धर्म, संस्कार इत्यादी

हा लेख म्हणजे कोणत्याही धर्मावर, त्यांच्या चालीरीतिंवर, संस्कारांवर टिपण्णी नाही. असेलच आपल्याच माणसांचा (आपल्या म्हणजे हिंदू वगैरे) असणारा गोंधळ आहे. गेली काही वर्ष सातत्यानं ही गोष्ट जाणवत होती आणि डाचतही होती. निमित्त झालं गुढीपाडव्याचं. सर्वधर्मसमभावाची व्याख्या दुसर्‍या धर्माला आपलं म्हणत आपल्याच धर्माला आणि त्याअनुषंगानं येणार्‍या संस्कारांना दूर लोटणं आहे का?

प्रसंग पहिला-ख्रिसमसला दोन दिवस आहेत. घाईनं आणि लगबगीनं सोसायटीतल्या उत्साही मैत्रिणींनी गाठलं,"अगं यंदा ख्रिसमसचं काय करायचं आहे? तुम्ही कल्चरलवाले काही करणार नसाल तर आम्हीच करू पुढाकार घेऊन सगळं. अखेर आपल्याच मुलांना मज्जा येणार आहे ना? त्यांना आवडतं गं असं सांताक्लॉज वगैरे सगळं". ख्रिसमच्या आदल्या रात्री खंजिरी वाजवत एक सांताक्लॉज सोसायटीतल्या एका कॅथलिक घरात गेला. ज्या दोन तीन पोरांनी सांताक्लॉजला पाहिलं ती धावत खाली गेली तर हा सांता चक्क दूर्लक्ष करून चालता होत होता अखेर पुन्हा मागे येऊन टेकवल्यासारखी दोन चॉकलेटं देऊन गेला. असो. ख्रिसमसची पोरांची पार्टी जोरदार झाली. यानिमित्तानं मफ़िंग्ज, कोल्ड्रींग, स्नॅक्स असा जोरदार कार्यक्रम आयांनी स्वखर्चानं केला. गंमत म्हणजे सोसायटीत तीन ख्रिश्चन घरं पण यातलं एकही मूल किंवा आई या सेलिब्रेशनमध्ये नाही. असो. तर ख्रिसमस जोरदार साजरा झाला.

थर्टीफ़र्स्ट- अरे आपली सोसायटी काही करणार आहे की नाही? किंवा आपण जाऊ नां कुठेतरी एखाद्य रिसॉर्टमध्ये किंवा किमान "डिनर"तरी एकत्र घेऊ. प्लॅन खटाखट बनतात आणि एरवी बिझी असणारी मंडळी या रात्री आवर्जून येतात. खान पान, मौज मस्ती, नाच गाणं धमाल मस्ती पहाटे कधीतरी घरी येऊन पाठ टेकली जाते आणि नव्या वर्षाची सुरवात जड अंगानं आणि आळसटलेपणानं.

गुढी पाडवा- आदल्या दिवशीपर्यंत सगळेच अनुत्साही. ज्या चारजणी कल्चरलमध्ये आहेत त्याच धावाधाव करून काठी आण, कापड आण, मिठाई आण असं करत आहेत. सकाळीही सगळ्यांना या या म्हणून निमंत्रण द्यावं लागतंय. घरांच्या खिडक्यांतून सगळे डोकावून बघत आहेत मात्र खाली येऊन कोणी सहभागी होत नाही. जणू काही हे सगळं करण्याची जबाबदारी केवळ कल्चरलवाल्यांचीच आहे. कशाला लागतात आमंत्रणं? होळी खेळायला, गरबा नाचायला, ख्रिसमस साजरा करायला लागतं का आमंत्रण? तिथे अगदी आपण नाही गेलो तर जगबुडी होईल असा आव आणि इथे आपली परंपरा, रीत साजरी करायला आमंत्रण कशाला लागतं? हे सगळीकडेच पहायला मिळू लागलं आहे. आपलं सगळंच टाकावू आणि इतरांचं सगळं ग्रेट असं का? आपली संस्कृती रसातळाला जाण्यासाठी बाहेरच्या कोणाची गरजच काय? आपल्यातलेच हे पुढारलेले महाभाग बास आहेत. विचारानं पुढारलेलं असणं म्हणजे आपल्या रितीभाती सोडणं असतं कां? आता हे सगळं वाचून मी कोणी कट्टर शेंडीवाली आहे असं वाटून घेऊ नका. माझ्या आईनं, माझ्या सासूबाईंनी जितक्या कसोशिनं सगळं जपलं तितकं तर मलाही (कोणालाही) करता येणार नाही पण जे आपण करू शकतो ते आवर्जून करायला, जपायला काय हरकत आहे? पुढच्या दोन पिढ्यांनतरचा विचार केला तर चित्र काय दिसेल? आपल्याच मुलांना काही पायाच नसेल. आपला धर्म,जात आणि संस्कृती आपल्याला एक भक्कम पाया देते हे तर नाकारता येणार नाही? आपण कितिही आव आणला तरी या सगळ्यापासून पूर्ण अलिप्तता बाळगणं कठीण आहे. असो. एकच सांगावसं वाटतं की प्रत्येक गोष्टीचं सेलिब्रेशन करता येत नाही आणि ज्याचं सेलिब्रेशन करता येत नाही ते हद्दपारच करायचं असंही नाही. आपणच आपल्या रिती जपल्या पाहिजेत अगदी कडवेपणानं नाही मात्र जसं जमेल तसं, पण जपायला हवं. अर्थात यावर मतं मतांतरं असतीलच पण मला जे जाणवलं ते प्रकट करावसं वाटलं.
 

मस्त, जबरदस्त कहानी



कसं असतं नां की आपण रोज तेच ते जेवत असतो कधी भाजी चांगली जमते तर कधी कोशिंबीर एखादा रविवार असा उजाडतो की रोजचाच सगळा स्वयंपाक पंचपक्वानांइतका रूचकर बनतो मग आपण तो तुडुंब जेवतो आणि तृप्तीचा ढेकर देतो. कहानीच्याबाबतीतही असंच झालंय. सगळं नेहमीचंच असलं तरिही त्याची भट्टी इतकी छान जमलिय की थिएटमधून बाहेर येऊनही त्याचा प्रभाव उतरत नाही. चित्रपटाचं समिक्षण वगैरे इथे अजिबात करणार नाहीए मात्र हा चित्रपट बघताना खुप दिवसांनी जो मस्त अनुभव आला नां तो तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करावासा वाटला.
एव्हाना या चित्रपताबाबत भरपूर लिहूनही आलेलं आहे आणि जबरदस्त हिटचा दर्जाही त्याला मिळालेला आहे, मात्र हिटच्या स्टार्सच्याही पलिकडचा एक अनुभव हा चित्रपट देतो. विद्या बालन ही बाई आता एक जबरदस्तच प्रस्थ झालेली आहे. इश्किया, पा, जेसिका, डर्टी पिक्चर आणि आता कहानी. इतकी जबरदस्त रेंज असणारी आजच्या पिढीत ती एकमेव अभिनेत्री आहे (अर्थात असं माझं वैयक्तिक मत आहे). द डर्टी पिक्चरचा अंमल अजून पुरता ओसरला नसताना, कहानी तिची ती डर्टी इमेज कुठच्या कुठे घेऊन गेलाय. या चित्रपटात पहिल्या फ़्रेमपासून अखेरच्या फ़्रेमपर्यंत तिनं जे काही साकारलंय ते मस्त आहे. हा सिनेमा म्हणजे अक्षरश: रोलर कोस्टर राईड आहे. थोडा सुखावह, थोडा पोटात गोळा आणणारा, नको नकोसा तरिही हवाहवासा वाटणारा अनुभव देणारी ही राईट अजिबात चुकवू नये अशीच आहे.
कथानकाबद्दल बोलायचं तर चित्रपटभर "बिद्या मॅडम" आहेत त्यांच्यासोबत असणारा इस्पेक्टर आहे, ऑफ़िसर मिस्टर खान आहे, विमा एजंट बॉब आहे, हॉटेलमधला पोर्‍या आहे, दर दोन मिनिटांनी संवादातून येणारा मिलान दाबजी आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कोलकता आहे. तरिही या चित्रपटात दोनच मुख्य भुमिका आहेत एक बिद्या बाकची आणि दुसरं "कोलकोता".
कोणताही चित्रपट दोन अर्थांनी "दिसतो". एक म्हणजे समोर जे कथानक साकारलं जात आहे ते आणि दुसरं म्हणजे तो चित्रपट आपल्याला जो "फ़िल" देतोय ते. हा फ़िल शब्दात पकडता येण्यासारखा नसतो, प्रत्येकाला अनुभवाला येणारा तरिही त्याची व्याख्या न करता येणारा हा फ़िल चित्रपटातून त्याच्या रंग-रूप-गंधासह भिडत रहातो आणि असा भिडणारा फ़ील चित्रपटाला वेगळा परिणाम प्राप्त करून देतो. "कहानी"तला कोलकता शहराचा जो फ़ील आहे तो असाच भिडतो (ज्यांनी हा चित्रपट पाहिला आहे त्यांना मला नेमकं काय म्हणायचं आहे समजेल). या शहरातल्या अरूंद गल्ल्या, वहानांच्या विविध हॉर्नचे एकाचवेळेस येणारे आवाज, माणसं-वाहनं यांची एकच कचकच गर्दी आणि या गर्दीत एकटी भिरभिर फ़िरणारी बिद्या बाकची.
रहस्यमय चित्रपटाचं यश असतं ते म्हणजे कथानकात प्रेक्षकाला गुंतवत असतानाच त्याचा अंत काय असेल, रहस्यभेद काय असेल याचे अंदाज लावायला भाग पाडणं. या फ़्रंटवर चित्रपट शंभर टक्के यशस्वी झालाय. मध्यंतरानंतर पाच दहा मिनिटांनी साधारण कल्पनाही येऊन जाते तरिही कथानकातला इंटरेस्ट तसुभरही कमी होत नाही हे कौतुकास्पदच आहे. याला कारण आहे कथानक सांगण्याचा वेग. त्यात घाईही नाही आणि उगाच रेंगाळलेपणाही नाही. मध्येच हा सयको-थ्रिलर असावा की काय असा अंदाज करायलाही कथानक भाग पाडतंच. चित्रपटातलं प्रत्येक पात्र त्याची भक्कम कामगिरी करतं विशेषत: विमा एजंट इतका छान नीच वठवला आहे की त्याला जाऊन चार रट्टेच घालावेत असं वाटतं. तरिही यापैकी कोणत्याही पात्राला बिद्या बाकचीच्या "कहानी"वर वरचढ होऊ न देण्याची किमया दिग्दर्शकानं साधली आहे. या सगळ्या सुंदर प्रवासावर कथाकथनावर कळस चढविला आहे अमिताभ बच्चन यांच्या आवाजातल्या रविंद्रनाथ टागोर यांच्या "एकला चलो रे" या गाण्यानं आणि त्यांच्या नॅरेशननं. इतक्या नेमकेपणानं हे गाणं कथानकात येतं की त्याची मग एक धुंदीच चढते. विद्या बालनच्या अभिनयाबाबत काहीच बोललं नाही तर ते पाप होईल. विद्या डोळे, ओठ, भुवया, नाक या सगळ्यांसहित सुंदर डॊयलॊग डिलिव्हरी करते. तिची बिद्या मॅडम इतकी कन्व्हिसिंग आहे की डर्टी पिक्चरमधली सिल्क एका क्षणासाठीही तिच्यात दिसत नाही. या दोन भिन्न व्यक्ती असाव्यात इतका वेगळेपणा दिसण्यापासून अभिनयापर्यंत आणि व्यक्त होण्यापर्यंत आहे. अखेरच्या प्रसंगातले तिचे डोळे आणि त्यातले भाव चित्रपट पाहून बाहेर आल्यावरही आठवत रहातात. अख्खा चित्रपट तिनं एकहाती तोलून नेलाय. सोन्यासारख्या गोष्टीला तिनं सोन्यासारखा बावनकशी अभिनय दिलाय. हा चित्रपट पाहिल्यावर तुम्हाला ती आवडून घ्यावीच लागेल.

एकला चलो रे.....