कच्ची धूप

ऐंशीचं दशक हे टीव्हीचं नव्हाळीचं दशक होतं. नुकता रूजलेला इडियट बॉक्स मनोरंजनाचे मोजके तास घेऊन यायचा आणि ते तास दोन तास मुलं टिव्हीला चिकटलेली बघून घरातले मोठे टीव्ही ला इडियट बॉक्स म्हणून हिणवायचे. (तेच मोठे आता आज्जी आजोबा झालेत आणि अहोरात्र डेलीसोपचा रतीब पहातायत हा भाग अलहिदा 😜).  रविवार हा सुट्टीचा आणि म्हणूनच मनोरंजनाचा दिवस असायचा. खास सुट्टीच्या दिवशी प्रसारीत होणार्‍या मालिका असत. त्यापैकी एक होती "कच्ची धूप". सकाळी प्रसारीत होणारी ही मालिका सुरवातीला चर्चेत होती ती अमोल पालेकर या नावामुळं. हिंदी चित्रपटात मॅटिनीस्टार म्हणून ख्याती मिळवलेल्या पालेकरांची ही मालिका. लिहिली होती त्यांचीच पत्नी चित्रा पालेकर यांनी. या मालिकेची कथा सुप्रसिध्द इंग्रजी कांदंबरी "लिटिल वुमन" वर आधारलेली होती. या कादंबरीनं वाचकांवर गारूड केलं  होतं (आहे) त्यामुळे यावर आधारीत मालिका करणं धाडसाचंच म्हणलं पाहिजे.
एक सिंगल मदर आणि तिच्या तीन मुली , या कुटुंबाच्या अवती भवती असणारे शेजारी. यांचे आपापसातले संबंध यावर हे कथानक बेतलं होतं.
बालपण सरत असतं, तारूण्य येऊ घातलेलं असतं आणि सगळं आयुष्य रंगीबेरंगी आणि त्याचवेळेस प्रचंड गोंधळलेलं असतं अशा अडनिड्या वयातल्या मुलांचं भावविश्र्व म्हणजे कच्ची धूप. लहान मुलांत तर ही मालिका विशेष लोकप्रिय झाली होती. अशा प्रकारच्या अनेक मालिका त्यानंतर आल्या. अगदी जस्ट मुहब्बत असो किंवा अलिकडेच आलेली परवरीश असो  पण नव्वद्च्या दशकातली कच्चीधूप तिचं स्थान टिकवून आहे.
तारूण्यात पदार्पण केलेल्या मुलांचं भावविश्र्व, त्यांची प्रेम या भावनेशी ओळख होण्यातली नव्हाळी, त्यांचे छोटे छोटे त्याग,   त्यांचे आनंद, जगाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टीकोन या सगळ्यावर अगदी सहज आणि सोप्या भाषेत या मालिकेनं भाष्य केलेलं होतं.
 पौगंडावस्थेतली मुलं आणि  सिंगल मदर पेरेंटिंग हा विषय हाताळलेली ही मालिका लोकप्रिय होण्याचं कारण म्हणजे प्रेक्षकांनी ती कथा, पात्रं "रिलेट" केली. आजही सिंगल पेरेंटिंग हा टास्किंग जॉब आहे.
दूरदर्शनच्या काळात मालिकांचे डेलिसोप झाले नव्हते त्यामुळे कथानक ठरलेलं असायचं आणि त्यातले टप्पेही, विशिष्ट भागांत मालिका संपत त्यामुळे कथानक जेवढ्यास तेवढं असायचं. लांबवणं, वाढवणं हे प्रकार नव्हते. त्यामुळे मालिका क्रिस्प होत. दर भागात काहीतरी घटना घडायची आणि कथानक पुढे सरकलेलं असायचं. म्हणूनच एखादा भाग बघायचा चुकला तर एकमेकाला विचारून स्टोरी अपडेट व्हायची. कच्ची धूपचेही चौदा भागच होते.
 चित्रा पालेकरांनी कथा लिहिली होती आणि अमोल पालेकरांनी दिग्दर्शन केलं होतं. अमोल मालेकर हे ऐंशीच्या दशताकलं मॅटिनी प्रेमींचं सुपरस्टारडम लाभलेलं नाव होतं.
या मालिकेतून भाग्यश्रीनं पदार्पण केलं होतं. शुटिंगच्या आदल्या दिवशी तिचं कास्टिंग झालं आणि ती या भूमिकेसाठी निवडली गेली.  अमोल पालेकर आणि पटवर्धन कुटुंबियांचे घरोब्याचे संबंध असल्यानं तिची या भूमिकेसाठी निवड केली गेली. तिच्यासोबत या मालिकेत तिची लहान बहिण पौर्णिमा पटवर्धन आणि अमोल-चित्रा पालेकरांची मुलगी शाल्मली पालेकरही होती.
या मालिकेनं लोकप्रियतेचा इतका उच्चांक गाठला होता की बडजात्या फ़िल्मसचा नव्या पिढीचा निर्माता सुरज यानं ही मालिका पाहून भाग्यश्री- आशुतोष ही जोडी मैने प्यार किया साठी निश्चित केली होती मात्र नंतर भाग्यश्रीचं नाव टिकून राहिलं आणि आशुतोषची जागा सलमाननं घेतली.
दूरदर्शनवरच्या कोणत्या जुन्या मालिका पुन्हा यायला हव्यात? असा प्रश्न विचारला तर कच्ची धूपचं नाव खूप वर असेल हे निश्चित.

 

1 comments:

raj said...

छान पिंपळपान आहे आठवणीच मस्तच लिहलयस To be cont...