तेरा मुझसे है पेहले का नाता कोई

रस्ते, गल्ल्या, हमरस्ते हे सगळं एखाद्या शहराची ओळख करून देणारं असतं. वाकडे तिकडे, सरळसोट, माणसांनी ओसंडून वाहणारे, गाड्यांनी भरलेले, दुतर्फ़ा नानाविविध गोष्टी विकणारे, कधी नुसतेच कंटाळवाणे पसरट झालेले तर कधी एखाद्या पॉश वसाहतीतून निर्विकारपणे निघून जाणारे. रात्री वेगळेच दिसणारे आणि दिवसा उजेडी वेगळेच भासणारे....
खूप लहानपणी मुंबईत रहाणार्‍या मोठ्या काकांकडून मुंबईची वर्णनं ऐकताना  अनेक गोष्टींनी आश्चर्याचे धक्के दिले होते. त्यातही सर्वात जास्त आश्चर्य वाटायचं ते  इथल्या मान उंच करून बघाव्या लागणार्‍या इमारतींविषयी . कारण एका छोट्याशा शहरात रहाणारी मी, फ़ार तर दोन मजली इमारतीच तोपर्यंत नजरेला पडलेल्या. मुळात आठ आठ दहा किंवा त्याहून उंच इमारती म्हणजे त्या वयात कायच्या काय वाटायाचं. त्यातही काका चाळीत रहायचे त्यामुळे तिथले किस्से ऐकताना हे एक वेगळंच जग आहे असं वाटायचं. लांबलचक चाळींची आणि उंचंच उंच इमारतींची वर्णनं ऐकली की, कशा काय बुवा इतक्या मोठ्या इमारती बांधत असतील आणि लोक कसे रहात असतील असा प्रश्न पडायचा.
    याची देहा मुंबई बघण्याचा योग खूप नंतर आला. मात्र लहानपणापासूनच मुंबई म्हणजे वेगळंच जग असावं असं वाटायचं, आणि  अर्थातच ते आहेही. आज परळ असो की गिरगाव, दादर असो की जुहू, वर्सोवा, इथल्या जुन्या इमारती (ज्या अजूनतरी अस्तित्व टिकवून आहेत) बघताना ऐंशीआणि आधिची मुंबई कशी असेल याची किंचितशी झलक मिळते.
टॉवर्सच्या विळख्यात, पॉश झालेली मुंबई तिची खरी ओळख, खरा चेहरा दिवसें दिवस हरवत चालली आहे. कोणे एकेकाळी व्यापार नावाच्या उन्हाळी खेळात एका चौकोनी तुकड्यावर अवतरलेली मुंबई हीच माझ्यासारख्या नॉन मुंबईकरची मुंबई. आताची मुंबई वेगळीच आहे. कात टाकून नवा चेहरा घेत असताना अजूनही कुठे कुठे या जुन्या खुणा जपलेले मुंबईतले रस्ते पॉश मुंबईपेक्षा जास्त जवळचे वाटतात. अगदी टिपिकल अशा चाळी. रंग उडालेल्या, वर्षानुवर्षं पाऊसपाणी झेलत वाळलेलं काळपट शेवाळं अंगाखांद्यावर मिरवणार्‍या या चाळींच्या खिडक्यांतून वाळत पडलेले आणि खार्‍या दमट हवेवर अलगद उडत रहाणारे रंगीबेरंगी कपडे असोत की गॅलर्‍यांमधून पत्र्यांच्या डब्यातून रसरसून उगवलेली झाडं असोत. चाळीचं तिचं एक या सगळ्यासहित सौंदर्य आहे. कोणाला ते गचाळ चित्र वाटण्याची शक्यता नाकारता येणार नाही मात्र मुंबईचं चित्र गजबजलेल्या चाळींशिवाय आणि  कंपन्यांच्या  धूर ओकणार्‍या चिमण्यांशिवाय कोणे एकेकाळी अधुरं होतं. आज बहुतेक मिल्स बंद पडलेल्या आहे. शब्दश: नावापुरत्या या मिल्सचे कंपाऊंड राहिले आहेत आणि शेकडो कुटुंब चालविणार्‍या मिल्स पाडून त्याजागी उभे आहेत परदेशी ब्रॅण्डची उत्पादनं विकणारे चकचकीत मॉल्स किंवा कॉर्पोरेट ऑफ़िसेस.  मुंबईची ओळखच आता पुसली जाऊ लागली आहे. हे चूक की बरोबर हा विषयच नाही मात्र हळूहळू गायब होणार्‍या या चाळी आणि मिल्समुळे कुठेतरी आत काहीतरी हरवत चालल्याची भावना नक्कीच होते.
                       गेली अनेक वर्षं मुंबईच्या अगदी जवळ बगलेत राहूनही मुंबईशी तसा फ़ारसा संबंधच येत नव्हता. आता मात्र कामाच्यानिमित्तानं अनेक गल्लीबोळ फ़िरत असताना एक वेगळीच मेरीवाली मुंबई मला भेटते आहे. काम बिम हरवून या इमारती बघत भटकणं हा सध्याचा आवडता उद्योग झाला आहे. इथली जुनी मार्केटस, टिपिकल दुकानं, टिपिकल पारशी नावांनी उभी दुकानं, एक छान जुनाटपणा सगळं सगळं कसं प्रेमात पडावं असं. या गल्ल्यांमधून फ़िरताना, तेरा मुझसे है पेहले का नाता कोई, युंही नही दिल लुभाता कोई....असं काहिसं होतंय. हे जुन्या इमारतींचं प्रेम आणि त्यांना फ़ोटोत बंदिस्त करणं आजूबाजूंच्यांसाठी हिचं काही खरं नाही असं वाटण्यासारखं असलं तरिही मला खात्री आहे, या गल्ल्यांशी, जुन्या इमारतींशी माझं नक्कीच काहीतरी नातं आहे.
जीपीएस नावाचं तंत्रद्न्यान आपल्याला आता कोणत्याही गल्लीतला पत्ता सहज शोधून देतं पण कधी कधी ते पत्ता शोधता शोधता अशाच एखाद्या अनोळख्या आणि अजिब गल्लीतूनही नेतं. मागे एकदा ताडदेवला जात असताना ड्रायव्हरनं सांगितलं की नेहमीच्या रस्त्यावर ट्रॅफ़िक दिसतंय. दुसरा रूट घेऊ का? जीपीएसवा सुंदरीनं रिकॅल्क्युलेट करत वेगळ्या रस्त्यावर नेलं. कधीतरी डोळे मिटले गेले आणि डुलकी लागली. डोळे उघडले तर कोणत्या तरी  गल्लीतून गाडी मुंगीच्या पावलानं चाललेली होती. मघाशी डोळे मिटण्यापूर्वी असलेला मोकळा ढाकळा रोड आता माणसांनी गजबजलेला होता. बहुतेक गर्दीनं बुरखे घातले होते किंवा दाढी वाढवून डोकं जाळीदार टोप्यांनी झाकलं होतं. अंगात टिपिकल  पठाणी ड्रेस होते. सर्वत्र उर्दू भाषेतले बोर्ड आणि परिचीत हिरवा रंग. कुठे आलोय


 काही कळेचना आणि मेंदूनं पटकन नोंद घेतली ती रस्त्याच्या बाजूनं असलेल्या प्रचंड मोठ्या ड्रायफ़्रूट विक्रीच्या होलसेल दुकानांनी. माझ्यासाठी ही नवलाईची गोष्टच होती. इतकी प्रचंड मोठी ड्रायफ़्रूट मार्केट माझ्या टप्प्यातल्या परिसरात होती आणि मी याबद्दल काहीच ऐकलेलं नसावं? दुकानांच्यावरच्या पाट्या वाचत परिसर कोणता आहे याचा अंदाज घेतला तर आम्ही मुहम्मद अली रस्त्यावर जीपीएस सुंदरीच्या कृपेनं अडकलो होतो. दुकानांच्या वरून नजर फ़िरत असतानाच सिग्नलला समोर आली ही ईमारत. हात आपसूक मोबाईलच्या कॅमेर्‍यावर गेला आणि ही फ़्रेम कैद झाली. हा काही पहिलाच प्रसंग नव्हता. याहीआधी अनाहूतपणे अशा अनेक इमारतीनी फ़ोटो काढायला भाग पाडलं होतं. सुरवात कुठून झाली, पहिला फ़ोटो नेमका कोणता हे आता आठवतही नाही. मात्र परवा फ़ोटो गॅलरी स्वच्छ करताना पुन्हा एकदा या सगळ्यांवर नजर पडली. डिलिट करवेनात आणि त्यांचं काय करावं हेही सुचेना. या इमारती, या गल्ल्या काहीतरी सांगू पहातायत, त्यांच्यात एक गोष्ट दडलेली आहे असं नेहमी वाटत रहातं. कसं लिहायचंय आणि काय लिहायचंय काही ठरलं नाहीए , बघुया कसं कसं जमत जातंय. ये है बॉम्बे मेरी जान मालिकेतली ही पहिली इमारत, पहिला रस्ता. याल नां माझ्यासोबत या गल्ल्यांमधून भटकायला? बघुया कोणती मुंबई सापडते. :)



 

6 comments:

Sangitha Aanand said...

As usual a very nice read Shilpa,a very simple topic made interesting! Mumbai se mera tau bahut gehra nata Hai...remembering my days spent there.

शिनु said...

thank you Sangitha. many more to come keep reading...inspiring :)

meg said...

Faarach mast sair karvun aanlis mumbai chi.... vachta vachta mi pan tya rastyanvar harvun gele...

entertaining n thoughtful.. both at the same time is the speciality of ur writing...

Mumbai darshan karayla awadel nakkich tuzya najretun.

swayam said...

Athvanitli Mumbai ani kat takleli Mumbai...hya doghincha pratyaksh darshan.....te pan ghar bbaslya....khoop sunder ......making nostalgic

शिनु said...

धन्यवाद मेग.
ही सेरिज लिहायला घेण्याचं कारणच तू आहेस. किमान व्हर्च्युअल भटकंती तरी एकत्र करून येऊ :)

शिनु said...

धन्यवाद मृदुला

ब्लॉगवर स्वागत :)

वाह! अशा छान छान प्रतिक्रिया आल्या की लिहिण्यातली मजाही दुप्पाट होते.