प्रपंच

झी मराठीचा सुरवातीचा काळ. झी आणि ई अशा दोनच मराठी वाहिन्या त्यावेळेस फ़ॉर्मात होत्या. स्टारचा 'तारा' म्हणावा तसा चमकत नव्हता. ई वरच्या मालिका किंचित बटबटीतपणाकडे झुकलेल्या, मेलोड्रामा असलेल्या होत्या तर झीवरच्या मराठी मध्यमवर्गाची नस समजलेल्था्य ाणि पकडलेला .

आयुष्यभराचं गारूड करणारी मालिका प्रपंच.  ज्यांनी ज्यानी बघितलीय त्यांना ती कधिही विसरता येणं शक्य नाही. यातलं कुटुंब हे मागच्या शतकातलं प्रातिनिधिक होतं. आज  जी चिटकू पिटकू मंडळी आहेत म्हणजे माझ्या पिढीची मुलं त्यांना एकत्र कुटुंब ही एक कवी कल्पना वाटावी अशी परिस्थिती आहे. माझी पिढी मात्र सुदैवी होती. बर्‍याचजणांनी एकत्र कुटुंबाचा अनुभव घेतला. काही कुरबुरी,  रूसवे फ़ुगवे मात्र एकत्र असण्यातली धमाल माझ्या पिढीनं अनुभवलीय. मोबाईल नसण्याचा आणि टेलिव्हिजन हा दिवसभरात केवळ दोन मालिका आणि सात आणि साडे नऊच्या बातम्या बघण्यापुरताच होता. बुधवारचं छायागीत, रविवारची रंगोली, शनिवारचं विक्रम वेताळ, हमलोग पुरतं टिव्हीपुढं बसणारी माझी पिढी. बाकिचा वेळ अभ्यास आणि भावंडं, मित्र मैत्रीणींसोबत विट्टीदांडू पासून गल्लीभर चालणार्‍या लपंडावानं भरगच्च. हा सगळा फ़िल देणारी, "प्रपंच". १९९९. माया कम्युनिकेशन्सची निर्मिती आणि प्रतिमाताई कुलकर्णींचं दिग्दर्शन.
एक छान एकत्र कुटुंब आणि त्या कुटुंबातल्या छोट्या मोठ्या घटनांची गोष्ट म्हणजे प्रपंच. डोळे ताणून बघावे लागणारे ढिंकचाक सिन नाहीत. कानठळ्या बसणावं संगीत नाही की आक्रस्ताळेपणा करणारी पात्रं नाहीत.  सगळी पात्रं छान पॉझिटिव्ह तरिही अधून मधून होणार्‍या कुरबुरी.  अण्णा देशमुख (सुधिर जोशी) हे कुटुंब प्रमुख,  त्यांची पत्नी माई (प्रेमा साखरदांडे) या दोघांची दोन मुलं प्रभाकर देशमुख (संजय मोने) त्याची बायको  प्रमिला (सुहास जोशी) , बाळ देशमुख (बाळ कर्वे) आणि त्याची बायको शालिनी (अमिता खोपकर) अण्णांची आई - अक्का (रेखा कामत) आणि मुलं- प्रशांत (सुनिल बर्वे), अलका (रसिका जोशी), आनंद (भरत जाधव),  लतिका (सोनाली पंडीत),  कलिका (शर्वरी पाटणकर), भार्गवी चिरमुले , आनंद इंगळे

यातली बरीच मंडळी तेंव्हा तशी नविनच. पण नंतर छोट्या मोठ्या पडद्यावर गाजलेली. भरत जाधव, रसिका यांच्या भूमिका आजही आठवतात आणि नैसर्गिक अभिनय शिकण्यासाठी इतकं पाहिलं तरिही नविन पुढीला पुरेसं आहे.

करेक्ट कास्टिंग हे या मालिकेचं वैशिष्ट्य.  पेटी ओढून गाणं म्हणणारा काका, कुरबुर करणारा काका, ओल्या नारळाच्या करंज्या करणारी काकू. सख्खं-चुलत न मानणारी मुलं. कोणी हुशार तर कोणी ऍव्हरेज. खरंतर तसं या घरात खूप काही नाट्यमय घडत होतं असं नाही. अगदी तुमच्या माझ्या घरातलीच गोष्ट पण तरिही या मालिकेनं पकडून ठेवलं होत. कदाचित याचं कारण हे असेल की माझी पिढी विशीत असतानाच हळूहळू एकत्र कुटुंब विभक्त होत चालली होती. एकत्र रहाण्यातली मजा जशी होती तशीच स्वत:ची "स्पेस" न मिळण्याची घुसमट लक्षात येत वाढत चालली होती. अमेरिकेची दारं खुली झाली होती. एकाडएक घरातला तरूण मुलगा सॉफ़्टवेअर क्षेत्रात डिग्री घेऊन एचवन मिळवून चालता झाला होता. तिकडच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा विचारांची हवा इकडे जोरात पसरू लागली होती. प्रत्येकाला अगदी भाजी कोणती करायची ते आर्थिक निर्णयांपर्यंतचे स्वातंत्र्य हवे होते. एक पाय उंबर्‍याबाहेर पडला असला तरिही मागे काहीतरी बंध शिल्लक राहिले होते. पुढचं दिसत असताना, खुणावत असताना मागचं विसरता येत नाही अशी काहीतरी विचित्र गोची झाली होती. म्हणूनच तुमची माझी भावनिक गोची या मालिकेनं मांडली आणि ती खूप लाडकी झाली. त्यावेळेस टीआरपी नावाचा राक्षस अजून आला नव्हता म्हणून कथानकावर भर देत मालिका बनत आणि सांगायची गोष्ट संपली की मालिका चुटपूट लावत निरोपही घेत.
प्रपंचमधेही लतिकाला अमेरिकेचा नवरा मिळतो. मोठा मुलगा प्रशांतही त्या वाटेने निघतो. अलका घरच्याना एनएसडीमधे जाण्यासाठी मनवते. एक एक मूल घराबाहेर पडतं. देशमुखांचं घरही त्यावेळच्या रितिला धरून रिडेव्हलप करण्याचा निर्णय घेतला जातो आणि मग एका गुडीपाडव्याला गुडी उभी करून देशमुख कुटुंबियानी घराचा आणि प्रेक्षकांचा भरलेल्या डोळ्यानं निरोप घेतला.

या मालिकेतला मला सगळ्यात आवडणारा भाग म्हणजे, कलाकारांचं प्रचंडच सहज भूमिका करणं.  अगदी आपल्या घरातलंच समोर घडतंय असं वाटायचं.

दुसरी आवडलेली गोष्ट म्हणजे देशमुखांचं बैठं घर. अप्रतिम. ती वास्तूच सुंदर होती. मागच्या दारानं बाहेर पडलं की थेट समुद्रकिनार्‍यावर जाता यायचं. देशमुखांची मुलं या छोट्या दाराशी बसून कधी गंभीरपणे तर कधी मजा करत गप्पा मारायची.

आता अशी मालिका बनणं जवळपास अशक्य आहे. कारण काहीच मेलोड्रामा नसणारी मालिका अलिकडे प्रेक्षकच नाकारतात मग बनवेल तरी कोण? कशाला?

म्हणूनच आता केवळ आठवणीतच राहिलेली "प्रपंच".
दुर्दैवानं इतक्या सुंदर आणि सुपरहिट मालिकेचे भाग आता इंटरनेटवर उपलब्ध नाहीत (मला तरी मिळाले नाहीत. कोणाला माहित असतील तर जरूर शेअर करा)केवळ टायटल ट्रॅक युट्युबच्या कृपेनं मिळाला तोच या पोस्टसोबत शेअर करते.  हे म्हणजे दुधाची तहान ताकावर आहे पण नाईलाज आहे.

त.टी.- तुम्हीही माझ्यासारखे या मालिकांचे चाहते असाल. तर तुमच्या आठवणी कमेण्टमधे जरूर शेअर करा.

 

सोडून द्यायच्या गोष्टी: तिची डायरी


मी अम्माची सून, आजपर्यंत कोणाला काही बोलले नाही. कारण बोलण्यात काही अर्थच नव्हता.
  कसंय की, इतरांना  लहान सहान वाटणार्‍या गोष्टी आपल्यासाठी खूप मोठ्या असू शकतात की नाही? पण होतं काय की लग्न करून आपण सासरी आलो की मंगळसुत्रासोबत फ़्री मिळणारी गोष्ट म्हणजे आपल्याला गृहित धरलं जाणं. सून म्हणजे अमूक गोष्ट तिनं केलीच पाहिजे. बायको म्हणजे तमूक गोष्ट तिनं केलीच पाहिजे , कर्तव्यच नाही का तिचं? या तर दोन बाजू पण अनेक नाती मिळतात आणि त्या नात्यांतल्या अपेक्षा, गृहित धरणंही वाढतं...एका लग्नानं.  आता माझंच बघा, माझी सासू, अम्मा, अगदी रीतसर खाष्ट म्हणता येण्याइतपत तिखट स्वभावाची. लव्ह मॅरेजला परवानगी दिली ही केवळ एकच गोष्ट ती हुकमी पत्त्यासारखी गेली वीस वर्षं वापरतेय. मुळात तिचा हा हुकमाचा पत्ता अजूनही चालतोय याचीच मला कधी कधी गंमत वाटते. लग्नाला परवानगी दिल्यामुळे अनेक गोष्टीत मला गृहित धरलं गेलं आणि मुख्य म्हणजे मी धरू दिलं कारण विचाराल तर लहानपणापासूनचे संस्कार, "सोडून द्यायचं गं. ताणलं की तुटतं" तर ताणून तुटू नये म्हणून अनेक गोष्टी सहन...हो सहनच... करत गेले आणि मग तो पॅटर्न बनला. कधी मधी संयम सुटून बोललं गेलं तर फ़टकळपणाचा शिक्का बसला. वर आजूबाजूचे समजूत घालणारे होतेच,"सोडून दे गं" वाले. असं सोडून देता देता एक मात्र झालं की मी माझ्या सासूला शांतपणानं स्विकारलं. ती तशीच आहे आणि तशीच रहाणार हे सुरवातीला तणतणत मग नाईलाजापायी आलेल्या थंडाव्यानं स्विकारलं. आता असं झालंय की बर्फ़ाच्या लादीसारखं थंडगार पडलंय आमच्यातलं नातं. ना कौतुकाचं कौतुक ना राग रुसवा. मनाची तडफ़ड कमी झाली. मग आता परिस्थितीनं कुस पालटली आणि चार दिवस सासूचे संपत आल्याची जाणीव तिला झाली. माझ्याबाबतीत वाईट वागलेल्याचा पश्चात्ताप झाला म्हणून नव्हे तर आता या उतारवयात आपलं कोणीच नाही मग आपलं काम काढून घ्यायचं तर माझ्याशी संबंध चांगले ठेवले पाहिजेत या उपरतीनं खोटं का होईना पण ती चांगली बोलायला लागली.  एम्पथी नावाची गोष्ट माहेरून संस्कारांच्या गाठोड्यातून सोबत आल्यानं  उतारवयातली  बापुडवाणी भासणारी सासू तोडता आली नाही. फ़क्त कसं झालंय नां की आयुष्यभर "सोडून द्यायचं असतं" हे इतकं अंगात भिनलंय की आता तिचं बरं वागणंही सोडूनच द्यायला होतंय.  ताणलं की तुटतं हे ऐकून ऐकून आता ताणण्यासाठी मुळात काही पकडलंच जात नाही.
म्हणणारे म्हणतात की जग बदललंय, आता पूर्वीसारखं सासू सुनेचं कुठं असतं? आपल्याला किती स्वातंत्र्य आहे, नवरे आपल्याला किती समजून घेतात वगैरे वगरे पण कुठेतरी काहीतरी साखरेत घोळवलेलं कचकचत असतंच. नाही का? पण काय नं विचार नाही करायचा....सोडून द्यायच्या अशा गोष्टी!

#तिच्या डायरीतलं पान.
 

सुहानाचं सासर

सिनेमाबद्दल बरेचजण लिहितात. सिरियल्सवर मात्र तुरळक, तुटक त्यातल्या त्यात हिंदी मराठीतल्या मालिकांबद्दल विशेष  नाहीच, म्हणूनच मला आवडलेल्या काही मालिकांवर लिहिण्याचं मी ठरवलंय, मला माहितीय की यातल्या बर्याच मालिका नंतर नंतर पाणी घालून वाढवलेल्या होत्या तरिही त्यावर मला लिहायचंय. मला स्वत:ला नातेसंबंध उलगडणार्‍या साध्या सुध्या कौटुंबिक मालिका फ़ार आवडतात. मग त्या देख भाई देख सारख्या खुसखुशीत विनोदी असोत की आभाळमायासारख्या थोड्या गंभीर धाटणीच्या.

हमलोग आणि बुनियादपासून मी सिरियल्स बघायला लागले, त्यामुळे तिथंपासून ते इथंपर्यंतच्या माझ्या आवडत्या सिरियल्सवर मी लिहिणार आहे. याला काही सुसुत्रता असेलच असं नाही. अडम तडम करत ज्या सिरियलचं नाव मनात येईल त्यावर लिहिणार आहे.

तर, आज अडम तडम अडकलाय स्टार प्लस अगदी अलिकडे म्हणजे चार पाच वर्षांपूर्वी प्रसारित झालेल्या "ससुराल गेंदा फ़ूल" या सिरियलवर. २०१२ म्हणजे सासबहू सिरियलनी कळस गाठलेला काळ. तरिही विशेषत: या दोन तीन वर्षांत काही खरंच हटके मालिका आल्या होत्या. स्टार प्लसनं रिश्ता वो ही सोच नयी ची ग्वाही देत काही खरोखरच चांगले शो आणले. त्यापैकी एक एसजीबी अर्थात ससुराल गेंदा फ़ूल

हिंदी मालिकांनी सास बहू ड्रामा लोकप्रिय केला. एक वाईट सास आणि बिचारी बहू अशा साच्यातून अनेक चकल्या पडत होत्या आणि त्याचवेळेस अगदी नावातच ससुराल असणारी एक मालिका आली. चेहरे सगळेच परिचित. 
रागिणी खन्ना (राधा की बेटियां मधून पदार्पण केलेली) , जय सोनी, सुप्रिया पिळगावकर अशी एकाहून एक नावं या सिरियलशी जोडलेली होती. सुप्रियाचं वैशिष्ट्य हे की, मोठ्या पडद्यावरून लहान पडद्यावर आल्यावरही तिनं उगाचच करायच्या म्हणून सिरियल्स मधीच केल्या नाहीत. तिच्या प्रत्येक सिरियलमधलं प्रत्येक पात्र लक्षात रहावं असंच आहे. सगळ्या भूमिका साधारण एकाच साच्यातल्या असूनही त्यात तिनं राखलेलं वैविध्य खरंच कौतुक करण्यासारखं आहे.

यातही तिनं सासूची म्हणजेच बडी मां ची भूमिका इतकी क्युट साकारलीय की प्रत्येक लग्नाळू मुलिला वाटावं असं सासर आणि अशी सासू मिळावी. 

या सिरियलची मला सर्वात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे यातले संवाद. शुध्द उर्दू मिश्रीत हिंदी वापरणारी बहुतेक ही शेवटची सिरियल. यानंतर मालिकांत युपीवाल्या भाषेची चलती सुरू झाली. दिल्लीतलं हे कुटुंब अत्यतं सुंदंर भाषा आणि लहेजा वापरायचं. बडी मां चे रिश्तों की समझ देणारे खरं तर एरवी पुस्तकी वाटू शकणारे संवाद इतके सहजपणानं यायचे की ऐकून वाह! असं  वाटायचं. तिचं ते हळूवार पणे समजून सांगणां आणि समजून घेणं प्रचंड क्यूट होतं.

या सिरियलमधली दुसरी छान गोष्ट म्हणजे यातले कपडे. एरवी हिंदी सासबहू मालिकांत कचकच काचा लावून चमचम करणार्या बेगडी साड्या आणि घाण दिसणारे खोटे दागिने बघून वीट आला होता. यातल्या सगळ्या बायकांच्या साड्या साध्या पण क्लासी होत्या. तुमच्या आमच्या घरात जशा दिसतात तशाच या सगळ्याजणी दिसायच्या. अगदी नायिका सुहानाचं उच्चभ्रुपणही तिच्या क्लासी साड्यांतून जपलं होतं. शिवाय बहुतेक पहिल्यांदाच मालिकेतली सून गुडघ्यापर्यंतच्या वनपीसमधे, ऑफ़ शोल्डमधे आणि पारदर्शक नायट्यांमधे दाखवली असावी, असं असूनही त्यात कुठेही ती निगेटिव्ह होत नव्हती. एरवी पाश्चात्य कपडे घालणं हा मालिका विश्र्वात व्हॅम्पिशपणा ठरतो. इथे सुहाना तिला हवं ते बिनधास्त घालताना दाखवलीय तरिही ते सगळं सहज खपून जातं. उलट तिनं हट्टान आपल्या जावांनाही वनपीस घालायला लावणंही प्रेक्षक सहज स्विकारतात.

तिसरी छान गोष्ट म्हणजे कश्यपांचं चावडी बाजाराच्या गल्लीत असलेलं पुश्तैनी असरटपसरट घर. मालिकांतली खोटी खोटी दिसणारी, भासणारी चकाचक घरं आणि कश्यप कुटुंबाचं हे टिपिकल उत्तरेकडचं दिसणारं साधं पण रूबाबदार घर. घराचा भक्कम आणि सदा उघडा मोठा लाकडी दरवाजा, अख्खं कुटुंब बसून गप्पा मारणारा हॉल, डायनिंग टेबल, स्वयंपाकघर, चौसोपीतला हातपंप, कॉमन बाथरूम, खालच्या मजल्यावरच्या दादा दादी, इंदर-राधा, इलेश-दीशा यांच्या खोल्या, वरच्या मजल्यावरच्या सुहाना-इशान, बडी मां, राधा, अलोक-रानो, इशिताच्या खोल्या, त्याच्या बाजूला आसणारी प्रशस्त गच्ची आणि हे दोन्ही मजले जोडणारा लालचुटूक गेरूचा जिना. घराचा प्रत्येक कोपरा कथानकात वापरला गेला. इतका सहजपणानं की तो स्क्रिनप्लेचा भागही न वाटावा. प्रत्येक कोपर्यातून कॅमेरा इतक्या सफ़ाईनं फ़िरला की दोन वर्षं प्रेक्षक आपल्याच घरात वावर्ल्यासारखे या खोल्यांमधून वावरले.  बहुतेक सिन मधे, फ़्रेममधे चार चार पाच पात्रं आणि त्यांच्या सततच्या हालचाली यानं फ़्रेम जिवंत वाटायच्या, इतर मालिकांत असायचे तसे डिशक्यॅंव टाईट क्लोज अप चे चेहरे बघण्याचं  टॉर्चर या मालिकेनं कधीच माथी मारलं नाही.


सुहाना बडे घर की बिगडी, नकचढी मुलगी दिल्लीच्या उच्चभ्रू वसाहतीत रहाणारी पण योगायोगानं लग्न करून ईशान   कश्यपच्या चावडी बाजारच्या अगदी टिपिकल मध्यमवर्गिय एकत्र कुटुंबात येते. ईशान पहिल्याच भेटीत सुहानाच्या प्रेमात पडलाय, सुहानाच्या वडिलांना कश्यप कुटुंब प्रचंड आवडलंय. पण सुहानाला मात्र हे घर आणि लग्न दोन्हीतून सुटका हवीय. अगदी पहिल्याच रात्री ती ईशानला सगळं खरं सांगून टाकते. समंजस ईशानही तिला नात्यातून मुक्त करतो. मात्र घटनाच अशा घडत जातात की सुहानाला या घरात थांबावच लागतं. हळूहळू सुहाना कश्यप कुटुंबात रूळते. ती या कुटुंबाच्या आणि विशेषत: बडी मांच्या प्रेमात पडते. ईशानवर प्रेम नसूनही ती या घरात रहाते. हळूहळू बडी मां आणि दादाजी तिला तिच्याही नकळत तिचं ईशानच्या प्रेमात पडलेलं असणं दाखवून देतात. हे सगळं करताना सुहानाला नात्यांची नव्यानं ओळख होते. ती आधी कुटुंबाच्या प्रेमात पडते आणि मग ईशानच्या. लग्नानंतर तब्बल एक वर्षानं ती ईशानजवळ प्रेमाची कबुली देऊन खर्या अर्थानं सुहाना ईशान कश्यप बनते. 
इथंपर्यंत मालिकेचा सिझन एक होता. जो बहुतेक ओरिजिनल कथेचा प्लॉट असावा.
इथून प्रवास सुरू होतो सुहाना आणि ईशानच्या संसाराच्या आणि मग त्यात येणार्या चढ उतारांचा. मग सुहानाचा ब्रेन ट्युमर, त्यातून तिचं बाहेर येणं आणि ईशानचा अपघात त्यात त्याची स्मृती जाणं. त्यानं केवळ सुहाना सोडून बाकी सगळ्यांना ओळखणं आणि सुहानाचं शशीकला बनून त्या घरात रहाणं पुन्हा नव्यानं ईशानच्या प्रेमात पडणं आणि यावेळेस ईशानला सुहानावरचं प्रेम ओळखायला कुटुंबियानी मदत करणं.
हा होता मालिकेचा सिझन टू
मालिकेनं इथंपर्यंत पकड ठेवली होती. आणि लोकप्रियतेच्या कळसावर होती. अर्थात बंद करण्यात काहीच अर्थ नव्हता. मोह आवरता न आल्यानं मग सुहाना आणि ईशानला मुंबईत कामानिमित्त आणणं. एकत्र कुटुंबाची सवय झालेल्या सुहानाचं मुंबईतलं एकटेपण आणि मग यथावकाश पुन्हा दिल्लीला आपल्या कुटुंबात जाणं. त्यानंतर तिचं हिंदी मालिकेची नायिका बनणं आणि एका मध्यमवर्गिय घरातली सून जर या वरवर ग्लॅमरस दिसणार्या क्षेत्रात आली तर काय काय होऊ शकतं याची गोष्ट सांगणारा सिझन तीन आणि मालिकेचा शेवट.
प्रेमापोटी चाहत्यानी हा सिझनही पाहिला असला तरिही पहिल्या दोन सिझननंतर हळूहळू सिरियलची पकड ढीली होत चालली होतीच. मात्र एक कौतुकाची गोष्ट ही की अती न करता सिरियलनं निरोप घेणं. शेवटच्या सिनमधे अलोक म्हणतो की,"चलो जी कहानी खतम. अंत तो अच्छाही हुवा " यावर  शैलजा म्हणजेच बडी मां म्हणते, "नहीं अलोक, जब तक जीवन है, कहानी खतम नहीं होती. जब जब हालात करवट बदलते है, जीवन में नयी कहानियां जनम लेती है, कहानी अभी खतम नहीं हुई" तिच्या या शेवटच्या संवादामुळे ही मालिका नवा सिझन आणि नवा ट्रॅक घेऊन येणार याची खात्री होती. मात्र आज पाच वर्षं उलटली तरिही या मालिकेचा नवा सिझन आला नाहीए. अजूनही या सिरियलचे चाहते (माझ्यासारखे) हॉटस्टारवर ही सिरियल भक्तीभावानं बघतात. अजूनही वाटतं की एखाद्या दिवशी या मालिकेच्या नव्या सिझनची घोषणा होईल. रागिनी खन्नाला इस्टावर अजूनही चाहते या सिरियलविषयी विचारत असतात. मध्यंतरी ती गुरगावच्या निमित्तानं लाईव्ह आली होती त्याहीवेळेस चाहत्यांनी हाच प्रश्नं वारंवार विचारला होता. तसंही सध्या जुन्या मालिकांचे नवे सिझन यायचा सिझन चालू आहे, तर, फ़िंगर्स क्रॉस फ़ॉर ससूराल गेंदा फ़ूल 


 

...तो क्या हुवा था कल रात को?



एखाद्या जुन्या सिनेमाचा रिमेक आला की जुन्यापेक्षा नवा वेगळा आहे का? जमलाय की फसलाय? ही तुलना अनिवार्य असते.
1969 च्या इत्तेफाक चा रिमेक येणार म्हटल्यावर उत्सुकता हीच होती की नेमका काय बदल असेल नव्यात?
69 मधे नायिका ग्रे शेडमधे दाखविण्याचं धाडस यश चोप्रानी दाखवलं हेच खूप. शिवाय ज्या काळात सिनेमातली गाणी जास्त गाजत त्या काळात गाणं विरहीत कथानक सादर करणंही धाडसाचंच होतं.
सर्वात मोठं धाडस म्हणजे या हटके कथानकासाठी निवडलेली स्टारकास्ट.
आता एव्हाना अशी कथानकं, ग्रे शेड असणार्या नायिका/नायक, अॅण्टिहिरो सगळं लोकमान्य झालंय. त्यामुळे प्रेक्षकाना धक्के देणं सोपं राहिलं नाही.
नविन इत्तेफाकबद्दल सांगायचं तर, अशा प्रकारच्या सिनेमाचं कथानक जर आधीपासूनच माहित असेल तर आणखिनच कठीण परिक्षा.
आणि या सगळ्या परिक्षांत नवा इत्तेफाक अव्वल गुण घेत पास झालाय.
कथानक माहित असूनही कथेत आपण गुंतत जातो हे सगळ्यात जास्त कौतुकास्पद आहे.
69 चा काळ आणि 2017 मधे प्रचंड फरक आहे. सामाजिक, आर्थिक, तांत्रिक अनेक बाबतीत बदल झालेत या सगळ्याचं प्रतिबिंब नव्या सिनेमात आहे.
अट्टाहासानं जुनं धरून न ठेवता त्यात जे आवश्यक ते बदल केलेत, कथानकाच्या गाभ्याला न हलवता हे जे बदल केले आहेत त्यानं नाविन्य आलंय.
इस कहानी के तीन पेहेलू है... हा जुन्या इत्तेफाक मधला संवाद नव्यात आहे . पण इथे अक्षय बाजी मारतो.
जुन्यात इफ्तेकारला किंचीत वायाच घालवलाय असं अक्षयचा नवा पोलिस अधिकारी बघताना वाटतं.
नवा जास्त क्रिस्प बनलाय, अधिक तर्किक वाटतो. उदा. जुन्यामधे वेड्यांच्या हाॅस्पिटलमधला डाॅक्टर नेमका नायिकेच्या ओळखिचा (का? याचं उत्तरही नाही) , नायक नेमका तिच्या घरात घुसतो. (का चं उत्तर नाही) असे अनेक सुटलेले धागे नव्या कथानकात मस्त गुंफलेत आणि आपण त्यात अडकत जातो.
जुन्यामधे क्लायमॅक्सला या सगळ्या इत्तफाकचं वर्णन नायक करतो
तसाच नव्यातही करतो पण नव्यातल्या नायकाचं ऐकताना सॅल्यूटच ठोकायला होतं.
अर्थात नव्यातही काही गडबडगुंडे झालेत पण ते दूर्लक्ष करता येतात.
अक्षय खन्नाचा पोलिस अधिकारी आणि सिध्दार्थचा नायक यांच्यासाठी बघायलाच पाहिजे असा सिनेमा.
#ittefaq
 

फ़णसाचे गरे

लहानपणी झोपायच्या आधी रोज दादां सोबत (वडिल) मी आणि भैया जरा मस्ती करायचो. दिवसभरातला अहवाल देऊन झाला की मग घोड्याला पाणी घाल किंवा बटोबटो सारखे खेळ खेळायचो. तेल लावू तूप लावू करत दादा जेंव्हा हात हातात घेऊन त्यावरून त्यांचे हात फ़िरवायचे तेंव्हा हात छान रगडून निघायचे. त्या आनंदात बटुला म्हणजे मला फ़णसाचे गरे खायलाच मिळायचे नाहीत हे लक्षातच यायचं नाही (बादवे, जाता जाता, हे बटू प्रत्यक्षात भटू असावं का?)  मुळात फ़णसाचे गरे मला फ़ारसे आवडायचे नाहीत त्यामुळे असावं कदाचित, पण गरे न मिळाल्याचं दु:ख कधी झालंच नाही...

कट टू-
२०१७



वेळ रात्रीची.
गोष्टी बिश्टी सांगायची.
जरा हलकी दांडगाई करायची
काल मूड आला बटूबटू खेळायचा. मधे एक दोन वर्षं हा खेळ खेळलोच नव्हतो.
आधी खेळायचो तर शेवटी,'तुम्ही खा सालपट' म्हणलं की नाकाचा शेंडा आणि ओठाचा चंबू एक व्हायचा. 'कट्टी' म्हणून निषेध व्हायचा. मग बट्टी करायला बटूला पुन्हा कोकणात पाठवावं लागायचं. यावेळेस बटू फणसासोबत आंबेही आणायचा आणि हे दोन्ही शमी एकटा खायचा. आईला टुकटुक. सगळं खोटंखोटं पण रूसवा आणि नंतरचं खट्याळ हसणं अगदी खरं ...
तर खूप दिवसानी बटू कोकणातून फणस घेऊन आला. रितीप्रमाणं सगळ्यांना गरे वाटून झाले आणि शर्मनला सालं मिळाली.
पुन्हा एकदा नाकाचा शेंडा गोलगोल झाला. पण यावेळेस ओठाचा चंबू न करता खणखणीत जाब विचारला गेला,' वा गं. एक तर इतक्या मेहनतीनं मी फणस आणला आणि मलाच गरे नाहीत?'
'बरं मग पुन्हा आण फणस'
'मी नाही जाणार आता'
'का?, जा की. यावेळेसचा फणस तू एकटा सगळा खा'
'पेट्रोल वेस्ट होईल. नेक्स्ट टाईम खातो आता'


मी नेहमीप्रमाणेच स्पिचलेस आई.  आणि रिश्ता वोही सोच नयी वगैरे.😀
 

गोष्ट मला सांग आई भुताची

आई नावाच्या बाईला सर्वगुण संपन्न असावच लागतं. नसलं तरिही तसं असल्याचं भासवावं लागतं. गोष्टी सांगणे हा आईच्या सिलॅबस कंपलसरी भाग आहे. हरतर्हेच्या गोष्टी याव्याच लागतात. 



वेळ रात्रीची
गोष्टी बिश्टी सांगायची
'आई आज भूताची गोष्ट सांग'
'कशी सांगू?'
'एकदम स्पायसी 6D'
(स्पायसी 6D= एकदम ड्रामासहित म्हणजे तोंडानं डरावने आवाज आणि भिती वाटतील असे हातवारे, हावभाव करत
मिडियम= नुसतेच डरावने आवाज
साधी= नुसतीच गोष्ट सांगायची. भीती वाटता कामा नये)
मी- नको रे साधीच सांगते आज
शमी- नाही एकदम डरावनी सांग ना प्लिज
मी-(मनातल्या मनात)- लेकरा आधीच हा वादळी पाऊस, त्यात शूरवीर बाबा घरी नाही तुला गोष्ट सांगू कशी? कारण मीच घाबरलीय (वरकरणी) - नको रे उद्या बाबा आला की सांगते नं. आज साधी ऐक
शमी- नाही नं मला आजच ऐकायचीय
मी आपली मन घट्ट करून गोष्ट सुरू करते .... आणि.... इतक्यात.... मेली लाईट जाते...वैताग इन्व्हर्टरही बंद पडतो....वातावरण एकदमच entertaining होतं....आणि मग.....
मग काय नाही मी दामटून रामायणातली गोष्ट सांगून आई असल्याचा गैरफायदा घेत दामटवून झोपवते.
.....
पोर पाच मिनिटात घोरायला लागतं...
पण आता मनातल्या मनात तयार केलेली ती स्पायसी भयानक डरावनी गोष्ट चलत् चित्र बनून माझ्याच डोळ्यासमोरून सरकायला लागलेली असते.. .
फिलिंग रामरामरामरामराम वगैरे 😀😉