चाळ नावाची वाचाळ वस्ती…..

मुंबईच्या या चाळी म्हणजे ऐंशीच्या दशकापर्यंतच्या मुंबईच्या अंगा खांद्यावर बागडणार्‍या चिमण्या होत्या. अखंड चिवचिवाट करणार्‍या, इथले सार्वजनिक उत्सव, लग्नं समारंभ आणि हो भांडणंही सगळंच सुरस. याचं जिवंत चित्रण करणारी चाळ नावाची वाचाळ वस्ती  ही मालिका तेंव्हा दूरदर्शनवर लागायची. या चाळ नावाच्या भागडीनं मनात कधी घर केलं कळलंच नाही.






मुंबईची दुसरी आणि पक्की ओळख म्हणजे इथल्या चाळी. आम्हा सांगलीकरांना म्हणजे बच्चेकंपनीला चाळ हा प्रकारच माहित नव्हता. कारण सांगलीत एकतर सगळी बैठी घरं. कॉंक्रिटच्या गच्च्या आणि गुळगुळीत गिलावे असलेले बंगले किंवा उतरत्या मंगलोरी कौलांची एक दोन खोल्यांची घरं, गावभागात असणारे जुनेपुराणे वाडे आणि या वाड्यात पिढ्यानुपिढा रहाणारी भाडेकरू मंडळी. पण घर म्हणजे थोड्या फ़ार फ़रकाने असंच चित्र. बैठं. घरापुढे गुळगुळीत अंगण ज्यावर सकाळ संध्याकाळ सडा मारायची पध्दत होती आणि जितकी जागा असेल त्या प्रमाणात घराच्या चारी अंगांनी असणारी नारळ, पेरू आंब्याच्या झाडापासून पासून कण्हेरी, मोगरा, गुलाबाचे ताटवे आणि हो प्रत्येक घरात अगदी हटकून असणारी तुळस. मुंबईची मात्र तर्‍हाच निराळी. इथं बैठी घरं नसतातच असं त्यावेळेस वाटायचं एकतर वाड्या असतात किंवा चाळी आणि त्याही गंमतीशिर आडनावाच्या. आणि इथल्या घरांना मजले नाहीत तर “माळे” असतात आणि इथली घरं म्हणजे “खोली” किंवा “रूम” असते शिवाय तिला नंबरही असतो. असं सगळं अजबच होतं मुंबईचं प्रकरण.  खरं तर चाळी पुण्यातही होत्याच आणि हो, अगदी आमच्या सांगलीतही होत्या पण आम्हाला मात्र चाळ ही फ़क्त मुंबईतच असते असं तेंव्हा खात्रीनं वाटायचं.
आमचं मुंबई दर्शन बहुतेक करून मोठ्या काकांच्या किस्स्यांतूनच व्हायचं त्यामुळे काकांची मुंबई तीच खरी मुंबई असंच समिकरण कित्येक वर्षं होतं. काका भाड्यानं रहायचे आणि त्यांचे पत्तेही सतत बदलायचे. एखाद्या दुपारी पोस्टानं पिवळं कार्ड यायचं ज्यावर त्यांचा बदलेला पत्ता असायचा, तो पत्ता वाचताना मजा यायची कारण चाळीचं नाव. आम्ही तेंव्हा फ़ार कॉलरटाईट करायचो आणि दोस्तमंडळीत सांगायचो की आमचे मोठे काका मुंबईत अमूक चाळीत रहातात कारण तेंव्हा आजूबाजूच्या घरातून मुंबईला रहाणारं नातेवाईक कोणी नव्हतं. पुणं म्हणजेच एकदम भारी स्टेटस आणि मुंबई म्हणजे तर काय विचारायलाच नको आणि आमचे तर दोनही शहरात नातेवाईक विचार करा दोस्तमंडळीत काय रूबाब असेल , असो. तर मुंबईच्या या चाळी म्हणजे ऐंशीच्या दशकापर्यंतच्या मुंबईच्या अंगा खांद्यावर बागडणार्‍या चिमण्या होत्या. अखंड चिवचिवाट करणार्‍या, इथले सार्वजनिक उत्सव, लग्नं समारंभ आणि हो भांडणंही सगळंच सुरस. याचं जिवंत चित्रण करणारी चाळ नावाची वाचाळ वस्ती  ही मालिका तेंव्हा दूरदर्शनवर लागायची. या चाळ नावाच्या भानगडीनं मनात कधी घर केलं कळलंच नाही.
हळूहळू बदलत्या मुंबईनं कात टाकली आणि चाळकरी लोक चाळीतल्या खोल्या विकून दूर पार कल्याणच्या पलिकडे आणि विरार वगैरे भागाकडे ऐसपैस (चाळीच्या तुलनेत) ब्लॉक मधे रहायला जाऊ लागले. कॉमन संडास आणि कॉमन नळ, त्याला लावाव्या लागणार्‍या रांगा आणि त्यापायी होणारी युध्दं यापेक्षा आपल्याच स्वत:च्या घरात असणारं इंडियन टॉयलेट आणि स्वयंपाकघरातल्या नळाला भलेही दिवसातून ठराविक वेळ येणारं पाणी ही अक्षरश: सुखाची परिसीमा होती. हळूहळू बर्‍याचशा चाळी पाडून त्याठिकाणी सदनिका उभ्या करण्यात आल्या. आजही बर्‍याच चाळी तग धरून आहेत पण कशा? तर घरात एखादं म्हातारं माणूस असतं नां ऐंशीचा टप्पा ओलांडलेलं, सुरकुतलेलं शरीर, डोळ्यात आठवणी भरून शून्यात बघत बसलेलं, सगळ्यात गोतावळ्यात असूनही वेगळं भासणारं…तशा. आजूबाजूला उंचच टॉवरमधे आपलं अस्तित्व टिकवून ठेवलेल्या या चाळी बघितल्या की वाटतं कधी ना कधी, आज ना उद्या या भिंती पाडून इथेही आकाशात झेपावणारे टॉवर उभे रहातील….! काही चाळी आजही चांगल्या टणकपणानं उभ्या आहेत. आजूबाजूच्या नव्या जमान्याच्या टॉवरची पर्वा न करता मस्त टेचात. जेंव्हा जेंव्हा अशी एखादी चाळ दिसते तेंव्हा हात आपोआप कॅमेर्‍यावर जातो आणि हे चित्र बंदिस्त होतं.





 

4 comments:

अमोल केळकर said...

मस्तच लेखन

शिनु said...

welcome on blog amol

thank you.

Yashwant Palkar said...

छान आहे लेख ..
मी पण असाच नावाने लिहिला होता पण थोडा वेगळ्या अंगाने ..
http://dhyanimani.blogspot.com/2013/01/blog-post.html

शिनु said...

ब्लाॅगवर स्वागत यशवंत पालकर.
हो का?
मी नक्की वाचेन हा ब्लाॅग 😊