सोमणकाका


भुकेल्यावेळेला गरमा गरम अन्न समोर यावं याहून दुसरं सुख नाही, ते अन्न प्रचंड रूचकर असावं हा तर कळस आणि असं अन्न कोणीतरी पाटावर बसवून आयतं आग्रह करकरून वाढावं हा तर सुखाचा परमावधी. बायकांच्याबाबतीत तर अगदी "होय्योहोय्यो"च. दरवर्षी सुट्टीसाठी सांगलीला गेलं की हे सुख अवघ्या हाकेच्या अंतरावर उभं असतं. नरसोबाच्या वाडीला दत्तदर्शनला जायाचं जायाचं म्हणत जाण्याचं आणखी एक कारण आहे इथलं "सोमण भोजनालय". देवदर्शन झालं की सोमणांकडच्या पंगतीला जाऊन बसायचं हे एक रूटिन झालंय. कसलाही बडेजाव नाही की चकचकीत भांड्यांचा देखावा नाही. साध्या ताटांमधून अगदी घरगुती पध्दतीचं सात्विक जेवण मात्र अगदी वाफ़ाळतं ही सोमणांची खासियत आहे. दहाच्या पहिल्या पंगतीला जा नाहीतर दोनच्या शेवटच्या, प्रत्येक पंगतीत वाफ़ाळता वरणभात आणि तव्यावरचीच गरम पोळी ताटात येते. रोज घरात जेवतो तेच वरण भात, आमटी, भाजी, पोळी कोशिंबिरीचं जेवण पण त्याला चव अगदी खास माहेरच्या घरातली. (यासाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत, म्हणजे माहेरच्या पाण्यातच अशी चव की आई, आजी, मावशी कोणिही पाण्याला फ़ोडणी घातली तरी खाणार्‍यानं ओरपून खाल्लं पाहिजे [ विशेष सूचना-नवरेमंडळींनी याच्याशी सहमत असलंच पाहिजे, पुढच्यावेळेस वाटीतल्या पाण्यात डाळ असावी अशी इच्छा असेल तर]) वाडीला जायचं आणि स्वीट डिश म्हणून इतर काही खायचं याला काही अर्थ नाही. इथे गोड या शब्दाला समानार्थी शब्द आहे, बासुंदी/खवा. वाटी उपडी केल्यावरही क्शणभर विचारकरून ताटात पडते अशी घट्ट बासुंदी....अहाहा महाराजा जिभेचं कैवल्य हो! दुसरं म्हणणं नाही. आता तुम्ही म्हणाल की यात वेगळं काही नाही सगळ्या घरगुती खानावळीत असंच घरगुती जेवण मिळतं. पण थांबा इतरत्र आणि सोमणकाकांचं भोजनालय यात एक मोठ्ठा फ़रक आहे.स्वत: सोमण जातीनं ताटं वाढत असतात आणि अगदी आगत्यानं जेवू घालतात. आग्रह करकरून जेवायला वाढणारा हॉटेलवाला मी तरी अजुनही कोठेही पाहिलेला नाही. (हे जर अनप्रोफ़ेशनल वागणं असेल तर मी म्हणेन काका तुम्ही असेच अनप्रोफ़ेशन रहा)खरं तर त्यांना हॉटेलवाला किंवा खानावळवाला म्हणणंच चुकीचं आहे. ते फ़क्त "वाडीचे सोमणकाका" आहेत. अर्थात काका या शब्दावर जाऊ नका तसे काका म्हणण्याइतके ते वयस्कर नाहीत पण हे प्रेमाचं संबोधन आहे.
गेल्या गेल्या दारातच "तुमची किती माणसं" असं चेहर्‍यावर हसू आणून विचारतात आणि मग सांगतात,"दर्शन झालं? नाही नां, मग दर्शन करून या तोवर तुमची पानं तयार ठेवतो." हे ही वेटिंगच पण सांगण्याची पध्दत किती घरगुती! लोकंही इकडे तिकडे न बघता, त्यांच्या दारातल्या कट्ट्यावरच मस्त गप्पा जमवून बसतात. आपला नंबर आला की पुन्हा स्वत: सोमण आपल्याला बोलवायला येतात. पानावर माणसं बसली की स्वत: वाफ़ाळता भात वाढत प्रत्येकाला आवर्जून पोटभर जेवायची "तंबी" देतात. "काका पोटभर जेवा. आधीच उशिर झालाय आता निवांत खाऊन घ्या", "ताई आजच्या दिवस डाएटिंग विसरायचं काय?","मावशी अहो ती बासुंदीची वाटी ताटाबाहेर काय ठेवलीय? घ्या ती ताटात. एका वाटीनं काही शुगर बिगर वाढत नाही. डॉक्टरला सांगू नका पाहिजेतर." "ए छोट्या दंगा बंद आता ताटात लक्श. आईला जेवून द्यायचं आणि ताटात काही टाकायचं नाही. आवडलेलं न लाजता मागून घ्यायचं" हे असं आग्र्ह करकरून ते शेवटच्या घासापर्यंत वाढत असतात. अखेर मन आणि पोट रल्यावर ढेकरासोबत "अन्नदाता सुखी भव"चा आशिर्वाद नकळत येतो. आजपर्यंत शेकडो, हजारोंनी दिलेल्या या पोटभर आशिर्वादामुळे सोमणांच्या दारापुढची रांग कधिही गेलं तरी कमी झालेली दिसत नाही.

तळ टीप- १-सगळं लक्ष जेवणात असल्यामुळे फ़ोटो काढायचा राहून गेला.
२-लेखाला समर्पक फ़ोटो न सापडल्यानं हा लावला आहे.
३-फ़ोटोवरून गैरसमज नसावा. लेखात वर्णन केलेलं जेवण प्रत्यक्षात जेवून आले आहे.
४-प्रकाशचित्र सौ.-one hot stove
 

11 comments:

भानस said...

वा!सोमणकाका झिंदाबाद.नुसत्या वर्णणानेच डोळ्यासमोर सुग्रास जेवण व अगत्यशील सोमणकाका आले. माझी मावशी पन्नासएक वर्षे सांगलीत होती. पण माझा योग दोनतीनदाच आला. आता मुद्दाम यायला हवे.
बाकी," माहेरच्या पाण्यातच अशी चव की आई, आजी, मावशी कोणिही पाण्याला फोडणी घातली तरी खाणा~यानं ओरपून खाल्लं पाहिजे...." यस्स्स्स. माहेरकी बात ही न्यारी...:)

शिनु said...

हो गं हो. अगदी झिंदाबाद झिंदाबाद :)

हेरंब said...

>> वाटी उपडी केल्यावरही क्शणभर विचारकरून ताटात पडते अशी घट्ट बासुंदी....

हा हा हा.. झक्कास...

>> म्हणजे माहेरच्या पाण्यातच अशी चव की आई, आजी, मावशी कोणिही पाण्याला फ़ोडणी घातली तरी खाणार्‍यानं ओरपून खाल्लं पाहिजे..

अगदी सहमत. पण तुम्ही बायका एक गोष्ट विसरता की हल्ली नवरेही त्यांच्या माहेरी नसतात. In fact दोघेही आपापल्या माहेरापासून लांब असतात (म्हणजे सासरीच) .. त्यामुळे माहेरच्या पाण्याची आणि आईच्या हाताची चव वेगळीच याबाबत नवरेमंडळींचंही दुमत नाही :P

अपर्णा said...

फ़क्कड गं एकदम..अगदी नास्तिक पण दर्शनाला नाहीतर सोमणकाकांच्या खानावळीला जाईल...(आता म्होरल्या ट्रिपेत ह्ये येक टाकावंच लागनार बगा...)
आणि ते माहेरचं पाणी काय सांगु गं तुला....आठवणीसरशी डोळ्यातच पाणी आलं बघं..दृष्ट काढुन टाक या पोस्टची...

आनंद पत्रे said...

>> वाटी उपडी केल्यावरही क्शणभर विचारकरून ताटात पडते अशी घट्ट बासुंदी....

हेरंबाशी सहमत... झक्कास वर्णन... मजा आली वाचुन...

meg said...

Pudhchya varshichya suttit maza ek paan rakhun thev ga soman kakankade!

शिनु said...

@ हेरंब
हो नां बरब्बर बोला है.


आपापल्या आयांच्या हातचं पाणी म्हणजे क्या बात है :)

शिनु said...

अपर्णा...अगं मी सुध्दा इतकी देवभो्ळी नाही. मला कोल्हापूरच्या अंबाबाईला जायला आवडतं कारण बाहेर तिखट मठ लावलेले आवळे मिळतात, टिटवाळ्याच्या मंदिराबाहेर चिन्या मिन्या बोरं,्मीठ लावलेली कैरी आणि चिंचा मिळतात :p

शिनु said...

आनंद...खरखरच तिकडची बासुंदी प्रचंड दाट असते....:)

Shilpa said...

Good one.. वाडीला इतक्या वेळेला गेले पण सोमन काका बद्दल माहित नवत..मुद्दाम खाण्यासाठी जाते एकदा. लेख एकदम झक्कास!

शिनु said...

@ shilpa
ब्लॉगवर स्वागत शिल्पा. :) आवर्जूदिलेल ्याप्रतिक्रीेबद्दल धन्यवाद.