळ्याचा खुराक व्यवस्थित चालू होता. एक दिवस मी स्टडीत अभ्यास करत होते. सकाळपासून काही खाल्लं नव्हतं त्यामुळे जाम भुक लागली होती म्हणून कॆंटिनमधून वेफर्स आणले आणि खात खात गप्पा मारत मारत मी आणि दुसर्या विभागाची एक मैत्रीण रमत गमत टिवल्या बावल्या करत येत होतो. होस्टेलमध्ये येताना आपापली पत्रं आलीत कां हे चेक करून येण्याचा प्रघात असल्यानं आम्ही पोस्ट बघत उभ्या होतो. इतक्यात समोरून मॆडम आल्या. मी गप्प बसावं की नाही? नको तिथं आणि नको त्यावेळेस बोलायची खोड नडली मॆडमचं लक्श नव्हतं तरी मी उगाचच त्यांना चढवायचं म्हणून हाक मारून म्हणाले,"मॆडम आज काय मस्त साडी नेसलाय. काय विशेष? गजरा तर घमघमतोय." मॆडम माझ्याकडे बघून ओरड्ल्या "अगं कन्ये आत्ता थोड्यावेळापूर्वी तुला उलट्या होत होत्या नां? आणि आता वेफर्स काय खात बसलीस?" मला कळेचना की मला कधी बाई उलट्या झाल्या?"मी म्हटलं नाही. आज मला काही धाड भरली नाहीए. मी मस्त आहे की" यावर मेडम फणफणत गेल्या. मी चकीत झाले आणि रूममध्ये आल्यावर ही ब्रेकिंग न्युज आणि मॆडमचं विअर्ड वागणं उत्साहाच्या भरात बाकिच्या पारूंना सांगितलं. त्यावर सगळ्याजणींचं एकमत होउन त्यांनी तारस्वरात मला हाक मारली"ए, मंद. अगं मघाशी आम्हाला मोरावळा खायचा होता म्हणून आम्हीच मॆडमला सांगितलं होतं की मोरावळा द्या. छ्या, काय गरज होती, नाही म्हणायची? तसंही आठवद्यातून चार दिवस डोकं धरून बसलेली असतेसच नां? ऒक ऒक करत असतेसच की, आमच्यासाठी आजच्या दिवस खोटी खोटी ओक ओक केली असतीस तर काय बिघडलं असतं?" असो. त्यादिवसापासून आमचा हा घरगुती उपाय कायमचाच बंद झाला. आजही मोरावळा पाहिला की माझा त्यावेळेस नसलेला पित्ताचा त्रास आणि तुरट गोड मोरावळा बोटानं चाटून चाटून खाणं आठवतं.......
 

रूम नं. १६.....

सुरवातिला काही समजायचं नाही. चार ठिकाणांहून आलेल्या आम्ही चौघीजणी नवी नवरी कशी सासरच्या घरातला अंदाज घेत वावरत असते तशा एकमेकीला पारखत होतो. हळूहळू मस्त चौकडी बनली. आमच्या समोरची रूम होती तिच्या शेजारीच फोन होता, जिथे पोरींचे फोन यायचे. आमचा बहुतांश मुक्काम याच खोलीत असायचा, ज्या मुलींची प्रकरणं चालू असायची त्या जरा बाजुला सरकून फुसूफुसू बोलत असायच्या. त्यांच्या दुर्दैवानं त्या ज्या बाजुला सरकायच्या तिथे आमची खिडकी यायची. आम्हाला यांची फुसफुस थेट ऐकायला यायची. ज्या दिवशी हा शोध लागला त्यादिवसापासून आम्ही टिव्ही पहायला जाणं बंद केलं. कारण सिरियलच्या वेळेतच अशा मुलिंचे फोन नेमके यायचे. हे गूढ आम्हाला पहिल्यांदा उलगडलं नाही मग लक्शात आलं की रेक्टर मेडम त्या मालिका पहाण्यात गुंग असायच्या त्यामुळे कोणाचा फोन, कुठून, किती वेळ अशा चौकशा व्हायच्या नाहीत. नाहीतरी त्या मालिका पहाण्यात काही रस नसाय़चाच उगाच टिवल्या बावल्या करत बसण्यापेक्शा हे मनोरंजन आम्हाला बरं वाटलं. हळू हळू आमच्या रूममधली लोकसंख्या वाढायला लागली. मग नुसतंच एकतर्फी ऐकण्याऐवजी इकडून उत्तरं द्यायचा नवा खेळ चालू झाला.
एक कन्नड भाषिक मुलगी फोनवर सतत "येन्नं" "येन्न" करत असायची, एक दिवस सगळ्यांनी ठरवून गंमत करायची ठरली. ती येन्नं म्हणाली की आम्ही इकडून आलो आलो म्हणून ओरडायचो. पहिल्यांदा या टारगटपणावरून नाही म्हटलं तरी आमची आणि इतर मुलींची खिटपिट झाली पण
 आम्ही साळसूदपणानं त्यांना म्हणायचो, मग मेडमच्या खिडकितला फोन इथंपर्यंत आणून कशाला बोलता? सारखं आम्हाला तुमचं सगळं ऐकत बसावं लागतं नां? त्यावर त्या चपापायच्या. त्यांनी अत्यंत हळू आवाजात बोलून पाहिलं पण आजुबाजूला इतका आवाज असायचा की त्यांनाच काही समजायचं नाही अखेर आमच्याशी मैत्री करण्यावाचून त्यांना पर्यायच राहिला नाही आणि अशारितिनं आमचा संसार बहरत गेला. नंतर नंतर अख्ख्या हॊस्टेलच्या प्रेमप्रकरणांचा एनसायक्लोपेडिय तयार झाला आणि आम्ही निरोपही घेउन पोहोचवायला लागलो.  एखादी मुलगी मॆडमच्या खोलीत "मटा" म्हणजे महाराष्ट्र टाईम्स निवांतपणानं वाचत बसली की ओळखावं आज तिचा फोन येणार आहे. कारण फोन आल्यावर जर ती मुलगी तिथे नसेल तर मामा जाऊन तिला हाक मारून येईपर्यंत मॆडम फोन कट करायच्या आणि परत फोन लागणं हे जवळपास मल्लिकानं पौराणिक सिनेमा करण्याइतकं कठीण काम होतं. म्हणून मग कोणत्या दिवशी कधी फोन येणार आहे हे आधीच निश्चित करून मग त्यावेळेस तिथे थांबणं जास्त सोयिचं असायचं. त्यातही आम्ही भोचकपणा करणं सोडायचो नाही. एखादीची गंमत करायची असली की ती पेपर वाचताना आम्ही तिथे जायचो आणि तिला म्हणायचो, पेपर पाठ करू नको, दोन पानं इकडे दे. असं करत तिच्याकडे एखादंच पान रहायचं आणि अखेर ती जाम ऒकवर्ड व्हायची. आमची खोली म्हणजे खिदळण्याचा अड्डा बनतोय हे मॆडमच्या लक्शात यायला फार दिवस लागले नाहीत कारण त्यांच्या ऒफीस आणि आमच्या खोलीत एका की रूमचं अंतर होतं फक्त. त्या योग्य संधीची वाट पहात होत्या आणि ती त्यांना दिली सचिननं........
 

रूम नं. १६

हा आमचा पत्ता. जिथे आम्ही कधीच नसायचो. तिथे असायचा आमचा पसारा. होस्टेलचे दिवस धमाल होते असं नुसतं म्हणून चालणार नाही. काहीतरी भन्नाट सांगायलाच हवं नाही का? तर मी तिथे बाड्बिस्तरा हलविण्यापूर्वी इतर तिघीजणीं सेट झाल्या होत्या. मी तरंगत कधीतरी महिन्याभराने रहायला गेले. कारण मला रूमच मिळालेली नव्हती आणि तोपर्यंत माझा रूम द्याल कोणी एक रूम म्हणून नटसम्राट झाला होता. अखेर आणि एकदाची मला रूम मिळाली. बादलीत पुस्तकं, गादीच्या गुंडाळीत बारीक सारीक सामान सुमान आणि एक बॆग इतक्या मोठ्य सरंजामासहित रूम नं. १६ चं मी माप ओलांडलं. पावसाची रीप रीप चालू होती. "पारू" ला शोधायला अख्खं डिपार्टमेंट तुडवावं लागलं आणि ती चार इंचाची किल्ली घेउन मी खोलीत प्रवेश कर्ती झाले. ओळख पाळख झाली आणि माझ्या पारूकडून सगळ्यांनी चहा घेतला कारण तशी पध्दतच होती म्हणे. समोरा समोरच्या दोन खोल्यात आम्ही चारजणी रहायचो. शिस्त विचाराल तर सगळ्याजणी वरचढ, कमी कोणी नाही. म्हणजे आमच्या रूममध्ये आल्या आल्या बादलीत पाय जायचा आणि समोरच्या खोलीत गेलं की भांड्यात इतका फरक सोडला तर तपशिल सारखाच. कपड्यांचं प्रेम तर विचारू नका. परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली की वर्ष संपल्यावर सामान भरताना साधारणपणे मॆचिंग होणार्या जोड्या बनवून बॆगा भरल्या. कोणाचं काय कळायलाच मार्ग नाही. सलवार एकिची, टॊप सुदरीचा आणि ओढणी भलतीच कोणाची तरी असं आवरून आम्ही धावतपळत डिपार्टमेंट गाठायचो. सक्काळी सक्काळी पाच सहा वाजेपर्यंत उठलं तर गरम पाणी आंघोळीला मिळायचं. त्यावर मोठ्या मनानं पाणी सोडून आम्ही कोमट पाण्यावर समाधान मानून घेतलं. मध्येच कधी तरी अफवा उडाली की दुसर्या मजल्यावरच्या गिझरला दहा वाजेपर्यंत पाणी असतं. आम्ही खुशीत बादल्या हलवत गेलो आणि कसलं काय फाटक्यात पाय. थंडगार पाण्यानं आंघोळ करून खाली आलो. नंतर कधीही त्या फंदात पडलो नाही. चुकून कधी गरम पाणी मिळालं तर दचकायला व्हायचं.
 

सिनेमा के साईड इफेक्ट

फिल्मचा अभ्यास जोरात चालू होता. चांगला सिनेमा शिकता शिकता वाईट सिनेमाही समजत गेला. यात सगळंच गंभीर आणि अभ्यासपूर्ण असायचं असंही नाही. बर्याचदा गंमती जमतीही घडायच्या. त्यातून आम्ही माधुरी आणि अमिताभ, अनिल कपूर, शाहरुख, अमीर 
असल्या मसाला नायक नायिकांचे पंखे त्यामुळे  कसेही असले तरी भक्तीभावानं या मंडळीचे सिनेमे बघायची सवय लागली होती. आता या सवयीला धक्का बसण्याचे दिवस आले होते बहुदा. एक दिवस नोटीस फिरली. कसलंसं फिल्मचं वर्कशॊप होतं. भारतीय चित्रपटातलं स्त्रीयांचं शोषण असल्या भयाण नावाचं. आम्हाला पर्याय नव्हता आम्ही "फिल्मवाले" होतो त्यामुळे आम्हाला जाणं भाग होतं. आमच्यासोबत वर्कशॊप ऐच्छिक असल्यानं आणखी काही हौशी मंडळीं सहभागी झाली. पहिल्याच दिवशी सक्काळी सक्काळी व्यावसायिक मसालापटातलं नायिकेचं चित्रण असा विषय होता. समोरच्या पडद्यावर काय सांगायचं तुम्हाला माधुरी अवतरली. बेटा मधलं सैंया जी से चुपके गाण्यावर मुरकणारी माधुरी किती भक्तीभावानं पाहिली होती माहितीए? आताही सकाळीच तिचं दर्शन झाल्यावर सगळे सरसावून बसले. आमच्याकडे हेव्यानं पहता "नॊनफिल्मी" मंडळी, हे असे सिनेमे बघता आणि आम्हाला सांगताना मात्र जडशीळ नावं सांगता, अशा नजरेनं पहात होती. गाणं ऐन मध्यात आलं होतं आणि ते कचकन थांबलं. समोरच्या वक्त्यानं आता त्या गाण्यातलं एक्सप्लोयटेशन सविस्तर समजावून द्यायला सुरवात केली. ते ही चक्क फळ्यावर आक्रुत्या काढून! माधुरी म्हणजे एक रेष, इतर बायका म्हणजे रेषा रेषा आणि अनिल कपूर म्हणजे एक टिंब असं स्पष्टिकरण फळ्यावर अवतरल्यावर"नॊनफिल्मी"मंडळी गांगरली. सेशन होतं दोन तासांचं. दोन तास संपले तेंव्हा माधुरीच्या 
पंधरावीस रेषाअनिलची टींब टिंब आणि त्यानंतर समाचार घेतलेल्या काजोल-शाहरुखच्या जाती हूं मैं जल्दी है क्या? या करन अर्जून मधल्या गाण्याच्या फराफरा ओढलेल्या रेषा आणि वर्तुळ यांनी काळा फळा पांढरा धोप झाला होता. सेशन संपलं आणि बाहेरून वेलदोडा घातलेल्या चहाचा दरवळ आला. आम्ही फाईल उचलत उठलो तरी आमचा एक "नॊनफिल्मी" मित्र तसाच सुन्नपणानं फळ्याकडे बघत बसला होता. त्याला म्हटलं, ऊठ की, संपलं सगळं, काय पहातोयस इतकं? त्यावर तो म्हणाला समोरच्या फळ्यावरच्या माधुरी, काजोल आणि शाहरुख अनिलला शोधतोय. बिचारे गरगर फिरून भोवळ येउन पडले असतील.
त्या सेशननंतरची उरलेली सगळी सेशन चहाच्या टारीवर पार पडली हे सांगणे न लगे! काय? :)
 

सिनेमा शिकायचे दिवस- - सत्यजीत रेंशी ओळख


खूप खूप पूर्वी म्हणजे सिनेमा काय असतो ते माहित नसता सत्यजित रेंचे सिनेमे नॆशनल चॆनवर पाहिले होते. मोठे बघतात म्हणून आपण बघायचे इतकंच त्यावेळेस  समजत होतं. एक दिवस सर म्हणाले,"चला आज तुम्हाला सिनेमा कशाशी खायचा असतो ते सांगतो". आम्ही उत्कंठतेनं आणि अर्थातच नेमहीप्रमाणे भक्तीभावानं टिव्हीसमोर बसलो. अरे हो, एक महत्वाचं सांगायचंच राहिलं. सिनेमाचा वर्ग चालू झाला तेंव्हा आम्ही सहाजण होतो आणि पहिल्याच इंट्रोनंतर गळती होउन तीघेच राहिलो.  सरांना सहाजण होते तेंव्हाही फरक पडला नव्हता आणि तिघे होतो तेंव्हाही फरक पडला नाही. पुढे पुढे तर मी एकटीच असायची तरी सर शंभरजणांना शिकवल्यासारखेच भक्तीभावानं शिकवायचे. शिकवायचे म्हणण्यापेक्शा ते सिनेमात रंगून जायचे, कधी कधी तास संपला तरी त्यांची दीएंडची पाटी यायचीच नाही. अखेर खालून क्लार्क सांगायला यायचा, सर, मॆडमना पुढच्या लेक्चरला बोलवलंय. इतकी फनी सिस्युएशन त्याआधी आणि नंतरही कधी आली नाही. असो. तर त्यादिवशी सर म्हणाले, सिनेमा काय असायला हवा 
आणि द्रुकश्राव्य माध्यम 
कसं हाताळायला हवं यांचा समग्र ग्रंथ म्हणजे सत्यजीतबाबुंचे चित्रपट. 
हे पहिलं वाक्य ऐकल्यावरच धडकी बसली. कसं झेपणार सगळं म्हणून
 स्वत:चीच काळजी वाटायला लागली. 
पहिलाच चित्रपट होता पाथेर पंचाली. पहिल्या फ्रेमपासून सरांच्या नजरेतून
 सिनेमा पहात गेल्यावर हळू हळू  
या भाषेशी ओळख होत गेली. समोर दिसतं त्यापेक्शा वेगळं, बिटविन द लाईन्स शोधण्याची सवय इथुनच लागली.
एका प्रसंगात नायिका शिवत असते आणि शिवता शिवता विचारात मग्न झालेली असते, मध्येच कधीतरी ती दातानं दोरा तटकन तोडते. इथे सरांनी फिल्म थांबवली आणि या द्रुष्या़चं स्पष्टिकरण द्यायला सांगितलं. तिघांनी तीन आकलनं सांगितली आणि माझं सरांशी मिळतं जुळतं आलं. सिनेमा बघायचा नवा चष्मा घालून त्यादिवशी वर्गातून आम्ही बाहेर पडलो. खाली आलो तर बाकिच्यांची लेक्चर कधीच संपली होती. आज आम्ही कोणता सिनेमा पाहिला याची उत्सुकता सगळ्यांनाच असायची. आम्ही पाथेर पांचाली सांगितल्यावर कोणी न सांगताही सगळेजण अम्र्याच्या टपरीवर चहा प्यायला गेलो. आज हाफच्याऐवजी चांगला अख्खा ग्लास भरून चहा प्यावा लागला तेंव्हा कुठे त्या क्रुष्णधवल चित्रचौकटीतून मन या रंगीत चौकटीत आलं.



छायाचित्र सौजन्य:  माहितीजालावरून तरंगत कोणा एकानं केलेल्या फॊरवर्ड मधून,
 

सिनेमा शिकायचे दिवस

पहिला दिवस होता, फिल्म जर्नलिझमच्या लेक्चरसाठी आम्ही जाम उत्कंठीत होतो. सरांची वाट बघत डिपार्टमेंटच्या बाहेर बाईकस्टॆंडवर बसलो होतो. समोरून एक उंचे पुरे छान छान कोणीतरी झप झप चालत आलं आणि थेट आमच्यासमोर उभं राहून म्हणालं,"चला" आम्हाला कळेचना की कुठे? मग लक्शात आलं हेच आमचे सर होते. सरांसारखे अजिबात न दिसणारे. मस्त पहिल्याच दिवशी एकही लेक्चर बंक करायचं नाही ठरवूनच टाकलं. सगळे मिळून खच्चून चार विद्यार्थी होतो पण सरांना याचा काही फरक पडलेला दिसला नाही. पहिल्यांदा खासफिल्मची लेक्चर व्हायची त्या खोलीत पाऊल टाकलं तेंव्हा तिथल्या काळ्या अंधारानं स्वागत केलं. ट्य्ब लावून प्लेयरम्नध्ये कॆसेट टाकली आणि भक्ते भावानं टिव्ही पुढे बसलो. पहिल्याच दिवशी मंथन पाहिला. प्रत्येक फ्रेमनंतर सर सिनेमा बघायचा म्हणजे काय हे सांगत होते. टिव्ही वर दोन चारदा पाहिलेला मंथन आज नवाच वाटत होता. नंतर समजलं की मंथन आणि पाथेर पांचाली ही आमची टेक्स्टबुकं होती. (वर्ष अखेरीपर्यंत हे दोन्ही चित्रपट फ्रेम टू फ्रेम पाठ झाले. आजही मी पूर्वीसारखा तटस्थपणानं मंथन पाहू शकत नाही.) लेक्चर संपलं तोपर्यंत लाय नशा आया मजा हे गाणं पाठ झालेलं होतं. मंथन ज्यांनी पाहिलाय ते विचार करतील की हे गाणं त्यात कधी आहे? हाच फरक आहे नां सामान्य सिनेमा बघणारांच्यात आणि अभ्यासपूर्ण दश्टिकोनातून सिनेमा बघणारांच्यात. :) असो. गाण्याची गंमत आणि या क्लासमधल्या आणखी काही गंमती पुढच्या पोस्टमध्ये.
 

मुझे जान ना कहो.......

सुंदर गाणं जमायला सूर लागावा लागतो, उत्तम पदार्थ बनण्यासाठी सगळे घटकपदार्थ अचूक पडावे लागतात आणि छान सिनेमा बनायला अभिनयापासून कथेपर्यंत सगळी भट्टी जमून यावी लागते. असा मस्त जमलेला चित्रपट आहे बासुदांचा "अनुभव". बासुदांच्या तीन चित्रपटांच्या सेरीजमधला हा माझा सर्वात आवडता चित्रपट आहे. लग्नानंतर काही वर्षांनी स्थिरावलेलं पती पत्नीचं नातं आणि त्यात काही कारणानं काही काळ उठणारे तरंग असा कथाविषय असाणारा हा चित्रपट. ब्लॆक व्हाईट असुनही कमालिचा सुंदर बनल आहे. हा चित्रपट बघताना आतून एक बेचैन बुलबुला सतत अस्वस्थपणे हलत असतो, याचं कारण याची प्रत्येक फ्रेम चित्रपटाच्या कथेशी इमान राखून समोर येते. चित्रपट बघताना नक्की कसं वाटतं माहित आहे? भर दुपारी तुम्ही कधी एखाद्या निरव ठिकाणच्या डोहावर गेलाय? आजुबाजुला चिटपाखरू नसताना, कसलाही आवाज, हालचल नसताता तो गडद हिरवा खोल डोह कसा कंटाळवाणा चुपचाप पसरलेला असतो? आपल्याला ते पाहून खडा टाकून या चित्रात जरा जीवंतपणा आणावासा वाटतो. तसं हा चित्रपट पहाताना जाणवत रहातं. लग्नानंतर काही वर्षांनी पतीपत्नीचं काहिसं एकसुरी होणारं नातं अगदीं परफेक्ट समोर येतं की आपण या दोघांत तिसरे होउन फिरत रहातो. यातलं गीता दत्तचं वर सांगितलेलं गाणं चित्रपटात इतकं सहजपणानं येउन जातं की आपल्या लक्शातही येत नाही, आपण गाणं पाहिलं. घरकाम करताना एखादी ग्रुहिणी जसं गुणगुणत एका लयीत  काम आवरत असते तसं हे गाणं येतं आणि जातं.  
गाणं दोन भागात आहे, चित्रपटची एकदा नायिका ,म्हणजे तनुजा अंघोळ करताना गुणगुणत असते आणि दुसर्यांदा नायक नायिका म्हणजे संजीव कुमार आणि तनुजा खुप दिवसांनंतरचा जुना निवांतपणा अनुभवत असतात तेंव्हा. यातला दुसरा भाग जास्त तरल झाला आहे. अलिकडे एकमेकांसाठी रिकामा वेळच मिळत नाही अशी सल असणारं, तरूणपणाकडून प्रौढपणाकडे चाललेलं एक तरूण जोडपं, कार्यमग्न पती आणि कलाकार, रसिक पण रिकामपणानं घर सांभाळणारी ग्रुहिणी. सगळ निरस कंटाळवाणं चाललेलं आहे, एकमेकाविरूध्द तक्रार करण्याचंही आता रूटिन बनलं आहे, जे चाललंय त्यात आता काही बदल होणार नाही हे सत्य स्वीकारून एकमेकासोबत रहाणारे पती पत्नी आणि एक दिवस अचानकच तो चुकार निवांत दिवस या जोडप्याच्या आयुष्यात येतो.  ऊन्हाची तलखी पावसाच्या एका सरसरून आलेल्या सरीमुळं कशी धुवून जाते तसं होतं. सगळे शिकवे गिले दूर होतात, अगदी निवांत चाललेल्या या दिवसाची दुपार डोक्यावर येते आणि अचानक पाऊस बरसायला लागतो, बस्स! आणखी काय पाहिजे? बाहेर कोसळणार्या सरी, आणि खिडकीच्या तावदाना पलिकडून डोकावणारा निशिगंध, पाण्याचे टपोरे थोंब माळलेली निशिगंधाची ताजी फुलं आणि हे जोडपं.  केवळ केवळ आणि केवळ इतक्या भांडवलावर हे कमालिचं रोमॆंटिक गाणं येतं. तनुजाचे टाईट क्लोजअप फ्रेममधून हलूच देत नाहीत. गोड दिसणारी तनुजा या गाण्यात,"दो जुडवा होठों की बात कहो आंखो से...मेरी जान" असं म्हणताना आणखिनच खट्याळ गोड दिसलीय.
 

धनाची पेटी

आज माझी धनाची पेटी पाच वर्षांची झाली. पहिली बेटी धनाची पेटी म्हणण्याची पध्दत आहे आपल्याकडे. कोणत्या अर्थानं ते माहित नाही; पण माझ्यापुरतं बोलायचं तर ती माझी खरी खुरी धनपेटी आहे. हिची चाहूल लागली त्या क्शणापासून आम्ही, देवा मुलगीच दे रे बाबा म्हणून विनवत होतो. कारण सांगता येणार नही; पण मुलगीच हवी हा हट्ट होता. लक्श्मी रस्त्यावरच्या लहान मुलांच्या कपड्यांच्या दुकानात लावलेले इवले इवले फ्रोक आम्ही खुळावल्यासारखे उभे राहून बघायचो. मोठ्या जाणत्या बायका अंदाज लावायच्या की हिला मुलगाच होणार "लक्शणं" मुलाची आहेत. पहिलटकरीण म्हणून डोहाळजेवणं तर दणक्यात झाली. त्यात ते खीर की लाडू प्रकरण प्रत्येक ठिकाणी झालं आणि ठोंब्या लाडूच दरवेळेस पुरीखालून निघायचा. माहेरचं शेवटचं डोहाळजेवण दत्तगुरुंच्या अंगणात केलं या इथे मात्र त्यांच्यासाक्शीनं खीरीनं दर्शन दिलं आणि ती खीर मी मन लावून चाटून पुसून खाल्ली. ज्या क्शणाला डॊक्टरनी सांगितलं "गॊड ब्लेस्ड यु विथ लिटिल प्रिन्सेस" तेंव्हा डोळे वहायलाच लागले. तिचं आणि माझं पहिलं दर्शन झकास झालं आम्ही  एकमेकीला चक्क ओळखलं. मी तिला पाहिलं तर गुलाबी दुपट्यात गुलाबी झबल्यात गुंडाळलेलं हे ध्यान माझ्याकडे टुकू टुकू बघत चक्क हसलं. त्या क्शणाला सगळं विसरुन माझा नवा जन्म झाला. आई होणं हा कोणत्या अर्थानं दुसरा जन्म असतो माहित नाही 
पण माणूस म्हणून पुन्हा एकदा जन्म होतो हे नक्की. कोणाला तरी आपली सर्वार्थानं गरज आहे ही भावनाच ऊर भरून आणणारी आहे.
 इतके सुंदर सुंदर क्शण गेल्या पाच वर्शांत आम्ही एकत्र घालवले की ते ठेवायचे म्हटलं तर बॆंकेची लॊकर तुडुंब वहायला लागतील. ती पोटात असताना "तोत्तोचान"ची पारायणं केली होती कारण मला तशीच चिमखडी हवी होती. आज पुस्तकातली तोत्तोचान घरात बागडताना, चुरू चुरू बोलताना, प्रश्न विचारून भंडावून सोडताना,  मिट मिट डोळ्यांनी "आई तू कित्ती ब्लिलियंट आहेस?" असं कौतुकानं आणि अभिमानानं म्हणताना देवाशप्पथ खुप छान वाटतं. शाळेत आलेल्या पहिल्या नंबर पेक्शाही तिच्या तोंडून तू कित्ती हुशार आहेस. जगात माझ्या मम्मुडीसारखी हुशार कोणी नाही. हे ऐकताना जास्त अभिमान वाटतो. मोठ्ठी झाल्यावर तू कोण होणार? असं विचारलं की मला तूच व्हायचं आहे असं जेव्हा ती प्रचंड अभिमानानं म्हणते तेव्हा आपण जगातल्या हुश्शार बायकांपैकी एक आहोत असं वाटायला लागतं.(आणखी काही वर्शांनी तिचा विचार कदाचीत बदलेल म्हणा! पण सध्या तरी मला मजा वाटते). मुलगा की मुलगी? या प्रश्नाचं खरं सांगायचं तर आजही नेमकं उत्तर देता येणार नाही; पण एक नक्की की आपल्या मनासारख दान आपल्याला मिळणं यासारखं दुसरं सुख नाही.
 

नव्हाळी

गेल्या उन्हाळ्यात
माझ्या दारासमोरचं झाड वठलं
म्हटलं, आता याचं आयुष्य सरलं

वठलेला परतीचा प्रवास
त्यानं मुकपणानं चालू केला
ना तक्रार ना खंत
ना फांदीवरल्या पिलांची ओढ
म्हटल, याला लागली पैलतिराची आस...

अचानकच मग
एक दिवस मेघ सरसरुन बरसले
उन्हाळाही सरुन आता बरेच दिवस झाले
सहजच परवा माझं लक्श त्याच्याकडे गेलं
तर, त्याच्या अंगाव शेवाळलेला हिरवागार कोट!
वठलेल्या झाडाच्याही चार दोन फांद्या
अजून होत्या ओल्या
किलबिलणार्या पाखरांची
चिमण्या बोटात घट्ट धरुन ठेवलेल्या
 

मै और मेरी रेसेपी

लग्न जमवताना आपल्याकडे कुंडली पहायची किंवा जमवायची पध्दत आहे. अगदी तसंच  एखादा पदार्थ बनवण्यासाठी आपलं आणि त्याचं कितपत जमणार आहे हे पहावं की काय या विचारापर्यंत मी आता आले आहे. एक तर हे असे नवीन नवीन पदार्थ बनवायची हौस दांडगी आणि त्यात भर म्हणजे ते कौतुकानं दुसर्याला खाऊ घालायची हौस तर त्याहुन भारी. मुळात रोजचा स्वयंपाक मी करणं आणि इतरांनी खाणं हीच एक रीस्क त्यात नवीन पदार्थ म्हटला की तो बरा बनावा म्हणून माझा मनातल्या मनात देवाचा धावा चालू होतो तर "देवा ही जे काही बनवणार आहे ते खरंच बरं बनु दे" असा घरच्यांचाही  धावा, कारण अखेरीस जे काही बनेल ते चावायचं त्यांनाच असतं नां? बरं नशिब तरी असं दगा दणारं की जो पदार्थ जसा होणं अपेक्शित असतं बरोबर त्याच्या विरुध्द का बरं घडत असावं? म्हणजे चकली हटकून मऊ होते आणि लाडू....जाऊदे काय बोलावं आपल्याच तोंडानं? नशीब कोणी अजून तो फेकून मलाच मारलेला नाही.  
                                      ढोकळा नावाचा पदार्थ तर मोगॆम्बो आहे मेला. कध्धी म्हणून माझ्यावर खुश होत नाही. इतरांचे छान छान जाळीवाले ढोकळे खाताना माझ्या जीवाला जी घरं पडतात ती मलाच माहित. काय नाही केलं याच्यासाठी. जितके म्हणून उपाय सांगितले ते सगळे करुन झाले. अगदी सोड्याची बाटली ओतून झाली, ताकं बरं पासून आंबटढाण पर्यंतच्या सगळ्या प्रकारचं घेउन झालं, चितळेंपासून गिटस फिट्स सगळे यच्चयावत रेडीमेड पीठं वापरुन झाली पण आजही माझा ढोकळा कुकरमध्ये गेला की परतताना पिठलं की वडी? अशा संभ्रमात असल्यासारखा बाहेर पडतो.  त्यावरुन आठवलं, पहिल्यांदा उत्साहानं गुलाबजाम केले होते.  सगळी रेसेपी पुस्तक समोर ठेवुन बनवली असल्यानं जाम कॊन्फिडन्स होता. जेवायला सगळे बसल्यावर गुलाबजामच्या पातेल्यावरचं झाकण दूर करुन भैय्यानं डाव हलवला....खरं तर डाव हलविण्याचा "फर्स्ट ऎटेम्प्ट" केला. डावानं गुलाबजामाच्या पाकाशी इतकी घट्ट दोस्ती केली होती की या प्रेमी युगुलाला एकमेकापासून दूर करण्यासाठी आम्ही सगळे शर्थीचे प्रयत्न केले. अखेर जवळपास फोडून काढावे लागले. ते कडक गुलाबजामही सगळ्यांनी वा मस्त म्हणून खाल्ले. आता वाटतं तिथेच मला सांगायला पाहिजे होतं की बाई गं झालं एव्हढं पुष्कळ झालं पुन्हा या अशा वाटेला तू जाऊ नको. त्यांनी माझा उत्साह वाढवयची चूक केली आणि त्यांच्या खाण्यामुळेच माझा करण्याचा सोस वाढला.  मी काय करु? भोगा (पक्शी खा)आता आपल्याच कर्माची फळं. मध्यंतरी मोमो नावाच्या पदार्थाच्या मागे मी हात धुवून लागले होते. मी नक्की काय करणार आहे बाकीच्यांना लक्शात न आल्यानं सगळे माझी नजर चुकवून मोमो नावाचा गनीम इंटरनेटवर गाठ पडतोय का? ते पहात होते. म्हणजे आपल्याला नक्की कशाला तोंड द्यावं लागणार आहे याचा बिचारे अंदाज घेत होते. शेवटचा प्रयत्न म्हणून बारीक आवाजात म्हणूनही झालं की अगं तो पदार्थ नॊनव्हेज असतो म्हणे, आपण शाकाहारी नां?मी पण किती तयारीची म्हटलं, मी त्याची शाकाहारी रेसेपी मिळवली आहे. करतात काय? केलं की खातात चुपचाप हे इतक्या दांडग्या अनुभवानंतर मला बरोब्बर समजलं आहे. कधी तरी हौसेनं यांना विचारलं की आज काय करु जेवायला? तर म्हणतात "पचण्यासारखं काहीही कर" मी मात्र त्यांच्या या असल्या टोमण्यांना अजिबात भीक घालत नाही माझा नवे पदार्थ करण्याचा उपद्व्याप चालूच ठेवते. रविवार जवळ आला की या रविवारी काय बेत करायचा या विचारानं शुक्रवारपासूनच माझी झोप उडते. बाय दी वे, या रविवारी आमच्याकडे फक्कड बेत आहे, येताय जेवायला?
 

पुरानी जिन्स

परवा घरी गेले तर वरुन एक मोठा खोका काढून त्यातलं तुला हवंय ते घे आणि बाकीचं टाक तरी आता असा पिताश्रीनी आदेश दिला. किती वर्षं सांभाळायचं हे? काय करता मग खोका उघडून बसले. ही माझी इस्टेट आहे. यात शाळेपासून कॊलेजपर्यंतचं अख्खं जग आहे. पत्ते कसे पिसतात नां तशा पिसून पिसून ठेवलेल्या आठवणी. माझी डोळ्यांची उघडझाप करणारी बाहुली, माझा सगळ्यात आवडता फ्रॊक, कसली कसली कात्रणं, पहिले पहिले छापून आलेले लेख, आवडती मासिकं, पत्रं, शुभेच्छापत्रं.....माझं कोवळं जग होतं त्या खोक्यात. हाताला एक डायरी लागली आणि पुढची उचकापाचक थांबवून डायरी उघडली. त्यात काय होतं हे माहित असूनही आणि असंख्यवेळा वाचून झालेली असूनही पुन्हा पुन्हा वाचाविशी वाटणारी ती माझी डायरी म्हणजे माझ्या सगळ्यात सुंदर दिवसांची सोबतीण आहे. विद्यापिठात पूर्ण दोन वर्षं जिनं माझ्यासोबत घालवली ती माझी "सगुणा". तिचं नाव मी खरंच सगुणाच ठेवलं होतं. एक तर आकार इतका सुटसुटीत की घेउन फिरता यायची आणि तिचा इंचन इंच काही ना काही खरडून पावन केलेला होता. म्हटलं तर फुटकळ म्हटलं तर खुप काही उराशी बाळगुन असणारी.या माझ्या सगुणानं माझ्या सगळ्या मित्रमैत्रीणिंची अक्शरं अजुनही जपून ठेवली आहेत. लेक्चर बोअर झालं की आम्ही यातून एकमेकाला निरोप पास करत असायचो. ती आमची संदेशवाहक होती. त्यावेळेस आम्हाला सगळ्यांनाच कवितांचा किडा चावलेला होता आणि चंद्र्शेखर गोखल्यांनी त्याला चाळवला होता. जे बोलायचं ते कवितेतच अस जणू नियम बनून गेला होता. त्यातले ते संदेश वाचत वाचत  किती लेक्चर मी परत ऐकली. एका पानावर कोणाचं तरी अक्शर होतं, चहाला जायचं का? पुढे उत्तर-कोण उदार होणार आहे? मध्येच कोणीतरी-ए मी पण कटात आहे, आज कोणाला तरी छान दिसावं लागणार त्याशिवाय चहा मिळणार नाही, कोणाला पकडायचं पण, शमाला सांग- तू चालू कर आम्ही सामील होतो, चालेल, हा पिरपिर गेला की बाहेर पडू, अरे पण आता बाईच लेक्चर आहे, असू दे की, प्रेझेंटेशनची तयारी करायला चाललोय म्हणून सांगू. चालेल. असा तो चहाकटाचा मसुदा इतक्या जणांच्या अक्शरात कोरला गेलाय की बहुदा त्या लेक्चरनंतर मॆडमना पटवून त्यांना बरोबर घेउनच आम्ही चहाला गेलोलो असणार.  होस्टेलवरच्या भयंकर जेवणावरही आम्ही कवीत केली होती, त्याला चाल लावली होती, हिची चाल तुरु तुरुची 
मेसमधून चालू झालेली कवीता बाथरुमपर्यंत गेलेली होती. डायरीच्या एका पानावर मार्शल कॆलुहानचं मॊडेल आणि त्याच्या शेजारीच विमान उडालं हा संदेश, म्हणजे हे मॊडेल कोणाच्यातरी डोक्यावरुन गेलेलं होतं. इतकंच नाही तर लेक्चर देताना कोणिही काहीही गंमतशीर वाक्य(म्हणजे आमच्या द्रुष्टिनं) बोललं की त्याची लगेचच नोंद होत असे. आमच्या वर्गात एक मुलगा होता. 
त्याचा आवाज किशोरकुमारसारखा होता, युथफेस्टिव्हलल आम्ही बसविलेल्या पथनाट्यात त्यानं सूत्रधाराची भुमिका केलेली होती. त्यात त्याला सतत गाणी होती, तिही टिपेच्या सुरात आणि लोकसंगीताच्या बाजात. एकदा रिहर्सल झाल्यावर आम्ही बसलो होतो आणि 
त्याला त्याचं आवडतं किशोर कुमारचं "पल पल दिल के पास" हे गाणं म्हणायला लावलं तर त्यानं चुकून त्याच सुरात म्हटलं. 
काय हसलो होतो, गडाबडा लोळायची वेळ आली. 
त्याचा बिचारयाचा आयुष्यभरासाठी ते गाणं म्हणायचा कॊन्पिडन्सच गेला. 
कोणीतरी हा ऐतिहासिक प्रसंग चुकवला  असावा कारण डायरीतून तो
असंख्य अक्शरात वर्णन झालेला होता. .....
कितीतरी आठवणी जाग्या झाल्या.....त्याच डायरीत शेवटी कॊलेज संपल्यावर
सगळ्यांनी आवर्जुन लिहिलेल्या एकत्र असतानाच्या आठवणी....
सगळंच पुन्हा कॆम्पसमध्ये घेउन जाणारं....
दोन वर्षांत घरची आठवण येउन कितीतरीवेळा रडले असेन; पण त्यानंतरघरी परतल्यवर, सगळ्यांच्या वाटा पसरल्यावर जितक्यावेळा
ती डायरी वाचली तितक्यावेळा डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या.....त्याच डायरीच्या शेवटच्या पानावर कोणीतरी भावनाविवश होउन
 हे अखखं गाणं लिहिलं आहे, "पुरानी जीन्स और गिटार....यादे बस यादे रह जाती है...
कुछ छोटी छोटी दो बाते याद आती है..." मला ही जीन्स मनापासून आवडते कितिही पुरानी झाली तरी.:)) आय मिस यु ऒल.....:(
 

मैत्री बित्री सब झूठ

किती दिवस झाले काही लिहिलं नाही कारण काही लिहावसं वाटलं नाही. मनात असुनही....आपण आपली मानलेली माणसं जेव्हा आपल्याला फाट्यावर मारतात तेव्हा चीड येते. का वागतात अशी माणसं? मैत्रीतही जेव्हा कोणी कॆलक्युलेशन्स बघतं तेव्हा तर संताप संताप होतो. अरे? तुम्हाला गरज असेल तेव्हा आम्ही आमची कामं टाकून तुमच्या मदतिला धावायचं आणि गरज संपली की मात्र तुम्ही लगे़चच आपल्या कोशात शिरायच? मला सतत असे अनुभव आल्यानंतर आता वाटायला लागलंय की कदाचित मीच माणसं ओळखायला चुकतेय का? सहज समोरच्यावर विश्वास टाकून मैत्रीत गुरफटतेय का? समोरचा आपला फायदा करुन घेतोय हे समजत असुनही स्वत:ला आवरता येत नाही म्हणून स्वत:चाच राग येतो कधी कधी. का असतात माणसं अशी. आहात नां तुम्ही कॆलक्युलेटेड मग रहा नां तुमच्या घरात बंद. आधी मैत्रीचं नाटक करायचं, गोड गोड बोलायचं, मी खुप नशिबवान की मला तुझ्यासारखी मैत्रीण मिळाली म्हणून भलावण करायची आणि आपलं काम झालं की पाठ फिरवायची. अशा माणसांना एकांतवासाचा शापच मिळायला पाहिजे. म्हणजे हे असे समोरच्याचा फायदा घेणार नाहीत. कधी तरी कोणी तरी असा घाव देउन जातं आणि मग मैत्रीवरचा विश्वासच उडतो. मैत्री बित्री सगळं झूठ आहे. खरं तर अशी सगळी नातीच खोटी आहेत. आहे तो फक्त फायदा. जो तो इथे स्वत:चा फायदा फक्त बघत असतो. एखाद्या पासून काहीच फायदा नसेल तर त्याच्याशी मैत्री सोडाच; पण तोंडओळखही कोणी ठेवत नाही आणि एखाद्याची आपल्याला गरज पडू शकते हे ल़क्शात आलं की त्याला जोडून ठेवलं जातं. अशा माणसांना मिळतातही माझ्यासारखी मैत्रीवर विश्वास असणारी मूर्ख माणसं.
 
 

प्रुथ्वीच्या आत काय असतं गं आई?

काल लॆपटॊपवर काम करण्यात गुंग असतानाच मागून अचानकच प्रश्न आला, "दुनियाच्या आत काय असतं गं आई?" मी मागे पाहिल,ं इतकं सुंदर मराठी आमच्या घरात एकच माणूस बोलतं आणि ते बोलतं कमी प्रश्न जास्त विचारतं. शक्यतो आम्ही चिलखतं घालूनच वावरतो. कारण कधी प्रश्नांचा मारा चालू होईल सांगता येत नाही पण गनीम कधी ना कधी खिंडीत सापडणारच नां? तर आजही मला बरचसं काम हातावेगळं करायचं असल्यानं मी या "प्रश्नासुराला" तिच्या आवडिची पुस्तकं पसरुन दिली होती, तिच्या आवडत्या सिडी बाहेर काढून ठेवल्या होत्या, भातुकली मांडून दिली होती आणि खाऊही दिला होता शिवाय हंगामा लावून दिलं होतं आणि कधी नव्हे ते चक्क शिनचॆन बघायची परवानगी दिली होती. काहीही कर पण दोन तीन तास शांतता दे बाई असा या तयारीमागचा हेतू होता. मला काही काम होतं म्हणून मी प्रुथ्वीच्या अंतरंगाची चायाचित्रं असणारं संकेतस्थळ उघडलं होतं. त्यात पथ्वीचं चायाचित्रही होतं. आणि मी हे करत असताना नेमका शिनचॆनमध्ये ब्रेक आला होता. गनीम बरोबर प्रश्नासुराच्या तावडीत सापडला. त्यात परवा सुट्टीत नेहरु प्लॆनेटोरियमला भेट झाल्यानं बेसिक नॊलेजमध्ये मोलाची भर पडली होतीच. तर हा वर सांगितलेला प्रश्न सटकन आल. करता काय. काम बाजुला ठेवलं आणि तयारीत बसले कारण आता किमान अर्धा तास तरी भुगोलापासून खगोलशास्र्त्रापर्यंतच्या व्हायवाला तोंड द्यावं लागणार होतं. शिवाय आदर्श बालसंगोपनावर नितांत विश्वास असल्यानं मुलांच्या जिद्न्यासा मारायच्या नाहीत हा नियम घालून घेतलेला. इथं तर फाजिल चौकशा नव्हत्या. मग वयवर्ष साडेचारच्या मेंदुला झेपेल इतपत सोप्या भाषेत प्रुथ्वी कशी असते हे समजावून झालं. हाताशी इंटरनेट होतंच म्हणून सरळ चार दोन संकेतस्थळं उघडली आणि तिला सूर्यमंडलाची माहिती दिली. सगळ्या ग्रहांशी ओळख करुन दिली त्यातली आपली प्रुथ्वी म्हणजे प्रश्नासुराची "दुनिया" तिनं लग्गेच ओळखली. माझ्या प्रेमाला मग उधाणच आलं. मनाशी ताडल्याप्रमाणं तासभर व्हायवा झाला आणि शंकासुराच्या शंका कमी झाल्या. मला अलिकडे या प्रश्नांना थोपवायचा अक्सीर इलाज सापडला आहे. बेसिक माहिती दिल्यानंतर मी तिला सांगते तू बिग होशील आणि फर्स्ट मध्ये किंवा सेव्हन्थमध्ये जाशील तेव्हा टिचरच हे सगळं तुला शिकवतील. तुम्हाला बुक देतील नां त्यात हे सगळं असतं. याचा दुहेरी फायदा होतो. एक तर शाळेच्या आणि होमवर्कच्याबाबतीत काही कटकट रहात नाही कारण लवकर मोठ्ठं होउन सेव्हन्थमध्ये जायचं असतं नां? आणि दुसरा फायदा म्हणजे शंका कमी होतात. सगळं झाल्यावर मला अचानकच आठवलं की मी साधारण दुसरी तिसरीला असताना आईला असंच प्रुथ्वी कशी असते हे विचारुन भंडावून सोडलं होतं. आई शिक्शिका असल्यानं तिनं मला छान समजावून सांगितलं. शेवटी हे ही सांगितलं की प्रुथ्वी गोल असते. शाळेत नेउन मॊडेल दाखवलं. हे सगळं मला जाम नवं होतं. मला आजही शंका आहे की जर प्रुथ्वी गोल आहे तर आपल्याखाली असणारी(म्हणजे चेंडुच्या दुसर्या उलट बाजुला असणार्या देशातली माणसं) उलटी पडत कशी नाहीत? म्हणजे ती माणसं खाली डोकं वर पाय अशी उभी आहेत का? शेवटी मी आईला म्हटलं की,"आई गं, मला धावत जाऊन प्रुथ्वीच्या खाली वाकून बघायचंय" आई म्हणाली,"जा हं. मोठ्ठी झालीस की जा. म्हणजे वाकून बघताना पड्णार नाहीस" आजही सगळं पुराण ऐकून झाल्यावर प्रुथ्वीच्या पोटात काय काय असतं याची यादी ऐकल्यानंतर शंकासूरानं अखेरची घोषणा केली,"आई आपण आपल्या किचमधला नाईफ घेउन दुनिया चिरुन पाहुया का आत काय आहे?" पहिल्यांदा दचकलेच. म्हटलं डायरेक्ट चिरफाडीची भाषा? पण मग हसायलाही आलं. म्हटलं चिरुया हं पण आता मला जरा काम आहे नां, ते झालं की मग किंवा सण्डेला करुया का? तर शंकासूर टाळ्या वाजवून म्हणाला"हे ढिंक टिका. मस्त चालेल. सण्डेला मॊलमध्ये जाउया नको, त्यापेक्शा हे काम करु. आणि आत्ता बाबुपण झोपलाय नां? तो उठला की त्यालाही ही आयडिया सांगुया का?" कपाळाला हात लावायचा राहिला. इतक्यात परत शिनचॆन लागलं आणि गनीम सुटला. कधी नव्हे तो शिनचॆन लागल्याचा मला जाम आनंद झाला.
 
माझ्याच आमचा तो बाब्याचा हा संक्शिप्त उतारा.
 

आमचा तो बाब्या

आमचा नां एक बाब्या होता. म्हणजे कोणी छोटा मुलगा नाही तर आमचा बाब्या नावाचा एक बोका होता. या बाब्याचे एक एक प्रताप म्हण्जे एक एक किस्सा आहे. या बाब्याला एक विचित्रच सवय होती तो चक्क कपडे खायचा. म्हणजे उंदरानी कपडे खाऊन वात आणल्यामुळं याला पाळलं तर यानं उंदरांना व्ही आर एस देउन ते काम आपल्याकडेच घेतलं. उंदीर, झुरळं याच्या मिशीसमोरुन जायची पण हां त्यांच्याकडे "हुंगुनही" पहायचा नाही. त्यानं आपल्या राज्यात सगळ्यांना अभय दिल्यानं सगळे किटक-प्राणी आमच्या घरात निर्भयपणानं वावरायचे. एकदा तर यानं कमालच केली. झालं काय की शेजारच्या पाटलांच्या दीपकनं पॆंटच्या खिशातून अंडी आणली होती, त्यातल एक फुटलं म्हणून त्यानं पॆंट धुवायला टाकली, तेव्हढ्या वेळात हा तिथे गेला आणि मागचा तो खिसाच त्यानं कुतरडला. ती पॆंट नंतर टाकवेनाही आणि घालयचिही पंचायतच नां? आम्ही एकदा जेवत असताना हा आपला शांतपणानं रगात डोकं खुपसून झोपला होता. आम्हाला वाटलं की बिचर्याला थंडी वाजत आहे म्हणून झोपला असेल. जेवणं झाली, सगळी आवरा आवर झाल्यावर अंथरुणं घालून आम्ही झोपायला गेलो तर अंधारात बाबांचा जोरात आवाज आला,"बाब्या<<<" आम्ही सगळे दचकून उठलो आणि खटाखट लाईट लावून काय झालं म्हणून बाबांकडे पहायला लागलो, समोरचं द्रुष्य पाहून एक क्शण सगळे चुपचाप उभे होते आणि मग बाबांसहित सगळेच खो खो हसायला लागले. 
बाब्यानं कुरतडलेल्या रगाच्या ताज्या ताज्या भोकातून बाबांचा रागीट चेहरा बाहेर डोकावत होता. ते द्रुष्य कमालिचं विनोदी होतं. आजही ते ऐतिहासिक रग आमच्याकडे आहेत. 
त्यांचं काय करावं न सुचल्यानं बरेच महिने ते तसेच पडून होते. 
मग मोठ्या भावाला एक कल्पना सुचली 
आणि त्यानं त्या दोन फाटक्या रगांचा मिळून एक धड रग बनविला. 
आजही घरी येणार्या पाहुण्याला तो रग दिसला की ते हमखास प्रश्न विचारतात,"अरेच्चा! हा रग असा काय?", मग त्याला बाब्याचं सगळं पुराण सांगावं लागतं. 
हे ऐकल्यावर पुढचं वाक्यही प्रत्येक पाहुणा न चुकता बोलतो,"अरेच्चा? मग तुम्ही त्याला इतके वर्ष घरात ठेवलंच कसं?" आता तुम्हीही सांगा आपल्या घरात जर असा व्रात्य बाब्या असेल आणि
 तो आपलाच मुलगा असेल तर त्याला आपण सोडून देतो? मग या बाब्याला तरी कसं सोडणार?  
या आणि त्या बाब्यात फरक असेलच तर इतकाच आहे की आमच्या बाब्याला दोन पाय जास्त होते आणि हो एक शेपुटही होतं. म्हणून काय झालं? तो "आमचा बाब्या" होता. 
एक दिवस बाहेर भटकायला गेला तो परत आलाच नाही.
 

आता आठवतही नाही......

आज पुन्हा आभाळ भरुन आलंय
अगदी त्या दिवशीसारखंच
तसंच गच्च दाटून आलेलं....

मागे वळून पाहिलं तेव्हा समजंलच नाही
नभ बरसतायत की डोळे
पापणीवर ट्पोरी फुलं होती उमलली
गालावरुन वहात होतं ते पाणी की अश्रु?
आता आठवतही नाही...

रस्ता पुढे होता, पावलं मात्र मागेच रेंगाळली
तुझ्या हातात गुंफलेली बोटं सुटली तरी कधी?
तुझी पाठमोरी सावलीही मला माझी भासत होती
वळून पाहिलं होतंस कां रे एकदा तरी...
आता आठवतंही नाही...
आजही पुन्हा तसंच दाटून आलंय आभाळ....गच्च

तुलाही आठवतो का तो दिवस?
गच्च अंधारलेल्या भर दुपारी
घेतला होता निरोप.....
काय म्हणाला होतास त्यावेळी
आता आठवतही नाही...
ओठ थरथरले होते ते कशानं
दाटलेल्या हुंदक्यानं की
शब्दांनी साथ सोडल्यानं
काहीच आठवत नाही.....

आज पुन्हा एकदा सगळं आठवतंय
अंधुकसं....त्या दिवशिच्या दुपारसारखं
कारण आजही आभाळ तसंच आहे गच्च दाटलेलं....
 
ऐसा नहीं की आपके जाने का गम हमे नहीं
लेकीन क्या करे ये कम्बख्त आंसू भी तो बेवफा निकले....

तकिये तले मेरा सपना गिरा होगा
जरा देखना, न छुना उसको
कहीं चूर ना हो जाए


वहीं होगा कहीं मेरा एक अधुरा
ख्वाब भी, जरा संभालना
मासूम है वो भी

एक एक पल जो बिताए हमने साथ में
लायी तो हूं उसकी पोटली अपनी यादों में
अगर कोई पल छुटा भी है, वहीं कही गिरा भी है
तो....रहने दो वहीं उसे
क्या पता शायद...वो पल तुम्हे याद दिलाये
कभी हम भी आप की सांसो में शामिल थे....
 

हॆलो टोन



आजकाल कोणाच्याही भ्रमणध्वनीवर म्हणजे सोप्या मराठीत सांगायचं तर मोबाईलवर फोन करा. तुम्हाला पलिकडून ट्रिंग ट्रिंग अशी रिंग ऐकू येणं जवळपास दूर्मिळ म्हणण्याइतकं दुरापस्त झालंय. अलिकडे हेलोट्युन्स लावायची फॆशन आहे. म्हणजे आपण नंबर फिरवला की पलिकडून थेट गाणंच ऐकायला येतं. कोणी कोणतं गाणं लावावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण, यामुळे काय भयानक विनोद होतात हे एकदा पहाच. एका मैत्रिणिच्या मोबाईलवर कित्येक महिने आंखो में तेरी अजब सी अजब सी अदाएं है, असं गाणं होतं. एक दिवस म्हटलं संपल्या बाई सगळ्या अदा, आता तरी बदल की गाणं. एकिला कधिही फोन करा तिच्या मोबाईलवर कायमची आरती चालू असायची,"ओम जय जगदीश हरे, स्वामी जय जगदीश हरे" महिनोन महिने नुसतीच आरती ऐकून वैताग आला. तिला म्हटलं आता बास झाली आरती. मंत्रपुष्प म्हण आणि प्रसाद वाट. यावर कडी म्हणजे फॆमिली डॊक्टरांच्या मोबाईलवर आये हो मेरी जिंगदी में तुम बहार बनके हे गाणं होतं. आता बोला. इकडे आम्ही "लोटापरेडला" वैतागून डॊक्टरची अपॊईंटमेंट घेण्यासाठी फोन कारावा तर ते म्हणतायत आये हो बहार बनके? कसली बहार अन कसलं काय? एकिच्या फोनवर होतं,"कौसल्येचा राम बाई कौसल्येचा राम". हिला सकाळी फोन करा नाहीतर रात्री हिचा पाळणा आपला सततचा हलता. राम जोजवून जोजवून इतका झोपवल्यावर पुढच्या रामायणाचं काय होणार? ही गाणी परवडली पण "ते" गाणं नको. कोणतं? तेच ते फेमस "कोंबडी पळाली तंगडी धरुन". आमच्या एजंटच्या मोबाईलवर हे गाणं होतं. या एजंटनं अगदी रितिप्रमाणं आमचे पैसे घेउन आम्हाला वर फसवलंही होतं. त्याचा जाब विचारायला फोन करावा तर याची कोंबडी आपली सतत तुरुतुरु इकडून तिकडे पळतेय. वात आणला नुसता या कोंबडिनं. एखाद्याला तावातावानं भांडायला किंवा शिव्या घालायला फोन करावा आणि पलिकडून जगजितसिंगचं "तु ही माता, तु ही पिता है......हे राम हे राम" ऐकू यावं यापेक्शा डोक्याला दुसरा ताप नाही. एक तर अख्खी रामधून होईपर्यंत पलिकडचा फोनच उचलत नाही आणि त्यानं उचलल्यावर आपण तोपर्यंत शिव्याच विसरलेलो असतो. आहे की नाही गंमत. कशाचा कशाला संबंध नसताना तर ही गाणी ऐकली की भयंकर विनोदी वाटतं. आता रोज चिरलेली निवडलेली भाजी देणारा भाजिवाला असतो, आपल्याला दोन चार दिवस भाजी नको असते म्हणून आपण त्याला फोन करावा तर याच्या मोबाईलवर ऐकू येतं,"हमे तुमसे प्यार कितना ये हम नहीं जानते मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना". आता त्याचा आणि आपला काय संबंध? पण हे गाणं ऐकावं लागतं नां? इस्त्रीवाल्याला कपडे घेउन जा बाबा म्हणून निरोप देण्यासाठी फोन करावा तर त्याच्या फोनवर थेट ’डोली में बिठाके, सितारों से सजाके ले जाएगा एक रोज तुझे सावरियां’ असं ऐकल्यावर नाही म्हटलं तरी दचकायला होणारच नां? त्याच त्या गाण्यांना वैतागुन मध्यंतरी मी चक्क तामिळ ट्युन लावली तर लोक दचकून फोन कट करायला लागले. त्यांना वाटायचं की चुकिचा नंबर फिरवला की काय? मग परत नंबर फिरवून मूळ मुद्दा राहिला बाजुला आधी या ट्युनवरुनच झापायचे. अखेर करणार काय लोकआग्रहास्तव बदललं ते गाणं. बाय दी वे तुमची हॆलो ट्युन कोणती आहे?
 

शिमला-५

.....ड्रायव्हरनं एका दुकानापुढे गाडी उभी केली. दुकानात तोबा गर्दी. कोण काय करतंय काही कळत नव्हतं. भाजीबाजारासखा गोंधळ माजलेला. हवेत प्रचंड गारठा आणि थंडगार वारं सुटलेलं होतं. हे दुकान होतं रोहतांगमध्ये बर्फात घालायचे कपडे, स्किईंग्ज आणि शुज भाड्यानं मिळण्याचं. अखेरीस आम्ही आम्हाला साजेसे आणि मुख्य म्हणजे बसणारे कपडे घालून पुन्हा गाडीत बसलो. आता कपड्यांनी आम्ही चांगले जाडजूड झालेलो होतो त्यामुळे गाडीत दाटी झाली. आम्ही सगळे चंद्रमोहिमेला चालल्यासारखे दिसत होतो. अखेरीस मधल्या रस्त्यावर मी ते चिलखत काढून टाकलंच. आता कालपासून बर्फाचे दूरवर दिसणारे डोंगर अगदी कवेत आल्यासारखे दिसत होते. अधून मधून चक्क बर्फाचे कडे रस्त्याच्या बाजुला उभे होते. इतक्याजवळ बर्फाचा अख्खा डोंगर पाहून खुळावल्यासारखं होत होतं. हळू हळू बर्फाच्या भिंतिंचं प्रमाण वाढायला लागलं. चेकपोस्टजवळ गाडी थांबली. खालच्या बाजुला बर्फातले खेळ चालले होते. इथे वेळ घालविण्यापेक्शा बर्फात खेळायला लागू असा विचार मांडला जाऊ लागला. पण आमच्यासोबत आलेल्या गाईड कम प्रशिक्शकाचं दुकान झिरो पोईंटवर होतं शिवाय ड्रायव्हर महाशयना आमच्या गुडियाला बडफ की गुंफा दाखवायची सुरसुरी आली होतीच. अखेर दोन अडीच तास तिथे घालविल्यावर आम्हाला ओके सिग्नल मिळून आम्ही रोहतांगच्या रस्त्याला लागलो. ह्रद्य कमकुवत असणार्यांनी इकडे तिकडे न बघता नाकासमोर बघत जावं असा सगळा रस्ता. एकाचवेळेस दोन गाड्या समोरा समोर आल्या तर दरीकडेची गाडी अगदी दरीकडेला झुकलेली दिसायची आणि तो अर्धा मिनिट श्वास घ्यायलाही सुचायचं नाही. आता हवेतला गोठलेपणा वाढत चालला. दूर टोकाकडे बोट करून गाईड म्हणाला अपने को उध्धर जाना है जी. त्यानं दाखवलेल्या दिशेनं पाहिलं तर आकाशा, डोंगर एकच झालेलं. जसं काही पांढरा शुभ्र पडदाच कोणितरी उभा केला होता. आता त्या पांधरट ओल्या पडद्याकडे आम्ही चाललो होतो. जसे पुढे जाऊ तसे रस्ता दिसत होता. अचानकच पुढच्या गाड्या वळायला लागलेल्या दिसल्या. पोलिस दिसले. म्हटलं काय झालं? तर रस्त्यात एक भला दांडगा हिमनग ढासळला होता. रस्ताभर बर्फाचा चिखल झाला होता. गाड्या रुतत होत्या. अखेर सगळ्या गाड्या मागे वळविल्या. म्हटलं आता काय? गाईड म्हणाल उतरा इथेच. आता आलोच आहोत. सगळे खाली उतरलो. आता खरी गम्मत चालू झाली. रस्त्यावरुन वर चढून जायचं होतं. पहाताना सोप्पं वाटत होतं पण पाय ठेवल्यावर समजलं. पाय ठेवला की तो आत रुततच नव्हता परत खाली घसरायचा, पायात भले मोठे गम शुज आणि थंडिनं बधिरता आलेली त्यामुळे पायाच्या संवेदना जवळपास गेलेल्या होत्या.त्यामुळे घसरत खाली आल्यावरच समजायचं की आपण घारलोय. पुढच्या चार आठजणांची सर्कस पाहिल्यावर युक्ती केली गाईडकडून स्किईंगसाठी असणारी स्टिक घेतली आणि ती रुतवून वर चढलो. हीच युक्ती मागे येणार्या सगळ्यांनी वापरली. वर आलो तर नजर जाईल तिकडे बर्फ आणि नाकासमोरुन वहाणारं बर्फ. गाईडनं सटासट फोटो काढायला सुरवात केली. बर्फाचे गोळे बिळे एकमेकाला मारुन झाले, बर्फाचा किल्ला करुन झाला आणि मग जवळ दगडासारखं काही तरी दिसत होतं त्यावर टेकलो तर गाईड म्हणाला चलो मॆडमजी चलते है. म्हटलं आता कुठं चलते है बाबा. झालं नां? तो म्हणाला नहीं अभ्भी हमारी दुकान कहां है? वहां चलो. बर्फ के गेम खेलेंगे. त्याला विचारलं की कुठं आहे दुकान? त्यानं समोर बोट करुन दाखवलं. धुकट हवेमुळं फार लांबचं दिसत नव्हतं. म्हणून गेलो त्याच्या मागे. जरा पंधरा मिनिटं चाललो(चाललो कसले? खरं तर चढलो) तर आमच्यातले निम्मे ढेपाळले. बाकिचे गाईडला और कितना दूर विचारत चालतच राहिले. तो आपला सतत समोरच बोट दाखवत होता. अखेर डोंगराच्या टोकावर आलो. मग म्हणाला आता खाली उतरायचं. करतो काय. उतरलो. तर आम्ही परत रस्त्याला लागलो होतो. मधला बर्फाचा कडा कोसळलेला भाग वगळून त्यानं आम्हाला चक्क ट्रेक करत आणलं होतं. बहाद्दरच म्हणायला हवा. नाही तर आमच्यातल्या रडक्या शिपायांकडे पाहून एखाद्यानं तिथेच सोडलं असतं. मग रस्त्यावरुन परत एकदा मघाच्याप्रमाणे वर चढलो. आता कधी येईल तेव्हा येईल तो झिरो पोईंट असं म्हणत त्याच्या मागोमाग चालत राहिलो. जरा चढून वर आलो तर लोकांच्या दंग्याचे आवाज यायला लागले. समोर पाहिलं तर एका ओळीत टपर्या दिसायला लागल्या होत्या. टपर्या ओलांडून आलो आणि बघतच राहिलो. समोर बर्फाचं विस्तिर्ण मैदानच पसरलं होतं. लोक मजेत बर्फातले खेळ खेळत होते, खिदळत होते. गाईडनं मग स्किईंग करुन दाखवलं. बघून वाटलं सोप्पंच तर आहे. पण त्याच्या शुजमध्ये पाय घातले, अजून लोक केलं होतंच आणि तो सूचना देतच होता की पाय वर! कसं बसं सावरत उठले. आता मात्र गाईडनं धोका पत्करला नाही. स्किईंगच्यामगे त्यानं पाय ठेवला आणि हळू हळू पुढे झुकुन जायला सांगितलं. हळू हळू कुठलं? गाडीनं एकदम पाचवा गियर टाकल्यासारखी सुसाट उतारावरुन सुटले. म्हटलं संपलं आता. राम बोलो. आजुबाजुनं स्नोबाईक्स सुसाट येत होत्या, कुठे ते स्लिजवाले धावत येत होते, घोडे होते या सगळ्यात मी आणि माझ्यासारखे सुसाटलेले स्किईंगवाले. अखेर तो क्शण आलाच! सरसरत जात असतानाच काय झालं माहित नाही, जरा उजवीकडे आपोआप वळल्यासारखं झालं आणि धडाम! पाय वर, स्टिक एक वर एक खाली पाठ टेकवून सपशेल पलटी मारली. आता तर उठायचिही शक्ती नव्हती. कारण एकदम सुसाट आल्यामुळे, ते ही अजाणता, गाळण उडालेली होती त्यात अचानकच पलटी खाल्यानं भेदरुनच गेले. पण किरकोळ दिसणार्या गाईडनं उठवून उभं केलं आणि परत एकदा आमची शिकवणी चालू झाली. आता कसलंही थ्रिल अनुभवायची इच्छा रहिली नव्हती. म्हटलं बाबा, झालं तेव्हढं बास झालं, आता इथुन जाते साधेपणानं चालत. तर हा ऐकायलाच तयार नाही. मला लहानपणिचा प्रसंग आठवला. सायकल चालवायला शिकत असताना पहिल्यांदाच अशीच पडले होते, गुडघे फुटले होते, भावाला म्हटलं आता बास बाबा, जाते इथुन चालत घरी. तर हा ऐकायलाच तयार नाही. घरी जायचं तर सायकल घेउनच अशी तंबीच दिल्यावर डोळ्यातून पाणी काढत जीव मुठीत घेउन सायकल कशी बशी घरी आणली. तेच आठवलं आत्ता. आत्ता अगदी पाणी नाही आलं पण काकुळतिला येउन परत आले आणि मग हुश्श झालं. खुर्चिवर बसकण मारल्यावर मात्र गाईड खो खो हसायलाच लागला. इतक्या मनोरंजनानंतर हसायलाच येणार नां? सगळेचजण असेच पडण्यात गुंग होते. कोणी फोटो काढत होतं. एक सलमान खान तर शर्ट काढून बर्फावर झोपून पोझ देत होता. एव्हाना चक्क उकडायला लागलं होतं. थोडिशी पोटपुजा करुन आम्ही परतिच्या वाटेला लागलो. परतिची वाट तीच होती. आता बच्चेकंपनिचे पाय दुखायला लागले होते म्हणून स्लेजवाल्याला ठरविला. मी म्हटलं मी चालत येणार तर सगळे आग्रह करायला लागले. म्हटलं तेव्हढाच व्यायाम. नाही तरी आता परत बर्फात चालण्याचा योग लवकर थोडाच येणार आहे? पण खरं सांगायचं तर त्या स्लेजलाच मी घाबरले होते. कसलं काय ते? अखेर मला बसावंच लागलं. उतारावरुन सरसरत खाली आलो आणि अगदी शेवटच्या क्शणाला व्रात्य स्लेजवाल्यानं स्लेज तिरकी करुन आम्हाला हिमालयापुढे नतमस्तक व्हायला लावलंच. धडपडत उठलो तर आमच्या मागून अशीच बरीच मंडळी किंचाळत लोटांगण घालत होती. त्यांचं धडपडणं बघून मात्र जाम हसायला येत होतं. एव्हाना वेळकाळाचं भान राहिलं नव्हतं. गाडीत बसलो आणि घड्याळ पाहिलं तर चार वाजले होते. महत्वाचा टप्पा संपला होता. रुख रुख लागली होती. खरं सांगायचं तर एकदा हा निसर्ग पाहिल्यानंतर काहीच बघावसं वाटत नव्हतं.
 

शिमला-४





.....अखेर पावसाला दया आलीच. संध्याकाळी पाच वाजायच्या सुमारास तो थांबला आणि आम्ही थेट गाडीत बसलो. आता जायचं होतं शिमल्यातल्या प्रसिध्द माल रोडला. या ठिकाणचं वैशिष्टय म्हणजे या रोडवर जाण्यासाठी लिफ्ट आहे. तिकिट आहे पण चालताना, चढताना दम लागणार्यांसाठी उत्तम सोय होते. माल रोडवर जाम भटकलो. चर्च पाहिलं. मुख्य म्हणजे हुडहुड थंडितला माहोल अनुभवला. त्याच रोडवर असणार्या हॊटेलमधून जेवून बाहेर पडलो आणि परत लिफ्टनं खाली येउन गाडीची वाट पहात उभे राहिलो. गाडी येईपर्यंतची पंधरावीस मिनिटं बर्फ झाला अगदी. गाडीत हुश्शार ड्रायव्हरनं आधीच हिटर लावून ठेवला होता म्हणून बरं. परत हॊटेलवर आलो आणि गुडूप झोपलो. दुसर्या दिवशी शिमल्यातला मुक्काम हलवला. बाय शिमला म्हणत असतानाच परत एकदा फुरसत के रात दिन अनुभवायला यायचं असं पक्कं ठरवूनच तिथून निघालो. आता मनाली गाठायचं होतं. बर्फ बघायचे वेध लागले होते. मनालिचा रस्ता चालू झाला आमची कौतुकानं आणि बरोबरीच्यांची भितिनं नजरबंदी झाली. एका बाजुला उंचच उंच कडा आणि दुसर्या बाजुला खोल दरीत रुद्र रुप दाखवत वहाणारी नदी हा नजारा मनाली येईपर्यंत होता. बरोबरीची मंडळी चुपचाप बसली होती. आम्हाला अशा रस्त्यांची सवय असल्यानं आम्ही मात्र प्रवास मस्त एंजॊय करत होतो. खरं तर सतत वाटत होतं की अशा प्रवासाला काही अर्थ नाही. मध्ये मध्ये उतरायला हवं. काही ठिकाणी तर नदिचं पात्र अगदी शहाण्याबाळासारखं होतं. तिथे खाली नदीत उतरण्याचा मोह आवरता येईना. अखेर एका ठिकाणी तशी संधी मिळालिच. पावसानं त्याची एक लकेर घेतल्यानं गाडीवरच्या बॆगा प्लॆस्टिकनं झाकणं अपरिहार्य होतं. म्हणून ड्रायव्हरसाहेब त्या कामाला लागले, आणि आम्ही नदिचं बोट पकडायला धावलो. अखेर मन कसं शांत शांत झालं. गाडीत बसलो आणि मनालिला कुच केलं. वाटेत कुल्लू आलं आणि लेक जोरात किंचाळली "बडफ". सगळे पेंगत होते ते एकदम जागे झाले. खिडकीतून बाहेर पाहिलं तर बर्फाचे सुळके दिसत होते. ते पहिलं गोंडस दर्शन झालं आणि भेटी लागी जिवा लागलिसे आस अशी स्थिती झाली. कधी एकदा बर्फात जाऊन त्याच्यात मस्ती करतोय असं झालं. मग तो सुळका जसा काही आम्हाला वाट दाखवायलाच आल्यासारखा अखेरपर्यंत दिसत राहिला. मध्येच काही मिनिटासाठी गायब व्हायचा आणि लेक ड्रायव्हरला सारखं, "डायव्हड अंकल बडफ देखना है" म्हणून भुणभुण करायची. त्यावर ड्रायव्हरही हसत म्हणायचा, "अभी ये लास्ट नाईट गुडिया. कल हम आपको बडफ की गुंफा में ले जाएंगे". त्यावर गुंफा काय हे माहित नसल्यानं मोर्चा सहाजिकच आमच्याकडे वळला. तिच्या एकामागूनएक येणार्या प्रश्नांना उत्तरं देईपर्यंत मनाली आलंच. ड्रायव्हरनं गाडी थेट मनालीच्या बाजारपेठेत नेली आणि मग लक्शात आलं इथेही आमचं हॊटेल मिसिंग आहे. मग पुन्हा पत्ते विचारत फिरणं आलं. अखेर आठ साडे आठ वाजता आमचं कन्याल रोडवरचं हॊटेल आम्हाला सापडलं. इथे जाऊन आधी जेवणाची ऒर्डर दिली आणि भुकेल्या पोटानं वाट बघत बसलो. साडे आठ वाजता दिलेली ऒर्डर साडे अकरा वाजता आली आणि तिही मस्त चुकिची. आधिच पोटात भुकेनं कल्लोळ लाजलेला त्यात भलतिच ऒर्डर बघून काय करावं हे संतापानं सुचेना. बरं तसं गिळावं तर त्यापैकी रोटी सोडली तर सगळेच आम्ही न खाणारे आमच्या ब्लॆकलिस्टमधले पदार्थ. मग काय. मॆनेजरबरोबर जाम जुंपली. अखेर कसंबसं जे आहे ते समोर त्यातलं वेचून वेचून पोटात ढकललं आणि झोपायच्या तयारीला लागलो. एव्हाना साडेबारा वाजून गेले होते. इतक्यात दार वाजलं म्हणून उघडलं तर दारात वेटर तीन चॊकलेटं घेउन उभा. म्हटलं हे काय नवीन? तर म्हणाला शेफ सरनी सॊरी म्हटलंय. करता काय ते सौजन्य स्वीकारण्यावाचून पर्याय नव्हता. सकाळी उठलो तर नविनच नाटक. अंघोळीला गरम पाणिच नाही. एक बादली काढल्यावर तासभर दुसरी बादली येण्यासाठी. मग थंड पाणी अंगावर आरडाओरडा करत घेउन अंघोळ आटोपली आणि गाडीत बसलो. आज रोहतांगपासला जायचं होतं. सकाळी सहाचं टार्गेट होतं पण अंघोळ प्रकरणामुळे बाहेर यायलाच सात वाजले.
 

शिमला-३




.......दुसर्या दिवशी डोळे उघडले आणि खिडकीचा पडदा बाजुला करुन बाहेर पाहिलं आणि शप्पथ सांगते इतकी अप्रतिम सकाळ बहुदा आयुष्यात पहिलीच असेल. काल रात्री अंधारात आम्ही शिमल्याच्या केवळ रस्त्यावरुन आलो होतो आज शिमला डोळ्यासमोर असं उभं होतं. अप्रतिम. सुंदर जे काही काठवतील ते शब्दही तोकडे पडावेत असं सुंदर द्रुष्य समोर दिसत होतं. समोर खोल हिरवीकंच झाड्यांच्या टोप्या घातलेली दरी, त्यात असणार्या दोन चार घरांच्या तुरळक वस्त्या, त्यात काम करणारे स्थानिक लोक, स्वच्छ कोवळा सूर्यप्रकाश, पाखरांची चिलचिल, सगळं एखाद्या कल्पनेतल्या कॆन्व्हासमध्ये चितारल्यासारखं.....इतकं छान प्रसन्न पूर्वी कधी वाटलं होतं आठवेचना. त्याच उत्साहात, रजईत हरवलेल्या बापलेकीला वरुन माझ्याही रजईत लपेटून एकटिच छान भटकायला निघाले. पावसानं सगळं छान धुतलं गेलं होतं. जिकडे नजर जाईल तिकडे हिरवाईच दिसत होती, मनात आतवर झिरपत जाणारा शांतपणा होता, कोठेही कसलिही घाई दिसत नव्हती की जाणवत नव्हती. सगळं निवांत होतं, माणसंही फार दिसत नव्हती म्हणजे नव्हतीच त्या शांत रस्त्यावर बहुदा मी एकटिच होते. तंद्रीत किती दूर चालत गेले समजलंच नाही. अखेर लक्शात आलं की अरे आता परतायला हवं. परत आले आणि हॊटेलचा फेरफटका मारुउन आले. टेकडिच्या कुशित लाडानं विसावलेलं आमचं हॊटेल इतकं गोंडस दिसत होतं. तसं पहायला गेलं तर चार मजली होतं पण एकावर मजले नव्हते तर टेकडिच्या उतारानं ते मजले विसावले होते. त्यामुळे प्रत्येक मजल्यापुढे टेकडिचा एक तुकडा होता. बाहेरुनही वरपर्यंत जाता येत होतच आणि आतूनही सोय होती. मी त्या क्शणी हॊटेलच्याच प्रेमात पडले. ज्यानं कल्पकता वापरुन ते बांधलं होतं त्याचं खरंच कौतुक वाटलं. एव्हाना नवर्याची सकाळ झाली होती आणि डोळे चोळत मला शोधत तो आमच्या खोलीबाहेर फिरत होता. मी वरुन त्याला हाक मारुन मी वर असल्याचं सांगितलं. चार चार पायर्या एकदम ओलांडत धावत तो वर आला. शिमल्याची लोभस सकाळ पाहून त्यानं डोळे विस्फारले की मी चक्क त्याच्या आधी उठून अशी आवरुन सावरुन ताजी उभी होते म्हणून कोण जाणे. पण त्याचा चेहरा लगेच खुलला. कित्येक वर्षांनंतर दोघेच अशी छान सकाळ अनुभवत होतो. प्रसन्न वातावरणाचा मनावरही लगेचच परिणाम होतो. जशी मी त्या हॊटेलच्या त्याच्या आजुबाजुच्या नजार्याच्या प्रेमात पडले होते तसाच तो ही पडला होता. तिथल्या तिथे आम्ही निर्णय घेतला की पुढच्यावेळेस केवळ शिमल्यातला निवांतपणा भरुन घ्यायला यायचं आणि याच हॊटेलमध्ये रहायचं. एव्हाना आम्हाला आमच्यातल्या तिसर्याची आठवण झाली. आम्ही खाली गेलो तरी बाबाच्या लेकीचे डोळे उघडले नव्हते. तिला उठवून सगळ्यांचं आवरुन मग कुफ्री पॊईंट बघायला गेलो. तिकडे जाण्यासाठी घोड्यावरुन जावं लागणार होतं. पहिल्यांदा जाम भिती वाटली पण हिय्या करुन बसलेच. दगडांनी खचाखच भरलेल्या वाटेवरुन घोडं वर चढायला लागलं आणि कढी पातळ झाली. कधी एकदा वर पोहचू असं झालं. अखेर वर गेलो. तिथे तासभर टाईमपास केला. लेकीला भूक लागली. म्हटलं आता हिला काय द्यायचं तर एकदम चिरपरिचित वास आला. लेक तर धावतच गेली. त्या टोकावरच्या टपरीत चक्क दोन मिनिट मध्ये तैय्यार होणारं मॆगी बनत होतं. ती पहिली भेट होती. हिमाचलमध्ये कोणत्याही कड्याच्या अगदी टोकावरही दो मिनिट मॆगी मिळतं याचं नंतर आश्चर्य वाटणं बंद झालं पण तिचं इतक्या टोकावरचं पहिलं दर्शन मात्र चकीत करणारं होतं. सकाळपासून छान कोवळं ऊन अंगावर घेतलेल्या पहाडिवरचं वातावरणं काही मिनिटांत बदललं. आकाश काळंभोर झालं. थंडगार बोचरं वारं वहायला लागलं. बरोबरचा गाईड खाली उतरण्याची घाई करायला लागला. आम्हीच त्याला थोपवत होतो. त्यावरचं त्याचं वाक्य एकमदम मस्त होतं,"ओ मॆडमजी पहाडी का मौसम और बंबई का फॆशन का कुछ भरोसा नहीं. कब बदले पताही नहीं चलता". त्याच्या या वाक्यावर यथेच्छ फिरक्या घेतच आम्ही माघारी फिरलो. उतरण जास्त भयान होती. पण एव्हाना घोड्यावरचा माझा अविश्वास कमी झाला होता. भिती घालविण्यासाठी जोरजोरात गप्पा टप्पा करत आम्ही उतरलो. गाडीत बसतच होतो की पावसानं झोडपायला सुरवात केली. गाईडचं म्हणणं शब्दश: पटलं. मिनिटभरापूर्वी छान हवा होती आणि आता तुफानी पाऊस. वाटेतच जाताना एका ठिकाणी जेवलो आणि चुपचाप हॊटेलवर जाऊन बसलो. आत्ताशी निम्मा दिवस सरला होता आणि अवेळी आलेल्या पावसानं आमच्या उत्साहावर पाणी टाकलं होतं. देव करो हा अवेळी आलेला पाऊस त्याचं बरसणं आटोपतं घेवो असं घोकत. खिडकीबाहेर डोळे चिकटवून बसलो.....
 

शिमला-२



......टिम्बर ट्रेलवरुन निघालो आणि हवेतला गारवा वाढतच चालला. हिमाचलमध्ये आलो आहोत हे जाणवायला लागलं. शेवटी तर बॆगमधून शाली आणि स्वेटर निघालेच. आम्ही गेलो त्याच्या दोन दिवस आधी शिमल्यात पाऊस हजेरी लावून गेला होता त्यामुळे तर नेहमिपेक्शा जास्तच गारठा जाणवत होता. एव्हाना रात्र म्हणावी असा अंधार पडला होता. गच्च झाडांची गर्दी अंधारात जास्तच भितीदायी वाटत होती. अधून मधून घरं दिसायला लागली, मग रस्त्याकडेला लावलेल्या गाड्या दिसायला लागल्या आणि शिमल्यात पोहोचल्याचं समजलं. हिमाचलमध्ये जिथे जिथे गेले तिथे अगदी ठळकपणानं दोन गोष्टी दिसल्या एक हिमालयाची शिखरं आणि दुसर्या प्रचंड संख्येत असणार्या गाड्या. रस्त्याच्याकडेला कठड्याप्रमाणे गाडया ओळित लावून ठेवल्या होत्या. आम्हाला पोहोचेपर्यंत बराच उशिर झालेला असल्यानं शिमलावाले डाराडूर झालेले होते. एव्हाना रात्रिचे अकरा वाजले होते, आमचं हॊटेल एजंट नक्की कोणत्या भागात केलंय काही माहित नव्हतं. अशा किर्र रात्री पावसानं धुतलेल्या आणि गारठून रजईत गुडूप झालेल्या शिमल्यात आम्ही आमचं थोर हॊटेल शोधत होतो. एखादा माणूस दिसतोय का पहात होतो. आत्तापर्यंत एक गोष्ट स्वच्छ समजली होती की ज्या ड्रायव्हर महाशायांवर आम्ही माहितगार म्हणून विसंबलो होतो ते ही आमच्याइतकेच नवखे होते. त्यामुळे पत्ता शोधण्याची जबाबदारी आमच्यावर आली. आणि अखेर त्या थंडगार रात्री आम्हाला समोरुन एक अख्खा माणूस येताना दिसला, तो टप्प्यात आल्या आल्या झप झप सगळ्यांनिच काचा खाली करुन त्याला एकाचवेळेस शंभर एक प्रश्न विचारले. तो बिचारा थंडित पटपट पावलं उचलत हात चोळत घर गाठायला चालला होता आणि आमच्या कचाट्यात सापडला. अखेर त्याला सगळ्यांच्या प्रश्नातला एकच कॊमन शब्द समजला "कुफ्री रोड". बहुदा तो हुशार असावा त्यानं सांगितलं की आगे सिध्दे जाके लेफ्ट मारो जी. सुटलो एकदाचे म्हणत पुन्हा एकदा गाडी चालली. सिध्दे जात असतानाच ड्रायव्हरनं दिलेल्या सुचनेप्रमाणे सगळ्यांची डोकी डाव्या बाजुला वळून हॊटेलचा बोर्ड कुठे दिसतोय का शोधत होती. सगळा लेफ्ट संपला, तुरळक दिसणारी हॊटेल संपली, रस्ता खाली उतरला तरी काही दिसेना. अखेर एका चौकात आल्यावर ड्रायव्हरनं अधिकृतरित्या जाहिर केलं,"ओ सरजी मुझे डाऊट है की हम रस्ता भुल गये....शायद. अब आगे जाने का मतलब ही नही है. आप एक काम करो जी वु हॊटलवाले को फोन करके पता पुछो". आमच्यापैकी बुकिंगवगैरेची जबाबदारी ज्याच्यावर होती त्याच्याकडे सगळे अपेक्शेनं पहायला लागले. तर चष्म्याच्या आडून लुकलुकत्या निष्पाप डोळ्यानं त्यानं सांगितलं की,"होटल का नंबर तो नहीं है. उसने बताया कुफ्री रोड बोलेगे तो ड्रायव्हर समझ जाएगा". सगळेजण त्याच्या या बोलण्यावर जितक्या संयमात त्याच्यावर डाफरता येईल तितक्या संयमात डाफरले. मग आता काय याचा खल चालू झाला. येण्यापूर्वी मी त्या होटेलची साईट पाहिली असल्यानं मला हॊटेलचा नसला तरी साईटचा पत्ता पाठ होता. तेव्हढ्या रात्री थंडितही मला कल्पना सुचली की मित्रमंडळिंपैकी रात्री हमखास ऒनलाईन असणार्या कोणालातरी साईटचं नाव सांगून ती साईट उघडायला लावून किमान फोन नंबर तरी मिळवावा. किमान माझ्या कल्पनेप्रमाणे तरी ही अगदी वर्ल्ड बेस्ट आयडिया होती पण ही कल्पना मांडल्या मांडल्या नवर्याचा जो "लूक" मिळाला त्यावरुन सुद्न्यास अधिक सांगणे न लगे समजून मी गप्प राहिले. आमचं हे सगळं मागे चालू होतंच तोपर्यंत ड्रायव्हर महाशयांनी गाडी वळवून परत पावली जायला सुरवातही केली होती. येताना ज्या ठिकाणी तुरळक हॊटेल दिसली होती तिथे परत एकदा नीट पहायचं ठरवलं तर यंदा आम्हाला आमच्या डाव्या बाजुला ते हॊटेल चक्क सापडलं. हॊटेलचं मूळ नाव मध्यात लहान अक्शरात आणि वर खाली इतर काही असल्यानं आमच्या नजरेतून ते सुटलं असावं आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे मघाशी तो जो थंडिनं काकडलेला मनुक्श होता त्यानं बरोब्बर उलट्या बाजुला वळायला सांगितलं होतं. अंत भला तो सब भला म्हणत आम्ही होटेलकडे जाणार्या रस्त्याकडे वळलो. रस्ता संपेना आणि हॊटेल दिसेना म्हटल्यावर वैतागलेल्या ड्रायव्हरनं विचारलच "सरजी ये होटेल आपको किसने सुझाया"? म्हटलं कप्पाळ आमचं. इतक्यात आम्ही अगदी हॊटेलच्या दारातच आलो. फटाफट उड्या मारत सगळेजण खाली उतरले. होटेलच्या रिसेप्शनमध्ये झोपलेली मंडळी बिचारी उठून बसली आणि हसतमुखानं आम्हाला सामोरी आली. तोंडानं काही म्हणत नसली तरी मनात त्यांच्या काय आहे वाचायला येतच होतं. दार उघडून आत आलो आमच्या मागोमाग होटेलचा केयरटेकर कम मॆनेजर जो कोणी होता तो स्वत: सामान घेउन आला. त्याला विचारलं, "खाने को क्या मिलेगा"? तो म्हणाला,"किचन तो कब का बंद हो गया मॆडमजी, चाहिए तो सॆंडविच बन सकता है" मनात म्हटलं"ई मध्यरात्री सॆंडविच कोण तोडणार"? कल्पनेनंही अंगावर काटा आला. पण वरुन साळसूदपणानं म्हटलं,"भैय्या साथ में चोटे बच्चे है, कम से कम उनके लिए तो चावल घी दो" त्यानं फारसा भाव दिला नाही. म्हटलं नाही तर नाही पण खडा तर मारुन पाहिला. एव्हाना परत एकदा नवर्यानं त्याचा वर्ल्ड फेमस तुच्छ ’लूक’ देउन झाला होता. मिही सराईतपणानं त्याला उलट लूक दिला. इतक्यात दार वाजलं आणि तो केयरटेकर कम मेनेजर आत आला आणि प्रचंड अपराध केल्यासारखा चेहरा करुन म्हणाला, ’मॆडमजी अभी आपको हम सिर्फ तवा रोटी, दाल, मिक्स सब्जी और सादा राईस दे सकते है, चलेगा’? त्याला म्हटलं,’चलेगा? दौडेगा’. त्या बोलण्यानंतर अर्धा पाऊण तासानं आम्ही सगळे जेवायला बसलो होतो मध्यरात्री बाराच्याही पुढे कितीतरी वाजले होते, आजुबाजुला हुडहुड थंडी होती आणि त्या तशा थंडित आमच्यासमोर गरमागरम पहाडी जेवणाची भांडी होती. व्वा व्वा! स्वर्गिय सुख यालाच म्हणतात की काय कोण जाणे. मघाशी,"आधी रात को खाना क्या खाएंगे? ब्रेड जाम खाके सोते है" म्हणणारी मंडळी भक्तिभावानं रोट्या चापत होती. ज्या अर्ध झोपलेल्या लेकिच्या नावावर हा घाट जमवून आणला होता तिनंही जणू माझी लाज राखण्यासाठी अगदी न कुरकुर करता व्यवस्थित जेवण केलं. त्यावर तिच्या बाबाकडे मी विजयी नजरेनं बघत आणि इतरांना मराठी समजत नव्हतं याचा ऎडव्हानटेज घेत तिथल्या तिथे म्हटलंच की बघ केवळ माझ्यामुळे तुझी भुकेली मुलगी ब्रेड जाम न खाता गरम गरम जेवण जेवतेय. यावर त्यानंही माझा आगावुपणा मान्य करत सगळ्यांच्यावतिनं जोरात म्हटलं, ’थॆंक्यु मॆडमजी, आपकी वजह से ये खाना नसिब हुवा’ यावर सगळ्यांनी संमतिची मान डोलवायचे कष्ट घेतले आणि पोटभरल्याचे ढेकर देत, कल सात बजे मिलेंगे म्हणत गुड नाईट केलं......
(अपूर्ण)
 

शिमला-१



यंदा सुट्टीत शिमल्याला जायचं जायचं जपत असताना अगदी जायचा दिवस येउन ठेपला. पॆकिंगचा गदारोळ, निरोपाचे फोन उचलतच पहाटे पहाटे विमानतळ गाठलं. शेवटच्या क्शणापर्यंत कसलं गं पॆकिंग करता नेहमी नेहमी ची कटकट ऐकतच घर सोडलं. वेळ गाठली आणि हुश्श झालं तर विमान तब्बल पंचेचाळीस मिनिटं उशिरानं उडलं. दिल्लीत उतरल्या उतरल्या घाणेरड्या वासानं डोकं उठलं कदाचित ही पुढच्या वैतागाची नांदी होती. बाहेर आलो तर हातात फलक घेउन आमचे सारथी महाशय उभे होते. त्यांच्यासोबत गाडीपाशी आल्यावर लक्शात आलं की माणसांच्या तुलनेत गाडी लहान आहे. इथुन पुढे दीड तास एजंट, सारथी अशा फोनच्या फैरी झडल्या. ही गाडी रहित करुन सरळ दोन स्वतंत्र गाड्या कराव्यात का? अशिही व्यापक चर्चा झाली. अखेर जाऊदे आता वेळ नको घालवायला असं म्हणून पदरी पडलेली गाडी पवित्र करुन घ्यायचं ठरलं. एक पिल्लू मांडिवर आणि दुसरं दोन सिटच्यामध्ये बॆग ठेवून त्यावर विराजमान करण्याचं सर्वानुमते ठरलं. बांधाबांध होउन अखेर निघालो. आमचे सारथीमहाशय फारच सावधपणानं गाडी चालविणारे निघाले. डिचक्यांव डिचक्यांव करत आमचा प्रवास चालू झाला. मध्ये कधीतरी कंटाळवाण्या प्रवासात जेवायला थांबलो तर ते हॊटेल चक्क अती उत्तम निघालं. क्या बात है! म्हणत जेवणावर तुटून पडलो. आता पुढचा प्रवास चालू झाला. मजल दरमजल करत पिंजौर गार्डनला पोहोचलो. प्रथम दर्शनी ताजमहालसारखं वाटत होतं. तिथे तासभर काढून पुन्हा एकदा गाडीला स्टार्टर दिला. शिमल्यातली पाईन झाडांच्या गर्दितली हिमशिखरं कधी एकदा पहातोय असं झालं होतं. पण गाडी तर आपल्याच नादात चालली होती. एरवी गाडिचा वेग कबूत ठेवावा अशा मताची मी आज मात्र चालक फारच हळू गाडी चालवतोय म्हणून कुरकुरत होते. माझ्या या कुरकुरीवर पतिराजांनी नजरेनच स्पिडॊमिटरकडे बघ असं सांगितलं. काटा शंभरच्या मागेपुढे झुलत होता. श्शी! शंभरच्या वेगाला गाडी इतकी हळू? आता तर हळू हळू सूर्यदेवही कलटी मारायच्या तयारिला लागले होते. त्यांची अशी आवरा सावर चालू असतानाच आम्ही काल्कात प्रवेश केला. आता कुठे शिमल्याच्या बोटावर आल्यासारखं फिलिंग यायला लागलं. हवेतला फुफाट्याचा कोरडेपणा जाऊन थंडावा यायला लागला. हिमाचलमध्ये आल्याचं जाणवायला लागलं. काल्काच्या बाजारपेठेतून गाडी जात असताना तिथली निवांत रेंगाळलेकी संध्याकाळ पहाताना एक प्रकारची गंमतच वाटायला लागली. काय मस्त निवांत संध्याकाळ होती त्या लोकांची, माणसांचे घोळके घराच्या, दुकानांच्या समोर निवांत बसले होते, कोणालाही कसलिही गडबड किंवा घाई दिसत नव्हती. एव्हाना आम्ही टिंबर ट्रेलपाशी आलो होतो. नवरा यापूर्वी तिथे जाउन आल्यानं त्याचा अगदी हट्टच होता की हा अनुभव घ्यायलाच हवा. म्हटलं चल बाबा! तिथे गेलो तर तिथल्या माणसानं विचारलं की "आप सचमुच जाना चाहते हो"? म्हटलं ही काय भानगड? असं का विचारलं यानं? नवर्र्याचं डोकं पोखरत केबलकारपाशी पोचलो. तिकिटं काढली आणि वाटपहायला लागलो. फोटो काढून होईपर्यंत ती आलिच आणि मग तिच्यात बसलो. बंदुकितून गोळी सुटावी तशी ती निघाली सुरवातिला जाणवलं नाही पण मध्येच खाली पाहिलं आणि पोटात गोळ्याचं गाठोडंच आवळलं. बाप रे! आम्ही दोन दर्यांच्यामधोमध लटकत होतो. मनात नाही म्हटलं तरी एका सेकंदासाठी विचार आलाच की, आत्ता या क्शणाला जर काही झालं, म्हणजे वायर वगैरे तुटली तर? कसलं सिमला आणि कसलं बर्फ. इथेच आटोपणार सगळं. हा विचार करेपर्यंतच टॊवर आला आणि डोळेच मिटून घेतले. म्हटलं आता या टॊवरवर जाउन आपण आदळणार....पण त्याला बगलेत घेत ज्या वेगानं केबल सुटली होती त्याच वेगानं ती पलिकडच्या तळावर आली आणि डुलत डुलत स्थिरावली. त्यातून टुण्णकन खाली पहिली उडी मारणारी मिच होते हे काही वेगळं सांगायला नको. आता इथं काय बघायचं असं वाटत असतानाच अंगावर छान थंडगार हव्या हव्याशा वार्याची शाल पांघरली गेली. हॊटेलच्या टोकावर जाउन सूर्यास्त पहात असताना मनात आलं नंतर कधीतरी फक्ता या हॊटेलमध्ये निवांत रहायला यायचं. अशा ठिकाणी हॊटेल बांधणार्याचं मला मनापासून कौतुक वाटलं. मधुचंद्रासाठी जाणार्या जोडप्यासाठी तर हे हॊटेल म्हणजे अगदी आयडियल ठिकाण वाटलं. सारी दुनियासे दूर....हवा तितका एकांत....कोणाची कटकट नाही...कोलाहल नाही..नजर जाईल तिकडे फक्त डोंगररांगा आणि शिरशिरी आणणारा थंडगार वारा....गरजेला हायफाय हॊटेल...उत्तम जेवण...रहाणं उत्तम...मधुचंद्रासाठी जाणार्या जोडप्याला यापेक्शा वेगळं आणखी काय हवं असतं?......हम्म....फारच रोमॆंटिक वगैरे वाटायला लागून पुढची ट्रिप कॆन्सल होण्याआधीच आम्ही पुन्हा एकदा केबलराणीत बसून परतलो. परतिचा प्रवास जरा कमी भितिचा झाला. गाडीत बसून चलो सिमला म्हणत किल्ली फिरवली.....

(अपूर्ण)