आई नावाच्या बाईची गोष्ट
आई झाल्यावर बाईला काय काय होतं? तर अनेक गोष्टी पॆकेजडील सारख्या "एक" के साथ मुफ़्त म्हणून मिळतात. या सगळ्या मुफ़्त गोष्टींची ही गंमत.
बघा हं कल्पना करा की तुम्ही एक हिंदी सिनेमा बघताय. एक कशाला? आपण जोधा अकबरच बघुया नां. यात शहेनशाह ची एंट्री झाल्यावर काय होतं? म्हणजे पडद्यावर तो आला रे आला की मागे ढॆंटे ढॆंटे असं म्युझिक वाजतं. पण समजा असलं काही म्युझिक बिझिक न वाजता सरळ शांतपणानं तो आला तर? किंवा फ़ॊर दॆट मॆटर हिंदी सिनेमातून पार्श्वसंगीत नावाची गोष्ट गायब झाली तर? मग काय मजा? नाही का? बुटांचा ठाक ठाक आवाज न येता गब्बरसिंग आला तर तो गब्बर कसा वाटेल? पहाडीवर फ़िरायला आलेला टुरीस्ट नाही का वाटणार? तर या सगळ्याचा आणि आई होण्याचा संबंध काय? तर हिंदी सिनेमा बॆकग्राऊंड म्युझिकशिवाय अधुरा आहे आणि आई नावाची बाई "आई गं<<" या बॆकग्राऊंडशिवाय अधुरी आहे. आई झाल्यावर आणि मूल बोलायला लागल्यावर सतत कानात "आई" "आई<<" "आ<<ई<<" अशा विविध पट्ट्यातला जप घुमायला लागतो. सुरवातिला कौतुकानं बाळाच्या प्रत्येक "आई"ला लाडीक हो म्हणणारी आई नंतर नंतर बाळाचा "बाळ्या" होईपर्यंत प्रतिक्शिप्त क्रियेसारखी "ओ" म्हणायला लागते. नंतर म्हणजे बाळ्या किंवा बाळी सहा सात वर्षांची होईपर्यंत आई या जपाला इतकी "इम्युन" होऊन जाते की जवळपास आतून कान बंद करून घेण्याच्या दैवी चमत्कारापर्यंत पोहोचते. बालमानसशास्त्र सांगतं की मुलांच्या सगळ्या गोष्टी दरवेळेस मन लावून ऐका आणि त्याकडे खरोखरच लक्श द्या. इथे एक छोटासा प्रॊब्लेम हा आहे की, नेमका कुरीयरवाला आलेला असतो आणि कमोडवर इतकावेळ "शी होत नाहीए गं आई ऊठू कां" चा धोशा लावलेला बाळ्या/बाळी हाकांवर हाका मारायला लागतात. एक कुरीयर घेऊन त्याच्याकडच्या चिटोर्यावर सही "मारून" ते घेऊन हातभर अंतरावरच्या ड्रॊव्हरमध्ये ठेवून दार बंद करायला जितकी मिनिटं लागतात त्या तेव्हढ्या मिनिटांमध्ये "आई" "आई" असं सहस्त्रनाम परायण झालेलं असतं. आई नावाची बाई ते पाकिट ड्रॊव्हरमध्ये कोंबून धावत आत जाते तर बाळ्या/बाळी तिला अत्यानंदानं सांगतो,"मला होतेय शी, पण तू इथे थांब" (ते जे कोंबलेलं पाकिट असतं ना ते या आई नावाच्या बाईला रात्री आठ वाजता जाम मनस्ताप देतं. म्हणजे या बाईचा नवरा घरी आला की तो ड्रॊव्हर उघडतो ते पाकिट बघतो आणि बाईला म्हणतो ही पाकिट ठेवायची काय पध्दत झाली? यानंतर बाईचा फ़्युज उडतो आणि तो कसा उडतो हे विस्तारानं सांगायची गरज नाही)
महिन्याचं सामान भरायला बाई नावाची सवत्स धेनु जाते. आत गेल्याबरोबर सोबतची खोंड उधळतात. ही बिचारी हातातल्या यादीत बघत बघत सामान भराभर भरत असते आणि तिची खोंड ’आई’ "आई" करत दिसेल त्या गोष्टीचा हट्ट करायला लागतात. "आई बार्बी घेऊ"?,"आई माझी नोट बुक संपत आलीय घेऊ"?, "आई बेल्ट घेऊ"?,"आई योगर्ट घेऊ"?"आई ज्युस घेऊ"? असा दिसेल त्या गोष्टीचा हट्ट करायला लागतात. त्यावेळेस आई काय करत असते? तर मागून भुणभुण, पिरपिर, चिरचिर करणार्या पोरट्याकडे फ़ारसं लक्श न देता आणि समोरच्या रॆकवरचं लक्श जराही विचलित होऊ न देता पोरांना तंब्या देत असते. "कशाला हविय बार्बी? घरात ढिगानं आहेत ना? आधी त्या व्यवस्थित ठेवायला शिक", "नोट अजुन संपलेली नाहीए नां, ती आधी संपू दे मग बघू","योगर्ट नको. परवा खोकला झाला होता माहितिये नां". कधी धाकानं, कधी लाडानं आणि कधी समजवून ती पोरांना या मायापाशातून बाहेर काढते. विशेष म्हणजे या सगळ्याची रिपिट टेलिकास्ट दरच महिन्याला होतात. आई नावाच्या बाईची केव्हढी ही सहनशिलता. हेच चुकून बाबा नावाच्या माणसासोबत या खोंडांना नुसतं साधं दही आणायला पाठवलं तरी सोबतिला एक दोन बाहुल्या, मोटारी, पुस्तकं, कुकिज, केक असलं काय काय घरी येईल याचा नेम नसतो.असो. या विषयावर सविस्तर नंतर कधीतरी.
तर घरी, दारी, जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी आईच्या कानात "आई" सतत घुमत रहातं. आई झाल्यावरच्या पॆकेजमध्ये हा सततच्या हाकांचा कधी हवा हवासा तर कधी जीव नको करणारा साऊंड ट्रॆक मोफ़त मिळतो.
आई नावाच्या बाईचा "व्हायवा"
मूल बोलेपर्यंत त्याच्या तोंडातले शब्द ऐकण्यासाठी आई अगदी आतुर होते. सुरवातिचे बोबलकांद्याचे दिवसही मौजेचे असतात नंतर सुरू होते आई नावाच्या बाईची आयुष्यभराची "व्हायवा" दगड मातीपासून अगदी कोणत्याही विषयातल्या प्रश्नांना उत्तर देणंयाची तिची तयारी अवासिच लागते. हा प्रकार कंपलसरी या प्रकारात आहे. म्हणजे तुम्हाला एखाद्या गोष्टीतली माहिती असो अथवा नसो उत्तरं द्याविच लागतात. त्यात सामाजिक, कौटुंबिक, साहित्यिक, भौगोलिक, रासायनिक, ऐतिहासिक अशा जगातल्या नव्हे या भुतलावरच्या यच्चयावत विषयांचा समावेश असतो.(आता समजलं का आईला, "आई माझा गुरू" का म्हणतात?) उदाहरणादाखल हे प्रश्न पहा,
-प्रुथ्विच्या आत काय असतं?
-ढगांच्या पलिकडे काय असतं?
-चिमणी पोळ्या कशा लाटते?
-सायकलचं चाक पंक्चर का होतं? आणि ते पंक्चर काढतात म्हणजे काय करतात?
-माणसं का मरतात?
-मेल्यावर माणसं कुठे जातात?
-तू कधी म्हातारी होणार नाहीस ना?
-आपल्या फ़ॆमिलतले सगळे म्हातारे झाल्यावर मरणार का?
हे तर सहज आठवले तसे सांगितलेले प्रश्न आहेत. असे अनेक प्रश्न कोणत्याही वेळेस दाणकन येतात आणि त्यांची संभाव्य धोक्यांची शक्यता लक्शात घेऊन उत्तरं द्यावी लागतात. म्हणजे कोणाचं तरी ऒपरेशन झाल्यावर जर "ऒपरेशन म्हणजे काय"? असा प्रश्न विचारला तर आपल्या घरात हाती असणार्या साहित्यानिशी असलं ऒपरेशन होणार नाही याची काळजी घेऊन नेमकीच माहिती द्यावी लागते. याशिवाय अनेक भयानक सेन्सॊर्ड प्रश्नांना बाळबोध उत्तरं देताना जी काय तारांबळ उडते ती फ़क्त आईलाच ठाऊक. बरं दटावून गप्प करावं तर आजकालच्या पोरट्यांचं तसं नाही नाही म्हटलं, टाळलं की जास्त चिकित्सा. त्यामुळे करता काय द्या उत्तरं द्या. आई व्हायची हौस होती फ़ार. बसा आता आयुष्यभरच्या तोंडी परिक्षेला. एका वाक्यात, सविस्तर, सुदाहरण सगळ्या प्रकारच्या प्रश्नातून जावं तेंव्हा आई माझा गुरू वचन घडतं. बाबा नावाचा माणूस मात्र या परिक्षेतून कायम एटीकेटी घेऊन पसार होतो. एकतर पोरं त्यांना फ़ार प्रश्न बिश्न विचारायच्या भानगडीत पडत नाहीत. त्यातून विचारलेच एकदोन प्रश्न तर उत्तर नीट मिळेल याची गॆरंटी बाप नावाच्या प्रोडक्टवर मिळत नसल्यानं पोरं तसली रिस्कच घेत नसावीत. दुसरा मुद्दा असा की मुलांना कोणत्या प्रश्नाचं उत्तर काय द्यायला हवं याचा प्रत्येक आईचा एक "युनिक" नियम असतो. गंमत म्हणजे बाबकडून तसं उत्तर दिलं जाईल याची गॆरंटी जगातल्या जवळपास सगळ्याच आयांना नसावी मग चुकिचं द्न्यान देण्यापेक्षा (आईच्यामते चुकिचं हं) नकोच ते असा साधारण पवित्रा. त्यामुळे घरात चित्र काय? तर आई माझा गुरू आणि पोरं-बाप उनाडलेले बॆंकबेंचर्स. बघा या सगळ्यांना चुचकारत फ़टकारत हाकणं म्हणजे कठीण आहे की नाही? तर आई नावाच्या बाईला पोरं झाली की साक्षात "जी के" बुक होण्याची संधी मिळते.
सध्यापुरतं थांबते. बाकिचं नंतर.
(citra sou.-greywolf)
गुगलणारी माणसं
अडकलेली पिन
मागे एकदा घर आवरायला काढलं होत तर तोंडात सतत "जिवलगा राहिले रे दूर घर माझे, पाऊल थकले, माथ्यावरचे जड झाले ओझे"च येत होतं. साधारण तासभर या दोनच ओळींच रिबिट कानाला बसल्यावर आमच्या "वैनीसाहेब" वैतागल्या आणि म्हणाल्या,"फ़ारच जड झालं असेल तर ठेव ते बोचकं बाजुला आणि आता माझे बये एकतर अख्खं गाणं म्हण नाहीतर गाण्याची सीडी तरी बदल". मला बिचारीला माहितच नव्हतं की मी फ़क्त एक तास दोनच ओळी म्हणत होते. 😜बरं, गाणं म्हणण्याची एखाद्या माणसाला हौस असावी म्हणजे किती? आवडली चाल की म्हण गाणं . असा सपाटा असल्यानं मी अजाणता अनेक तरल गाण्यांच्याही कत्तली केल्या आहेत. हे अर्थात कोणीतरी सांगितल्यावरच समजलं म्हणा. १९४२ मधलं रिमझिम रूमझुम गाणं त्यावेळेस नुकतंच कानावर पडायला सुरवात झालेली होती. आता साधारण त्यावेळेपर्यंत पावसातलं नवं गाणं म्हणजे "फ़डकतं" असा समज पक्का झालेला होता. मग शब्दही तसेच ढींगचॅक असायचे. आता आम्हाला हे गाणं म्हणायची हौस फ़ुटली म्हटल्यावर शब्दांची वाट लागणार हे ओघानं आलंच. मी बजता है जलतरंग टीन के छ्त पे....च्या ऐवजी अक्षरश: जलता है ये बदन वगैरे सारखे भयानक शब्द पेरून वाट लावली गाण्याची. तरी बरं दोनच वेळा मी म्हटलं आणि सख्ख्या मैत्रिणीच्या ते ताबडतोब लक्षात येऊन तिनं मला सावरलं.
एकदा तर भर दुपारी ऑफ़िसमध्ये सगळेजण आपापल्या कामात गुंग असताना मला जोरात "कुण्या गावाचं आलं पाखरू" म्हणायच्या कळा यायला लागल्या होत्या. मग मनातल्या मनात वरच्या पट्टीतला सूर लावून मनातल्या मनात गाणं म्हटलं, तरी हातांनी आणि मानेनं दगा दिलाच. टेबलवर बोटांनी ठेका धरला आणि मान तालात हलायला लागल्यावर आजुबाजुच्यांनी "बरंय नां सगळा?" असा लूक दिला, हे सांगणे न लगे. या सगळ्यातून जर काही चांगलं झालंच असेल तर ते म्हणजे माझे सूर पक्के वगैरे झालेत.
तर हे सगळं आठवायचं तत्कालिन कारण म्हणजे मागच्या रविवारी दिवसभर "मन शुध्द तुझं....तू चाल पुढं तुला गड्या भिती कुनाची, पर्वा भी कुनाची" वर पिन अडकली होती. आता रविवारी दिवसभर हे गाणं किंवा या दोनच ओळी कोणी म्हणायला लागलं तर काय होईल? (घाबरु नका, गडावर तशी शांतता आहे😛) तर जरा बारिक सीन झाला आणि नवरा वैतागला. त्यानं कट्टी केली. कसंबसं मान्य केलं की, होय बाबा तू बरोबर मी चूक. आता परत एकच गाणं दिवसभरात अज्जिबात गुणगुणायचं नाही असा पणही केला. पण हे केल्याला अवघे अठ्ठेचाळीस तास उलटले नाहीत तर आज मन तळ्यात मळ्यात करत दिवसभर अडकून राहिलंय. देवा... माझं काहीच बरं होणार नाहीए का?
एक पावसाळी दिवस
एक पावसाळी दिवस, असा गारठलेला
लाडावलेल्या मुलासारखा रजईत गुरफ़टलेला
एक पावसाळी दिवस, असा गारठलेला
गोड गुलाबी उबेत रेंगाळलेला
एक पावसाळी दिवस असा गारठलेला
मऊ मऊ भातावरच्या वाफ़ा पहात पोटात शिरलेला
एक पावसाळी दिवस, अस्सा गारठलेला
कुरकुरणार्या सांध्यांना थरथर हातांनी बाम चोळणारा
होश्शियार...दात पडणार आहे!
"आई तुझ्याच ठायी"....अप्रतिम!
निवारा
कोसळणारा पाऊस, सुसाटलेला वारा
जीर्ण झाडाच्या ढोलीत पाखरांचा निवारा
झाड आता थकलंय
पानांविना उसासत
टिपं गाळत बसलंय
करकरणार्या फ़ांद्यांना, उसवलेल्या मुळांना
चुचकारत सांगतंय,
"बाबांनो, इतके पावसाळे साथ दिलीत भक्कम
आता कच खाऊ नका, इवलुशा या पिलांना उघडं पाडू नका"
आठवणितला गुलाबजाम
त्यावेळेस मी कॊलेजमध्ये जात होते. एका दसर्याला मी आणि भैय्यानं ठरवलं की गुलाबजाम करायचे. साधारण क्रुती (अरे यार, कोणीतरी मला हा प्रॊपर क्रु बरहात कसा टाईपायचा सांगा रे. दरवेळेस क्रुती लिहिताना क्रुर मधला क्रु होतो.) तर गुलाबजाम बनविण्याची साधारण क्रुती माहित होतीच. त्यानुसार सामानसुमान जमवून तयारीला लागलो. खव्याचे गोळे बिळे बनवून मस्त खरपूस तळून बिळून घेतले. साखरेचा पाक बिक बनवला आणि सगळं मुरायला ठेवलं. जेवायला बसल्यावर समजलं की गुलाबजाम ज्यात होते त्या पातेल्याचं आणि त्यात "रूतून" बसलेल्या डावाचं भलंतच प्रकरण जमलंय. अगदी दो जिस्म मगर एक जान है हम टाईप मामला झाला. पाकापासून डाव जुदा व्हायलाच तयार नव्हता. कसंबसं त्यांना एकमेकांपासून दूर केलं. जमेल तसे आणि जसे जमले होते तसे पुरीसोबत गुलाबजाम खाल्ले. जेवण बिवण झाल्यावर दादांनी पाकातले गुलाबजाम काडून वेगळ्या ताटलीत ठेवले साधारण दुसर्या दिवशी त्याची गुलाबजाम कॆंडी टाईप काहीतरी बनलं होतं. तेही आम्ही अर्थातच फ़स्त केले. शेवटचा गुलाबजाम खाताना दादा म्हणाले पुढच्यावेळेस पाक आणखी जरा जास्त "पुढे ने" म्हणजे गुलाबजाम कुरकुरीत तर होतीलच शिवाय खलबत्त्यानं फ़ोडून चूर्ण करून खाण्याचा आणखी एक ऒप्शन ओपन राहिल. पुढे नेटानं मी गुलाबजाम करतच राहिले आणि आज खाणार्यानं पुन्हा घ्यावेत इतपत भारी गुलाबजाम मला बनवायला येतात.
भुताटकी??????
आम्हा सगळ्यांनाच कोकणाचं भयंकर आकर्षण आहे. ब्रेक हवाय, बोअर झालंय म्हटलं की फ़्रेश व्हायला कोकणासारखं दुसरं ठिकाण नाही. तर असेच एकदा भटकायला म्हणून सहकुटुंब आंबोलिला गेलो होतो. रात्री मुक्काम करायचा आणि सकाळी लवकर निघायलं असं ठरलेलं असल्यानं रात्रीपुरती पथारी पसरायला हॊटेल शोधत होतो. एका बर्या अशा हॊटेलमध्ये एकच भलीमोठी खोली घेऊन राहिलो. गप्पांत रात्र घालवायची असल्यानं एका रात्रीसाठी कशाला दोन दोन खोल्या? असा इकॊनॊमी विचार करून त्या भल्या मोठ्या खोलित बॆगा भिरकावून पोरांना झोपवून आम्ही पाय पसरून मस्त गप्पा मारत बसलो. सकाळ झाल्यावर सगळं आवरून पटपट निघायच्या बेतात होतो. बंधुराज त्यांच्या युवराजांसमवेत प्रात:कालच्या भटकंतीला गेलेले होते. लेक स्वत:चे केस पिंजारून तिच्या बाहुलिचं आवरण्यात गुंग झालेली होती. बाकिचे आम्ही एका रात्रीतही सवयीनं भारंभार पसारा करून ठेवला होता तो एकमेकांवर डाफ़रत आवरत होतो, दादा खोलितच मॊर्निंग वॊक [:)]करत आम्हा मुलांना अजिबात शिस्त कशी नाही हे पुन्हा एकवार पटवून देत होते. हे सगळं कमी म्हणून टिव्हीवर काहीतरी ब्ला ब्ला चालुच होतं. काहीही मदत न करण्याचा निश्चय केलेला नवरा बेडवर पसरला होता, तो मध्येच म्हणाला,"काय गरम होतंय? कोण आहे रे तिकडे? महारांसाठी जरा फ़ॆन चालू करा" त्याच्या बोलण्यावर आम्ही अजून हसावं की चिडावं हे ठरवतोय तोवर खरोखरचं चांगला मोठ्ठा "खट्ट" आवाज होऊन खोलितला छताला टांगलेला पंखा आपोआपा सुरू झाला. पंखा कोणी सुरू केला याचा उलगडा होईना. कारण सगळी बटणं दाराजवळ होती आणि तिथे त्यावेळेस कोणिच नव्हतं. मग फ़ॆन चालू कोणी केला? सगळे तर्क करोन झाले पण उत्तर मिळालं नाही. सगळ्यांना संशयाच्या दायर्यात घेऊन झालं पण सगळे मासूम साबित झाले. मध्येच कोणितरी म्हणालं की, "कोकणात भुतं असतात". त्यावरून चर्चा रंगली आणि मंडळी गाडीत सामान सुमान टाकायला रवाना झाली. मात्र पंखा चालू कोणी केला हा माझ्या आणि राणिच्या डोक्यातला किडा काही जाईना. सगळे खाली गेल्यावर आम्ही चक्क बेड पुढे ओढून मागे बटनं आहेत का हे तपासलं (न जाणो बेडवर पसरलेल्या नवर्यानच आमची थट्ट करायची म्हणून हळूच बटन दाबलं असेल) पण सगळी भिंत स्वच्छ होती. दाराजवळची बटनं सोडली तर खोलित कसलंच बटण नव्हतं. नंतर राणिला आठवलं की रात्री माडीवर दोन खोल्या आहेत असं मॆनेजरनं सांगितलं होतं त्यावेळेस आम्हाला मागची खोली हवी होती तर यानं आग्रहानं पुढचीच खोली देऊ केली होती. त्यावेळेस त्याच्या या वागण्याचं काही वाटलं नव्हतं मात्र आता त्याचाही संशय यायला लागला. आमचं हे सगळं बोलणं चालू होतं आणि त्याचवेळेस सगळ्या खोलिची तपाणी करणंही चालू होतं. त्याचवेळेस एक रूमबॊय खोलीत आला, त्याला आम्ही पलिकडची खोली बंद का आहे याबाबत फ़िरवून फ़िरवून प्रश्न विचारले पहिल्यांदा त्यानं उत्तरं दिली नंतर तो (बहुदा आमच्याकडे संशयानं बघत) चक्क निघून गेला. गाडीत जाऊन बसल्यावर "इतका वेळ काय करत होता?" या प्रश्नावर आम्ही खरोखरच काय करत होतो हे सांगितलं. त्यावर "या बायका म्हणजे...." असं काहीतरी बोलून सगळे आमची टर उड्वायला लागले. पण खरंच सांगते "कोणितरी पंखा लावा रे" असं म्हटल्याबरोबर नेमका पंखा कसा सुरू झाला याचं गुढ आजही उकलेलं नाही.
टु इज कंपनी
आपल्या आईबाबांच्यावेळेस प्रत्येक जोडप्याला सरासरी तीन मुलं असायचीच. गेला बाजार दोन मुलं तरी असायचीच, फ़ारच क्वचित एकच अपत्य असायचं. आता आपल्या पिढीत एकच मूल असण्याकडे कल वाढतोय. दुसरं मूल अजिबातच नको असणार्यांची संख्या बक्कळ आहे. मला स्वत:ला "एकाला एक" असणारा चौकोन जास्त आवडतो. मागे एकदा एकदा मिपावर यावर मस्त चर्चा झालेली होती. माझ्या ग्रुपमध्येही बरेचजण असे एकुलते एक होते. मात्र आम्ही आमच्या भावंडासोबत जे "शेअर" करायचो ते सगळं अशी एकुलती एक असणारी "मिस" करायची. दंगाधुडगुस आणि धिंगाणा घालायला आम्हाला "कंपनी" शोधावी लागायची नाही. मित्र मैत्रिणी आले गेले मात्र आम्ही भावंडं आजही एकमेकाचे कट्टर शत्रु आणि घट्ट मित्र आहोत. शत्रुत्व शब्दाशी ठेचकाळला नां? पण खरंच आहे लहानपणापासूनची "सिबलिंग रायव्हलरी" आजही अगदी इनटॆक्ट आहे. आम्हाला पोरं झाली तरी अजुनही आम्ही तू घरात जास्त लाडका होतास किंवा होतीस म्हणून चक्क ब्लेमगेम करत असतो. आपापल्या संसारातले आनंद आणि कटकटीही शेअर करायला एक भावंड लागतंच. म्हणून आजही नवरात्र संपतंय न संपतंय तोवरच सांगलीला जायचे वेध लागतात. दसरयाच्या शुभेच्छा देतानाच दिवाळीचं काय ठरलं हा प्रश्न असतोच. मीच काय दरवर्षी तिकडे यायचं आता यंदा तुम्ही सगळे इकडे या म्हणून तणतणताना न कळत तिकडे काय काय घेऊन जायचं याची यादीही मनात तयार होत असते. बॆगेतून नक्की काय निघाल्यावर मनुसाहेब खुश होतील आणि "आत्तीट" म्हणून अत्यानंदानं लाडात येतील याचे विचार सुरू होतात.
आपल्या आईवडिलांनी आपल्याला भावंड आणताना ाअपल्यानंतर एकमेकाला आधार होतील असा विचार करून कुटुंब विस्तारलं. आता आपल्या पिढीत मात्र हा विचारच लुप्त झालाय.
मागे एकदा एका सिनियर कलिगनं मुलं नसण्याचं किंवा होऊ न देण्याचं कारण सांगितलं होतं की, "आम्ही दोघंही कामानिमित्त सतत घराबाहेर असतो, आईवडिल कायमचे येऊन रहायला तयार नाहीत मग मूल कुठेतरी पाळणाघरवाल्यांवर सोपविण्यापेक्शा नसलेलंच बरं, कशाला ऊगाच पोरवड्यात अडकायचं" तिचं हे मत मला जोर का धक्का देणारंच होतं. आपल्या इच्छेनं मूल नको असणारं हे माझ्या पहाण्यातलं पहिलंच जोडपं होतं. त्यानंतर अर्थात असे बरेच "व्यस्त" लोक भेटले. मुलांना द्यायला वेळ नाही म्हणून, दोन मुलं वाढविण्यासाठी जितकी लागते तेव्हढी मानसिक तयारी नाही, त्या अनुषंगानं कराव्या लागणारया तडजोडी करण्याची तयारी नाही किंवा एकाच मूलावर बक्कळ पैसा खर्चून त्यालाच मोठ्ठ बनविण्याचा विचार करणारे आपण थोडेसे याबाबतीत स्वार्थी झालोत का? मुळात आजच्या मुलांना भावंडाची गरज आहे का? तुम्हाला काय वाटतं?
कसलं भारी!!!
Image by Brandon Christopher Warren via Flickr
शुक्रवार म्हणजे लेकीच्या दप्तरातून घरी करण्यासाठी वर्कशिट येण्याचा दिवस. या शु्क्रर्वारी मशरूमचं चित्र होतं आणि नेहमीप्रमाणे ते रंगवून बिंगवून त्यासंदर्भातली पाच वाक्य लिहायची होती. कसंतरी करून तिच्या वयाला समजतील आणि पचतील इतपत चार वाक्यं सांगितली एक राहिलं होतं म्हणून म्हटलं की लिही, मला हे खायला खूप आवडतं. खल्लास! आमच्या अभ्यासाला ब्रेकच लागला. कन्यारत्न म्हणालं की,"मला मशरूम आवडत नाही मग मी असं कसं लिहिणार"? म्हटलं, "अगं लिहायचं असतं नुसतं." यावर क.र.-"असं कसं लिहिणार? मी कधी खाल्लेलच नाही तर ते आवडतं असं कसं लिहिणार आणि खोटं बोलायचं नाही असं मिस नेहमी सांगते, मी मिसला चीट नाही करू शकत"?(होय हो माझी लेक चक्क "शकत बिकत" असलं तुफ़ानी मराठी बोलते. म्हणजे मी खेळायला जाऊ? असला साधा सुधा प्रश्न ती "मी खेळायला जाऊ शकते का"? असा विचारते). मी-"मिसना काय माहित तू मशरूम खातेस की नाही? लिही पटपट आता", क.र.-"मिसला नाही पण मला माहित आहे नां" (मी शेंगा खाल्ल्या नाहीत मी टरफ़लं उचलणार नाही असाच बाणा अगदी) "मग तुला काय लिहायचं ते लिही" माझी शरणागती. कुठून मेल्या या मशरूमचा शोध लावला असं झालं.
पोरांच्या मेंदूत काय पाखरं भिरभिरत असतात काही सांगता येत नाही. मागे एकदा ओठांचा चंबू करून मन लावून चित्र रंगवत होती "काय गं काय रंगवतेयस" विचारल्यावर म्हणाली,"ऎप्पल" हातात खडू हिरव्या रंगाचा दिसत होता म्हणून विचारलं,"ऎप्पल रंगवतेयस मग हातात ग्रीन कलर कसा?" तर आता या आईचं करू काय अशा नजरेनं बघत तिनं शांतपणानं सांगितलं,"ऎप्पल अजून कच्चं आहे नां" म्हटलं बरोबर आहे माझे आई कच्च्या सफ़रचंदाचं चित्र काढू नये असा काही नियम नाही.
रोज झोपताना गोष्टिंचा रतीब घालाव तेंव्हा कुठी या बाईसाहेब डोळे मिटणार. रोज रोज गोष्टी सांगून सांगून कंटाळा आला एक दिवस लायब्ररीत चांदोबा दिसला आणि अगदी हौसेनं आणला. चला आता आठवडाभर तरी निश्चिंती असा विचार करून रात्री झोपताना त्यातली कोणती गोष्ट सांगू असं विचारलं, रंगीत चित्रं बित्रं बघून चिमणी भारीच खुष झालेली होती. पानं उलटवून बघून झाल्यावर त्यातली विक्रम वेताळाची गोष्ट सांगण्याची फ़र्माईश झाली. म्हटलं बघ हं भुताची गोष्ट रात्री झोपताना ऐकशिल आणि मग स्वप्न तसलंच पडेल. पण तिच गोष्ट ऐकायची तिची इच्छा बघून मी ती वाचायला सुरवात केली. एकच पान झालं असेल नसेल तर हिनं "आई ही नक्को दुसरी सांग" म्हणून भुणभुण सुरू केली. वाटलं घाबरली बिबरली की काय? म्हणून दुसरी एक गोष्ट वाचायला सुरवात केली. दोन मिनिटानं ही गोष्टही नको म्हणून पिरपिर चालू. आता मात्र वैतागच आला. म्हटलं ही नको ती, काय चाललंय काय? तर एव्हढुसं तोंड करून म्हणाली की,"आई हे मराठी मला समजतच नाहीय" मला ही गोष्ट "आपल्या मराठीत सांग" अक्शरश: मराठीतली गोष्ट मराठीतच भाषांतरीत करायची वेळ आली. तिचंही खरंच आहे म्हणा. आपणच म्हणजे माझ्या पिढीतले जवळपास सगळेच पालक शुध्द मराठी न बोलता त्यात हिंदी इंग्रजी शब्दांचा मुक्त वापर करतात. त्यात आता ही पोरं शाळेत इंग्रजी, मित्र मैत्रिणीत हिंदी आणि घरात मराठी बोलत असल्यानं सगळीच सरमिसळ. तेंव्हापासून मराठी पुस्तकं मराठीतच वाचायची आणि कठीण शब्द तिला समजणार्या भाषेत सांगायचे आम्ही ठरवलं आहे. त्यानिमित्तानं निदान मराठी शब्द कानावरून तरी जातील.
भाषेवरून आणखी एक गंमत आठवली. सोसायटीतली तमाम पटेल, अरोरा, अय्यर, शर्मा बच्चेमंडळी त्यांना मराठीत निबंध लिहून आणायचा झाला की आमच्या घराची बेल वाजवतातच आणि "आंटी प्लिज हेल्प करो नां" अशी गळ घालतात. मी एक नियम केलाय की मी सांगायचं आणि त्यांनी लिहायचं शिवाय झाल्यावर वाचून दाखवायचं.
रविवारी तीन विषय घेऊन ही भुतावळ आली. १- आजच्या जमान्यातलं स्त्रीचं स्थान,२-माझे आवडते प्रेक्शणिय स्थळ,३-अपंग व्यक्त आणि "मी"यातलं संभाषण. निबंध क्र.१ ची सुरवात "न स्त्री स्वातंत्र्य मर्हती"नं लफ़्फ़ेदार केली. पण वाचताना अरोरा कन्येची भलतीच तारांबळ उडाली. पुन्हा "च" चा उचार आपण दोन पध्दतीनी करतो तर हे एकाच. जे "च"च तेच "ज"चं. "ळ"ची भानगड तर विचारायलाच नको. पंजाबी उच्चारातनं आजच्या स्त्रीचं मराठीतून स्थान ऐकताना गंमतच वाटत होती. विषय क्र २- लिहिताना दक्शिणी कन्येनं पहिल्याच वाक्याला बल्ल्या घोळ घातला, माझे आवडते प्रेक्शणिय स्थळच्या ऐवजी, माझे प्रेक्शणिय स्थळ असं लिहून तिनं भलतंच मनोरंजन केलं. बरं पुन्हा यांच्या शाळेत काय म्हणे हे लिहून आणलेलं भर वर्गसमोर वाचूनही दाखवायचं असतं म्हणून लिहून काम भागत नाही तर "प्युअर मराठीत" लिहिलेलं कसं वाचायचं हेही शिकवावं लागतं. मला मजाच येते हा भाग वेगळा पण यांच्या मास्तरीणबाईंचीही हे सगळे निबंध ऐकताना जाम करमणूक होत असणार नाही?
एक विशेष सूचना- १-लेखाला ड्कवलेल्या फ़ोटोचा संबंध लेखाशी असेलच असं नाही.
२-हे आपलं उगाचच सगळे म्हणतात की लेखासोबत फ़ोटू बिटू असला की जरा बरं वाटतं म्हणून.
३-"भुंग्या"नं त्याच्या ब्लोगवर झिमट्याची युक्ती सांगितलेली होती, म्हटलं चला यानिमित्तानं वापरून पाहू. तेंव्हा इथून पुढच्या लेखात विषयाशी फ़टकून असणारे फ़ोटे असतील तर बिचकू नका.
केकच्या.......ची टांग
मी काही अगदीच वाईट्ट सुगरण नाही (वाईट आणि सुगरण? वाक्यरचना फ़ारच वाईट झाली नाही! भावना महत्वाच्या त्या पोहोचल्या की झालं) हं तर मी काही अगदीच वाईट स्वयंपाक बनवत नाही. मुळात मला स्वयंपाकाची म्हणजे रोजच्या पोळी भाजीची नाही तर वेगवेगळे पदार्थ बनवण्याची दांडगी हौस आहे. या हौसेपायी मी झाडून सगळ्या चॆनेलवरचे आणि कोणत्याही भाषेतले रेसपी शो बघते. परवा काय झालं, झी बंगलीवर एक रेसपी बघत होते, नवरा काहीतरी सांगत होता त्याला म्हटलं एक मिनिट थांब रे ऐकू दे जरा तर तो चाटच पडला. मी बंगाली रेसपी शो "ऐकत" होते यावर त्याचा विश्वास बसला नाही की आता ही मराठी पोरगी बंगाली भाषेतला रेसपी शो बघून त्याच्या मराठी तोंडात कोणता पदार्थ घुसडेल याची त्याला धास्ती वाटली? कोण जाणे? असो. तर मुद्दा हा आहे की मला हे असं काही बाही (नवर्याच्याभाषेत सांगायचं तर "काहिच्या बाही")करून बघायला आवडतं. मागच्या एका लेखात मी सांगितलं होतंच त्याप्रमाणे सगळया पदार्थाना मी काबुत ठेवू शकते पण माझ्या पाककौशल्याच्या कुंडलीतल्या राहू केतू असणार्या ढोकळा आणि केक या दोन पदार्थांवर माझं काहीही कौशल्य चालत नाही. अनेकदा भिष्मप्रतिद्न्या करूनही हळूच हे पदार्थ करून बघण्याचा मोह टाळताही येत नाही हा आणखी एक वांधा.
बरेच दिवस झाले केकची उचकी लागली नव्हतीच. त्या दिवशी नेमकं काय झालं की सहजच बोलताना केकचा विषय निघाला. जाम उत्साही अ नं तिच्या नवर्याच्या वाढदिवसाला स्वत: केक करून वरून तो डेकोरेट वगैरे करून पेश केला होता. (हाऊ रोमॆंटिक). तर केक बनविण्याचा हा रोमॆंटिक कीडा सगळ्यांनाच चावला. एकेकीचा "घडणारा" केक बघून (उगाचच) आत्मविश्वास (फ़ाजिल) आला की, यावेळेस बहुदा आपल्यालाही केक जमेल. इस्टंट केक बनविण्याचं मिश्रण आणल्यामुळे तर आत्मविश्वासाचा पतंग जास्तच फ़डफ़डत होता. एरवी मी केक बिक बनवायचा असेल तर दुपारच्यावेळेस गुपचुप बनवून बघते. म्हणजे समजा बिघडला (समजायचं काय? तो बिघडतोच)तर त्याची वाट लावणं सोपं जातं शिवाय मी केक केला होता हे या कानाचं त्या कानाला समजत नाही. यावेळेस मला काहीच करायचं नव्हतं, केक मिश्रण बनविणार्या कंपनिनं तो सगळा व्याप आधीच करून ठेवलेला असल्यानं मला फ़क्त मिश्रण फ़ेसून मायक्रोमध्ये ठेवायचं होतं. त्यामुळे पहिल्यांदाच मी साक्शात केक बनविणार असल्याची जाहिरात करून ठेवली. यावेळेस केक बनविण्याची वेळ संध्याकाळची ठेवली, ऒफ़िसमधून थकून आलेल्या नवर्याला जरा खुश करावं हा हेतू. सगळं सामान व्यवस्थित जमवून पाकिटावर दिलेल्याप्रमाणे क्रुती केली. सोबत धीर देण्यासाठी आणि चियरअप करण्यासाठी मैत्रिणींची फ़ौज होतीच. सगळं केलं आणि केक मायक्रोमधे ठेवला. म्हटलं चला आत अवघ्या दहा मिनिटांनंतर स्वत:च्या हातनं बनविलेला गरमा गरम ताजा केक खायला मिळणार. दहा मिनिटांनी त्याला मोठ्या आशेनं बाहेर काढला तर साहेब अजून कच्चेच होते. मग परत दोन मिनिटं ठेवला, पुन्हा तेच. परत एखादा मिनिट ठेवला तरी तेच. बरं एव्हाना झालं काय होतं की केक वरून भाजलेला आणि आतून पातळढाण राहिला होता. त्यामुळे कितीवेळ ठेवायचा यावर एकमत होत नसल्यानं मिनिट लावून सारखा बाहेर काढून त्याच्यात सुरी खुपसून बघितलं जात होतं. बिचार्याला आम्ही इतक्यांदा भोसकलं की त्यामुळेच त्याला बहुदा आतून जाळी पडली असावी. त्यात परत कोणी म्हणत होतं की केक हलका झालाय तर कोणी म्हणत होतं तो बसलाय. असं करून अखेरीस कंटाळून जाऊदे आता जसा झालाय तसा खाऊ म्हणून केक बाहेर काढला. एव्हाना इतकी मेहनत झालेली होती की त्याला आयसिंगनं सजवायचा उत्साह ओसरला होता. त्यामुळे तो प्रोग्रॆम रहित करून नुसताच केक खायचं एकमतानं ठरवलं. केकचं भांडं बाहेर काढलावर पहिला धक्का बसला तो त्यानं बदललेल्या रंगामुळे. पाकिटावरच्या माहितीनुसार आमचा केक क्रीम रंगाचा व्हायला हवा होता. प्रत्यक्शात मात्र तो चॊकलेटी आणि काळ्याच्यामध्ये लटकला होता. आधी मेला स्वत:ला भाजून घ्यायला तयार नव्हता आणि आता मात्र....जाऊदे म्हणत दु:खाचा तो पहिला धक्का पचवत त्याला कापायल घेतला तर तो आतून इतका फ़ुसफ़ुशीत झाला होता की त्याला कापायचा कस हाच प्रश्न पडला. अखेर हातानच तुकडा तुकडा मोडत त्यातलं काय घडलंय काय बिघड्लंय यावार सधक बाधक चर्चा करत ते केक म्हणून जे काही होतं ते संपवलं. इतकं सगळं होईपर्यंत जेवणाची वेळ येऊन ठेपली होती आणि स्वयंपाक तयार नव्हता म्हणून बाहेरून मागवून जेवलो. परत एकदा फ़सलेल्या केकच्या नावानं बोटं मोडून झाली, नवर्यानं ढेकर देत सांत्वनपर चार शब्द बोलले, सगळं नेहमीप्रमाणेच झालं आणि परत म्हणून केकच्या वाट्याला जायचं नाही असं आणखी एकवार ठरवून टाकलं.(आमचा केक फ़ारच वाईट झाल्यानं त्याचं उट्ट म्हणून या लेखासाठी खास हा सुंदरसा फ़ोटो गुगल्याच्या सौजन्यानं शोधून काढला.)
मंजुचा व्हर्च्युअल स्वाईन फ़्ल्यु
बायको जेंव्हा बायका बघायला सांगते
जनरली नवरा दुसर्या बाईकडे बघत असेल तर बायकोला राग येतो. सहाजिकच आहे म्हणा. पण असेही काही नवरे असतात ज्यांच्या बायकाच त्यांना दुसर्या बाईकडे "बघ" असं सांगतात. पण थांबा. इतक्यातच, किती भाग्यवान ते नवरे असं वाटून घेऊन हळहळू नका. चंदूची बायकोही अशाच बायकांपैकी आहे. घरात, दारात, रस्त्यावर कोठेही गेलं की ती समो्रून येणार्या बाईकडे चंदूला बघायला सांगते. तोही बिचारा अद्न्याधारकपणे बघतो. तसं बायकांकडे बघायला त्याची ना नसते, मात्र या सगळ्या बायका "७५ एम एम" फ़िगर बाळगणार्या असतात. (विशेष सूचना- जाड, जाड्या, ढब्या, लठ्ठ, अवाढव्य अशा सर्व प्रकारच्या फ़िगर्सबाबत मला व्यक्तिश: सहानुभुती आहे. त्यामुळे वाचकांपैकी कोणी या मापदंडात बसत असेल तर क्रुपया राग मानू नये. बच्चा समझके माफ़ करना :))तर चंदूचं लग्न झाल्यानंतर साधारण वर्षभरानं म्हणजे त्याची चवळीची शेंग क्रमश: बदलत भोपळ्यापर्यंत पोहोचल्यानंतर तिला जाणवलं की आपण जरा जास्तच सुटलो आहोत. सुटलो आहोत हे जरी समजलं असलं तरी कितपत सुटलोय याचा अंदाज तिला येत नसल्यानं तिनं चंदुचं मत अजमावायचं ठरवलं. "चंदू मी किती जाड आहे"? या प्रश्नाला चतुर नवरा जे उत्तर देईल तेच त्यानं दिलं,"छे गं, मला तर तू बारीकच वाटतेस". वरकरणी बायको खुश झालेली असली तरी "आपण जरा सुटलोयच" हा विचार तिच्या मनातून न गेल्यानं सोसायटीतल्या, ओळखितल्या, नात्यातल्या सगळ्या बायकांची नावं घेऊन मी तिच्याइतकी आहे की तिच्यापेक्शा जाड? की तिच्याहून बारीक अशी तोंडी परिक्शा घेऊन तिनं चंदुला हैराण केलं. बाहेर पडल्यावर समोरून साधारण सुटलेली बाई येताना दिसली की ती चंदुला विचारायची,"हिच्यापेक्शा मी किती जाड आहे"? आताशा तर कहरच झालाय, समोरून जाड बाई येताना दिसली की ती चंदुला कोपर रुतवून तिच्याकडे बघायला सांगते आणि डोळ्यानंच विचारते. एव्हाना चंदुलाही याची इतकी सवय झालीय की समोर जरा विस्तारीत फ़िगरवाली बाई दिसली रे दिसली की तो लगेच बायकोनं न विचारता ती त्या बाईच्या मागे आहे की पुढे हे सांगून टाकतो.
बाहुलि हरवलि
अलिकडे बाहुली म्हणजे बार्बी असंच समिकरण बनलंय. मला विचाराल तर मला बार्बी छोट्या मुलिंची बाहुली न वाटता मोठी बाईच वाटते. लांबसडक पाय, हात आणि आटोपशिर बांध्याची बार्बी मॊडेल भासते. आम्ही खेळलो त्या बाहुल्या म्हणजे गोबरया गालांच्या कुरळ्या केसांच्या गुटगुटीत, डोळ्यांची उघडझाप करणार्या असायच्या. दुकानातून अंगावर जो ड्रेस घालून यायच्या त्याच ड्रेसवर बिचार्या निमुट आमच्या भातुकलीत वर्षानु वर्ष खेळत असायच्या. बार्बीचं तसं नाही. या बाईसाहेबांचे नखरे तर विचारूच नका. यांच्या पायात उंच टाचेचे सॆंडल्स असतात, ओठांवर लिपस्टिक, अंगात तंग कपडे, हातात पर्स, मोबाईल, पेप्सी सगळं असतं. शिवाय यांचा अख्खा कपडेपटही विकत मिळतो. आमची बाहुली आमची बबडी असायची. तिला झोपवून, चुकवून आम्ही आईसारखे ऒफ़िसला जायचो. बार्बीशी खेळणारी लेक तिच्या सोबतिनं ्पार्टी पार्टी खेळते. बाहुलीच्या खेळातला निरागसपणा जाऊन आता तो स्टायलिश खेळ बनला आहे. भातुकलीतली गोबरी बाहुली हरवली आहे आणि तिची जागा या बार्बीनं घेतलीय याचं वाईट वाटून घ्यायचं की भातुकलीचा खेळही ब्रॆंडेड बनलाय याचं कौतुक करायचं हेच समजेनासं झालंय......
कोणी काही बोललं तरी टोचणं बोचणं उरलं नाही
ओशट ओशट मन आणि बोथट झाल्यात भावना
निसरड्या कानावरून शब्दांचे ओघळ नुसतेच घरंगळतात
--------------------------------------------------------------
परवा अचानकच जुना गाव वाटेत भेटला
बालपणिचा काळ सुखाचा चटका लावून गेला
जुन्या गावातलं घर माझं आता बरंच पुराणं झालंय
सुरकुतलेल्या म्हातार्यागत डोळ्यात आस पकडून श्वास मोजतंय
जुनेपाणाचं पोतेरं अंगावर घेऊन
शेवाळलेल्या भिंतिंतून आठवणी गच्च पकडून
उभं आहे बिचारं अजुनही पाऊसवारा झेलत
.........रात्र पावसाचि
तर बंधुराजांनी सांगितलं की त्याचा मित्र अंधेरीतलं काम आटोपून दोन वाजेपर्यंत स्टेशनवर येणार होता, तिथे आम्ही त्याला भेटणार होतो आणि पुढे त्याच्या पनवेलच्या फ़्लॆटवर असणारी त्याची गाडी घेऊन सांगलीला जाणार होतो. हे सगळं अचानक ठरल्यानं आम्ही जमेल तेव्हढी घाई करून सामान सुमान घेऊन स्टेशन गाठलं. निघताना घरी फ़ोन करून रात्री जेवायला येत असल्याचं सांगितलं. साधारण पावणेदोन वाजता स्टेशनवर आम्ही पोहोचलो. दोनचे सव्वा दोन आणि अडीच झाले तरी मित्रवर्यांचा पत्ता नाही. तीनचे साडे तीन झाले तरी काही समजेना. मोबाईल करावा तर तो बंद. एव्हाना नवर्यानं माझ्याकडे रागानं, संतापानं आणि वैतगानं बघून गुरगुरून झालेलं होतं. स्टेशनवरच्या गर्दीनं पिल्लू वैतागलं आणि जमेल तितकं इरीटेट करायला लागलं. या सगळ्यात बंधुराज मात्र डोक्यावर बर्फ़ाची लादी ठेवून होते. अखेरीस नवर्यानं शक्य तितक्या शांतपणानं आणि ठामपणानं घरी परत जाण्याचा निर्णय सुनावला. दोन तास फ़ुकटचा टाईमपास करून आम्ही परत घरी आलो. रात्रीची तिकिटंही कॆन्सल केलेली असल्यानं आता काय करायचं? हा प्रश्न होता. अखेरीस आमच्या रामप्यारीतून जायचं ठरलं. सामान उचलून खाली आलो, डिक्कीत सामान भरलं, स्टार्टर मारला आणि लक्शात आलं की एकावर एक फ़्री असल्यासारखी दोन्ही चाकं पंक्चर आहेत. ती काढून आणेपर्यंत आणखी तासभर गेला. परत वर येऊन चहापाणी झालं आणि बंधुराजांचा फ़ोन खणखणला. पलिकडून त्याचा परमप्रिय मित्र उलटा आम्हालाच झापत होता की तो स्टेशनवर आम्हाला शोधत आहे आणि आम्ही घरी काय करतोय म्हणून? मग परत डिकितलं सामान काढलं आणि रिक्शात भरून स्टेशन गाठल. तिथून टॆक्सी पकडली आणि पनवेलकडे निघालो. बंधुराज आणि त्यांच्या मित्रात व्यवस्थित मिसकम्युनिकेशन झालेलं होतं. त्यानं सांगितलं होतं की दोन अडीच वाजता तो अंधेरीला जाणार आहे. असो. केवळ एक कप चहासाठी आणि गाडीचं पंक्चर काढण्यासाठी आम्ही घरी गेल्यासारखे झालं. आता तुम्ही म्हणाल की काढलंच होतं पंक्चर तर जायचं नां स्वत:च्या गाडीतून. तर त्याचं कारण असं की मित्रवर्यांनी नवी कोरी गाडी घेतली होती आणि त्यातून जावईबापूंना घेऊन जायची सुर्सुरी दोघांना आलेली. टॆक्सीत बसलो तर तिथे दुसरंच नाटक. टॆक्सीत आम्ही चौघं आणि आमचं प्रचंड सामान कसंबसं कोंबलेलं होतं. टॆक्सी सुरू झाल्यावर समजलं की एका बाजुला काचच नव्हती. तणतणत वैतागत कसेबसे पनवेलला पोहोचलो. तिथून ती ब्रॆण्डन्यू कार घेऊन निघालो. साधारण अर्ध्या तासानं नवर्यानं बंधुराजांना विचारलं की अरे आपण नक्की कोणत्या मार्गे जातोय? त्यावर त्यानं नाही पण मित्रवर्यांनी सांगितलं की पेणच्या कॊलेजात त्यांना कसलंसं एक पार्सल द्यायचं होतं, जाता जाता तेव्हढं काम करून पुढे निघायचं होतं. गाडीतून न उतरता केवळ गेटवरच्या माणसाकडे ते पार्सल देऊन जायचं असल्यानं वाकडी वाट केल्यानं जितका वेळ लागणार होता तोच. एव्हाना सगळेजण गाडीत सेटल झालो होतो. अंधार झाला होता. मस्त जुनी गाणी लागल्यानं कधी पेण आलं समजलंच नाही. पेण आलं, कॊलेज आलं, कॊलेजचं गेट आलं पण ज्याच्याकडे पार्सल द्यायचं तो माणून सोडाच काळं कुत्रंही दिसेना. आता परत फ़ोनाफ़ोनी सुरू झाली. तो माणूस आमची वाट बघून निघून गेला होता. आता तो जिथं होता तिथं जाऊन पार्सल देणं भाग असल्यानं परत एकदा आमचा प्रवास सुरू झाला. त्यानं सांगितलेल्या खुणा म्हणजे मोठा निर्माल्यकुंड, बाजार वगैरे सगळं सापडलं पण तो माणूस काही सापडला नाही. सरळ सरळ जाऊन अखेरीस रस्ता संपला. तासभर अशी डोके आणि घसेफ़ोड केल्यानंतर भक्ककन उजेड पडला की तो माणूस पेणमधला पत्ता मुळी सांगतच नव्हता. तो जो पत्ता सांगत होता ते ठिकाण होतं अलिबागमध्ये. हे समजल्यावर हसावं की रडावं हेच समजेना. पार्सल देणं अगदी निकडीचं असल्यानं आणि आता एव्हाना उशिर झालेला असल्यानं ऐंशी तिथं पंच्याऐंशी असा विचार करून ब्रॆण्ड न्यू गाडीची चाकं अलिबागकडे वळवली. एव्हाना पाऊस चांगलाच कोसळायला लागला होता. सकाळी केलेलं जेवण आणि संध्याकाळचा चहा सोडला तर पोटात काही नव्हतं त्यामुळे कडकडून भूक लागली होती. अखेरीस एका घरगुती पध्दतीच्या हॊटेलात आम्ही वैतागत जेवण उरकलं(तसं बघायला गेलं तर त्या संबंध दिवसांत आम्ही तेव्हढी एकच गोष्ट शहाणपणाची केली होती). आता घड्याळ बघायचंच नाही असं ठरवल्यानं किती वाजलेत याला काही महत्व नव्हतं. त्यात पुन्हा गंमंत अशी झाली की एव्हाना तीनपैकी दोन मोबाईलनी बॆटरी संपल्याच्या नावाखाली माना टाकल्या आणि एका मोबाईलला रेंज मिळत नसल्यानं आम्ही आमच्या घरच्यांच्या आणि एकुणच सगळ्यांच्या संपर्कातून गेलेलो होतो. अंदाजानं मघाशी सांगितलेल्या खाणाखुणांवरून आम्ही चक्क अलिबागला त्या सदगहस्थांना शोधलंच आणि ते ऐतिहासिक पार्सल त्यांच्या स्वाधिन केलं. त्यावेळेस रात्रीची किमान अकरा बिकरा तरी वाजून गेले असणार. पार्सल दिल्यावर सुटलो एकदाचे करत पुन्हा गाडीत बसलो. आता सांगली आल्याशिवाय थांबायचं नाही असं ठरवून किल्ली फ़िरवली. तिथून निघून पंधरावीस मिनिटंच झाली असतील आणि प्रचंड म्हणजे हत्तीच्या सोंडेसारखा पाऊस कोसळायला लागला. समोरचं दिसणं मुश्किल झालं आम्ही एका रेल्वेच्या गेट समोरून गेलो आणि भावानं निरागस चेहर्यानं सांगितलं, किंवा विचारलं की, मघाशी येताना हे गेट नव्हतं, आता कुठून आलं? आल्या रस्त्यानंच परत फ़िरायला गेलो आणि मस्तपैकी वाट चुकलो. बरं इतक्या पावसात आणि तेदेखिल इतक्या रात्री वाट विचारायला आम्हाला भेटणार तरी कोण? अखेरीस तसेच अंदाजा अंदाजानं गाडी पुढे नेत राहिलो. कुठे आलो होतो आणि कुठे चाललो होतो, काही पत्ताच लागत नव्हता. बरोबर लहान मुलगी असल्यानं आणखिनच टेन्शन आलं. थांबायचं आणि सकाळी जायचं म्हटलं तरी सोय नाही, कारण आजुबाजुला डोळ्यात बोट घातलं तरी काही दिसत नव्हतं. रात्री झोपायला घरी जाणार होतो ते राहिलंच, पण सकाळच्या चहापर्यंत तरी पोहोचतोय की नाही याची शंका वाटायला लागली. मध्येच गाडी बंधुराजांनी चालवायला घेतली. अपरात्री कधीतरी त्याच्या अत्यानंदी आवाजानं तरतरी वाटली, त्यानं "खोपोलीकडे" असा बोर्ड वाचला. इतक्या तासांनंतर आम्ही ओळखिचं काहीतरी वाचलं होतं. काही नाही किमान आता खोपोली तरी गाठता येणार होतं. गरगर फ़िरून पहाटे कधीतरी आम्ही एक्सप्रेस हायवेला लागलो. जितक्या अकल्पितपणे रस्ता चुकला होता त्याच अकल्पितपणानं रस्त्यावरही आलो होतो. अजून हुश्श करून सुटलो एकदाचे म्हणतोय तर पुढचं संकट कपडे करून तयारच उभं होतं. रात्री झालेल्या अपघातामुळं वाहतुकीची प्रचंड कोंडी झालेली होती. त्यातून मुंगीच्या पावलानं निघायला प्रचंड वेळ लागला. असं करता करता सांगलीला घरी पोहोचलो तेंव्हा सकाळचे अकरा वाजायला आले होते. आदल्या दिवशी अकरा वाजता यायला निघालेले आम्ही दुसर्या दिवशी अकरा वाजता पोहोचलो होतो. रात्री जेवायला येणार म्हणून जेवण तयार करून घरचे वाट बघत होते, पानं घेऊन तयार होती, गाद्या घालून तयार होत्या आणि आमचाच पत्ता नव्हता. त्यातून मोबाईल लागत नव्हते, बरोबर लहान मूल त्यामुळे घरचे जाम काळजीत होते. नवरा वैतागून अखेरीस म्हणालाच की चालत निघालो असतो तरी एव्हाना पोहोचलो असतो, पण करणार काय "एक तरफ़ खुदाई एक तरफ़ जोरूका भाई"....:)
दिवस असे की......
चमाला तू चंगतेसा चमी चकए चज्जाम!!
नसता की्डा
एका घराची गोष्ट
.................आमच्या घराची गोष्ट मी पाच वर्षांची असताना सुरू झाली. कराडातल्या सोमवार पेठेतल्या ऐसपैस वाड्यात वावरलेल्या माझ्या आईला दोन खोल्यात रहाणं म्हणजे बांधल्यासारखं वाटायचं. त्यातून भाड्याच्या घरात शंभर बंधनं असायची ती वेगळीच. एक खिळा ठोकला तर आमचे घरमालक म्हणे धावत यायचे. दारासमोर फ़ुललेली बाग होती पण देवासाठी चार फ़ुलं तोडायची परवानगी नव्हती. बाथरूम तुंबतात म्हणून आठवड्यातून एकदाच केस धुण्याची अट तर घराच्या किल्ल्या देतानाच घातली होती हे सगळं कमी म्हणून आणखी एअ विचित्र अट घरमालकीण बाईंनी अगदी कडकपणानं घातली होती वर जर ही अट मान्य असेल तरच घर मिळेल म्हणून तंबिही दिली ती अट अशी होती की,"आमचं घर देव धर्म करणार्यातलं आहे. आम्ही कडक सोवळं ओवळं पाळतो म्हणून तर ब्राह्मणांशिवाय कोणाला वाड्याचा उंबरा चढू देत नाही त्यामुळे तुम्हाला या वास्तूत रहायचं तर सगळं सोवळं पाळायला पाहिजे. अगदी बाहेरचंही बसावं लागेल". असली विचित्र अट मान्य करण्यावाचून आईदादांपुढे पर्याय नव्हता कारण खिसा परवानगी देणारं हे एकच घर होतं. मला जसं समजायला लागलं तसं आईचं एअ वाक्य मला सतत ऐकायला यायचं,"अहो, काहीही करू पण जागा घेऊन किमान एक खोली तरी उभी करू. माझ्या जागेवरून कोणी मला ऊठ म्हणणार नाही अशी हक्काची जागा मला हवीय" आमची आई जाम हिकम्ती तर दादा कमालिचे संयमी. कोणतिही गोष्ट दहा बाजुंनी विचार करून पन्नास जणांसोबत मसलत केल्याशिवाय करत नसत. आई म्हणजे आधी कती मग विचार असा मामला. अखेर एक दिवस गावाबाहेर पाच हजार स्क्वे. फ़ु.ची जागा घ्यायला आईनं दादांना राजी केलं आणि नुसतं राजी केलं नाही तर जवळचं होतं नव्हतं ते सगळं सोनं त्या जागेपायी विकलं. गळ्यात काळी पोत आणि हातात काचेच्या बांगड्या अशी आई आनंदानं इतई फ़ुलली होती की तिचं दागिन्यांविना ओकंबोकं रूपही तितकच देखणं दिसत होतं. स्वत:चं हक्काचं घर होणार या गोष्टीचा तिला इतका आनंद झाला होता की त्यामुळे तिला पुढच्या अडचणी जाणवतच नव्हत्या. जवळचं होतं नव्हतं ते विकल्यानंतर पाया आढून झाल्यावर घराचं काम अर्थातच ठप्प झालं. मग जसे पैसे जमतील तसं घर उभं रहायला लागलं. जागा कुठच्या कुठे गावाबाहेर होती, पाणी वीज कसली म्हणून सोय नाही, रस्त्यांच्या पत्ताच नाही त्यात काळी जमिन त्यामुळे पावसाळ्यात गुडघाभर चिखल व्हायचा अशा ठिकाणी पैसा ओतला म्हणून आईदादांना सगळ्यांनिच अगदी वेड्यात काढलं. त्यावर आई म्हणायची,"असुदे कशिही असली तरी जागा, हक्काची आहे हे काय कमी आहे? उद्या तशिच वेळ आली तर चार पत्रे उभे करून राहिन". तिच्या हट्टापुढे कधिच कोणाचंच काही चाललं नव्हतं याहीवेळेस काही चाललं नाही. आमचं घर बांधायचं काम दिगंबरकाका नावाचे एक गवंडी करत होते. आमच्या खिशाचा अंदाज असलेले दिगंबरकाका त्याचा विचार करून त्याबेतानं विट न विट उभी करत होते. जवळच असलेल्या एका चुन्याच्या भट्टीतून चुना येत होता, विटा काकांच्य ओळखितून येत होत्या सगळं हळूहळू का होईना पण शिस्तीत चाललं होतं याचं कारण आईदादांची लोकांतली स्वच्छ प्रतिमा. अत्यंत गप्पिष्ट, मनमिळावू, अगत्यशिल असलेली आई पेशानं शिक्षिका होती त्यामुळे तिला सगळेच "बाई" म्हणत असत. एका पैशाचिही चौकशी न करता "बाईंच्या प्लॊटवर" सामान येत राहिलं. सामानची जुळवा जुळव झाली तरी हाताखालच्या मजुरांचे पगार थकवणं आईदादांनी कधिच केलं नाही पण हळू हळू दर शनिवारी त्यांचे पगार देण्यासाठी पैसे जमवणं जरा ओढीचं व्हायला लागलं. दिगंबर काकांनी आमचं घर उभं राहिल्यानंतरच त्यांचे पैसे एकदमच घ्यायचं ठामपणानं सांगितलेलं असलं तरी हाताखालच्या लोकांना पैसे देणं आवश्यक होतं. मग आईनच सांगितलं अगदी एक किंवा दोनच माणसं हाताखाली घ्या बाकीचं आम्ही बघू. आम्ही शाळासंपल्यानंतर दिवसभर घरात एकटेच असायचो तर आईनं एअ दिवस आम्हाला म्हणजे मला आणि भैय्याला बोलवून सांगितलं की उद्यापासून प्लॊटवर जायचं आणि बांधकामावर पाणी मारणं आणि इतर किरकोळ कामं करायची. म्हणजे अगदी घमेली उचलायला लागली नाहित पण विटांवर पाणी मारून ठेवणं वाळूचा ढीग करून ठेवणं अशी बारीक कामं आम्ही दोघं अरायला लागलो. आम्हाला काय उलट मजाच यायची. दुपारी जेवणाचे डबे घेऊन आम्ही दोघं सायकलवरून डबलसिट प्लॊटवर जायचो. तिथं पाणी मारायच्या निमित्तानं पाण्यात मनसोक्त खेळायचो. संध्याकाळी शाळेतून आई थेट तिकडेच यायची. काम कुठवर आलंय ते पहायची कौतुकानं लावलेल्या झाडांना पाणी घालायची मग सायकलच्या हॆंडलला पाण्याच्या पाईपचं भलं मोठं भेंडोळं, बादल्या आणि डबा लटकावून आम्ही तिघं चालत चालत घरी यायचो. असं काम थोडं थोडकं नाही तर वर्ष दीड वर्ष चाललं. मध्ये पैशाची अगदीच ओढ झाल्यानं बंदच पडलं. प्लॊटवर जायचा नेम मात्र तिनं स्वत: चुकवला नाही आणि आम्हालाही चुकवू दिला नाही. दरम्यान आम्ही लावलेलं झाड न झाड फ़ोफ़ावलं होतं. त्यांची निगा राखायला रोज जायलाच हवं असं तिचं म्हणणं होतं. आमच्या घराचं बांधकाम हा घरमालकांच्या चेष्टेचा विषय झाला नसता तरच नवल. आईची येता जाता कुजक्या शब्दात मालकीणबाई थट्टा करायच्या. मात्र आई न चिडता, संतापता त्यांचे वार परतवायची. अखेर एक दिव घरमालकांनी पंधरा दिवसांची मुदत दिली आणि घर सोडायला सांगितलं. आई तर पण करून बसली होती की हे भाड्याचं शेवटचं घर. आता जायचं ते स्वत:च्या घरात. ती जे बोलायची ते करायची हे पक्कं जाणून असणारे दादा दुहेरी काळजित पडले. घराचं अर्धं काम झालेलं होतं आणि तिथे रहाणं शक्य नव्हतं, लगोलग घर उभं करायचं तर दातावर मारायला पैसे नव्हते अशातच आमच्याचकडे रहाणार्या लहान मावशिच लग्न ठरल्यानं घरात ती घाई चालली होती. तिचं लग्न इतरत्र चार पैसे खर्च करायला उसंत देत नव्हतं. कसं करायचं या विवंचनेत आईदादा होते...........