सोडून द्यायच्या गोष्टी: तिची डायरी


मी अम्माची सून, आजपर्यंत कोणाला काही बोलले नाही. कारण बोलण्यात काही अर्थच नव्हता.
  कसंय की, इतरांना  लहान सहान वाटणार्‍या गोष्टी आपल्यासाठी खूप मोठ्या असू शकतात की नाही? पण होतं काय की लग्न करून आपण सासरी आलो की मंगळसुत्रासोबत फ़्री मिळणारी गोष्ट म्हणजे आपल्याला गृहित धरलं जाणं. सून म्हणजे अमूक गोष्ट तिनं केलीच पाहिजे. बायको म्हणजे तमूक गोष्ट तिनं केलीच पाहिजे , कर्तव्यच नाही का तिचं? या तर दोन बाजू पण अनेक नाती मिळतात आणि त्या नात्यांतल्या अपेक्षा, गृहित धरणंही वाढतं...एका लग्नानं.  आता माझंच बघा, माझी सासू, अम्मा, अगदी रीतसर खाष्ट म्हणता येण्याइतपत तिखट स्वभावाची. लव्ह मॅरेजला परवानगी दिली ही केवळ एकच गोष्ट ती हुकमी पत्त्यासारखी गेली वीस वर्षं वापरतेय. मुळात तिचा हा हुकमाचा पत्ता अजूनही चालतोय याचीच मला कधी कधी गंमत वाटते. लग्नाला परवानगी दिल्यामुळे अनेक गोष्टीत मला गृहित धरलं गेलं आणि मुख्य म्हणजे मी धरू दिलं कारण विचाराल तर लहानपणापासूनचे संस्कार, "सोडून द्यायचं गं. ताणलं की तुटतं" तर ताणून तुटू नये म्हणून अनेक गोष्टी सहन...हो सहनच... करत गेले आणि मग तो पॅटर्न बनला. कधी मधी संयम सुटून बोललं गेलं तर फ़टकळपणाचा शिक्का बसला. वर आजूबाजूचे समजूत घालणारे होतेच,"सोडून दे गं" वाले. असं सोडून देता देता एक मात्र झालं की मी माझ्या सासूला शांतपणानं स्विकारलं. ती तशीच आहे आणि तशीच रहाणार हे सुरवातीला तणतणत मग नाईलाजापायी आलेल्या थंडाव्यानं स्विकारलं. आता असं झालंय की बर्फ़ाच्या लादीसारखं थंडगार पडलंय आमच्यातलं नातं. ना कौतुकाचं कौतुक ना राग रुसवा. मनाची तडफ़ड कमी झाली. मग आता परिस्थितीनं कुस पालटली आणि चार दिवस सासूचे संपत आल्याची जाणीव तिला झाली. माझ्याबाबतीत वाईट वागलेल्याचा पश्चात्ताप झाला म्हणून नव्हे तर आता या उतारवयात आपलं कोणीच नाही मग आपलं काम काढून घ्यायचं तर माझ्याशी संबंध चांगले ठेवले पाहिजेत या उपरतीनं खोटं का होईना पण ती चांगली बोलायला लागली.  एम्पथी नावाची गोष्ट माहेरून संस्कारांच्या गाठोड्यातून सोबत आल्यानं  उतारवयातली  बापुडवाणी भासणारी सासू तोडता आली नाही. फ़क्त कसं झालंय नां की आयुष्यभर "सोडून द्यायचं असतं" हे इतकं अंगात भिनलंय की आता तिचं बरं वागणंही सोडूनच द्यायला होतंय.  ताणलं की तुटतं हे ऐकून ऐकून आता ताणण्यासाठी मुळात काही पकडलंच जात नाही.
म्हणणारे म्हणतात की जग बदललंय, आता पूर्वीसारखं सासू सुनेचं कुठं असतं? आपल्याला किती स्वातंत्र्य आहे, नवरे आपल्याला किती समजून घेतात वगैरे वगरे पण कुठेतरी काहीतरी साखरेत घोळवलेलं कचकचत असतंच. नाही का? पण काय नं विचार नाही करायचा....सोडून द्यायच्या अशा गोष्टी!

#तिच्या डायरीतलं पान.
 

8 comments:

Farah said...

Chan lihilay
Sounds very real

शिनु said...

Thank you Farha.
Welcome on blog

Archana kulkarni said...

खूप छान

शिनु said...

ब्लॉगवर स्वागत अर्चना :)

प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

इंद्रधनु said...

>>पण कुठेतरी काहीतरी साखरेत घोळवलेलं कचकचत असतंच.
agadi kharay, khup chhan lihilay...

शिनु said...

ब्लॉगवर स्वागत धनू
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

Unknown said...

छान आहे

ssp1986 said...

nice