सुहानाचं सासर

सिनेमाबद्दल बरेचजण लिहितात. सिरियल्सवर मात्र तुरळक, तुटक त्यातल्या त्यात हिंदी मराठीतल्या मालिकांबद्दल विशेष  नाहीच, म्हणूनच मला आवडलेल्या काही मालिकांवर लिहिण्याचं मी ठरवलंय, मला माहितीय की यातल्या बर्याच मालिका नंतर नंतर पाणी घालून वाढवलेल्या होत्या तरिही त्यावर मला लिहायचंय. मला स्वत:ला नातेसंबंध उलगडणार्‍या साध्या सुध्या कौटुंबिक मालिका फ़ार आवडतात. मग त्या देख भाई देख सारख्या खुसखुशीत विनोदी असोत की आभाळमायासारख्या थोड्या गंभीर धाटणीच्या.

हमलोग आणि बुनियादपासून मी सिरियल्स बघायला लागले, त्यामुळे तिथंपासून ते इथंपर्यंतच्या माझ्या आवडत्या सिरियल्सवर मी लिहिणार आहे. याला काही सुसुत्रता असेलच असं नाही. अडम तडम करत ज्या सिरियलचं नाव मनात येईल त्यावर लिहिणार आहे.

तर, आज अडम तडम अडकलाय स्टार प्लस अगदी अलिकडे म्हणजे चार पाच वर्षांपूर्वी प्रसारित झालेल्या "ससुराल गेंदा फ़ूल" या सिरियलवर. २०१२ म्हणजे सासबहू सिरियलनी कळस गाठलेला काळ. तरिही विशेषत: या दोन तीन वर्षांत काही खरंच हटके मालिका आल्या होत्या. स्टार प्लसनं रिश्ता वो ही सोच नयी ची ग्वाही देत काही खरोखरच चांगले शो आणले. त्यापैकी एक एसजीबी अर्थात ससुराल गेंदा फ़ूल

हिंदी मालिकांनी सास बहू ड्रामा लोकप्रिय केला. एक वाईट सास आणि बिचारी बहू अशा साच्यातून अनेक चकल्या पडत होत्या आणि त्याचवेळेस अगदी नावातच ससुराल असणारी एक मालिका आली. चेहरे सगळेच परिचित. 
रागिणी खन्ना (राधा की बेटियां मधून पदार्पण केलेली) , जय सोनी, सुप्रिया पिळगावकर अशी एकाहून एक नावं या सिरियलशी जोडलेली होती. सुप्रियाचं वैशिष्ट्य हे की, मोठ्या पडद्यावरून लहान पडद्यावर आल्यावरही तिनं उगाचच करायच्या म्हणून सिरियल्स मधीच केल्या नाहीत. तिच्या प्रत्येक सिरियलमधलं प्रत्येक पात्र लक्षात रहावं असंच आहे. सगळ्या भूमिका साधारण एकाच साच्यातल्या असूनही त्यात तिनं राखलेलं वैविध्य खरंच कौतुक करण्यासारखं आहे.

यातही तिनं सासूची म्हणजेच बडी मां ची भूमिका इतकी क्युट साकारलीय की प्रत्येक लग्नाळू मुलिला वाटावं असं सासर आणि अशी सासू मिळावी. 

या सिरियलची मला सर्वात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे यातले संवाद. शुध्द उर्दू मिश्रीत हिंदी वापरणारी बहुतेक ही शेवटची सिरियल. यानंतर मालिकांत युपीवाल्या भाषेची चलती सुरू झाली. दिल्लीतलं हे कुटुंब अत्यतं सुंदंर भाषा आणि लहेजा वापरायचं. बडी मां चे रिश्तों की समझ देणारे खरं तर एरवी पुस्तकी वाटू शकणारे संवाद इतके सहजपणानं यायचे की ऐकून वाह! असं  वाटायचं. तिचं ते हळूवार पणे समजून सांगणां आणि समजून घेणं प्रचंड क्यूट होतं.

या सिरियलमधली दुसरी छान गोष्ट म्हणजे यातले कपडे. एरवी हिंदी सासबहू मालिकांत कचकच काचा लावून चमचम करणार्या बेगडी साड्या आणि घाण दिसणारे खोटे दागिने बघून वीट आला होता. यातल्या सगळ्या बायकांच्या साड्या साध्या पण क्लासी होत्या. तुमच्या आमच्या घरात जशा दिसतात तशाच या सगळ्याजणी दिसायच्या. अगदी नायिका सुहानाचं उच्चभ्रुपणही तिच्या क्लासी साड्यांतून जपलं होतं. शिवाय बहुतेक पहिल्यांदाच मालिकेतली सून गुडघ्यापर्यंतच्या वनपीसमधे, ऑफ़ शोल्डमधे आणि पारदर्शक नायट्यांमधे दाखवली असावी, असं असूनही त्यात कुठेही ती निगेटिव्ह होत नव्हती. एरवी पाश्चात्य कपडे घालणं हा मालिका विश्र्वात व्हॅम्पिशपणा ठरतो. इथे सुहाना तिला हवं ते बिनधास्त घालताना दाखवलीय तरिही ते सगळं सहज खपून जातं. उलट तिनं हट्टान आपल्या जावांनाही वनपीस घालायला लावणंही प्रेक्षक सहज स्विकारतात.

तिसरी छान गोष्ट म्हणजे कश्यपांचं चावडी बाजाराच्या गल्लीत असलेलं पुश्तैनी असरटपसरट घर. मालिकांतली खोटी खोटी दिसणारी, भासणारी चकाचक घरं आणि कश्यप कुटुंबाचं हे टिपिकल उत्तरेकडचं दिसणारं साधं पण रूबाबदार घर. घराचा भक्कम आणि सदा उघडा मोठा लाकडी दरवाजा, अख्खं कुटुंब बसून गप्पा मारणारा हॉल, डायनिंग टेबल, स्वयंपाकघर, चौसोपीतला हातपंप, कॉमन बाथरूम, खालच्या मजल्यावरच्या दादा दादी, इंदर-राधा, इलेश-दीशा यांच्या खोल्या, वरच्या मजल्यावरच्या सुहाना-इशान, बडी मां, राधा, अलोक-रानो, इशिताच्या खोल्या, त्याच्या बाजूला आसणारी प्रशस्त गच्ची आणि हे दोन्ही मजले जोडणारा लालचुटूक गेरूचा जिना. घराचा प्रत्येक कोपरा कथानकात वापरला गेला. इतका सहजपणानं की तो स्क्रिनप्लेचा भागही न वाटावा. प्रत्येक कोपर्यातून कॅमेरा इतक्या सफ़ाईनं फ़िरला की दोन वर्षं प्रेक्षक आपल्याच घरात वावर्ल्यासारखे या खोल्यांमधून वावरले.  बहुतेक सिन मधे, फ़्रेममधे चार चार पाच पात्रं आणि त्यांच्या सततच्या हालचाली यानं फ़्रेम जिवंत वाटायच्या, इतर मालिकांत असायचे तसे डिशक्यॅंव टाईट क्लोज अप चे चेहरे बघण्याचं  टॉर्चर या मालिकेनं कधीच माथी मारलं नाही.


सुहाना बडे घर की बिगडी, नकचढी मुलगी दिल्लीच्या उच्चभ्रू वसाहतीत रहाणारी पण योगायोगानं लग्न करून ईशान   कश्यपच्या चावडी बाजारच्या अगदी टिपिकल मध्यमवर्गिय एकत्र कुटुंबात येते. ईशान पहिल्याच भेटीत सुहानाच्या प्रेमात पडलाय, सुहानाच्या वडिलांना कश्यप कुटुंब प्रचंड आवडलंय. पण सुहानाला मात्र हे घर आणि लग्न दोन्हीतून सुटका हवीय. अगदी पहिल्याच रात्री ती ईशानला सगळं खरं सांगून टाकते. समंजस ईशानही तिला नात्यातून मुक्त करतो. मात्र घटनाच अशा घडत जातात की सुहानाला या घरात थांबावच लागतं. हळूहळू सुहाना कश्यप कुटुंबात रूळते. ती या कुटुंबाच्या आणि विशेषत: बडी मांच्या प्रेमात पडते. ईशानवर प्रेम नसूनही ती या घरात रहाते. हळूहळू बडी मां आणि दादाजी तिला तिच्याही नकळत तिचं ईशानच्या प्रेमात पडलेलं असणं दाखवून देतात. हे सगळं करताना सुहानाला नात्यांची नव्यानं ओळख होते. ती आधी कुटुंबाच्या प्रेमात पडते आणि मग ईशानच्या. लग्नानंतर तब्बल एक वर्षानं ती ईशानजवळ प्रेमाची कबुली देऊन खर्या अर्थानं सुहाना ईशान कश्यप बनते. 
इथंपर्यंत मालिकेचा सिझन एक होता. जो बहुतेक ओरिजिनल कथेचा प्लॉट असावा.
इथून प्रवास सुरू होतो सुहाना आणि ईशानच्या संसाराच्या आणि मग त्यात येणार्या चढ उतारांचा. मग सुहानाचा ब्रेन ट्युमर, त्यातून तिचं बाहेर येणं आणि ईशानचा अपघात त्यात त्याची स्मृती जाणं. त्यानं केवळ सुहाना सोडून बाकी सगळ्यांना ओळखणं आणि सुहानाचं शशीकला बनून त्या घरात रहाणं पुन्हा नव्यानं ईशानच्या प्रेमात पडणं आणि यावेळेस ईशानला सुहानावरचं प्रेम ओळखायला कुटुंबियानी मदत करणं.
हा होता मालिकेचा सिझन टू
मालिकेनं इथंपर्यंत पकड ठेवली होती. आणि लोकप्रियतेच्या कळसावर होती. अर्थात बंद करण्यात काहीच अर्थ नव्हता. मोह आवरता न आल्यानं मग सुहाना आणि ईशानला मुंबईत कामानिमित्त आणणं. एकत्र कुटुंबाची सवय झालेल्या सुहानाचं मुंबईतलं एकटेपण आणि मग यथावकाश पुन्हा दिल्लीला आपल्या कुटुंबात जाणं. त्यानंतर तिचं हिंदी मालिकेची नायिका बनणं आणि एका मध्यमवर्गिय घरातली सून जर या वरवर ग्लॅमरस दिसणार्या क्षेत्रात आली तर काय काय होऊ शकतं याची गोष्ट सांगणारा सिझन तीन आणि मालिकेचा शेवट.
प्रेमापोटी चाहत्यानी हा सिझनही पाहिला असला तरिही पहिल्या दोन सिझननंतर हळूहळू सिरियलची पकड ढीली होत चालली होतीच. मात्र एक कौतुकाची गोष्ट ही की अती न करता सिरियलनं निरोप घेणं. शेवटच्या सिनमधे अलोक म्हणतो की,"चलो जी कहानी खतम. अंत तो अच्छाही हुवा " यावर  शैलजा म्हणजेच बडी मां म्हणते, "नहीं अलोक, जब तक जीवन है, कहानी खतम नहीं होती. जब जब हालात करवट बदलते है, जीवन में नयी कहानियां जनम लेती है, कहानी अभी खतम नहीं हुई" तिच्या या शेवटच्या संवादामुळे ही मालिका नवा सिझन आणि नवा ट्रॅक घेऊन येणार याची खात्री होती. मात्र आज पाच वर्षं उलटली तरिही या मालिकेचा नवा सिझन आला नाहीए. अजूनही या सिरियलचे चाहते (माझ्यासारखे) हॉटस्टारवर ही सिरियल भक्तीभावानं बघतात. अजूनही वाटतं की एखाद्या दिवशी या मालिकेच्या नव्या सिझनची घोषणा होईल. रागिनी खन्नाला इस्टावर अजूनही चाहते या सिरियलविषयी विचारत असतात. मध्यंतरी ती गुरगावच्या निमित्तानं लाईव्ह आली होती त्याहीवेळेस चाहत्यांनी हाच प्रश्नं वारंवार विचारला होता. तसंही सध्या जुन्या मालिकांचे नवे सिझन यायचा सिझन चालू आहे, तर, फ़िंगर्स क्रॉस फ़ॉर ससूराल गेंदा फ़ूल 


 

0 comments: