अस्वस्थ मी : नशा कशाची?

आजूबाजूला अनेक गोष्टी घडत असतात....काही मनात झिरपतात, काही नाही...काहींनी विचार करायला होतं तर काहींनी बेचैनी जाणवायला लागते....अस्वस्थ व्हायला होतं....अशीच एक घटना नुकतीच मुंबईच्या एका कोपर्‍यात घडली....रितीनुसार त्याची बातमी झाली आणि सध्याच्या परंपरेला साजेसा व्हिडिओही व्हायरल झाला....मग त्यावर साधक बाधक चर्चा करणंही ओघानंच आलंच....कसं आहे नां, भारतातल्या लोकांना सध्या दोनच कामं उरलीत  व्हॉटसऍपवर पुचाट मेसेजच्या ओट्या भरणं आणि फ़ेसबुक/ट्विटरवर परस्परांवर राजकीय/अराजकीय विषयांवरून पिंका थुंकणं....आपल्याला द्न्यान असो अथवा नसो....विषयातलं गम्य असो अथवा नसो...प्रत्येक विषयावर प्रत्येकवेळेस मत मांडणं हा जणू संविधनात्मक हक्क बनलाय....असो. तर आत्ता निमित्त झालं (बहुतेक) दारूनं  झिंगून दंगा केलेल्या या मुलिच्या व्हिडिओचं....
 दारूच्या नशेत बेभान झालेली ही पहिलीच अशी केस आहे अशातला भाग नाही. आजपर्यंत कमी बातम्या आल्या नाहीत. अगदी  गल्लीपासून दिल्लीपर्यंत अशा घटना वरचेवर घडत असतात. दारूच्या आणि कशाकशाच्या नशेत सुसाट गाड्या पळवत आजूबाजूच्या जिवांचा विचार न करत चिरडून टाकणारे बातम्यात झळकतात.... मिडियावाले चघळून चघळून बातम्या दाखवतात आणि मग नवी सनसनी आली की बातम्यावाले आणि लोकही या घटनांना विसरतात....  एका बाजूला प्रत्येक गोष्टीवर व्यक्त होण्याची अतीघाई असण्याची अतीसंवेदनशिलता आणि या घटना ताबडतोब विसरण्याची संवेदनहिनता असं विरोधाभासी वातावर झालंय....  विशेषत: या ज्या नशेत गाड्या  आणि माणसं उडवणारे असतात, यात बड्या बापांचे बेटे आणि बेट्या त्यांच्या महागड्या गाड्या असतात तशीच सामान्य घरातली मुलंही असतात...म्हणजे मग इथे तसं बघायला गेलं तर सामाजिक समानताच आहे म्हणायची. नशेत गाडी चालवून रस्त्यावरच्यांना चिरडायची मक्तेदारी काय फ़क्त श्रीमंतांचीच असावी?  असो. तर हे जे नशेत वहावणं आहे ते मला अस्वस्थ करतं.
दारू पिणार्‍या (मर्यादीत आणि अमर्यादीत) कित्येकांशी बोलल्यावरही लोक दारू नेमकी का आणि कशासाठी पितात याचं समाधानकारक उत्तर मला मिळालेलं नाही. अनेकजण सांगतात की लिमिटमधे प्यायली की काही होत नाही. मला या लिमिटच्या भानगडीचं एक कळत नाही. खरं सांगायचं तर  लिमिटमधे दारू पिणं याहून भयानक विनोद तर आजपर्यंतच्या आयुष्यात ऐकला नाही. लिमिट म्हणजे नेमकं काय? ती कोणी ठरवयाची? मुळात जर दारू पिण्याचा हेतू (परमानंदी समाधी अवस्था) साध्यच होणार नसेल तर मग दारू प्यायचीच का?   असे आपले माझे बाळबोध प्रश्न आहेत. या प्रश्नांना उत्तरं देत या विषयातले जाणकार माझं द्न्यान वाढवायचा वेळोवेळी प्रयत्न करतात, त्यातलं सर्वात लाडकं विधान म्हणजे बियर आणि ब्रिझर हे पाण्यासारखेच असतात . हो का? सिरियसली? मग असं असेल तर एखाद दिवस पाणीटंचाई आहे म्हणून मुलांच्या शाळेच्या वॉटरबॉटलमधे बियर द्यावी का? असा चिडका प्रश्नही मनात येतो.....पिणार्‍यांकडे प्यायची हजार कारणं असतात. कोई गम में तो कोई खुशी में तो कोई एंवेही....यातल्या कोणत्याच कारणासाठी आजवर दारू प्याविशी न वाटल्यानं याचं तर्कशास्त्र माझ्यातरी समजण्यापलिकडचं आहे.
माझ्या लहानपणी आणि मी ज्या प्रकारच्या मध्यमवर्गिय संस्कारात आणि घरात वाढले तिथे दारू ही वाईटच आणि दारू पिणारेही वाईट हे ऐकवलं जायचं. म्हणून मग दारूला ग्लोरिफ़ाय करणं आजही जरा जडच जातं. यापैकी  वयाच्या पस्तिशीपर्यंत गळ्यात कसंबसं उतरलं की दारू पिणारे सगळेच वाईट नसतात. तरिही अजून तरी दारू चांगली असावी असं मत बनलं नाही...  भविष्यात बनेल याची शक्यताही नाही. काळ झपाट्यानं बदलतोय.,...जग बदलतंय....पुण्या मुंबईसारखी शहरं तर कायच्या काय बदललीत...सांस्कृतिक ...सामाजिक...आर्थिक सगळ्याच बाजूनं.....आता सोशल ड्रिंकिंग सर्वसामान्य आणि सर्वमान्य झालं आहे....अनेक सोकॉल्ड मध्यमवर्गीयांच्या घरातही बार असतात....मुलं आई वडिल दोघांना मजेत पिताना बघत लहानाची मोठी होतात...मग ही मुलं पुढे जाऊन पिण्याबाबत हाच कूल ऍटिट्युड बाळगून असतात....दारू पिणं वाईट की चांगलं हा मुद्दाच आता राहिला नाही....ओकेजनल ड्रिंकिग, सोशल ड्रिकिंग, लिमिटेड ड्रिंकिग या नव्या संकल्पना जन्माला आल्यानं दारूवरचा वाईट हा शिक्का पुसट झाला आहे. मला अस्वस्थता या गोष्टीनं येते की मुळात अजाणत्या वयातल्या या मुलांना ग्लास हातात धरावासा वाटतो याला जबाबदार कोण? पुन्हा हा ग्लास  हातात धरल्यानंतरची जबाबदारी, त्याचं भान यांना कोण देणार? प्यायल्यानंतर कसं वागायचं असतं याचे संकेत काय असावेत याचं शिक्षण द्यायची जबाबदारी कोणाची? आज आपण ज्या सहजतेनं आईवडिलांनी सेक्सएज्युकेशन मुलांना द्यावं म्हणतो त्या सहजतेनं या नशेबाजीबद्दल बोलावं असं म्हणतो का?  प्रत्येक पिणार्‍या आणि न पिणार्‍या पालकानी मुलांना समोर बसवून याबाबतचं योग्य ते मार्गदर्शन (?) करायला नको? आज न पिणार्‍या घरातली मुलं उद्या बाहेर जाऊन पिणार नाहीतच याचिही खात्री नाही. त्यामुळे हा प्रत्येकाचाच प्रश्न बनला पाहिजे. दारू पिण्याला हरकत नसणार्‍या पालकांनी मुलांना,  बाबानो प्या काय प्यायची ती,  पण पिऊन गाड्या चालवू नका, स्वत:चा आणि इतरांचा जीव धोक्यात घालण्याचा तुम्हाला अधिकार नाही  हे सांगायला नको? स्वतंत्र्याच्या भलत्या संकल्पनांपायी मुलांना स्वैर सोडल्यानंतर ही बेभान मुलं रस्त्यावरच्या इतरांसाठी धोका होतात याची जबाबदारी कोण घेणार?  आई-वडिल म्हणून या सगळ्यात  तुमची काय जबाबदारी असायला हवी?  आता त्याहून महत्वाचं,  नशेची किक बसण्यासाठी मुलं दारूहून वेगळं काही ट्राय करू पहायला लागली तर ती जबाबदारी कोणाची? अंमली पदार्थांचं सेवनही कूल असतं का?
न पिणार्‍या आणि मुलांनिही याच्या वाटेला नाही गेलं तरच बरं असं वाटणार्‍या पालकांचा स्ट्रेस आणखिनच वेगळा. काय आणि कसं सांगितलं म्हणजे मुलं या वाटेवरही जांणार नाहीत याची मनात सतत सजग उजळणी. पिअर प्रेशर हा न पिणार्‍या पालकांसाठी आणखि एक चिंतेचा विषय...आपल्या मुलांनी पिणार्‍यांच्या आग्रहाला बळी न पडावं यासाठी काय करावं ही चिंता....
क्रेझ म्हणून....आनंद मिळावा म्हणून.,...जस्ट फ़ॉर फ़न....कूल वाटावं म्हणून.....उच्चभ्रू असल्याचा भास व्हावा म्हणून....ग्लास उंचावणारे पाहिले की काळजीच वाटते.... समाज कुठे चाललाय....आपण कुठे आहोत?...जिथे आहोत तिथे असणं चांगलं की वाईट हे आजच्या पुरोगामी समाजात कळेनासंच झालंय.....
हे सगळे या मुलिच्या निमित्तानं मनात आलेले विस्कळीत अर्धवट विचार आहेत...कोणला बुरसट वाटतील, कोणाला मध्यमवर्गिय तर कोणाला आणखि कसे पण दारू म्हणलं की हे सगळं मनात येतंच.... सगळ्यात शेवटी आणि महत्वाचं, काही असो, बरं- वाईट काहीच न कळण्याच्या धुसर वयातल्या या मुलांना जपायला हवं इतकंच कळवळून वाटतं.....




# अस्वस्थ मी

आपल्या सगळ्यांनाच ही अस्वस्थता, बेचैनी कोणत्या ना कोणत्या बाबतीत जाणवत असते. विचार डोक्यात सतत घुटमळत रहातात. दोन्हीबाजूंकडचे विचार आपण एकटेच सतत करत रहातो. मला वाटतं आता हे विचार एकमेकांसोबत शेअर करूया. सुरवात मी करतेय पण हे अस्वस्थपण पुढे सरकवत राहू. तुम्हाला ज्या गोष्टीनं अस्वस्थ व्हायला होतं त्यावर जरूर लिहा आणि मग पुढे अशाच कोणा "अस्वस्थ मी" ला टॅग करा. कराल नां?
आणि हो, ही तळटीप लेखाली चिकटवायची विसरू नका.

माझा खो तन्वीला.
 

9 comments:

meg said...

Hmmmmmmmmm...... samadhan karak uttarachi vaat baghtey... pan bahudha milel tya uttaravarach samadhan maanava laagel asa vattay.

शिनु said...

खरंय....

arogya.com said...

Sagla agadi manaatla lihilayal.... Aswastha apan.... Pan sex education itkach addiction education karna pan garajecha ahe khup ha vichar uttam ahe! As a parent aapla kaam ahe educate karna. Baki jyacha tyacha nasheeb mhanaycha!!

Sandeep Kulkarni said...

आपण ज्या वातावरणात घडलो, वाढलो तेच विचार आपल्या मनावर "संस्कार" या लेबला खाली घट्ट रोवले जातात. याचा अर्थ असा नाही की त्यापेक्षा काही भिन्न असणं हे वाईटच असलं पाहीजे. माझे इथले सिंगापूरचे चायनीज मित्र त्यांच्या सणासुदीला घर परिवारा बरोबर मद्यपान करतात. लहान मुलाना ते थंड पेये देऊन उत्साहामधे सामाविष्ट करून घेतात. पती-पत्नी, सासू-सासरे, भाऊ-वहिनी आदी सर्व एकत्र येऊन बीयर, वाईन, शॅंपेन यांची मस्त मजा लुटतात. यातून ते मला कदापि बेवडे किंवा संस्कारशून्य वाटत नाहीत. ही सर्व मंडळी लिमीट मधे पितात का नाहीत असा प्रश्न मला कधीच पडला नाही. माझा एक कोरियन सहकारी फुटबाॅलच्या मॅच च्या दुसऱ्या दिवशी संपूर्ण आॅफीसला त्याच्या गतरात्रीच्या मद्य पानाचा दुर्गंध द्यायचा. ज्यावेळी त्याच्या हे लक्षात आलं त्यावेळी त्यानं खजिल होऊन एक दिवस घरातूनच काम करणं किंवा सरळ रजा टाकणं पसंत केलं. या दोन्ही उदाहरणातील व्यक्ती त्यांच्या क्षेत्रात अतिशय हुशार, यशस्वी आणि वागण्यात नम्र सुस्वभावीच आहेत. त्यानी कधीही वर्ण भेद किंवा स्त्री चा अपमान किंवा बेपर्वाईची वर्तणूक केलेली नाही. सांगायचा मुद्दा हा की मद्यपान करणं हा काही संस्काराचा विषय होऊ शकत नाही.

कोणतीही गोष्ट अती करणं हे नेहमीच वाईट. मग ते मद्यपान असो वा इतर काहीही. अती कष्ट, अती जागरण, अती झोप, अती भोजन, अती हव्यास... सर्वच व्यर्ज करावं. मद्यपान याला अपवाद नाही.

विषयाचं तात्पर्य असे की मद्यपान हा फक्त प्रौढ व्यक्तीचा विषय रहावा. त्याला संस्काराशी जोडू नये. सोमरस पान आदी-अनादी कालापासून होत आले आहे. कोणताही समाज यातून सुटलेला नाही किंवा वाया पण गेलेला नाही. विषयाचा फार बाऊ करून उगाचच अल्प वयात कुतूहल निर्माण करू नये. मुलाना त्या पासून दूर ठेवावे. त्याच्या अती सेवनाचे दुष्परिणाम त्याना समजावून सांगावेत. शेवटी प्रत्येक व्यक्ती स्वत:च्या कर्मानेच जगत व भोगत असते. त्याना सैराट बनण्यापासून वाचवा. सकारात्मक दृष्टीकोन हा कोणत्याही परिस्थितीत उपयोगीच ठरतो.

सरते शेवटी एक उल्लेख करतो. मी इथं खो-खो कब्बडी यातील कोणताही खेळ खेळण्यास उत्सुक नाही. माझ्याकडून विषयाला इथेच पुर्णविराम.

वैधानिक इशारा: अती मद्यपान हे आरोग्यास हानीकारक अाहे, होतं आणि कायम राहणारच.

आ.म.टी. (आणखी मजकूर टिचभर): कृपया या माझ्या मतावर खुश होऊन मला "आखिल भारतीय बेवडा संघटने" चे अध्यक्ष पद देण्याचा प्रयत्न करू नये. मी पित नाही.

शिनु said...

Sandy
ब्लॉग वर स्वागत .
विस्तृत प्रतिक्रियेबद्दल आभार. प्रत्येकाच्या मताचा आदर.
मतंमतांतरं असणं हे आरोग्यदायी चर्चेचं लक्षण आहे.

आ. म.टी- एका न पिणारीनं दुसर्‍या न पिणार्‍याला अ.भा.बे.सं. चं अध्यक्षपद देणं बेकायदेशीर असल्यानं हा बेत रहित झालेला आहे

शिनु said...

बरोबर.

शिनु said...

Sandy
ब्लॉग वर स्वागत .
विस्तृत प्रतिक्रियेबद्दल आभार. प्रत्येकाच्या मताचा आदर.
मतंमतांतरं असणं हे आरोग्यदायी चर्चेचं लक्षण आहे.

आ. म.टी- एका न पिणारीनं दुसर्‍या न पिणार्‍याला अ.भा.बे.सं. चं अध्यक्षपद देणं बेकायदेशीर असल्यानं हा बेत रहित झालेला आहे

Sandeep Kulkarni said...

अस्वस्थ?... पण का?

ब्लाॅग लिहीणं किंवा त्यावर प्रतिक्रिया देणं हा माझा पहिलाच प्रयत्न. एक नेटीझन च्या जन्मसिद्ध अधिकाराने मी माझे मत प्रकट करीत आहे. वास्तविक प्रत्येक सुजाण भारतीय नागरिकाचा हा स्वभाव गुणधर्म असणं गरजेचंच आहे. संबंध असो वा नसो, दे मत! गरज असो वा नसो, उघड तोंड! बुद्धीचे पैलू उघडे केले ना की चार भाट त्यावर पंचारती करायला सिद्धच असतात. मुग गिळून गप्प बसलं ना की लोक "आऊट डेटेड" म्हणतील अशी अनामिक भीती असते. पुलं नी हे वर्णन पुणेकरांसाठी केलं होतं पण मी तेच सर्व माझ्यासह भारतीयांना लावतो. मग ते कुठेही जन्माला येवोत वा कुठेही स्थित असोत.

एकंदरीत लेखाचा आशय हा कोणासही सहज पटण्यासारखा आणि पटकन स्विकार करण्यासारखाच आहे. जो विरोध करेल किंवा नाराजी व्यक्त करेल तो एक पुणेकरच. विषयाची मांडळी सुद्धा मुद्देसूद व भावूक पद्धतीने; त्यामुळे वाचकांच्या हृदयाला हात घातला नाही तर नवलच! हा लेख जर निबंध स्पर्धेत गेला तर चांगले गुण मिळवल्या शिवाय राहणार नाही.

माझे व्यक्तिगत मत विचाराल (माहीती आहे, कोणीही विचारलेले नाही.) तर थोडे भिन्न आहे. दारू, मद्य, समाज, संस्कृतीची ऱ्हास आणि भविष्यावर त्याचा होणारा परिणाम या सर्व बाबी ज्या पद्धतीनं मांडल्या गेल्यात ते तितकसं मला तरी पटलेलं नाही. मी स्वत: मद्यपान न करणारा तसेच मांसाहार न करणारा असलो तरी जे करतात ते वाईट किंवा संस्कृतीहीन असा विचार करणं योग्य नाही. जरी काही वर्षां पुर्वी माझेही बहुतांशी विचार लेखिके सारखेच होते तरी कालानुरूप मत बदलले आहे.

ज्या बातमी संदर्भात लेख आहे त्याची मला सुतराम कल्पना नाही. पण एकंदरीत असं वाटतं, विषयाला फारच गंभीर स्वरूप दिलं गेलंय. एका घटनेवरून समस्त समाज अराजकते मधे जात नाही. काहीतरी आणि कधीतरी गोष्टी घडत राहणारच. जशा वाईट घटना घडतात तशा चांगल्या सुद्धा घडतात. या इंटरनेट, टिव्ही च्या माध्यमातून सर्व जग जवळ आलंय, त्यामुळं या घटना अंगावर येणाऱ्या भासतात. पण तसं वाटून घ्यायचं नाही. जो पर्यंत आपली सदसद विवेक बुद्धी जागृत आहे तो पर्यंत कोणतेच भय बाळगण्याची गरज नाही. जर आपण आपल्या पुढच्या पिढीला व्यसनाधिनता काय असते आणि त्याच्या अतिरेकाचे दुष्परिणाम काय असतात हे समजावू शकलो तर भीती उरणारच नाही. माहीती आहे की हे इतकं सोपं नाही. बाहेर जगात खुणावणाऱ्या व भुलवणाऱ्या गोष्टी खुप आहेत. ज्या त्याना सहज पथ भ्रष्ट करू शकतात. तरी आपण सर्वतो प्रयत्न करीत राहणे हाच उपाय आहे. नुसतंच अस्वस्थ होऊन काय साध्य होणार आहे.

मद्यपानाने अख्खी पिढी वाया जाण्याची शक्यता अजिबात नाही. अजूनही सुजाण पालक बरेच आहेत जे स्वत: पित असले वा नसले तरी मुलाना योग्य गोष्ट योग्य वयात करण्याचं ज्ञान देत असतात. जर आपण तसे करीत नसाल तर तसे करणे जरूरीचे आहे. जसे आपण लहान मुलाला गॅस व लाइटर पासून दूर ठेवतो तसेच मदिरेचे पण आहे. उगाच त्याचे उदात्तीकरण करून कोणी वाॅटर बाॅटल मधे बीयर का देत नाही असं विचारणं चुकीचे ठरेल.

लिमीट मधे पिणाऱ्यांचे समर्थन नव्हे पण त्यांचा मुद्दा असा की ते क्वचित प्रसंगी जरी पित असले तरी ते त्या द्रव्याच्या अधिन जाऊन स्वत:वरील नियंत्रण घालवत नाहीत. मित्र किंवा सहकर्मचाऱ्यां बरोबर प्रसंगाने पिणे हा काही गुन्हा होऊ शकत नाही. कदाचित किक बसणे आणि स्वत:वरचा ताबा घालवणे या दोन भिन्न घटना असतील. सोप्या भाषेत बोलायचे झाले तर जे लोक पहिल्या घटनेनंतर थांबतात ते लिमीटमधे आणि ज्याना दुसऱ्या घटनेनंतर थांबावं लागतं ते अनलिमीट बेवडे. मी या क्षेत्रात तज्ञ नसल्याने माझे हे शब्द प्रमाण म्हणून घेऊ नयेत. कशासाठी पितात याचे फारच कुतूहल असेल तर एखाद्या वाचकाने स्वत:च प्रयोग करून पहावा. जर प्रश्नाचे उत्तर सापडले तर लेखाच्या काॅमेंट मधे टाकावे.

नशा ही कायमच जीवंत मनाला हवी हवीशी असते. कोणी गायना मधे शोधतो तर कोणी वाद्यामधे, कोणी अधात्म्या मधे तर कोणी खेळामधे. जिथं माणसाला नशा होते तिथं तो सर्वस्व देतो. त्या नशेत असताना त्याला सुख दु:ख राग लोभ सर्व गोष्टींचा विसर पडतो. मद्याची या सर्व गोष्टींशी बरोबरी करणं मनाला पटणार नाही पण त्याचा परिणाम क्षणैक असेलही पण तसाच आहे. कोणत्या कारणासाठी मद्यपान करावं हा प्रश्न त्रयस्थाला पडणं गरजेचे नाही.
(हा खरंतर भाग १ होता. पण तो या पुर्वी आलाच नाही.)

शिनु said...

पुन्हा एकदा प्रतिक्रियेसहित स्वागत.

हा पहिला भाग आधी आलाच नव्हता त्यामुळे तो झळकला नाही. असो देर आए दुरूस्त आए.

प्रत्येकाचं एखाद्या गोष्टीवरचं मत हे आजुबाजूला घडणाऱ्या घटनांवरून बनत असतं. हे नैसर्गिक आहे. ज्याचा जसा अनुभव त्याचं तसं मत.

दारू पिणं हा काळजीचा विषय असण्यापेक्षाही लहान वयातली मुलं दारू पिऊन गाड्या चालवतात आणि मग बहुतेकवेळा जे होतं ते आहे. हा तत्कालीन संदर्भ आहे.

आपली मुलं आपण सुजाणपणे वाढवूच पण आजूबाजूला जे चित्र सर्रास दिसतंय ते नजरेआड करता येत नाही ही खरी कोंडी.
वाॅटरपार्कमधे 10-12 वर्षाचा मुलगा झिंगून अर्वाच्य वागताना पाहिला की होतो त्रास.
अगदी आपल्या परिचयातल्या व्यक्तीचा नववी दहावीला असलेला मुलगा बेदरकार गाडी चालवत अपघात करतो हे समजल्यावर होतो त्रास

असो. भान आणि जबाबदारी हे संस्कारांसोबत दिले पाहिजेत यावर मी ठाम आहे