पुरानी जिन्स

परवा घरी गेले तर वरुन एक मोठा खोका काढून त्यातलं तुला हवंय ते घे आणि बाकीचं टाक तरी आता असा पिताश्रीनी आदेश दिला. किती वर्षं सांभाळायचं हे? काय करता मग खोका उघडून बसले. ही माझी इस्टेट आहे. यात शाळेपासून कॊलेजपर्यंतचं अख्खं जग आहे. पत्ते कसे पिसतात नां तशा पिसून पिसून ठेवलेल्या आठवणी. माझी डोळ्यांची उघडझाप करणारी बाहुली, माझा सगळ्यात आवडता फ्रॊक, कसली कसली कात्रणं, पहिले पहिले छापून आलेले लेख, आवडती मासिकं, पत्रं, शुभेच्छापत्रं.....माझं कोवळं जग होतं त्या खोक्यात. हाताला एक डायरी लागली आणि पुढची उचकापाचक थांबवून डायरी उघडली. त्यात काय होतं हे माहित असूनही आणि असंख्यवेळा वाचून झालेली असूनही पुन्हा पुन्हा वाचाविशी वाटणारी ती माझी डायरी म्हणजे माझ्या सगळ्यात सुंदर दिवसांची सोबतीण आहे. विद्यापिठात पूर्ण दोन वर्षं जिनं माझ्यासोबत घालवली ती माझी "सगुणा". तिचं नाव मी खरंच सगुणाच ठेवलं होतं. एक तर आकार इतका सुटसुटीत की घेउन फिरता यायची आणि तिचा इंचन इंच काही ना काही खरडून पावन केलेला होता. म्हटलं तर फुटकळ म्हटलं तर खुप काही उराशी बाळगुन असणारी.या माझ्या सगुणानं माझ्या सगळ्या मित्रमैत्रीणिंची अक्शरं अजुनही जपून ठेवली आहेत. लेक्चर बोअर झालं की आम्ही यातून एकमेकाला निरोप पास करत असायचो. ती आमची संदेशवाहक होती. त्यावेळेस आम्हाला सगळ्यांनाच कवितांचा किडा चावलेला होता आणि चंद्र्शेखर गोखल्यांनी त्याला चाळवला होता. जे बोलायचं ते कवितेतच अस जणू नियम बनून गेला होता. त्यातले ते संदेश वाचत वाचत  किती लेक्चर मी परत ऐकली. एका पानावर कोणाचं तरी अक्शर होतं, चहाला जायचं का? पुढे उत्तर-कोण उदार होणार आहे? मध्येच कोणीतरी-ए मी पण कटात आहे, आज कोणाला तरी छान दिसावं लागणार त्याशिवाय चहा मिळणार नाही, कोणाला पकडायचं पण, शमाला सांग- तू चालू कर आम्ही सामील होतो, चालेल, हा पिरपिर गेला की बाहेर पडू, अरे पण आता बाईच लेक्चर आहे, असू दे की, प्रेझेंटेशनची तयारी करायला चाललोय म्हणून सांगू. चालेल. असा तो चहाकटाचा मसुदा इतक्या जणांच्या अक्शरात कोरला गेलाय की बहुदा त्या लेक्चरनंतर मॆडमना पटवून त्यांना बरोबर घेउनच आम्ही चहाला गेलोलो असणार.  होस्टेलवरच्या भयंकर जेवणावरही आम्ही कवीत केली होती, त्याला चाल लावली होती, हिची चाल तुरु तुरुची 
मेसमधून चालू झालेली कवीता बाथरुमपर्यंत गेलेली होती. डायरीच्या एका पानावर मार्शल कॆलुहानचं मॊडेल आणि त्याच्या शेजारीच विमान उडालं हा संदेश, म्हणजे हे मॊडेल कोणाच्यातरी डोक्यावरुन गेलेलं होतं. इतकंच नाही तर लेक्चर देताना कोणिही काहीही गंमतशीर वाक्य(म्हणजे आमच्या द्रुष्टिनं) बोललं की त्याची लगेचच नोंद होत असे. आमच्या वर्गात एक मुलगा होता. 
त्याचा आवाज किशोरकुमारसारखा होता, युथफेस्टिव्हलल आम्ही बसविलेल्या पथनाट्यात त्यानं सूत्रधाराची भुमिका केलेली होती. त्यात त्याला सतत गाणी होती, तिही टिपेच्या सुरात आणि लोकसंगीताच्या बाजात. एकदा रिहर्सल झाल्यावर आम्ही बसलो होतो आणि 
त्याला त्याचं आवडतं किशोर कुमारचं "पल पल दिल के पास" हे गाणं म्हणायला लावलं तर त्यानं चुकून त्याच सुरात म्हटलं. 
काय हसलो होतो, गडाबडा लोळायची वेळ आली. 
त्याचा बिचारयाचा आयुष्यभरासाठी ते गाणं म्हणायचा कॊन्पिडन्सच गेला. 
कोणीतरी हा ऐतिहासिक प्रसंग चुकवला  असावा कारण डायरीतून तो
असंख्य अक्शरात वर्णन झालेला होता. .....
कितीतरी आठवणी जाग्या झाल्या.....त्याच डायरीत शेवटी कॊलेज संपल्यावर
सगळ्यांनी आवर्जुन लिहिलेल्या एकत्र असतानाच्या आठवणी....
सगळंच पुन्हा कॆम्पसमध्ये घेउन जाणारं....
दोन वर्षांत घरची आठवण येउन कितीतरीवेळा रडले असेन; पण त्यानंतरघरी परतल्यवर, सगळ्यांच्या वाटा पसरल्यावर जितक्यावेळा
ती डायरी वाचली तितक्यावेळा डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या.....त्याच डायरीच्या शेवटच्या पानावर कोणीतरी भावनाविवश होउन
 हे अखखं गाणं लिहिलं आहे, "पुरानी जीन्स और गिटार....यादे बस यादे रह जाती है...
कुछ छोटी छोटी दो बाते याद आती है..." मला ही जीन्स मनापासून आवडते कितिही पुरानी झाली तरी.:)) आय मिस यु ऒल.....:(
 

मैत्री बित्री सब झूठ

किती दिवस झाले काही लिहिलं नाही कारण काही लिहावसं वाटलं नाही. मनात असुनही....आपण आपली मानलेली माणसं जेव्हा आपल्याला फाट्यावर मारतात तेव्हा चीड येते. का वागतात अशी माणसं? मैत्रीतही जेव्हा कोणी कॆलक्युलेशन्स बघतं तेव्हा तर संताप संताप होतो. अरे? तुम्हाला गरज असेल तेव्हा आम्ही आमची कामं टाकून तुमच्या मदतिला धावायचं आणि गरज संपली की मात्र तुम्ही लगे़चच आपल्या कोशात शिरायच? मला सतत असे अनुभव आल्यानंतर आता वाटायला लागलंय की कदाचित मीच माणसं ओळखायला चुकतेय का? सहज समोरच्यावर विश्वास टाकून मैत्रीत गुरफटतेय का? समोरचा आपला फायदा करुन घेतोय हे समजत असुनही स्वत:ला आवरता येत नाही म्हणून स्वत:चाच राग येतो कधी कधी. का असतात माणसं अशी. आहात नां तुम्ही कॆलक्युलेटेड मग रहा नां तुमच्या घरात बंद. आधी मैत्रीचं नाटक करायचं, गोड गोड बोलायचं, मी खुप नशिबवान की मला तुझ्यासारखी मैत्रीण मिळाली म्हणून भलावण करायची आणि आपलं काम झालं की पाठ फिरवायची. अशा माणसांना एकांतवासाचा शापच मिळायला पाहिजे. म्हणजे हे असे समोरच्याचा फायदा घेणार नाहीत. कधी तरी कोणी तरी असा घाव देउन जातं आणि मग मैत्रीवरचा विश्वासच उडतो. मैत्री बित्री सगळं झूठ आहे. खरं तर अशी सगळी नातीच खोटी आहेत. आहे तो फक्त फायदा. जो तो इथे स्वत:चा फायदा फक्त बघत असतो. एखाद्या पासून काहीच फायदा नसेल तर त्याच्याशी मैत्री सोडाच; पण तोंडओळखही कोणी ठेवत नाही आणि एखाद्याची आपल्याला गरज पडू शकते हे ल़क्शात आलं की त्याला जोडून ठेवलं जातं. अशा माणसांना मिळतातही माझ्यासारखी मैत्रीवर विश्वास असणारी मूर्ख माणसं.
 
 

प्रुथ्वीच्या आत काय असतं गं आई?

काल लॆपटॊपवर काम करण्यात गुंग असतानाच मागून अचानकच प्रश्न आला, "दुनियाच्या आत काय असतं गं आई?" मी मागे पाहिल,ं इतकं सुंदर मराठी आमच्या घरात एकच माणूस बोलतं आणि ते बोलतं कमी प्रश्न जास्त विचारतं. शक्यतो आम्ही चिलखतं घालूनच वावरतो. कारण कधी प्रश्नांचा मारा चालू होईल सांगता येत नाही पण गनीम कधी ना कधी खिंडीत सापडणारच नां? तर आजही मला बरचसं काम हातावेगळं करायचं असल्यानं मी या "प्रश्नासुराला" तिच्या आवडिची पुस्तकं पसरुन दिली होती, तिच्या आवडत्या सिडी बाहेर काढून ठेवल्या होत्या, भातुकली मांडून दिली होती आणि खाऊही दिला होता शिवाय हंगामा लावून दिलं होतं आणि कधी नव्हे ते चक्क शिनचॆन बघायची परवानगी दिली होती. काहीही कर पण दोन तीन तास शांतता दे बाई असा या तयारीमागचा हेतू होता. मला काही काम होतं म्हणून मी प्रुथ्वीच्या अंतरंगाची चायाचित्रं असणारं संकेतस्थळ उघडलं होतं. त्यात पथ्वीचं चायाचित्रही होतं. आणि मी हे करत असताना नेमका शिनचॆनमध्ये ब्रेक आला होता. गनीम बरोबर प्रश्नासुराच्या तावडीत सापडला. त्यात परवा सुट्टीत नेहरु प्लॆनेटोरियमला भेट झाल्यानं बेसिक नॊलेजमध्ये मोलाची भर पडली होतीच. तर हा वर सांगितलेला प्रश्न सटकन आल. करता काय. काम बाजुला ठेवलं आणि तयारीत बसले कारण आता किमान अर्धा तास तरी भुगोलापासून खगोलशास्र्त्रापर्यंतच्या व्हायवाला तोंड द्यावं लागणार होतं. शिवाय आदर्श बालसंगोपनावर नितांत विश्वास असल्यानं मुलांच्या जिद्न्यासा मारायच्या नाहीत हा नियम घालून घेतलेला. इथं तर फाजिल चौकशा नव्हत्या. मग वयवर्ष साडेचारच्या मेंदुला झेपेल इतपत सोप्या भाषेत प्रुथ्वी कशी असते हे समजावून झालं. हाताशी इंटरनेट होतंच म्हणून सरळ चार दोन संकेतस्थळं उघडली आणि तिला सूर्यमंडलाची माहिती दिली. सगळ्या ग्रहांशी ओळख करुन दिली त्यातली आपली प्रुथ्वी म्हणजे प्रश्नासुराची "दुनिया" तिनं लग्गेच ओळखली. माझ्या प्रेमाला मग उधाणच आलं. मनाशी ताडल्याप्रमाणं तासभर व्हायवा झाला आणि शंकासुराच्या शंका कमी झाल्या. मला अलिकडे या प्रश्नांना थोपवायचा अक्सीर इलाज सापडला आहे. बेसिक माहिती दिल्यानंतर मी तिला सांगते तू बिग होशील आणि फर्स्ट मध्ये किंवा सेव्हन्थमध्ये जाशील तेव्हा टिचरच हे सगळं तुला शिकवतील. तुम्हाला बुक देतील नां त्यात हे सगळं असतं. याचा दुहेरी फायदा होतो. एक तर शाळेच्या आणि होमवर्कच्याबाबतीत काही कटकट रहात नाही कारण लवकर मोठ्ठं होउन सेव्हन्थमध्ये जायचं असतं नां? आणि दुसरा फायदा म्हणजे शंका कमी होतात. सगळं झाल्यावर मला अचानकच आठवलं की मी साधारण दुसरी तिसरीला असताना आईला असंच प्रुथ्वी कशी असते हे विचारुन भंडावून सोडलं होतं. आई शिक्शिका असल्यानं तिनं मला छान समजावून सांगितलं. शेवटी हे ही सांगितलं की प्रुथ्वी गोल असते. शाळेत नेउन मॊडेल दाखवलं. हे सगळं मला जाम नवं होतं. मला आजही शंका आहे की जर प्रुथ्वी गोल आहे तर आपल्याखाली असणारी(म्हणजे चेंडुच्या दुसर्या उलट बाजुला असणार्या देशातली माणसं) उलटी पडत कशी नाहीत? म्हणजे ती माणसं खाली डोकं वर पाय अशी उभी आहेत का? शेवटी मी आईला म्हटलं की,"आई गं, मला धावत जाऊन प्रुथ्वीच्या खाली वाकून बघायचंय" आई म्हणाली,"जा हं. मोठ्ठी झालीस की जा. म्हणजे वाकून बघताना पड्णार नाहीस" आजही सगळं पुराण ऐकून झाल्यावर प्रुथ्वीच्या पोटात काय काय असतं याची यादी ऐकल्यानंतर शंकासूरानं अखेरची घोषणा केली,"आई आपण आपल्या किचमधला नाईफ घेउन दुनिया चिरुन पाहुया का आत काय आहे?" पहिल्यांदा दचकलेच. म्हटलं डायरेक्ट चिरफाडीची भाषा? पण मग हसायलाही आलं. म्हटलं चिरुया हं पण आता मला जरा काम आहे नां, ते झालं की मग किंवा सण्डेला करुया का? तर शंकासूर टाळ्या वाजवून म्हणाला"हे ढिंक टिका. मस्त चालेल. सण्डेला मॊलमध्ये जाउया नको, त्यापेक्शा हे काम करु. आणि आत्ता बाबुपण झोपलाय नां? तो उठला की त्यालाही ही आयडिया सांगुया का?" कपाळाला हात लावायचा राहिला. इतक्यात परत शिनचॆन लागलं आणि गनीम सुटला. कधी नव्हे तो शिनचॆन लागल्याचा मला जाम आनंद झाला.
 
माझ्याच आमचा तो बाब्याचा हा संक्शिप्त उतारा.
 

आमचा तो बाब्या

आमचा नां एक बाब्या होता. म्हणजे कोणी छोटा मुलगा नाही तर आमचा बाब्या नावाचा एक बोका होता. या बाब्याचे एक एक प्रताप म्हण्जे एक एक किस्सा आहे. या बाब्याला एक विचित्रच सवय होती तो चक्क कपडे खायचा. म्हणजे उंदरानी कपडे खाऊन वात आणल्यामुळं याला पाळलं तर यानं उंदरांना व्ही आर एस देउन ते काम आपल्याकडेच घेतलं. उंदीर, झुरळं याच्या मिशीसमोरुन जायची पण हां त्यांच्याकडे "हुंगुनही" पहायचा नाही. त्यानं आपल्या राज्यात सगळ्यांना अभय दिल्यानं सगळे किटक-प्राणी आमच्या घरात निर्भयपणानं वावरायचे. एकदा तर यानं कमालच केली. झालं काय की शेजारच्या पाटलांच्या दीपकनं पॆंटच्या खिशातून अंडी आणली होती, त्यातल एक फुटलं म्हणून त्यानं पॆंट धुवायला टाकली, तेव्हढ्या वेळात हा तिथे गेला आणि मागचा तो खिसाच त्यानं कुतरडला. ती पॆंट नंतर टाकवेनाही आणि घालयचिही पंचायतच नां? आम्ही एकदा जेवत असताना हा आपला शांतपणानं रगात डोकं खुपसून झोपला होता. आम्हाला वाटलं की बिचर्याला थंडी वाजत आहे म्हणून झोपला असेल. जेवणं झाली, सगळी आवरा आवर झाल्यावर अंथरुणं घालून आम्ही झोपायला गेलो तर अंधारात बाबांचा जोरात आवाज आला,"बाब्या<<<" आम्ही सगळे दचकून उठलो आणि खटाखट लाईट लावून काय झालं म्हणून बाबांकडे पहायला लागलो, समोरचं द्रुष्य पाहून एक क्शण सगळे चुपचाप उभे होते आणि मग बाबांसहित सगळेच खो खो हसायला लागले. 
बाब्यानं कुरतडलेल्या रगाच्या ताज्या ताज्या भोकातून बाबांचा रागीट चेहरा बाहेर डोकावत होता. ते द्रुष्य कमालिचं विनोदी होतं. आजही ते ऐतिहासिक रग आमच्याकडे आहेत. 
त्यांचं काय करावं न सुचल्यानं बरेच महिने ते तसेच पडून होते. 
मग मोठ्या भावाला एक कल्पना सुचली 
आणि त्यानं त्या दोन फाटक्या रगांचा मिळून एक धड रग बनविला. 
आजही घरी येणार्या पाहुण्याला तो रग दिसला की ते हमखास प्रश्न विचारतात,"अरेच्चा! हा रग असा काय?", मग त्याला बाब्याचं सगळं पुराण सांगावं लागतं. 
हे ऐकल्यावर पुढचं वाक्यही प्रत्येक पाहुणा न चुकता बोलतो,"अरेच्चा? मग तुम्ही त्याला इतके वर्ष घरात ठेवलंच कसं?" आता तुम्हीही सांगा आपल्या घरात जर असा व्रात्य बाब्या असेल आणि
 तो आपलाच मुलगा असेल तर त्याला आपण सोडून देतो? मग या बाब्याला तरी कसं सोडणार?  
या आणि त्या बाब्यात फरक असेलच तर इतकाच आहे की आमच्या बाब्याला दोन पाय जास्त होते आणि हो एक शेपुटही होतं. म्हणून काय झालं? तो "आमचा बाब्या" होता. 
एक दिवस बाहेर भटकायला गेला तो परत आलाच नाही.
 

आता आठवतही नाही......

आज पुन्हा आभाळ भरुन आलंय
अगदी त्या दिवशीसारखंच
तसंच गच्च दाटून आलेलं....

मागे वळून पाहिलं तेव्हा समजंलच नाही
नभ बरसतायत की डोळे
पापणीवर ट्पोरी फुलं होती उमलली
गालावरुन वहात होतं ते पाणी की अश्रु?
आता आठवतही नाही...

रस्ता पुढे होता, पावलं मात्र मागेच रेंगाळली
तुझ्या हातात गुंफलेली बोटं सुटली तरी कधी?
तुझी पाठमोरी सावलीही मला माझी भासत होती
वळून पाहिलं होतंस कां रे एकदा तरी...
आता आठवतंही नाही...
आजही पुन्हा तसंच दाटून आलंय आभाळ....गच्च

तुलाही आठवतो का तो दिवस?
गच्च अंधारलेल्या भर दुपारी
घेतला होता निरोप.....
काय म्हणाला होतास त्यावेळी
आता आठवतही नाही...
ओठ थरथरले होते ते कशानं
दाटलेल्या हुंदक्यानं की
शब्दांनी साथ सोडल्यानं
काहीच आठवत नाही.....

आज पुन्हा एकदा सगळं आठवतंय
अंधुकसं....त्या दिवशिच्या दुपारसारखं
कारण आजही आभाळ तसंच आहे गच्च दाटलेलं....
 
ऐसा नहीं की आपके जाने का गम हमे नहीं
लेकीन क्या करे ये कम्बख्त आंसू भी तो बेवफा निकले....

तकिये तले मेरा सपना गिरा होगा
जरा देखना, न छुना उसको
कहीं चूर ना हो जाए


वहीं होगा कहीं मेरा एक अधुरा
ख्वाब भी, जरा संभालना
मासूम है वो भी

एक एक पल जो बिताए हमने साथ में
लायी तो हूं उसकी पोटली अपनी यादों में
अगर कोई पल छुटा भी है, वहीं कही गिरा भी है
तो....रहने दो वहीं उसे
क्या पता शायद...वो पल तुम्हे याद दिलाये
कभी हम भी आप की सांसो में शामिल थे....
 

हॆलो टोन



आजकाल कोणाच्याही भ्रमणध्वनीवर म्हणजे सोप्या मराठीत सांगायचं तर मोबाईलवर फोन करा. तुम्हाला पलिकडून ट्रिंग ट्रिंग अशी रिंग ऐकू येणं जवळपास दूर्मिळ म्हणण्याइतकं दुरापस्त झालंय. अलिकडे हेलोट्युन्स लावायची फॆशन आहे. म्हणजे आपण नंबर फिरवला की पलिकडून थेट गाणंच ऐकायला येतं. कोणी कोणतं गाणं लावावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण, यामुळे काय भयानक विनोद होतात हे एकदा पहाच. एका मैत्रिणिच्या मोबाईलवर कित्येक महिने आंखो में तेरी अजब सी अजब सी अदाएं है, असं गाणं होतं. एक दिवस म्हटलं संपल्या बाई सगळ्या अदा, आता तरी बदल की गाणं. एकिला कधिही फोन करा तिच्या मोबाईलवर कायमची आरती चालू असायची,"ओम जय जगदीश हरे, स्वामी जय जगदीश हरे" महिनोन महिने नुसतीच आरती ऐकून वैताग आला. तिला म्हटलं आता बास झाली आरती. मंत्रपुष्प म्हण आणि प्रसाद वाट. यावर कडी म्हणजे फॆमिली डॊक्टरांच्या मोबाईलवर आये हो मेरी जिंगदी में तुम बहार बनके हे गाणं होतं. आता बोला. इकडे आम्ही "लोटापरेडला" वैतागून डॊक्टरची अपॊईंटमेंट घेण्यासाठी फोन कारावा तर ते म्हणतायत आये हो बहार बनके? कसली बहार अन कसलं काय? एकिच्या फोनवर होतं,"कौसल्येचा राम बाई कौसल्येचा राम". हिला सकाळी फोन करा नाहीतर रात्री हिचा पाळणा आपला सततचा हलता. राम जोजवून जोजवून इतका झोपवल्यावर पुढच्या रामायणाचं काय होणार? ही गाणी परवडली पण "ते" गाणं नको. कोणतं? तेच ते फेमस "कोंबडी पळाली तंगडी धरुन". आमच्या एजंटच्या मोबाईलवर हे गाणं होतं. या एजंटनं अगदी रितिप्रमाणं आमचे पैसे घेउन आम्हाला वर फसवलंही होतं. त्याचा जाब विचारायला फोन करावा तर याची कोंबडी आपली सतत तुरुतुरु इकडून तिकडे पळतेय. वात आणला नुसता या कोंबडिनं. एखाद्याला तावातावानं भांडायला किंवा शिव्या घालायला फोन करावा आणि पलिकडून जगजितसिंगचं "तु ही माता, तु ही पिता है......हे राम हे राम" ऐकू यावं यापेक्शा डोक्याला दुसरा ताप नाही. एक तर अख्खी रामधून होईपर्यंत पलिकडचा फोनच उचलत नाही आणि त्यानं उचलल्यावर आपण तोपर्यंत शिव्याच विसरलेलो असतो. आहे की नाही गंमत. कशाचा कशाला संबंध नसताना तर ही गाणी ऐकली की भयंकर विनोदी वाटतं. आता रोज चिरलेली निवडलेली भाजी देणारा भाजिवाला असतो, आपल्याला दोन चार दिवस भाजी नको असते म्हणून आपण त्याला फोन करावा तर याच्या मोबाईलवर ऐकू येतं,"हमे तुमसे प्यार कितना ये हम नहीं जानते मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना". आता त्याचा आणि आपला काय संबंध? पण हे गाणं ऐकावं लागतं नां? इस्त्रीवाल्याला कपडे घेउन जा बाबा म्हणून निरोप देण्यासाठी फोन करावा तर त्याच्या फोनवर थेट ’डोली में बिठाके, सितारों से सजाके ले जाएगा एक रोज तुझे सावरियां’ असं ऐकल्यावर नाही म्हटलं तरी दचकायला होणारच नां? त्याच त्या गाण्यांना वैतागुन मध्यंतरी मी चक्क तामिळ ट्युन लावली तर लोक दचकून फोन कट करायला लागले. त्यांना वाटायचं की चुकिचा नंबर फिरवला की काय? मग परत नंबर फिरवून मूळ मुद्दा राहिला बाजुला आधी या ट्युनवरुनच झापायचे. अखेर करणार काय लोकआग्रहास्तव बदललं ते गाणं. बाय दी वे तुमची हॆलो ट्युन कोणती आहे?
 

शिमला-५

.....ड्रायव्हरनं एका दुकानापुढे गाडी उभी केली. दुकानात तोबा गर्दी. कोण काय करतंय काही कळत नव्हतं. भाजीबाजारासखा गोंधळ माजलेला. हवेत प्रचंड गारठा आणि थंडगार वारं सुटलेलं होतं. हे दुकान होतं रोहतांगमध्ये बर्फात घालायचे कपडे, स्किईंग्ज आणि शुज भाड्यानं मिळण्याचं. अखेरीस आम्ही आम्हाला साजेसे आणि मुख्य म्हणजे बसणारे कपडे घालून पुन्हा गाडीत बसलो. आता कपड्यांनी आम्ही चांगले जाडजूड झालेलो होतो त्यामुळे गाडीत दाटी झाली. आम्ही सगळे चंद्रमोहिमेला चालल्यासारखे दिसत होतो. अखेरीस मधल्या रस्त्यावर मी ते चिलखत काढून टाकलंच. आता कालपासून बर्फाचे दूरवर दिसणारे डोंगर अगदी कवेत आल्यासारखे दिसत होते. अधून मधून चक्क बर्फाचे कडे रस्त्याच्या बाजुला उभे होते. इतक्याजवळ बर्फाचा अख्खा डोंगर पाहून खुळावल्यासारखं होत होतं. हळू हळू बर्फाच्या भिंतिंचं प्रमाण वाढायला लागलं. चेकपोस्टजवळ गाडी थांबली. खालच्या बाजुला बर्फातले खेळ चालले होते. इथे वेळ घालविण्यापेक्शा बर्फात खेळायला लागू असा विचार मांडला जाऊ लागला. पण आमच्यासोबत आलेल्या गाईड कम प्रशिक्शकाचं दुकान झिरो पोईंटवर होतं शिवाय ड्रायव्हर महाशयना आमच्या गुडियाला बडफ की गुंफा दाखवायची सुरसुरी आली होतीच. अखेर दोन अडीच तास तिथे घालविल्यावर आम्हाला ओके सिग्नल मिळून आम्ही रोहतांगच्या रस्त्याला लागलो. ह्रद्य कमकुवत असणार्यांनी इकडे तिकडे न बघता नाकासमोर बघत जावं असा सगळा रस्ता. एकाचवेळेस दोन गाड्या समोरा समोर आल्या तर दरीकडेची गाडी अगदी दरीकडेला झुकलेली दिसायची आणि तो अर्धा मिनिट श्वास घ्यायलाही सुचायचं नाही. आता हवेतला गोठलेपणा वाढत चालला. दूर टोकाकडे बोट करून गाईड म्हणाला अपने को उध्धर जाना है जी. त्यानं दाखवलेल्या दिशेनं पाहिलं तर आकाशा, डोंगर एकच झालेलं. जसं काही पांढरा शुभ्र पडदाच कोणितरी उभा केला होता. आता त्या पांधरट ओल्या पडद्याकडे आम्ही चाललो होतो. जसे पुढे जाऊ तसे रस्ता दिसत होता. अचानकच पुढच्या गाड्या वळायला लागलेल्या दिसल्या. पोलिस दिसले. म्हटलं काय झालं? तर रस्त्यात एक भला दांडगा हिमनग ढासळला होता. रस्ताभर बर्फाचा चिखल झाला होता. गाड्या रुतत होत्या. अखेर सगळ्या गाड्या मागे वळविल्या. म्हटलं आता काय? गाईड म्हणाल उतरा इथेच. आता आलोच आहोत. सगळे खाली उतरलो. आता खरी गम्मत चालू झाली. रस्त्यावरुन वर चढून जायचं होतं. पहाताना सोप्पं वाटत होतं पण पाय ठेवल्यावर समजलं. पाय ठेवला की तो आत रुततच नव्हता परत खाली घसरायचा, पायात भले मोठे गम शुज आणि थंडिनं बधिरता आलेली त्यामुळे पायाच्या संवेदना जवळपास गेलेल्या होत्या.त्यामुळे घसरत खाली आल्यावरच समजायचं की आपण घारलोय. पुढच्या चार आठजणांची सर्कस पाहिल्यावर युक्ती केली गाईडकडून स्किईंगसाठी असणारी स्टिक घेतली आणि ती रुतवून वर चढलो. हीच युक्ती मागे येणार्या सगळ्यांनी वापरली. वर आलो तर नजर जाईल तिकडे बर्फ आणि नाकासमोरुन वहाणारं बर्फ. गाईडनं सटासट फोटो काढायला सुरवात केली. बर्फाचे गोळे बिळे एकमेकाला मारुन झाले, बर्फाचा किल्ला करुन झाला आणि मग जवळ दगडासारखं काही तरी दिसत होतं त्यावर टेकलो तर गाईड म्हणाला चलो मॆडमजी चलते है. म्हटलं आता कुठं चलते है बाबा. झालं नां? तो म्हणाला नहीं अभ्भी हमारी दुकान कहां है? वहां चलो. बर्फ के गेम खेलेंगे. त्याला विचारलं की कुठं आहे दुकान? त्यानं समोर बोट करुन दाखवलं. धुकट हवेमुळं फार लांबचं दिसत नव्हतं. म्हणून गेलो त्याच्या मागे. जरा पंधरा मिनिटं चाललो(चाललो कसले? खरं तर चढलो) तर आमच्यातले निम्मे ढेपाळले. बाकिचे गाईडला और कितना दूर विचारत चालतच राहिले. तो आपला सतत समोरच बोट दाखवत होता. अखेर डोंगराच्या टोकावर आलो. मग म्हणाला आता खाली उतरायचं. करतो काय. उतरलो. तर आम्ही परत रस्त्याला लागलो होतो. मधला बर्फाचा कडा कोसळलेला भाग वगळून त्यानं आम्हाला चक्क ट्रेक करत आणलं होतं. बहाद्दरच म्हणायला हवा. नाही तर आमच्यातल्या रडक्या शिपायांकडे पाहून एखाद्यानं तिथेच सोडलं असतं. मग रस्त्यावरुन परत एकदा मघाच्याप्रमाणे वर चढलो. आता कधी येईल तेव्हा येईल तो झिरो पोईंट असं म्हणत त्याच्या मागोमाग चालत राहिलो. जरा चढून वर आलो तर लोकांच्या दंग्याचे आवाज यायला लागले. समोर पाहिलं तर एका ओळीत टपर्या दिसायला लागल्या होत्या. टपर्या ओलांडून आलो आणि बघतच राहिलो. समोर बर्फाचं विस्तिर्ण मैदानच पसरलं होतं. लोक मजेत बर्फातले खेळ खेळत होते, खिदळत होते. गाईडनं मग स्किईंग करुन दाखवलं. बघून वाटलं सोप्पंच तर आहे. पण त्याच्या शुजमध्ये पाय घातले, अजून लोक केलं होतंच आणि तो सूचना देतच होता की पाय वर! कसं बसं सावरत उठले. आता मात्र गाईडनं धोका पत्करला नाही. स्किईंगच्यामगे त्यानं पाय ठेवला आणि हळू हळू पुढे झुकुन जायला सांगितलं. हळू हळू कुठलं? गाडीनं एकदम पाचवा गियर टाकल्यासारखी सुसाट उतारावरुन सुटले. म्हटलं संपलं आता. राम बोलो. आजुबाजुनं स्नोबाईक्स सुसाट येत होत्या, कुठे ते स्लिजवाले धावत येत होते, घोडे होते या सगळ्यात मी आणि माझ्यासारखे सुसाटलेले स्किईंगवाले. अखेर तो क्शण आलाच! सरसरत जात असतानाच काय झालं माहित नाही, जरा उजवीकडे आपोआप वळल्यासारखं झालं आणि धडाम! पाय वर, स्टिक एक वर एक खाली पाठ टेकवून सपशेल पलटी मारली. आता तर उठायचिही शक्ती नव्हती. कारण एकदम सुसाट आल्यामुळे, ते ही अजाणता, गाळण उडालेली होती त्यात अचानकच पलटी खाल्यानं भेदरुनच गेले. पण किरकोळ दिसणार्या गाईडनं उठवून उभं केलं आणि परत एकदा आमची शिकवणी चालू झाली. आता कसलंही थ्रिल अनुभवायची इच्छा रहिली नव्हती. म्हटलं बाबा, झालं तेव्हढं बास झालं, आता इथुन जाते साधेपणानं चालत. तर हा ऐकायलाच तयार नाही. मला लहानपणिचा प्रसंग आठवला. सायकल चालवायला शिकत असताना पहिल्यांदाच अशीच पडले होते, गुडघे फुटले होते, भावाला म्हटलं आता बास बाबा, जाते इथुन चालत घरी. तर हा ऐकायलाच तयार नाही. घरी जायचं तर सायकल घेउनच अशी तंबीच दिल्यावर डोळ्यातून पाणी काढत जीव मुठीत घेउन सायकल कशी बशी घरी आणली. तेच आठवलं आत्ता. आत्ता अगदी पाणी नाही आलं पण काकुळतिला येउन परत आले आणि मग हुश्श झालं. खुर्चिवर बसकण मारल्यावर मात्र गाईड खो खो हसायलाच लागला. इतक्या मनोरंजनानंतर हसायलाच येणार नां? सगळेचजण असेच पडण्यात गुंग होते. कोणी फोटो काढत होतं. एक सलमान खान तर शर्ट काढून बर्फावर झोपून पोझ देत होता. एव्हाना चक्क उकडायला लागलं होतं. थोडिशी पोटपुजा करुन आम्ही परतिच्या वाटेला लागलो. परतिची वाट तीच होती. आता बच्चेकंपनिचे पाय दुखायला लागले होते म्हणून स्लेजवाल्याला ठरविला. मी म्हटलं मी चालत येणार तर सगळे आग्रह करायला लागले. म्हटलं तेव्हढाच व्यायाम. नाही तरी आता परत बर्फात चालण्याचा योग लवकर थोडाच येणार आहे? पण खरं सांगायचं तर त्या स्लेजलाच मी घाबरले होते. कसलं काय ते? अखेर मला बसावंच लागलं. उतारावरुन सरसरत खाली आलो आणि अगदी शेवटच्या क्शणाला व्रात्य स्लेजवाल्यानं स्लेज तिरकी करुन आम्हाला हिमालयापुढे नतमस्तक व्हायला लावलंच. धडपडत उठलो तर आमच्या मागून अशीच बरीच मंडळी किंचाळत लोटांगण घालत होती. त्यांचं धडपडणं बघून मात्र जाम हसायला येत होतं. एव्हाना वेळकाळाचं भान राहिलं नव्हतं. गाडीत बसलो आणि घड्याळ पाहिलं तर चार वाजले होते. महत्वाचा टप्पा संपला होता. रुख रुख लागली होती. खरं सांगायचं तर एकदा हा निसर्ग पाहिल्यानंतर काहीच बघावसं वाटत नव्हतं.
 

शिमला-४





.....अखेर पावसाला दया आलीच. संध्याकाळी पाच वाजायच्या सुमारास तो थांबला आणि आम्ही थेट गाडीत बसलो. आता जायचं होतं शिमल्यातल्या प्रसिध्द माल रोडला. या ठिकाणचं वैशिष्टय म्हणजे या रोडवर जाण्यासाठी लिफ्ट आहे. तिकिट आहे पण चालताना, चढताना दम लागणार्यांसाठी उत्तम सोय होते. माल रोडवर जाम भटकलो. चर्च पाहिलं. मुख्य म्हणजे हुडहुड थंडितला माहोल अनुभवला. त्याच रोडवर असणार्या हॊटेलमधून जेवून बाहेर पडलो आणि परत लिफ्टनं खाली येउन गाडीची वाट पहात उभे राहिलो. गाडी येईपर्यंतची पंधरावीस मिनिटं बर्फ झाला अगदी. गाडीत हुश्शार ड्रायव्हरनं आधीच हिटर लावून ठेवला होता म्हणून बरं. परत हॊटेलवर आलो आणि गुडूप झोपलो. दुसर्या दिवशी शिमल्यातला मुक्काम हलवला. बाय शिमला म्हणत असतानाच परत एकदा फुरसत के रात दिन अनुभवायला यायचं असं पक्कं ठरवूनच तिथून निघालो. आता मनाली गाठायचं होतं. बर्फ बघायचे वेध लागले होते. मनालिचा रस्ता चालू झाला आमची कौतुकानं आणि बरोबरीच्यांची भितिनं नजरबंदी झाली. एका बाजुला उंचच उंच कडा आणि दुसर्या बाजुला खोल दरीत रुद्र रुप दाखवत वहाणारी नदी हा नजारा मनाली येईपर्यंत होता. बरोबरीची मंडळी चुपचाप बसली होती. आम्हाला अशा रस्त्यांची सवय असल्यानं आम्ही मात्र प्रवास मस्त एंजॊय करत होतो. खरं तर सतत वाटत होतं की अशा प्रवासाला काही अर्थ नाही. मध्ये मध्ये उतरायला हवं. काही ठिकाणी तर नदिचं पात्र अगदी शहाण्याबाळासारखं होतं. तिथे खाली नदीत उतरण्याचा मोह आवरता येईना. अखेर एका ठिकाणी तशी संधी मिळालिच. पावसानं त्याची एक लकेर घेतल्यानं गाडीवरच्या बॆगा प्लॆस्टिकनं झाकणं अपरिहार्य होतं. म्हणून ड्रायव्हरसाहेब त्या कामाला लागले, आणि आम्ही नदिचं बोट पकडायला धावलो. अखेर मन कसं शांत शांत झालं. गाडीत बसलो आणि मनालिला कुच केलं. वाटेत कुल्लू आलं आणि लेक जोरात किंचाळली "बडफ". सगळे पेंगत होते ते एकदम जागे झाले. खिडकीतून बाहेर पाहिलं तर बर्फाचे सुळके दिसत होते. ते पहिलं गोंडस दर्शन झालं आणि भेटी लागी जिवा लागलिसे आस अशी स्थिती झाली. कधी एकदा बर्फात जाऊन त्याच्यात मस्ती करतोय असं झालं. मग तो सुळका जसा काही आम्हाला वाट दाखवायलाच आल्यासारखा अखेरपर्यंत दिसत राहिला. मध्येच काही मिनिटासाठी गायब व्हायचा आणि लेक ड्रायव्हरला सारखं, "डायव्हड अंकल बडफ देखना है" म्हणून भुणभुण करायची. त्यावर ड्रायव्हरही हसत म्हणायचा, "अभी ये लास्ट नाईट गुडिया. कल हम आपको बडफ की गुंफा में ले जाएंगे". त्यावर गुंफा काय हे माहित नसल्यानं मोर्चा सहाजिकच आमच्याकडे वळला. तिच्या एकामागूनएक येणार्या प्रश्नांना उत्तरं देईपर्यंत मनाली आलंच. ड्रायव्हरनं गाडी थेट मनालीच्या बाजारपेठेत नेली आणि मग लक्शात आलं इथेही आमचं हॊटेल मिसिंग आहे. मग पुन्हा पत्ते विचारत फिरणं आलं. अखेर आठ साडे आठ वाजता आमचं कन्याल रोडवरचं हॊटेल आम्हाला सापडलं. इथे जाऊन आधी जेवणाची ऒर्डर दिली आणि भुकेल्या पोटानं वाट बघत बसलो. साडे आठ वाजता दिलेली ऒर्डर साडे अकरा वाजता आली आणि तिही मस्त चुकिची. आधिच पोटात भुकेनं कल्लोळ लाजलेला त्यात भलतिच ऒर्डर बघून काय करावं हे संतापानं सुचेना. बरं तसं गिळावं तर त्यापैकी रोटी सोडली तर सगळेच आम्ही न खाणारे आमच्या ब्लॆकलिस्टमधले पदार्थ. मग काय. मॆनेजरबरोबर जाम जुंपली. अखेर कसंबसं जे आहे ते समोर त्यातलं वेचून वेचून पोटात ढकललं आणि झोपायच्या तयारीला लागलो. एव्हाना साडेबारा वाजून गेले होते. इतक्यात दार वाजलं म्हणून उघडलं तर दारात वेटर तीन चॊकलेटं घेउन उभा. म्हटलं हे काय नवीन? तर म्हणाला शेफ सरनी सॊरी म्हटलंय. करता काय ते सौजन्य स्वीकारण्यावाचून पर्याय नव्हता. सकाळी उठलो तर नविनच नाटक. अंघोळीला गरम पाणिच नाही. एक बादली काढल्यावर तासभर दुसरी बादली येण्यासाठी. मग थंड पाणी अंगावर आरडाओरडा करत घेउन अंघोळ आटोपली आणि गाडीत बसलो. आज रोहतांगपासला जायचं होतं. सकाळी सहाचं टार्गेट होतं पण अंघोळ प्रकरणामुळे बाहेर यायलाच सात वाजले.
 

शिमला-३




.......दुसर्या दिवशी डोळे उघडले आणि खिडकीचा पडदा बाजुला करुन बाहेर पाहिलं आणि शप्पथ सांगते इतकी अप्रतिम सकाळ बहुदा आयुष्यात पहिलीच असेल. काल रात्री अंधारात आम्ही शिमल्याच्या केवळ रस्त्यावरुन आलो होतो आज शिमला डोळ्यासमोर असं उभं होतं. अप्रतिम. सुंदर जे काही काठवतील ते शब्दही तोकडे पडावेत असं सुंदर द्रुष्य समोर दिसत होतं. समोर खोल हिरवीकंच झाड्यांच्या टोप्या घातलेली दरी, त्यात असणार्या दोन चार घरांच्या तुरळक वस्त्या, त्यात काम करणारे स्थानिक लोक, स्वच्छ कोवळा सूर्यप्रकाश, पाखरांची चिलचिल, सगळं एखाद्या कल्पनेतल्या कॆन्व्हासमध्ये चितारल्यासारखं.....इतकं छान प्रसन्न पूर्वी कधी वाटलं होतं आठवेचना. त्याच उत्साहात, रजईत हरवलेल्या बापलेकीला वरुन माझ्याही रजईत लपेटून एकटिच छान भटकायला निघाले. पावसानं सगळं छान धुतलं गेलं होतं. जिकडे नजर जाईल तिकडे हिरवाईच दिसत होती, मनात आतवर झिरपत जाणारा शांतपणा होता, कोठेही कसलिही घाई दिसत नव्हती की जाणवत नव्हती. सगळं निवांत होतं, माणसंही फार दिसत नव्हती म्हणजे नव्हतीच त्या शांत रस्त्यावर बहुदा मी एकटिच होते. तंद्रीत किती दूर चालत गेले समजलंच नाही. अखेर लक्शात आलं की अरे आता परतायला हवं. परत आले आणि हॊटेलचा फेरफटका मारुउन आले. टेकडिच्या कुशित लाडानं विसावलेलं आमचं हॊटेल इतकं गोंडस दिसत होतं. तसं पहायला गेलं तर चार मजली होतं पण एकावर मजले नव्हते तर टेकडिच्या उतारानं ते मजले विसावले होते. त्यामुळे प्रत्येक मजल्यापुढे टेकडिचा एक तुकडा होता. बाहेरुनही वरपर्यंत जाता येत होतच आणि आतूनही सोय होती. मी त्या क्शणी हॊटेलच्याच प्रेमात पडले. ज्यानं कल्पकता वापरुन ते बांधलं होतं त्याचं खरंच कौतुक वाटलं. एव्हाना नवर्याची सकाळ झाली होती आणि डोळे चोळत मला शोधत तो आमच्या खोलीबाहेर फिरत होता. मी वरुन त्याला हाक मारुन मी वर असल्याचं सांगितलं. चार चार पायर्या एकदम ओलांडत धावत तो वर आला. शिमल्याची लोभस सकाळ पाहून त्यानं डोळे विस्फारले की मी चक्क त्याच्या आधी उठून अशी आवरुन सावरुन ताजी उभी होते म्हणून कोण जाणे. पण त्याचा चेहरा लगेच खुलला. कित्येक वर्षांनंतर दोघेच अशी छान सकाळ अनुभवत होतो. प्रसन्न वातावरणाचा मनावरही लगेचच परिणाम होतो. जशी मी त्या हॊटेलच्या त्याच्या आजुबाजुच्या नजार्याच्या प्रेमात पडले होते तसाच तो ही पडला होता. तिथल्या तिथे आम्ही निर्णय घेतला की पुढच्यावेळेस केवळ शिमल्यातला निवांतपणा भरुन घ्यायला यायचं आणि याच हॊटेलमध्ये रहायचं. एव्हाना आम्हाला आमच्यातल्या तिसर्याची आठवण झाली. आम्ही खाली गेलो तरी बाबाच्या लेकीचे डोळे उघडले नव्हते. तिला उठवून सगळ्यांचं आवरुन मग कुफ्री पॊईंट बघायला गेलो. तिकडे जाण्यासाठी घोड्यावरुन जावं लागणार होतं. पहिल्यांदा जाम भिती वाटली पण हिय्या करुन बसलेच. दगडांनी खचाखच भरलेल्या वाटेवरुन घोडं वर चढायला लागलं आणि कढी पातळ झाली. कधी एकदा वर पोहचू असं झालं. अखेर वर गेलो. तिथे तासभर टाईमपास केला. लेकीला भूक लागली. म्हटलं आता हिला काय द्यायचं तर एकदम चिरपरिचित वास आला. लेक तर धावतच गेली. त्या टोकावरच्या टपरीत चक्क दोन मिनिट मध्ये तैय्यार होणारं मॆगी बनत होतं. ती पहिली भेट होती. हिमाचलमध्ये कोणत्याही कड्याच्या अगदी टोकावरही दो मिनिट मॆगी मिळतं याचं नंतर आश्चर्य वाटणं बंद झालं पण तिचं इतक्या टोकावरचं पहिलं दर्शन मात्र चकीत करणारं होतं. सकाळपासून छान कोवळं ऊन अंगावर घेतलेल्या पहाडिवरचं वातावरणं काही मिनिटांत बदललं. आकाश काळंभोर झालं. थंडगार बोचरं वारं वहायला लागलं. बरोबरचा गाईड खाली उतरण्याची घाई करायला लागला. आम्हीच त्याला थोपवत होतो. त्यावरचं त्याचं वाक्य एकमदम मस्त होतं,"ओ मॆडमजी पहाडी का मौसम और बंबई का फॆशन का कुछ भरोसा नहीं. कब बदले पताही नहीं चलता". त्याच्या या वाक्यावर यथेच्छ फिरक्या घेतच आम्ही माघारी फिरलो. उतरण जास्त भयान होती. पण एव्हाना घोड्यावरचा माझा अविश्वास कमी झाला होता. भिती घालविण्यासाठी जोरजोरात गप्पा टप्पा करत आम्ही उतरलो. गाडीत बसतच होतो की पावसानं झोडपायला सुरवात केली. गाईडचं म्हणणं शब्दश: पटलं. मिनिटभरापूर्वी छान हवा होती आणि आता तुफानी पाऊस. वाटेतच जाताना एका ठिकाणी जेवलो आणि चुपचाप हॊटेलवर जाऊन बसलो. आत्ताशी निम्मा दिवस सरला होता आणि अवेळी आलेल्या पावसानं आमच्या उत्साहावर पाणी टाकलं होतं. देव करो हा अवेळी आलेला पाऊस त्याचं बरसणं आटोपतं घेवो असं घोकत. खिडकीबाहेर डोळे चिकटवून बसलो.....