काऊ कोकताहे

 



कावळा ओरडला की कोणीतरी पाहुणा घरी येतो असं म्हणतात. अंगणात कावळा ओरडू लागला की आजी म्हणायची,'आता कुणाची वर्दी घेऊन आलास मेल्या'. पूर्वीच्या लोकांशी निसर्गाशी असा एक वेगळा संवाद आणि नातं होतं. म्हणजे सकाळी भारद्वाज दिसला तर दिवस शुभ, मुंगूस दिसलं की धनप्राप्ती वगैरे. काही नाती मात्र पनौती विभागात. जसं की, मांजर आडवं गेलं की काम होणार नाही, कुत्रं रडलं की अशुभ बातमी येणार वगैरे. पण कावळा एरवी गोष्टीत कितीही कावेबाज आणि कुजका रंगवला असला तरिही या पक्षाला काहीतरी मानाचं स्थान देऊन टाकलंय. मृत व्यक्ती आणि जीवंत माणसं यातला एक दिवसाचा दुवा म्हणजे कावळा. पिंडाला कावळा शिवणं हे फारच महत्वाचं. कावळा शिवला की गेलेल्याच्या इच्छा राहिल्या नाहीत (असं आपलं म्हणायचं). जसा माणसाच्या 'जाण्यात' याची महत्वाची भूमिके तसाच माणसांच्या 'येण्यातही' महत्वाचा. 

दाराशी येऊन काव काव करत पाहुण्यांचं आगमन अ‍ॅडव्हान्स मधे सांगणारा. हा कोकलून गेला की आपण अंदाज बांधायचे, कोण बरं येईल? आता फोन, वाॅटसएप आणि जास्तीचे एटिकेटस, मॅनर्स वगैरेमुळे अचानक कोणी पाहुणा येईल हे दूर्मिळच झालंय म्हणा पण तरिही कावळ्यानं कर्तव्य सोडलेलं नाही. आपले पाहुणे याला आधी समजतात आणि तो वर्दी द्यायला हजर होतो. आता तो इतका येतो दाराशी तर आपण पण मान द्यायलाच पाहिजे नं? हा मान देता देता एकदा फुकटच एक गमतीशीर गोष्ट लक्षात आली. म्हणजे ती तशीच आहे असं अर्थात वैज्ञानिक किंवा शास्त्रीय दृष्टिकोणातून सिध्द बिध्द झालेलं नाही. पण, फावल्या वेळेत मेंदू अती उत्साहात काम करतो तसं काहीसं झालं. तर हा कावळा जिथे येऊन ओरडतो साधारण त्या प्रकारचे पाहुणे येतात असं निरिक्षण नोंदवलं (बादरायण संबंध न काय). म्हणजे हाॅलला लागून असलेल्या टेरेसमधे ओरडला तर चहापाणी, गप्पावाले उभ्या उभ्या येणारे पाहुणे किंवा जे कोणी येणार ते दोन तीन तासात जाणार.  किचनच्या खिडकीत ओरडला तर जेवायला कोणीतरी येणार  आणि बेडरूमच्या खिडकीत ओरडला तर रहायला येणारं कोणीतरी. कावळ्यानं बिनकामाचा हा चाळाच दिला 


पुस्ती- खरं म्हणजे कावळ्याबद्दल सगळं सांगून झालं होतं पण मग अचानक आठवलं आणि अत्यंत महत्वाच्या कामाला अनुल्लेखानं मारलं असं व्हायला नको म्हणून ही पुस्ती. आता हा शब्दप्रयोग फार वापरला जात नसावा कारण तो वापरण्यासाठी जी गोष्ट करावी लागते ती (सुदैवानं) कालबाह्य होत चालली आहे. तर 'बायकांचं बाहेर बसणं' हे पूर्वी फार काटेकोरपणे पाळण्याची रीत होती. मग व्हायचं काय की, घरातल्या थोरांना बाजूला तांब्या दिसला की कळायचं पण लहानांना तेवढी अक्कल नसल्यानं कळायचं नाही. सवयीनं जेंव्हा लेकरं बाळं त्या 'बाहेर बसलेल्या' बाईला शिवायला जात तेंव्हा ती स्वतः किंवा कोणी घरातली इतर कारवदे, ' घोडे शिवू नको. तिला कावळा शिवलाय'. आम्ही अगाऊ नसल्यानं पुढे प्रश्न विचारायचो नाही पण कुतुहल नक्की वाटायचं. हा कावळा आपल्याला न कधी दिसतो न कधी शिवतो तो बरोबर मधेच येऊन आई, मावशी, आत्ता ताया यांना का आणि कसा शिवतो? (राम नगरकरांच्या रामनगरीमधे हे फार धमाल पध्दतीनं सांगितलं आहे) मुळात हे विचारायची सोय नव्हती आणि विचारलंच तर उत्तराऐवजी रपटा मिळायची शक्यता. एकदा भातुकली खेळताना मात्र माझी एक बहिण खेळातला कावळा शिवून बाहेर बसली. तिकडून जाणाऱ्या आजीनं पाहिलं, तिला कळलं आणि मग आजी फार जोरात पाठीवर शिवली तिला. जळ्ळे मेले खेळ. आयुष्य भर आहेच पुढे कावळा आत्ता धड खेळा म्हणाली. पूर्वीचं सोवळं ओवळं प्रकरण बघता तिची कळकळ बरोबरच होती. 

तर आता चार दिवस या बाईला कामं सांगायची नाहीत हा महत्वाचा संदेशही कावळाच द्यायचा.


#आठवणींचे_पिंपळपान

अलिकडे लाॅकडाऊन मधे हा गायबच झाला आहे. यालाही कळलंय वाटतं हे लाॅकडाऊन प्रकरण. कावळा हा हुशार असतो म्हणतात ते काय उगाच?😉


#काऊच्या_गोष्टी