मी कोण? मी कोण?…मी कोण?



कसं नां की आपलं सगळं वर वर पहाता नीटपणानं चाललेलं असतं आणि तरीही राही उणे प्रमाणे काहीतरी दोन बोटं रितेपण असतंच… निराश असलं की हे रितेपण केवळ आपल्याच वाट्याला आहे असं वाटतं आणि मन शहाणं स्थिर चित्त असलं की हे दोन बोटं उणं रितेपण सगळ्यांच्याच मनात दाटलेलं दिसतं… म्हणजे असं चरचरित दु:ख वगैरे अजिबात नाही तरीही काहीतरी आत हळू हळू बोचणारं,… मी आहे ती खरी की दुसरी कोणी हा प्रश्न कुरतडत रहाणारं… नावामागच्या पदव्या कुठेबरॆ अडगळीत गेल्या हा प्रश्न तर महाभयानक जीवघेणा… बरं पुन्हा पदव्यांनुसार नोकरी म्हणजेच काहीतरी ग्रेट असणं असतं का? हा शहाणा प्रश्नही हळॊच डोकावतो. मुळात काहीतरी नोकरी बिकरी करत रहाणं म्हणजेच काहीतारी साध्य करणं का? मग जे आत्ता हातात आहे त्याचं काय? …. पण मग याचसाठी केला होता का अट्टाहास हा वेडा प्रश्नही तापच देतो… हे असलं सगळं वेडेपणाचं मनात येत असतानाच दोन चिमुकले हात पाठीमागॊन गळ्यात येतात आणि माझी आई वर्ल्डबेस्ट आहे असं मोठ्या डोळ्यानं कौतुकानं म्हणतात.… वर्ल्ड बेस्ट आई होण्यासाठी नां गंमत म्हणजे कोणतीच पदवी लागत नाही. एका बाउल टोमेटो सूप, कधीतरी केलेली दोन मिनिट में तैय्यार मेगी , सरप्राईज म्हणत हातात ठेवलेलं चोकलेट आणि रोज झोपताना कुशीत घेउन सांगितलेली कायच्या काई गोष्ट, एव्हढ्या पाठबळावर वर्ल्डबेस्ट आई होता येतं . इतक्या कमी क्वालीफिकेशानामध्ये मिळणारा हा जगातला अत्युच्च जॉब आहे. पुन्हा परतावा म्हणून मिळणारे आनंदाचे बोनस निराळेच …. हे सगळं घडत सातम नां तेंव्हा गंमत म्हणजे तो दोन बोटं रितेपणा गायबच असतो… तात्पुरता का होई ना..

 

खूप छान काही ...






दीप्ती नवलच्या अभिनायाप्रमाणे शब्दातपण एक थंडावा आहे. तिच्या कवितातले शब्द शांतपणे कवितेत उतरतात,त्यात धसमुसळेपणा नाही की टोकाच्या भावना नाहीत. तिच्या कविता वाचताना हिमालयातल्या एखाद्या निवांत खेड्यातल्या सुस्त संध्याकाळच फिलिंग येतं.आपल्यात हरवलेले शब्द आणि हळूवार व्यक्त होणारया भावना...




चलो दूर तक

अजनबी रस्तो पे पैदल चले

कुछ न कहे

अपनी अपनी तनहायिया लिये

सवालों कें दायारो से निकलकर

रीवाजो की सरहदो कें परे

हम यू ही साथ चलते रहे

कुछ न कहे


किंवा






जब बहुत कुछ कहने को जी चाहता है ना

तब कुछ भी कहने को जी नही चाहता


किंवा





सर्द! तनहाई की रात

और कोई देर तक चलता रहा

यादों की "बुककल" ओढे...

 

Shri lanka slide show

Untitled Album Slideshow: Shilpa’s trip from Nuwara Eliya, Sri Lanka to 2 cities Kandy and Bentota was created by TripAdvisor. See another Sri Lanka slideshow. Create a free slideshow with music from your travel photos.
 

सिने में जलन, आंखो में तुफ़ान क्युं है

असं नेमकं काय झालंय की रोजच्या दिवसातला आनंद हरवून गेलेला आहे......आनंद तुमच्या हातात आहे. तो कोणीही तुमची इच्छा नसताना हिरावून घेऊ शकत नाही, असली फ़िलॉसॉफ़ील कोट्स वाचताना एकाचवेळेस आतून बरं वाटत असतं तर मग भंपकासारखं का बरं वाटावं?......आपलं आपलं असं सगळं मस्त चाललं असतानाच असं काय आहे, जे इतकं त्रास देतंय?....छे छे, आपण दु:खात, त्रासात आहोत याचा आनंद कोणी उपभोगत असेल तर आपण का बरं असा आनंद द्यावा त्यांना?....पण हे सगळे शब्दाचे बुडबुडेच....नाही म्हटलं तरी मान्य करायलाच हवं की जखम खोल आहे, आतपर्यंत गेलेली रूतन बसलेली.....पण का कुरवाळ्यावत अशा फ़ुकट जखमा?....लोकांच काय आहे? आज जरी आयुष्यात आहेत उद्या नक्की नसणार आहेत...काल परवा जी होती ती तरी आज कुठे आहेत?....ते दिवस गेले, हेही जातीलच....हा सगळा त्रागा का? ही अस्वस्थता का? काय आहे ही बोच? सगळं काही ठीक असताना मनाची शांतता, समाधान गेलं कुठे? कोणीतरी म्हणजे अगदी शब्दश: कोणीतरी ज्यांचा आपल्या आयुष्याशी काहीएक संबंधही नसतो अशी माणसं आपलं सुख, मनाची शांतता अशी ओरबडून घेऊन निघून जातात आणि आपणही उसासे सोडत बसावं?.....बरं सगळेच आपल्याच मनाचे हिंदोळे....इकडून तिकडे......जाब विचारण्याची हिम्मत नाही आणि माफ़ करून विसरण्याइतका मोठेपणाही नाही....वरवर माफ़ केलेलं असलं तरिही निघतच असते खपली दर दिवशी.....माझी हक्काची माणसं, त्यांच्या आयुष्यात माझ्या असण्यानं खुष असतानाही अशी वैतागवाणी माणसं माझ्या आयुष्यात असण्यानं इतका का फ़रक पडावा?.....नकोच पडायला खरं तर...फ़रक पडतो हेही खरंच....गेले काही दिवस.... नव्हे महिने, या परिस्थितीतून जात असताना स्वत:शी वारंवार विचारलेला, त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केलेला हा प्रश्न, सिने में जलन, आंखो में तुफ़ान सा क्युं है? ..... आहे काही उत्तर? लोक असे का वागतात? त्यांच्या वागण्याचा त्रास आपल्याला काहीएक कारण नसताना का होतो? आपल्या चांगुलपणाचा फ़ायदा घेत रहाण्याचा अघोरीपणा करून यांना नेमकं कोणतं सुख मिळतं?...थोडा निर्ढावलेपणा यायला हवा....दूर्लक्ष करता येण्याइतका...गेलात उडत म्हणण्याइतका......गैरफ़ायदा घेताय? असभ्य चेहर्‍यावर सभ्यतेचे मुखवटे ताणताणून चढवताय? मेरी बलासे म्हणण्याइतका......
 

धर्म, संस्कार इत्यादी

हा लेख म्हणजे कोणत्याही धर्मावर, त्यांच्या चालीरीतिंवर, संस्कारांवर टिपण्णी नाही. असेलच आपल्याच माणसांचा (आपल्या म्हणजे हिंदू वगैरे) असणारा गोंधळ आहे. गेली काही वर्ष सातत्यानं ही गोष्ट जाणवत होती आणि डाचतही होती. निमित्त झालं गुढीपाडव्याचं. सर्वधर्मसमभावाची व्याख्या दुसर्‍या धर्माला आपलं म्हणत आपल्याच धर्माला आणि त्याअनुषंगानं येणार्‍या संस्कारांना दूर लोटणं आहे का?

प्रसंग पहिला-ख्रिसमसला दोन दिवस आहेत. घाईनं आणि लगबगीनं सोसायटीतल्या उत्साही मैत्रिणींनी गाठलं,"अगं यंदा ख्रिसमसचं काय करायचं आहे? तुम्ही कल्चरलवाले काही करणार नसाल तर आम्हीच करू पुढाकार घेऊन सगळं. अखेर आपल्याच मुलांना मज्जा येणार आहे ना? त्यांना आवडतं गं असं सांताक्लॉज वगैरे सगळं". ख्रिसमच्या आदल्या रात्री खंजिरी वाजवत एक सांताक्लॉज सोसायटीतल्या एका कॅथलिक घरात गेला. ज्या दोन तीन पोरांनी सांताक्लॉजला पाहिलं ती धावत खाली गेली तर हा सांता चक्क दूर्लक्ष करून चालता होत होता अखेर पुन्हा मागे येऊन टेकवल्यासारखी दोन चॉकलेटं देऊन गेला. असो. ख्रिसमसची पोरांची पार्टी जोरदार झाली. यानिमित्तानं मफ़िंग्ज, कोल्ड्रींग, स्नॅक्स असा जोरदार कार्यक्रम आयांनी स्वखर्चानं केला. गंमत म्हणजे सोसायटीत तीन ख्रिश्चन घरं पण यातलं एकही मूल किंवा आई या सेलिब्रेशनमध्ये नाही. असो. तर ख्रिसमस जोरदार साजरा झाला.

थर्टीफ़र्स्ट- अरे आपली सोसायटी काही करणार आहे की नाही? किंवा आपण जाऊ नां कुठेतरी एखाद्य रिसॉर्टमध्ये किंवा किमान "डिनर"तरी एकत्र घेऊ. प्लॅन खटाखट बनतात आणि एरवी बिझी असणारी मंडळी या रात्री आवर्जून येतात. खान पान, मौज मस्ती, नाच गाणं धमाल मस्ती पहाटे कधीतरी घरी येऊन पाठ टेकली जाते आणि नव्या वर्षाची सुरवात जड अंगानं आणि आळसटलेपणानं.

गुढी पाडवा- आदल्या दिवशीपर्यंत सगळेच अनुत्साही. ज्या चारजणी कल्चरलमध्ये आहेत त्याच धावाधाव करून काठी आण, कापड आण, मिठाई आण असं करत आहेत. सकाळीही सगळ्यांना या या म्हणून निमंत्रण द्यावं लागतंय. घरांच्या खिडक्यांतून सगळे डोकावून बघत आहेत मात्र खाली येऊन कोणी सहभागी होत नाही. जणू काही हे सगळं करण्याची जबाबदारी केवळ कल्चरलवाल्यांचीच आहे. कशाला लागतात आमंत्रणं? होळी खेळायला, गरबा नाचायला, ख्रिसमस साजरा करायला लागतं का आमंत्रण? तिथे अगदी आपण नाही गेलो तर जगबुडी होईल असा आव आणि इथे आपली परंपरा, रीत साजरी करायला आमंत्रण कशाला लागतं? हे सगळीकडेच पहायला मिळू लागलं आहे. आपलं सगळंच टाकावू आणि इतरांचं सगळं ग्रेट असं का? आपली संस्कृती रसातळाला जाण्यासाठी बाहेरच्या कोणाची गरजच काय? आपल्यातलेच हे पुढारलेले महाभाग बास आहेत. विचारानं पुढारलेलं असणं म्हणजे आपल्या रितीभाती सोडणं असतं कां? आता हे सगळं वाचून मी कोणी कट्टर शेंडीवाली आहे असं वाटून घेऊ नका. माझ्या आईनं, माझ्या सासूबाईंनी जितक्या कसोशिनं सगळं जपलं तितकं तर मलाही (कोणालाही) करता येणार नाही पण जे आपण करू शकतो ते आवर्जून करायला, जपायला काय हरकत आहे? पुढच्या दोन पिढ्यांनतरचा विचार केला तर चित्र काय दिसेल? आपल्याच मुलांना काही पायाच नसेल. आपला धर्म,जात आणि संस्कृती आपल्याला एक भक्कम पाया देते हे तर नाकारता येणार नाही? आपण कितिही आव आणला तरी या सगळ्यापासून पूर्ण अलिप्तता बाळगणं कठीण आहे. असो. एकच सांगावसं वाटतं की प्रत्येक गोष्टीचं सेलिब्रेशन करता येत नाही आणि ज्याचं सेलिब्रेशन करता येत नाही ते हद्दपारच करायचं असंही नाही. आपणच आपल्या रिती जपल्या पाहिजेत अगदी कडवेपणानं नाही मात्र जसं जमेल तसं, पण जपायला हवं. अर्थात यावर मतं मतांतरं असतीलच पण मला जे जाणवलं ते प्रकट करावसं वाटलं.
 

मस्त, जबरदस्त कहानी



कसं असतं नां की आपण रोज तेच ते जेवत असतो कधी भाजी चांगली जमते तर कधी कोशिंबीर एखादा रविवार असा उजाडतो की रोजचाच सगळा स्वयंपाक पंचपक्वानांइतका रूचकर बनतो मग आपण तो तुडुंब जेवतो आणि तृप्तीचा ढेकर देतो. कहानीच्याबाबतीतही असंच झालंय. सगळं नेहमीचंच असलं तरिही त्याची भट्टी इतकी छान जमलिय की थिएटमधून बाहेर येऊनही त्याचा प्रभाव उतरत नाही. चित्रपटाचं समिक्षण वगैरे इथे अजिबात करणार नाहीए मात्र हा चित्रपट बघताना खुप दिवसांनी जो मस्त अनुभव आला नां तो तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करावासा वाटला.
एव्हाना या चित्रपताबाबत भरपूर लिहूनही आलेलं आहे आणि जबरदस्त हिटचा दर्जाही त्याला मिळालेला आहे, मात्र हिटच्या स्टार्सच्याही पलिकडचा एक अनुभव हा चित्रपट देतो. विद्या बालन ही बाई आता एक जबरदस्तच प्रस्थ झालेली आहे. इश्किया, पा, जेसिका, डर्टी पिक्चर आणि आता कहानी. इतकी जबरदस्त रेंज असणारी आजच्या पिढीत ती एकमेव अभिनेत्री आहे (अर्थात असं माझं वैयक्तिक मत आहे). द डर्टी पिक्चरचा अंमल अजून पुरता ओसरला नसताना, कहानी तिची ती डर्टी इमेज कुठच्या कुठे घेऊन गेलाय. या चित्रपटात पहिल्या फ़्रेमपासून अखेरच्या फ़्रेमपर्यंत तिनं जे काही साकारलंय ते मस्त आहे. हा सिनेमा म्हणजे अक्षरश: रोलर कोस्टर राईड आहे. थोडा सुखावह, थोडा पोटात गोळा आणणारा, नको नकोसा तरिही हवाहवासा वाटणारा अनुभव देणारी ही राईट अजिबात चुकवू नये अशीच आहे.
कथानकाबद्दल बोलायचं तर चित्रपटभर "बिद्या मॅडम" आहेत त्यांच्यासोबत असणारा इस्पेक्टर आहे, ऑफ़िसर मिस्टर खान आहे, विमा एजंट बॉब आहे, हॉटेलमधला पोर्‍या आहे, दर दोन मिनिटांनी संवादातून येणारा मिलान दाबजी आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कोलकता आहे. तरिही या चित्रपटात दोनच मुख्य भुमिका आहेत एक बिद्या बाकची आणि दुसरं "कोलकोता".
कोणताही चित्रपट दोन अर्थांनी "दिसतो". एक म्हणजे समोर जे कथानक साकारलं जात आहे ते आणि दुसरं म्हणजे तो चित्रपट आपल्याला जो "फ़िल" देतोय ते. हा फ़िल शब्दात पकडता येण्यासारखा नसतो, प्रत्येकाला अनुभवाला येणारा तरिही त्याची व्याख्या न करता येणारा हा फ़िल चित्रपटातून त्याच्या रंग-रूप-गंधासह भिडत रहातो आणि असा भिडणारा फ़ील चित्रपटाला वेगळा परिणाम प्राप्त करून देतो. "कहानी"तला कोलकता शहराचा जो फ़ील आहे तो असाच भिडतो (ज्यांनी हा चित्रपट पाहिला आहे त्यांना मला नेमकं काय म्हणायचं आहे समजेल). या शहरातल्या अरूंद गल्ल्या, वहानांच्या विविध हॉर्नचे एकाचवेळेस येणारे आवाज, माणसं-वाहनं यांची एकच कचकच गर्दी आणि या गर्दीत एकटी भिरभिर फ़िरणारी बिद्या बाकची.
रहस्यमय चित्रपटाचं यश असतं ते म्हणजे कथानकात प्रेक्षकाला गुंतवत असतानाच त्याचा अंत काय असेल, रहस्यभेद काय असेल याचे अंदाज लावायला भाग पाडणं. या फ़्रंटवर चित्रपट शंभर टक्के यशस्वी झालाय. मध्यंतरानंतर पाच दहा मिनिटांनी साधारण कल्पनाही येऊन जाते तरिही कथानकातला इंटरेस्ट तसुभरही कमी होत नाही हे कौतुकास्पदच आहे. याला कारण आहे कथानक सांगण्याचा वेग. त्यात घाईही नाही आणि उगाच रेंगाळलेपणाही नाही. मध्येच हा सयको-थ्रिलर असावा की काय असा अंदाज करायलाही कथानक भाग पाडतंच. चित्रपटातलं प्रत्येक पात्र त्याची भक्कम कामगिरी करतं विशेषत: विमा एजंट इतका छान नीच वठवला आहे की त्याला जाऊन चार रट्टेच घालावेत असं वाटतं. तरिही यापैकी कोणत्याही पात्राला बिद्या बाकचीच्या "कहानी"वर वरचढ होऊ न देण्याची किमया दिग्दर्शकानं साधली आहे. या सगळ्या सुंदर प्रवासावर कथाकथनावर कळस चढविला आहे अमिताभ बच्चन यांच्या आवाजातल्या रविंद्रनाथ टागोर यांच्या "एकला चलो रे" या गाण्यानं आणि त्यांच्या नॅरेशननं. इतक्या नेमकेपणानं हे गाणं कथानकात येतं की त्याची मग एक धुंदीच चढते. विद्या बालनच्या अभिनयाबाबत काहीच बोललं नाही तर ते पाप होईल. विद्या डोळे, ओठ, भुवया, नाक या सगळ्यांसहित सुंदर डॊयलॊग डिलिव्हरी करते. तिची बिद्या मॅडम इतकी कन्व्हिसिंग आहे की डर्टी पिक्चरमधली सिल्क एका क्षणासाठीही तिच्यात दिसत नाही. या दोन भिन्न व्यक्ती असाव्यात इतका वेगळेपणा दिसण्यापासून अभिनयापर्यंत आणि व्यक्त होण्यापर्यंत आहे. अखेरच्या प्रसंगातले तिचे डोळे आणि त्यातले भाव चित्रपट पाहून बाहेर आल्यावरही आठवत रहातात. अख्खा चित्रपट तिनं एकहाती तोलून नेलाय. सोन्यासारख्या गोष्टीला तिनं सोन्यासारखा बावनकशी अभिनय दिलाय. हा चित्रपट पाहिल्यावर तुम्हाला ती आवडून घ्यावीच लागेल.

एकला चलो रे.....
 

सिनेमाच्या आठवणींची आठवण

आपल्याला सिनेमा (मला मराठीतही याला सिनेमाच म्हणायला आवडतं कसं आपलं तुपलं वाटतं चित्रपट म्हटलं की....जाऊ दे)दोन कारणांनी लक्षात रहातो एक तर त्या सिनेमामुळेच आणि दुसरा म्हणजे त्या सिनेमाच्यासंदर्भात किंवा त्या त्या वेळेस बनलेल्या काही खास आठवणींमुळे. आजची ही पोस्ट अशाच आठवणींना पोस्त देण्यासाठी.....
सर्वात पहिली आठवण इथे अगदी समयोचीत वगैरे म्हणतात तशी आहे कारण आठवण आहे सिनेमाच्या पडद्याची आणि कोणत्याही नाटक सिनेमाची सुरवातही पडदा उघडूनच होते नाही का? माझ्या पिढीला (माझी पिढी म्हटल्यावर डोळ्यासमोर आजीबाईचा बटवा वगैरे आणाल तर खबरदार. माझी पिढी म्हणजे सिंगल स्क्रीन सिनेमावर पोसलेली आणि आजची पिढी म्हणजे पॉपकॉर्न चावत मल्टिप्लेक्समध्ये सिनेमे बघणारी) सिनेमा बघायला मिळायचा (त्यावेळेस सिनेमा सुरू झाला असं म्हणत नसत तर पाट्या पडल्या असं म्हणत)तो त्याच्या समोरचा पडदा दूर झाल्यावर (खरं तर त्याहीनंतर नाही. कारण विकोनं दात घासल्याशिवाय, लिरीलनं धबधब्याखाली न्हाऊन माखून झाल्याशिवाय, नाकाला/ छातीला विक्स लावल्याशिवाय, ड्युक्स किंवा तसलंच काही लिमका बिमका प्यायल्याशिवाय, इंदिरा गांधींची देशाच्या प्रगतीविषयीचं भाषण ऐकल्याशिवाय सिनेमा सुरू म्हणून व्हायचाच नाही. जाता जाता जरा विषयांतर करायची परवानगी मागते हं कधिचं मनात होतं लिहावं. आता संधी आहे तर लिहून घेते. ते सिनेमाच्या आधी दातानं आक्रोड फ़ोडणारे आजोबा आहेत नां, ते आमच्या लहानपणापासून अस्सेच दातानं आक्रोड फ़ोडतायत, आम्ही मारे अमिताभ बच्चन बघायला जावं तर हे आक्रोड फ़ोडत बसलेत. इतकी वर्षं झाली पण त्यांचा हा उद्योग अजून संपला नाही. धन्य आहे विको वज्रदंतीची! या अजोबांना कोणीतरी सांगा रे की, आताशा फ़ोडलेलेच काय पण बारीक तुकडे केलेले आक्रोडही बाजारात मिळतात कशाला उगाच म्हातारपणी असले भलते स्टंट करावेत म्हणते मी. उगाच काय एखादा दात बीत तुटला किंवा पडलाच तर काय विकोवाले भरून देणारेत? मग नंतर आज्जीचे रपटे मिळतील ते वेगळेच. असो तर आता मूळ विषयाकडे कंसाबाहेर) तर त्यावेळेस सांगलीत स्वरूप नावाचं नवं कोरं त्या काळातलं चकाचक थिएटर बनलं होतं आणि तिथे पहिलाच सिनेमा लागला होता लावारीस. दुपारी आईच्या महिलामंडळाचं अचानकच सिनेमा बघायला जायचं प्लॅनिंग बनलं अणि गाड्याबरोबर नळ्याची यात्रा या न्यायानं अस्मादिकही गेले. बरं सिनेमातलं ओ की ठो कळायचं नाही (त्यावेळेस तर अमिताभ आणि झिनत अमान ही दोनच नावं माहित होती त्यामुळे सिनेमा कोणताही पाहिला तरी त्यात हे दोघेच असतात असा माझा ठाम समज होता) शिवाय ते ढिशुंम ढिशुम बघायला लागलं की जीव घाबरा व्हायचा ते वेगळंच. तिकडे बच्चन दे दणादण हाणतोय आणि इकडे मी हंबरडा फ़ोडतेय हा सीन कॉमन असायचाच. तर या सिनेमाला जाताना आईनं तंबी दिली की खरदार चोंबडेपणा करून ऑफ़िसमधून आल्या आल्या दादांना (वडिलांना) सिनेमा बघितलेला सांगशिल तर. जे काय सांगायचं ते मी सांगेन. संध्याकाळी दादा घरी आले, चहा पाणी खाणं झालं तरी सिनेमाचा विषय काही निघेना, मला तर जाम डुचमळायला लागलेलं की कधी एकदा सिनेमाच्या पडद्याची गम्मत दादांन सांगेन म्हणून. पण आई सांगायचं नाव घेईना म्हटल्यावर मी तोंडाचं कुलुप उघडलंच,"दादा, आम्ही नां आज नां दुपारी नां एक गम्मत पाहिली. तो अमिताभ आहे ना तो पहायला गेलो तर आधी पडदा कित्ती छान वर जात होता अस्सा (बोटानं अर्धगोल हवेत रेखाटत) आणि माहितीय सिनेमा संपल्यावरही तो अस्साच खाली आला (पुन्हा बोटानं हवेत अर्ध गोल रेखाटत) पण ना आईनं सांगितलंय की आम्ही सिनेमा बघितला हे सागायचं नाही म्हणून ते मी नाही सांगत, हो नां गं आई"? यानंतर आईची माझ्याकडे फ़ेकलेली नजर अजूनही आठवते आणि तिनं दादांना काही सांगायचं म्हणून सुरवात केली तर दादांनी फ़क्त कडक शब्दात "समजलं" असं सांगितलं. त्यानंतर अनेक वर्षं ही आठवण मला प्रत्येकानं सांगून बेजार केलेलं आहे.
दुसरी आठवण आहे भालू या मराठी सिनेमाची. हा सिनेमा बघायला मी आणि आई दोघीच गेलोलो होतो. सिनेमा सुरू झाल्यानंतर पाचव्या मिनिटाला मला आणि आईला समजलं की हे बघणं मला झेपणार नाही. आईनं युक्ती सांगितली की तिच्या मांडीवर डोकं ठेवून डोळे मिटून झोप. मी तसं केलं पण डोळे हळूच किलकिले होतच होते आणि कान कसे बंद करणार, ते सगळं ऐकत होते. त्यामुळे बघितला नाही तरी सिनेमा समजलाच. मात्र झालं काय की शेवटी शेवटी जरा झोप लागलीच. सिनेमा संपला तसं आईनं उठवलं. समोर पाहिलं तर अंधार गुडुप मी जे भोकाड पसरलं की काही विचारू नका. हमसून हमसून रडतेय म्हटल्यावर आईला वाटलं की अंधारात काही चावलं बिवलं की काय? तिनं चार पाच वेळा काय झालंय विचारल्यावर मी त्याच सुरात विचारलं "भालू कुठ्ठाय"? सुरवातिला आईनं पेशन्स राखत लॉजिकल उत्तर दिलं. नंतर मात्र ती वैतागली आणि म्हणाली "गप गं भालू गेला पडद्यामागे भाकरी खायला". आई शप्पथ त्यावेळेपासून मला त्या थिएटरच्या बाहेरचं प्रत्येक कुत्रं भालूच वाटायचं.
तिसरी मस्त धमाल आठवण माझी नाही तर बंधुराजांची आहे. एव्हाना शक्य असेल त्यावेळेस पोरांना घरीच ठेवायचं सिनेमाला न्यायचं नाही असा निर्णय सर्वानुमते घेण्यात आलेला होता. मात्र एका दिवाळीच्या सुट्टीत जरा मोठी भावंडं आत्यांसोबत जंजीर बघायला गेली. तिकीटं काढून मंडळी आत गेली या मंडळात बिचारा माझा भैय्याच काय तो वयानं सर्वात लहान होता. त्याला धड सांगताही येईना की त्याला सिनेमा बघायची भिती वाटतेय म्हणून. त्यात आतून क्लायमॅक्सचं ढिशांव ढिशुम ऐकायला यायला लागल्यावर तर त्याचा निर्णय पक्काच झाला. मस्त एक आईस्क्रीम खाऊन झालं, हातात वेफ़र्सचं पाकीट घेतलं आता आत जायची वेळ आली म्हटल्यावर हा पठ्ठ्या जागून हलेचना. सीन कसा तर हा मागे रेटतोय आणि बाकीची भावंडं याचे हात ओढत याला चल रे काही होत नाही म्हणत पुढे नेण्याचा प्रयत्न करतायत. अखेर यानं भोकाड पसरलं आणि धमकी दिली की अजून जोरात ओढाल तर आणखी रडेन. झालं बाकीच्यांना आणखी चेव चढला. आत जाणार्‍यांना हा प्रकार जास्त मनोरंजक वाटल्यानं सगळे गंमत बघत उभे राहिले. अखेर आत्यांनी जरा मोठ्या चुलत भावाला भैय्याला घरी सोडून मग पुन्हा सिनेमाला यायला सांगितलं. उर्वरीत आम्ही मंडळी घरी काचाकवड्या खेळत असतानाच भैय्यामहाराजांचं बोचकं मोठ्या भावानं दणकन आत ढकलंलं आणि तो निघून गेला. त्यानंतर आम्हाला भैय्यानं आव आणून गोष्ट सांगितली आणि बाकीची मंडळी घरी आल्यावर सत्य की हकीकत समजली.
लहानपणाच्या आठवणींतून बाहेर येण्याआधी त्यावेळेस पडणारा एक गमतप्रश्न आणि त्याचं माझ्यापरीनं मी शोधलेलं उत्तर, त्यावेळेस म्हणजे जिंतेंद्रनं श्रीदेवी आणि जयाप्रदा यांच्यासोबत दक्षीणछापातले सिनेमे काढण्याचा सपाटा लावला होता त्यावेळे एका गाण्यात नायक आणि नायिका असंख्य कपडे बदलतात असं दिसायचं. मला नेहमी प्रश्न पडायचा की हे लोक गाणं गाता गाता, नाचता नाचता असे फ़टाफ़ट कपडे कसे बदलतात? नायकाचं एकवेळ ठीक आहे की त्याला काय शर्ट पॆंटच घालायची आहे पण हिरोईन इतक्या झटपट साड्या बदलून पुन्हा मॅचिंगचं सगळं घालून पुढची ओळ म्हणायला कशी काय हजर असते? मला वाटायचं की गाणं म्हणायला बागेत जाताना हे लोक बहुदा कपड्यांची बॅग सोबत घेऊन जात असतील.
सिनेमाशी संबंधीत सर्वात जास्त धमाल आठवणी असतात त्या तरूणपणातच असं आपलं माझं मत आहे. म्हणजे या वयात पाहिलेले सगळे सिनेमे गाण्यांमुळे, कथेमुळे लक्शात रहाण्यापेक्षा त्या त्या वेळेस घडलेल्या काही ना काही प्रसंगांमुळेच लक्षात राहिले आहेत. कॉलेजमध्ये गेल्यावर सर्वात पहिला बंक मारून पाहिलेला सिनेमा परिंदे(दुसर्‍यांदा लागलेला). गाव तसं लहान त्यामुळे हे अ‍ॅडव्हेंचर आम्ही घरी पोहोचण्याआधीच समजलं होतं आणि आम्हाला शिस्त लावण्याची सर्व जबाबदारी भैय्यामहाराजांच्या खांद्यावर असल्यानं त्यांनी घराबाहेरच उभं केलं. बरं तर बरं अंगठे वगैरे धरून उभी रहा असं काही त्यानं सांगितलं नाही. ते काही बरं नसतं दिसलं. असो. बंधुराजांचा नियम काय? तर म्हणे, आधी तो स्वत: सिनेमा बघणार आणि मग मी तो बघण्यासारखा असेल तर परवानगी देणार. म्हणजे या उद्योगामुळे हा स्वत: झाडून सगळे सिनेमा बघणार हा त्याचा कावा माझ्या वेळीस लक्षात आला म्हणून बरं. नंतर नंतर त्यानं ही सेन्सॉरशिप काढून टाकली पण यामुळे सौदागरसारखा पानपत्ती सिनेमाही (बाय दी वे त्यातला विवेक मुश्रम क्युट हं)लपून पहावा लागला.
साजन लागला त्यावेळेसची धमाल तर विचारूच नका. एकतर कॉलेजचं नव्हाळीचं वर्ष, साजनला जायचं ठरलं, मी माझी एक मैत्रीण आणि आमच्यासोबत माझी मावशी असं जुगाड ठरलं. तिकीटं काढून झाल्यावर पाहिलं तर अजून अर्धा तास हातात होता. मग मावशीबाईनी फ़र्मान काढलं की चला तोपर्यंत पलिकडच्या मंडईतून भाजी घेऊन येऊ. म्हटलं चला (न चलून करता काय स्पॉन्सरशिप होती ना) भाजी घेऊन आलो तर सिनेमा सुरू झालेला होता. अंधारात धडपडत बाल्कनिच्या पायर्‍या चढू लागलो, बॅटरी पुढे, त्याच्यामागे मावशी आणि तिच्या मागे आम्ही दोघी अशी यात्रा एक एक पायरी वर चढत होती. मध्येच कधितरी या दोघी सुळकन आपल्या खुर्चीत जाऊन बसल्या आणि मी माधुरीकडे वळून पहाण्याच्या नादात पाय अडकले आणि धमकन अर्धी मुर्धी आडवी झाले. आता हे फ़ारसं कोणाला समजलं नसतं पण मावशीनं तिकडून विचारलं,"शिल्पे कार्टे धडपडलीस काय"? आता मावशिचाच आवाज तो, मस्त खणखणीत. अख्ख्या बाल्कनीत खसखस पिकली. असो तर जागेवर जाऊन पुढ्चा सिनेमा शांतपणानं पाहिला आणि इंटर्व्हल झाल्यावर आजुबाजुला बघितल्यावर असली लाज वाटली, अर्धं कॉलेज बाल्कनीत समावलं होतं. काय झालं असेल शरमून ते विचारूच नका. त्यानंतर मावशीनं कितिही उदारपणानं तिकीटं काढली तरिही तिच्यासोबत सिनेमा बघायचाच नाही हा पण केला.
डर सिनेमा बघेपर्यंत आम्ही रितसर बंक करून सिनेमा बघण्याइतके सरावलो होतो. एका रविवारी चक्क इमानदारीत डर बघितला. मात्र झालं काय की या सिनेमाच्यावेळेस बजेट जरा पातळ होतं म्हणून मग खालची तिकीटं काढली. माझी एक मैत्रीण मस्त मांडी घालून सिनेमा बघत होती. इंटरव्हल झाल्यावर चपला घालायला म्हणून पाय खाली केले तर चप्पलच नाहीत. देवळातून चपला चोरीला जातात हे माहीत होतं पण थिएटरमधून? खुर्ची खाली गेल्या असतील, इकडे तिकडे असतील म्हणून शोधल्या, अखेरीस बॅटरीलाही बोलावलं पण चप्पल मिळाल्याच नाहीत. पुढचा अर्धा सिनेमा असा तसाच घालमेलीत बघितला कारण उरलेला पूर्ण वेळ आता काय करायचं याचा खल करण्यातच गेला. सिनेमा झाल्यावर उरलेल्या पैशातून तिच्यासाठी निळ्या पट्याच्या पांढर्‍या स्लिपर्स घेतल्या आणि चुपचाप घरी आलो. रस्ताभर तिच्या स्लिपर्सकडे पाहून पाहून सगळे हसत होतो. आजही मला एक प्रश्न सातवतो की हिच्या पायाखालच्या चपला गेल्याचं हिला समजलं कसं नसेल?
दोन सिनेमांच्या आठवणी तर कायमस्वरूपी मेंदुच्या मेमरीतून फ़ॉरमॅट करता येतील तर बरं अशा आहेत
पैकी पहिल्या सिनेमाचं नाव आहे "कॅप्टन प्रभाकर" आणि दुसरा आहे "कालापानी".
दिवसभरात दोन चार क्लासेस असायचे त्यामुळे दिवसभर इकडून तिकडे धावणं सुरू असायचं. सर्वात शेवटचा क्लास अकांऊंटसाचा. त्याची लेजर्स वाहून न्यायची म्हणजे एखादं लहान पोर मागे बसल्यासारखं वाटायचं. त्या दिवशी माझी सायकल नव्हती म्हणून मग आमची सगळ्यांच्या वह्या एकीच्या सायकलवर आणि आम्ही ड्बलसीट असे चाललो होतो. वाटेत अंतर पडलं, दिवस पावसाळ्याचे होते, अचानकच धुमधुम पाऊस पडायला लागला. आम्हाला थांबायला आडोसाच सापडेना, इतक्यात कडेकडेने चालत आम्ही एका थिएटरच्या समोर जाऊन थांबलो. बराचवेळ झाला तरी पाऊस थांबायची लक्षणं दिसेनात एव्हाना आता क्लासही चुकल्यातच जमा होता. काय करावं बरं असा विचार चाललेला असतानाच मैत्रीणीनं सुचवलं की इथे उभंरहाण्यापेक्षा आत जाऊन एखादा सिनेमा बघू तोपर्यंत पाऊसही थांबेल. कल्पना वाईट न वाटल्यानं आम्ही कोणता सिनेमा लागलाय हे पाहिलं तर "कॅप्टन प्र्भाकर". योगायोगानं याच सिनेमाविषयी भावाच्या एका मित्रानं दोनच दिवसांपूर्वी अरे मस्त आहे असा शेरा दिल्यानं बिनधास्त तिकीटं काढली. अवघ्या पाच मिनिटात काय पाप केलंय हे लक्षात आलं आणि थोड्या वेळानं इंटरव्हल झाल्यावर आजुबाजुला पाहिलं तर अख्ख्या थिएटरमध्ये आम्ही दोनच कन्या होतो.सगळे आमच्याकडे बघतायत... जी धुम ठोकली बाहेर, विचारायची सोय नाही. भर पावसात घाम फ़ुटला. घरी गेलो. दुसर्‍या दिवशी क्लासमध्ये आणखीनच गोंधळ. काल आम्ही नव्हतो मात्र आमच्या जागा पकडून आमच्या वह्या तासभर इमानदारीत बसल्या होत्या. त्यामुळे सरांनी विचारलं कुठे होता काल? (काय सांगता कप्पाळ?) त्याच दिवशी संध्याकाळी ज्यानं उत्तम चित्रपटाचा शेरा दिला होता तो वाघ भेटला. त्याला म्हटलं काय रे कसला सिनेमा आहे टुकार तर म्हणाला? तुम्ही पाहिला? आम्ही हो म्हटल्यावर तर हसून आडवा पडायचा बाकी राहिला होता. वर म्हणतो कसा, मी हा सिनेमा पाहिला आणि जाम पकलो म्हणून ठरवलंच होतं कोणालातरी हा बघायला लावायचाच. कालापानीची आठवण तर काळ्यापाण्यासारखीच भयानक आहे. कोल्हापूरमधली गोष्ट. तिथे दोन थिएटर आहेत जी पाठीला पाठ लावून आहेत. म्हणजे इकडे सिनेम बघायचा आणि तिकडे दुसर्‍या थिएटरमधून बाहेर पडायचं (अर्थात हे सुरवातिला माहितच नव्हतं). एका रविवारी मी आणि माझी रूमपार्टनर कालापानी बघायला गेलो, बाहेर पडताना मागच्या थिएटरमधून बाहेर आलो आणि सहज वर बघितलं तर मागच्या थिएटरमध्ये एकदम "ई’ ग्रेड सिनेमाचं पोस्टर, त्यात भर म्हणजे अगदी समोर रस्त्यावर दोनचार ओळखिचे चेहरे, बाप रे! आता यांना वाटणार आम्ही हा असला सिनेमा बघितला की काय? पुन्हा आता त्यांना ओळखिचं हसू द्यायचं की असंच हळूच सटकून जायचं हे समजेना. कसलं काय अन फ़ाटक्यात पाय असला प्रकार सगळा.
तर अशा या सिनेमाच्या आठवणी त्या त्या वेळेस नाही म्हटलं तरी तापदायकच ठरलेल्या मात्र आता मस्त हसवणार्‍या.