वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई .......



मिलच्या भोंग्यानी जागी होणारी मुंबई शांत होत गेली. कामगारांना उध्वस्त करणारा, त्यांचे संसार उघड्यावर आणणारं हे दशक मुंबईच्या इतिहासात काळं दशक म्हणून उल्लेखलं जाईल. एक चालती बोलती व्यक्ती एखाद्या लहानशा अपघातात लुळी व्हावी आणि मग हळूहळू कोमात जाऊन मृत्यू यावा तसं झालं.


मुंबई म्हणजे जुहू बीच, मुंबई म्हणजे नरीमन पॉईंट, मुंबई म्हणजे चौपाटी, मुंबई म्हणजे गेट वे ऑफ़ इंडिया.....मुंबई म्हणजे बरंच काही आणि आता पूर्ण पुसली गेलेली ओळख म्हणजे गिरण्यांची मुंबई. कोणे एके काळी मुंबईत लहान मोठ्या शहरातून विशेषत: कोकणातून लोक मुंबईत गिरणी कामगार म्हणून यायचे. इथल्या मिलमधे कामगार बनायचे आणि गाववाल्यांसाठी "मुंबईकर पावने". अशा चाकरमान्याला गावाकडे ग्लॅमर असायचं. इथे घामट गर्दीत रहाणारा गाववाला मुंबईतून गावातल्या येष्टीतून उतरला की डोळ्यावर गॉगल चढवून बॉम्बेवाला व्हायचा. त्याचा रूबाबच वेगळा, पण मिलवाल्यांचं आयुष्यही फ़ार सुखाचं होतं असं नाही. त्यांचे वेतनाचे प्रश्न, बदली कामगारांचे प्र्श्न होतेच. तरिही मुंबईच्या मिल्स ही मुंबईची मुंबईबाहेरची मुख्य ओळख होती. मात्र ऐंशीचं दशक उजाडलं तेच मिलकामगारांसाठी अखेरचा अंक लिहिण्यासाठी. अगदी अचूक पणानं सांगायचं तर पस्तिस वर्षांपूर्वी या मिल्सना घरघर लागली आणि मुंबईची ही एक पक्की ओळख पुसट व्हायच्या पहिल्या अंकाचा प्रारंभ झाला.

मिलच्या भोंग्यानी जागी होणारी,  लूम्स आणि स्पिंडल्सची मुंबई शांत होत गेली. कामगारांना उध्वस्त करणारं, त्यांचे संसार उघड्यावर आणणारं हे दशक मुंबईच्या इतिहासात काळं दशक म्हणूनच बहुदा कायम उल्लेखलं जाईल. एक चालती बोलती व्यक्ती एखाद्या लहानशा अपघातात लुळी व्हावी आणि मग हळूहळू कोमात जाऊन मृत्यू यावा तसं झालं. निमित्त झालं दिवाळी बोनसचं आणि मग त्याचं स्वरूप विक्राळ होत जाऊन मिल कामगारांनी संप करून मिल  बंद पाडल्या. हा ऐतिहासिक संप मोडण्यासाठीचे प्रयत्नही तसेच ऐतिहासिक आहेत. या संपाला अनेक राजकिय पदरही आहेत मात्र यातली काळी बाजू ही की अखेर कामगार हरला,
आज बहुतांश मिल्सच्या जागी मॉल्स, कॉर्पोरेट ऑफ़िसेस किंवा टाऊनशिप उभ्या आहेत. या घरात रहाणार्‍या अनेकांना त्या जागेचं ऐतिहासिक महत्व कदाचित माहितही नसेल. कदाचित त्याच आवारात कधीकाळी कामगारांनी घोषणा दिल्या असतील, संप मोडून काढणार्‍यांनी साम, दाम, दंड भेदाचा वापर करत कदाचित त्याच आवारात एखाद्याला अडचणीत आणलं असेल. ते सगळं जमिनीत गाडून त्याजागी आज उभ्या आहेत वातानुकुलीत इमारती. इथे दु:खाला थारा नाही. सगळ कसं हाय प्रोफ़ाईल आणि एसीच्या हवेतलं थंडगार. विरोधाभास म्हणजे कोणे एकेकाळी ज्या जागेवर दीड दोनशे रूपये पगारवाढ करण्यासाठी आंदोलन झालं आणि ते विविध दबावतंत्रं वापरून चिरडलं गेलं त्याच जागेवर आज लाखो रूपये पगार घेणारे कर्मचारी काम करतात, करोडो रूपये मोजून सदनिका विकत घेतल्या जातात किंवा हजारो रूपये फ़ेकून देशी-परदेशी ब्रॅण्डची महागडी उत्पादनं विकली जातात/ विकत घेतली जातात. स्थान महात्म्य असतं म्हणतात नं? पण ते असं? म्हणूनच परळ भागात फ़िरताना उंचच इमारतींच्या कचकचाटातून जेंव्हा एखादी चिमणी नजरेला पडते तेंव्हा गलबलून येतं. अजूनही या टॉवर्सच्या गर्दीत आपलं अस्तित्व टिकवून असणारी चिमणी कदाचित त्या टाऊनशिपच्या सजावटीचा भाग बनेल पण याच इमारतींच्या पायात अनेक कामगारांच्या मोडक्या संसाराचे उसासे आहेत हे कसं विसरावं?
 

6 comments:

arogya.com said...

Khupach touchy.... masta!

Anonymous said...

Extremely intriguing article....khoop mast lihila aahes ....mill chya bhongyacha awaj agadi lahaanpani aiklela athavto...it used to give feeling of unity . So many people at the same time would hear that sound and say 7 vajle...!
Keep writinh more on mumbai memories!!

शिनु said...

Thank you kirti.

शिनु said...

करेक्ट. मिलच्या भोंग्यावर मुंबईचं घड्याळ चालायचं.
Thank you apurva for visiting the blog and commenting .
छान छान काॅमेण्ट वाचल्या की लिहावसं वाटतं 😊

swayam said...

Best as usual....juni Mumbai cha darshan milta

शिनु said...

Thanks mrudula. Keep visiting 😊