सिनेमातलं गाव

बरेली की बर्फ़ी,  बद्री की दुल्हनिया, शुभमंगल सावधान, तन्नू वेडस मन्नू, मेरे ब्रदर की दुल्हन, शुध्द देसी रोमान्स या सगळ्या सिनेमात किंवा दिल्ली ६, बेवकुफ़ियां,  वेक अप सिद,  सत्या, मेरी प्यारी सुलू, कहानी  या सगळ्या सिनेमात काही साम्य वाटतंय का तुम्हाला? जरा नीट विचार केला तर लक्षात येईल की, या सगळ्या सिनेमांच्या कथानकातलं शहरही एक "कॅरेक्टर" आहे. महत्वाची भूमिका बजावणारं. त्या त्या शहराच्या लहेजासहित अवतरणारी पात्रं आणि म्हणून पडद्यावर साकारत जाणारं कथानक प्रेक्षक "रिलेट" करायला लागतात. गंमत म्हणजे शहरं त्यांची ओळख दाखवत कथानकात आली ती अगदी अलिकडे. नेमकेपणानं सांगायचं तर नव्वदीच्या दशकानंतर. आत तुम्ही म्हणाल वरच्या उदाहरणातला सत्या तर नव्वदमधलाच आहे. पण अपवाद वगळे तर सिनेमाची गोष्ट ही साधारणपणानं एखाद्या "आटपाट नगरात" घडायची. त्या गावाला, शहराला नाव नसायचं त्याही आधी म्हणजे साधारण सत्तरच्या दशकात तर ठरलेला साचा होता. सिनेमातला "गांव" हा उत्तरभारतीय पेहरावातला असायचा, पात्रांची भाषा उत्तरभारतीय हिंदीशी साधर्म्य दाखवणारी असायची. घागरा चोलीतली नायिका तर हिंदी सिनेमाचं प्रतिक बनली होती. गांव की गोरी म्हणलं की म्हणूनच आजही डोळ्यासमोर येते ती पत्थर के सनम मधली वहिदा, कारवांतली आशा किंवा मधुमतीमधली वैजयंती.
ऐंशीच्या दशकात गांव की गोरी शहरी बनली मात्र तरिही गोष्ट कोणत्या गावार, शहरात घडतेय हे गुलदस्त्यातच राहिलं.  यशचोप्रांचे सिनेमेही एखाद्या ला ला ला लॅण्डमधे घडायचे. (अजूनही त्याच्याच स्कूलमधे तयार झालेल्या करण जोहरचे सिनेमेही असेच अगम्य शहरात घड्त असतात. )  गाण्यातून, कथानकातून कश्मिर, शिमला, स्वित्झरलॅण्ड दिसायच मात्र ते केवळ एखाद्या चित्राची पार्श्वभूमी असावी असं. त्याचा कथानकाशी बरेचदा काही संबंध नसायचा.
नव्वदच्या दशकात तर सगळंच फ़ॅण्टासीलॅण्डमधे घडायला लागलं होतं. मागे एकदा एका मुलाखतीत मसानचा लेखक वरून ग्रोव्हरनं खूप छान सांगितलं होतं, की नव्वदीच्या दशकात बाहेरच्या शहरातून मुंबईत लेखक आले. याआधीही जे होते ते एकतर पार्टीशनच्या काळात आलेले होते, जे डिनायल मोडवरच होते. ज्यांना घडलेल्या घटनाच विसरायच्या होत्या. म्हणून त्यांनी काल्पनिक शहरं उभी केली जिथं बहुतांश सिनेमाची कथानकं घडली. नव्वद सरताना मात्र मुंबईबाहेरचा आणि आपल्या स्थानिक जाणिवा असणारा लेखकवर्ग मोठ्या प्रमाणात मुंबईच्या सिनेमा क्षेत्रात आला आणि येताना आपल्या कथानकांतून तिथली शहरं, तिथलं वातावरण, संस्कृती घेऊन आला. म्हणूनच सुधीर मिश्रा, अनुराग कश्यपचे रांगडे सिनेमे एकदम वेगळे दिसले, विशाल भारद्वाजच्या सिनेमांनी लक्ष वेधून घेतलं. कारण यांच्या कथानकातली गावं ही नावापुरती नव्हती तर ती एक चेहरा घेऊन कथानकांसोबत चालली.
उदाहरणच द्यायचं तर बरेली की बर्फ़ी मधे उत्तर भारतातली घरं, गल्ल्या, तिथले स्थानिक लोक आणि अगदी गाड्यांवर विकले जाणारे पदार्थही सिनेमाच्या रंगात भर घालणारे होते. तर कहानी मधे विद्या बागची कोलकत्त्यात मिशनसाठी येऊन पोहोचते आणि ट्राम पासून मेट्रोपर्यंतचं, दुर्गापूजेसाठी सज्ज असलेलं कोलकता बघताना कथानकाची ऑथेण्टिसिटी वाढवतं.
कथानक नेमकं कुठे घडतंय हे दिसणं फ़ार महत्वाचं आहे. सेटवरच्या बंदिस्तपणापेक्षा जिवंत लोकेशन्सवरचं कथानक जास्ती खुलून येतं. म्हणूनच आजा नच ले मधला नायिकेचा संघर्ष बेगडी वाटतो. कारण असं गावच रिलेट करता येत नाही. माधुरीसारखा हुकमी एक्का असूनही चित्रपट पडण्यामागे जी अनेक कारण आहेत त्यातलं हे एक आहे, कारण संपूर्ण कथानक ज्या गोष्टीभोवती घडतं ते गाव आणि त्यातलं सांस्कृतिक केंद्रच खोटं वाटत रहातं.
तलाशमधली रेडलाईट मुंबई खरी खुरी मुंबई वाटते आणि म्हणूनच तिथल्या मुलिंचं आयुष्यही अंगावर येतं. वेक अप सिद मधे मुंबईत लाईफ़ बन जाएगी असं स्वप्न घेऊन बाहेरचे आणि त्यांच्या नजरेतून दिसणारी मुंबई इतकी सुंदर दिसते की आपल्याच शहराच्या पुन्हा एकदा प्रेमात पडायला होतं.
दिल्ली, मुंबई असो की वाराणसी, बनारस, लखनौ हिंदी सिनेमात ही शहरं, इथल्या  गजबजलेल्या जिवंत गल्ल्या, गर्चीचा भाग असणारे चेहरे, लोकांची बोलायची, जगायची पध्दत सगळं प्रतिबिंबीत होतंय. आठवा तुम्हारी सुलू मधल्या सुलूचं  मुंबईच्या उपनगरातलं अगदी टिपिकल मध्यमवर्गीय घर. छोट्याशा बाल्कनीत झोपाळ्यापासून कुंडितल्या बगिच्यापर्यंतची पूर्ण केलेली हौस. सेफ़्टी डोअरपासून कुकरपर्यंत सगळं कथानकाची पार्श्वभूमी देणारं आणि म्हणूच सुलूचं मध्यमवर्गीयपण ओघात येत जातं आणि पटतंही. एरवी मधल्या काळात एकता कपूरनं मध्यमवर्गियांची संकल्पनाच बदलून टाकली होती.
तर थोडक्यात काय तर आजचा सिनेमा अधिकाधिक लोकांच्या जवळ जाणारा होत चाललाय. एकिकडे यश चोप्रा, करण जोहर सारखे निर्माते ला ला लॅण्डवर वर्चस्व राखून आहेत तर दुसरीकडे वास्तव शहरं मोठ्या प्रमाणात कथानकांतून दिसायला लागली आहेत.

 

5 comments:

Unknown said...

khupach sunder nirikshan, sandarbh pharach surekh, khup avadla ani patla suddha!!

tech ram said...

Super shinu

tech ram said...

HRf

keds said...

मस्त����

keds said...

मस्त👌👌