शांताबाईंचं काही खरं नाही

ते मनाची शांती बिंती प्रकरण जरा गमतीचंच असतं. या शांताबाई फ़ेसबुकपासून वॉटसएप पर्यंत सर्वत्र  सकाळ संध्याकाळ फ़िरत असतात. कोणी असा लय भारी मेसेज पोस्ट केलं की मनात येतं, अगदी डिट्टो आपल्याला जे म्हणायचंय तेच आहे की हे.  पटतं सगळं मात्र वळत काहीच नाही कारण मी अत्यंत आदर्श वागतो/ते समोरचाच चुकतो त्याला काय करणार? असं सगळं असल्यामुळे रोज शांताबाई वॉटसएप्च्या खिडक्यांतून आणि फ़ेसबुकाच्या भिंतींवरून फ़िरून गेल्या तरिही एक लाईकच्या वर परिस्थितीत फ़रक पडत नाही. तसा फ़रक पडत असता तर या पोस्टी करणारी मंडळी आज आपल्याला हिमालयात जाऊन बर्फ़ाच्या दगडावर बसलेली नसती दिसली? किमानपक्षी आपल्या समोर असणार्‍या या महान आत्म्यांच्या मागे ते चमकदार, तेजस्वी का काय  वलय का काय म्हणतात ते दिसलं असतं नां! पण भाऊ इथेच तर सगळा घोळ आहे. हातात सापडली म्हणता म्हणता जाते नां हातातून आणि मग डोक्यातून ही शांती.
कोणीतरी लिहितो की शांतता तुमच्या मनात आहे, जोवर तुम्ही ठरवत नाही तोवर कोणी तुम्हाला दु;खी करू शकत नाही. आता हे लिहायला भारी आणि वाचायला त्याहून भारी आहे. आता जरा प्रॅक्टिलकडे वळूया- काय असतं नां की माझ्यासारख्या सामान्य बापडीचा दिवसच सुरू होतो रोजच्या त्याच त्या कंटाळवाण्या कामांनी.  आता उठल्या उठल्या नळ सोडावा तर पाणी गायब, बरं शांताबाईंना स्मरून पाणी नसणं स्विकारून कामं सुरू होतात. सगळी मंडळी डब्बे घेऊन जिकडची तिकडे होतात, आता जरा चहाचा वाफ़ाळता कप घेऊन पेपर वाचत निवांत सकाळ एंजॉय करावी तर आज कामवाली येणार नसल्याचा निरोप मिळतो. मग चहा घशाखाली ढोसून कामाला स्वत:ला जुंपावं लागतं. आता ही परिस्थिती काही रोज असत नाही पण नेमकं पाणी नसताना, नेमके पाहुणे येऊ घातलेले असताना, नेमकं अंगात कचकच असताना, नेमकं आपल्याला बाहेर जायची घाई असताना नेमकेणानं या गोष्टी घडतात. तर अशावेळेस शांतता बाळगणं म्हणजे कर्मकठीण काम.म्हणूनच सक्काळी वाचलेला तो बी पॉझिटिव्ह इत्यादीचा सुंदर मेसेज काही अशावेळेस आठवतही नाही.
ते कशाला, आपल्या आजूबाजूला डोक्याला शॉट देणारी अनेक मंडळी असतात.  उदाहरणार्थ सतत नकारात्मक बोलणारी मंडळी. यांचं आयुष्य विनाकारण सडकं झालेलं असतं. सोप्या भाषेत सांगायचं तर सुख दुखत असतं. मग यांना आपल्या आजूबाजूला दु:खाचे डोंगर दिसायला लागतात. सतत कुरबुर, सतत तक्रार, ती तक्रार मग मळमळीसारखी ते आपल्यासमोर फ़ेकायला लागतात. आपण शांताबाईंना स्मरून थंड असतो. तरिही एखाद्या क्षणी ही डोक्यात जातातच. फ़ेसबुक असो की आणखी कोणतं माध्यम अशी डोक्यात जाणारी आणि विनाकारण चीड आणणारी मंडळी भरपूर दिसतील.  शांतता ढळविणारी दुसर्‍या गटातली मंडळी म्हणजे  एखाद्या विषयातलं आपल्या काही माहित असो अथवा नसो ही मंडळी सगळ्यावर मत मांडत फ़िरत असतात. त्यांची मतं ऐकूनच चीड यायला लागते. काहीजण तर आपण शांत रहातोच कसे याची परिक्षा घेतल्यासारखे पिळ मारत असतात.
 गंमत बघा हं, आपण अगदी बाळ असतो तेंव्हा वेळीअवेळी कोणत्याही कारणासाठी बेंबीच्या देठापासून सूर लावून घरातल्या आयाबायांची शांतता ढळवून टाकतो. एक शब्दही न बोलता समोरच्याला वात आणण्याचं हे पाळण्यातलं वय किती भारी! तुकडे तुकडे जोडून केलेल्या दुपट्यावर दिवसरात्र पार्श्वभाग वर करून लाथा झाडत, अंगठे चोखत , पाय उडवत रहाण्याखेरीज काहीएक उद्योग नसतो मग सांगा गॅसेस होतील नाहीतर काय? मग काय जरा पोटात लागलं गुडगुडायला की लावला सूर. बरं आपल्याला काय होतंय हे न सांगताच नुसतंच तार स्वरातलं चिरक्या आवाजातलं रडणं आपल्याच नाही तर आजूबाजूंच्यांचाही घरातल्यांची मानसिक शांतता घालवत असतं. दुपट्यावरचे आपण मजेत खेळतोय म्हटल्यावर त्या माऊलीनं जरा एखादं काम करायला जावं की आजूबाजूला कोणी न दिसल्यानं बोअर होतं मग काय? लाव बेंबीपासूनचा ’सा’. हातातलं काम टाकून येते ती माऊली धावत की आपण गोड हसायचं. मग सगळे म्हणतात, ’ए लब्बाड. अं अशं कलायचं अश्तं का? आईला शोलायचंच नाई का’जन्किमदा्त्रीसहित सगळेच कितिही चीडचीड झाली, शांतता ढळली तरी हा त्रास सहन करतात. एकूण लहानपण हे असं इतरांची शांतता खातं. मग जरा मोठं झालं, कॉलेजबिलेजला गेलं की संमिश्र प्रकरण सुरू होतं. आपल्याला वाटतं की आपले आईवडिल आणि एकूण आजुबाजूचे वडिलधारे आपल्याला शांतपणानं जगू देत नाहीत. तर आजुबाजुच्या सगळ्यांना वाटतं कार्टं/कार्टी धड शांतपणानं जगूच देत नाही. मग प्रौढ वगैरे झालं की इतकी कचकच होते की आपल्यालाच ही शांतता सापडत नाही. जरा त्या पलिकडच्या वयात गेलं म्हणजे ज्येष्ठ वगैरे झालो की आपल्या पिढीपेक्षा मागची पिढी संस्कार नसलेली, मोठ्यांना आदर न देणारी, अव्यवहारी इत्यादी असल्याचं जाणवायला लागतं, मग  आपण याबद्दल सतत कुरकुर करून इतरांना शांतता शोधू देत नाही. एकूण शांततेचा आणि आपला सतत पाठशिवणीचा खेळ. नेमकं काय केलं की शांतता नेहमीसाठी मनात मुक्कामाला येईल हे सांगणं कठीण. हे इतकं सगळं सांगायचा उद्देश इतकाच की मानसिक शांततेचं काही खरं नाही.