नमकीन



काही काही सिनेमे कादंबरी वाचल्याचा फिल देतात. असाच छान अनुभव देणारा सिनेमा म्हणजे  १९८२ साली प्रदर्शित झालेला गुलजार दिग्दर्शित "नमकीन". #namkeen

चित्रपटात मुख्य भूमिकांत वहिदा रेहमान,  शर्मिला टागोर, शबाना आझमी, किरण वैराळे आणि संजीव कुमार आहेत.

गुलजार यांच्या शायरीमधे नेहमी "भेटणारं" , दूर कहीं टिमटिमाती रोशनी से खामोश पहाडी गांव या गोष्टीत मुख्य सहाय्यक भूमिकेत आहे.

यातली गोष्ट, यातली पात्रं आणि प्रसंग फिल्मी नाहीत. ती वास्तवात असूच शकतात म्हणून ही गोष्ट एक चूटपूट लावत मनात घर करते.

ही गोष्ट जिथे घडते ते एक छोटसं, शांत, निवांत पहाडी गाव आहे. इथले शेळ्या चरायला नेणारे लोक मनानं निरागस आहेत. डोक्यावर ओढणी असणाऱ्यां स्त्रिया असण्याचा  तो काळ.  आजच्यासारखा सहा पदरी हायवेंचा आधुनिक काळ नाही. तेंव्हा डोंगरातून नागमोडी वळणं घेत रस्ते गावं जोडत जात. अशाच एका रस्त्यावरचं हे गाव. रहदारीतला एक ट्रक आणि त्याचा ड्रायव्हर  गेरूलाल (संजीव कुमार). रहायला घर शोधत या गावात येतो. सिनेमाची सुरवातच या शोधातून होते. त्याला घर दाखवणारा धनीराम त्याला म्हणतो,"कौन सा तुम शादी के लिए घर देखने जा रहे हो, चार दीवार खड़ी कर उस पर छत डालो, हो गया मकान तैयार।" त्याच्या अशा सांगण्याला कारण आहे ज्या घरात गेरूलाल रहाणार आहे त्या कुटुंबाची परिस्थिती. या कुटुंबात चार स्त्रियाच रहातात. एका जुनाट जीर्ण घरात ज्योती अम्मा (वहिदा) आणि तिच्या तीन तरूण मुली, निमकी, मिठ्ठू, चिनकी रहातात. कोणे एके काळी ज्योती नर्तकी असते आणि सारंगीवादकासोबत लग्न करून तीन मुली पदरात घेऊन  या पहाडी गावात गरिबीत रहात असते. तीन तीन तरूण मुली असणारी आई जशी असू शकते तशीच ती आहे. सगळा गाव या चार स्त्रियांच्या कुटुंबाला चोच मारायला टपलेला असताना धनीसारखा सज्जन मात्र त्यांच्या पोटपाण्यासाठी एखादा चांगला भाडेकरू शोधत असतो. योगायोगानं गेरूलाल या घरात येतो आणि हळूहळू या कुटुंबात मिसळून जातो.  त्याचं निमकीवर (शर्मिला) प्रेम जडतं मात्र वयानं आणि अनुभवानं वडील असलेली निमकी गेरूलालला मिठ्ठूशी (शबाना) लग्न करायचा सल्ला देते. बहिणीचं आयुष्य मार्गी लागावं आणि तिला आवडणारा मुलगा तिला मिळावा हा उद्देश. मात्र गेरूलाल याला मान्यता देत नाही आणि या कुटुंबाच्या आयुष्यातून, त्या गावातून निघून जातो. पुढे काही वर्षांनंतर एका नाटक मंडळीत त्याला नाचणारी चिनकी भेटते. ती आता वडिलांसोबत नाचून पैसा कमवत असते. तिच्याकडून उरलेल्या तिघींबाबत अर्धंमुर्धं कळल्यानं गेरूलाल पुन्हा एकदा त्या गावी जातो. त्या आणखिनच पडक्या झालेल्या जुनाट घरात आता उरलेली असते एकाकी निमकी. 


काळ बदलला असेल, वरवर बघता बर्‍याच सुधारणाही झालेल्या असतील मात्र आजही तीन तरूण पोरींच्या आईचा जिवाचा घोर तोच आहे. आजही अशा वय वाढलेल्या अविवाहित मुली समाजाला चोचा मारायला आवडतात. 

माझ्या आजीला सात मुली त्यामुळे तिचा तो घोर मला ज्योतीच्या जवळचा वाटतो. पटकथा, संवाद, गीतं आणि दिग्दर्शन गुलजार यांचंच आहे आणि त्याकाळी हा काळाच्या पुढचा सिनेमा होता. यातल्या चारही वुमनिया मनानं कणखर आहेत, विचारानं स्वतंत्र आहेत. स्त्रीमुक्तीचे ढोल न वाजवताही आयुष्यानं दिलेल्या अनुभवातून शिकत आपापल्या मार्गांवरून जाणाऱ्या आहेत.


सहसा पोस्टला पोस्टर लावायचा रिवाज असला तरिही मला गाणं जोडण्याचा मोह आवरता येत नाहिए. याचं कारण यातली गाणी खूप सुंदर आहेत आणि दुसरं म्हणजे पोस्टसोबतचं जे गाणं आहे त्यातला निरागस अस्सल ग्रामीण मूड मला फार आवडतो. तुम्हालाही. नक्की आवडेल.

https://youtu.be/slveXAZ4Jzc


#sharmila

#shabana

#kiranvairale

#sanjeevkumar

#gulzar



 

मेक्सिकन बिन राईस व्हाया पुणे

माझी धाकट जाऊ चवीचं खाणारी आणि कौतुक, हौस, प्रेमानं खाऊही घालणारी. सतत नविन काहीतरी करण्याची आवड असणारी. पूर्वी पुण्यात रहायची तर आमच्या सतत वाऱ्या होत. दर वारीत नविन काहीतरी पोटात जायला वाट बघत असे. अशाच एका वारीत हा राईस खाल्ला आणि वन मील डिशच्या माझ्या मेन्यूत कायमचा आला.  आठवणींच्या पानावर आज ही रेसपी अपनोंकी याद में





आपल्या राजमा चावलचा मेक्सिकन भौ असणारा हा भाताचा प्रकार अनेक कारणांसाठी मला आवडतो. एकतर यात तेलाचा वापर ना के बराबर, दुसरं कच्च्या भाज्या सढळ हातानं , तिसरं फार वाटणी घाटणी नाहीत आणि महत्वाचं म्हणजे (मला वाटतं म्हणून) पोटाला अगदी लाईट लाईट.

 यातले मुळात वापरले जाणारे एकदोन घटक मी बदलले आहेत.

 पदार्थात नाही पण पोस्टमधे नमनाला घडाभर तेल गेल्यावर मूळ मुद्द्यावर यायला हरकत नाही. तर, आधी शास्त्रानुसार साहित्य- सलाडसाठी- सर्व रंगांच्या सिमला मिर्च्या, कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, लेट्यूस, ओरेगॅनो.


चटणी/ कोथिंबीर/ सालसासाठी- दोन अवाकाडो (किंमत न बघता घ्यावीत, उगाचच बै गं किती महाग असं वाटायला नको) मल्टीपर्पझ सिझनिंग, कांदा हा उगंच मधेच येईल इतपत. त्याची चव आणि लुडबुड मर्यादित असायला हवी


भात- शक्यतो बारीक चणीचा तांदूळ (दिल्ली राईस वगैरे राक्षसी आकार नजाकत घालवतात), ऑलिव्ह किंवा सूर्यफूल तेल चमचाभर (हे आपलं उगाचंच हं.  खरंतर कोणतंही तेल चालेल. पण सध्या माझ्याकडे हे आहे हे एक आणि दुसरं रेसिपीला वजन यावं म्हणून) (तेल अज्जिबात नको म्हणणार्‍यांनी भात सुटा शिजवण्याचं कौशल्य आत्मसात करावं ) बाकी चवीत तेलाचा काहीही संबंध नाही.


राजमा साठी - मूळ रेसपीत फिकट पांढरट गुलाबी ताजा कोवळा राजमा वापरतात. तो सगळ्या सिझनमधे मिळत नाही म्हणून मग आपला पंजाब दा पुत्र लाल राजमा फार विचार न करता घ्यावा, तो भिजवावा आणि मग आटोपशीर शिजवावा. आपल्याला भातात राजमा "दिसायलाच" हवाय त्यामुळे भरमसाठ शिट्यांनी त्याचं पिठलं करण्याचा मोह टाळा.


क्रीम , जे मूळ रेसपीमधे आहे. मी त्याऐवजी आंबट नसलेलं घट्ट दही वापरते. तुम्ही काहीही वापरा.


सर्व घटकांत घालायला चवीपुरतं मीठ.


आता कृती जी अजिबातच कृतीसारखी नाही. पण सांगते.

तर सगळ्या शिमला मिरच्या एकदम बारीक चिरून घ्या. ज्यांच्याकडे कडरंग आहे त्यांनी त्याचा लाभ घ्या (कडरंग = चाॅपर), कोथिंबीरही बारिक चिरून घ्या,  हिरव्या मिरच्या एकदम बारीक चिरून घ्या. हे सगळं त्यात ओरैगॅनो घालून एकत्र करा.

अवोकाडोची साल काढा (हे फार सॅटिसफाईंग काम आहे. करून बघा. ) तो गर गरगटून त्यात कोथिंबीर ,मिरची, मीठ आणि खूप घट्ट असेल तर किंचीत पाणी घाला.


क्रिम किंवा दही जे असेल ते किंचित फेटून घ्या


भातात मीठ तेल घालून मोकळा शिजवा (मी राईस कुकर वापरते)


राजमा अंगाबरोबर शिजवा नंतर त्यातलं पाणी काढून टाकून त्यात मीठ घाला.


मूळ रेसपीमधे सर्व्ह करताना राजमा घातला जातो, मी तो शिजला की पाणी काढून शिजलेल्या भातात मिसळून टाकते.


सर्व्ह करणं ही याची खरी कृती आहे.

तर आधी भात त्यावर सलाड, अवोकाडो कोशिंबीर,  क्रीम/दही,  हिरव्या मिरच्या आणि सिझनिंग घालून सर्व करा.


ही झाली शास्त्र नी परंपरेनुसारची कृती. सोप्या भाषेत सांगायचं तर शिमला मिरची कोशिंबीर,  अवोकाडो कोशिंबीर, दही आणि राजमा चावलचा सिझनिंग शिंपडून गोपाळकाला करा.


वाचायला जितकी क्लिष्ट कंटाळवाणी रेसपी आहे तितकी करायला आणि खायला अजिबात नाही.


त.टी. (अत्यंत महत्त्वपूर्ण)

एकुणात कापाकापी, चिराचिरी बरीच असल्यानं साहित्यात ऑफिशियली उल्लेख नसलेला नवरा मदतीला घ्या. नमक स्वादानुसार चालीवर नवरा गरजेनुसार वाचा आणि कामाला लागा.


#मेक्सिकन_बिनराईस

#आठवणीतल्या_रेसपीज

#खमंग_किस्से

 

काऊ कोकताहे

 



कावळा ओरडला की कोणीतरी पाहुणा घरी येतो असं म्हणतात. अंगणात कावळा ओरडू लागला की आजी म्हणायची,'आता कुणाची वर्दी घेऊन आलास मेल्या'. पूर्वीच्या लोकांशी निसर्गाशी असा एक वेगळा संवाद आणि नातं होतं. म्हणजे सकाळी भारद्वाज दिसला तर दिवस शुभ, मुंगूस दिसलं की धनप्राप्ती वगैरे. काही नाती मात्र पनौती विभागात. जसं की, मांजर आडवं गेलं की काम होणार नाही, कुत्रं रडलं की अशुभ बातमी येणार वगैरे. पण कावळा एरवी गोष्टीत कितीही कावेबाज आणि कुजका रंगवला असला तरिही या पक्षाला काहीतरी मानाचं स्थान देऊन टाकलंय. मृत व्यक्ती आणि जीवंत माणसं यातला एक दिवसाचा दुवा म्हणजे कावळा. पिंडाला कावळा शिवणं हे फारच महत्वाचं. कावळा शिवला की गेलेल्याच्या इच्छा राहिल्या नाहीत (असं आपलं म्हणायचं). जसा माणसाच्या 'जाण्यात' याची महत्वाची भूमिके तसाच माणसांच्या 'येण्यातही' महत्वाचा. 

दाराशी येऊन काव काव करत पाहुण्यांचं आगमन अ‍ॅडव्हान्स मधे सांगणारा. हा कोकलून गेला की आपण अंदाज बांधायचे, कोण बरं येईल? आता फोन, वाॅटसएप आणि जास्तीचे एटिकेटस, मॅनर्स वगैरेमुळे अचानक कोणी पाहुणा येईल हे दूर्मिळच झालंय म्हणा पण तरिही कावळ्यानं कर्तव्य सोडलेलं नाही. आपले पाहुणे याला आधी समजतात आणि तो वर्दी द्यायला हजर होतो. आता तो इतका येतो दाराशी तर आपण पण मान द्यायलाच पाहिजे नं? हा मान देता देता एकदा फुकटच एक गमतीशीर गोष्ट लक्षात आली. म्हणजे ती तशीच आहे असं अर्थात वैज्ञानिक किंवा शास्त्रीय दृष्टिकोणातून सिध्द बिध्द झालेलं नाही. पण, फावल्या वेळेत मेंदू अती उत्साहात काम करतो तसं काहीसं झालं. तर हा कावळा जिथे येऊन ओरडतो साधारण त्या प्रकारचे पाहुणे येतात असं निरिक्षण नोंदवलं (बादरायण संबंध न काय). म्हणजे हाॅलला लागून असलेल्या टेरेसमधे ओरडला तर चहापाणी, गप्पावाले उभ्या उभ्या येणारे पाहुणे किंवा जे कोणी येणार ते दोन तीन तासात जाणार.  किचनच्या खिडकीत ओरडला तर जेवायला कोणीतरी येणार  आणि बेडरूमच्या खिडकीत ओरडला तर रहायला येणारं कोणीतरी. कावळ्यानं बिनकामाचा हा चाळाच दिला 


पुस्ती- खरं म्हणजे कावळ्याबद्दल सगळं सांगून झालं होतं पण मग अचानक आठवलं आणि अत्यंत महत्वाच्या कामाला अनुल्लेखानं मारलं असं व्हायला नको म्हणून ही पुस्ती. आता हा शब्दप्रयोग फार वापरला जात नसावा कारण तो वापरण्यासाठी जी गोष्ट करावी लागते ती (सुदैवानं) कालबाह्य होत चालली आहे. तर 'बायकांचं बाहेर बसणं' हे पूर्वी फार काटेकोरपणे पाळण्याची रीत होती. मग व्हायचं काय की, घरातल्या थोरांना बाजूला तांब्या दिसला की कळायचं पण लहानांना तेवढी अक्कल नसल्यानं कळायचं नाही. सवयीनं जेंव्हा लेकरं बाळं त्या 'बाहेर बसलेल्या' बाईला शिवायला जात तेंव्हा ती स्वतः किंवा कोणी घरातली इतर कारवदे, ' घोडे शिवू नको. तिला कावळा शिवलाय'. आम्ही अगाऊ नसल्यानं पुढे प्रश्न विचारायचो नाही पण कुतुहल नक्की वाटायचं. हा कावळा आपल्याला न कधी दिसतो न कधी शिवतो तो बरोबर मधेच येऊन आई, मावशी, आत्ता ताया यांना का आणि कसा शिवतो? (राम नगरकरांच्या रामनगरीमधे हे फार धमाल पध्दतीनं सांगितलं आहे) मुळात हे विचारायची सोय नव्हती आणि विचारलंच तर उत्तराऐवजी रपटा मिळायची शक्यता. एकदा भातुकली खेळताना मात्र माझी एक बहिण खेळातला कावळा शिवून बाहेर बसली. तिकडून जाणाऱ्या आजीनं पाहिलं, तिला कळलं आणि मग आजी फार जोरात पाठीवर शिवली तिला. जळ्ळे मेले खेळ. आयुष्य भर आहेच पुढे कावळा आत्ता धड खेळा म्हणाली. पूर्वीचं सोवळं ओवळं प्रकरण बघता तिची कळकळ बरोबरच होती. 

तर आता चार दिवस या बाईला कामं सांगायची नाहीत हा महत्वाचा संदेशही कावळाच द्यायचा.


#आठवणींचे_पिंपळपान

अलिकडे लाॅकडाऊन मधे हा गायबच झाला आहे. यालाही कळलंय वाटतं हे लाॅकडाऊन प्रकरण. कावळा हा हुशार असतो म्हणतात ते काय उगाच?😉


#काऊच्या_गोष्टी

 

रोचक रंजक सेरीज





गुप्तहेरांचं कार्य हा सामान्य जनतेसाठी नेहमीच कुतुहलाचा विषय असतो. हिंदीमधे अजूनही टायगरछाप फिल्मी कथाच गुप्तहेरकथा म्हणून खपवल्या जातात, नाही म्हणायला राझीनं चांगला प्रयत्न केला होता पण तो अस्सल नव्हता वाटला,  कुठेतरी फिल्मी खोटेपणा जाणवत राहिला होता. #netflix वरची नवी miniseries  #thespy मात्र खराखुरा अनुभव देते. याची कारणं दोन, एकतर हे कथानक सत्यघटनांवर आधारित आहे आणि यातला हेर लेखकाच्या मेंदूतून आलेला  नाही, तर साठच्या दशकात मोसाद या जगप्रसिध्द संघटनेचा तो हेर होता ज्याच्या फाशीनं जगाचं लक्ष वेधून घेतलं होतं.
साठच्या दशकातलं राजकारणही वेगळं होतं आणि परिस्थितीही. 
इस्त्राइली गुप्तहेर Eli Cohen ची ही सिरियामधल्या हेरगिरीची गोष्ट. मुळात ही कथा एका सामान्य कारकुनाची टाॅपचा गुप्तहेर बनण्याची (जो पुढे जाऊन इस्त्रएलचा नॅशनल हिरो बनला) तर आहेच पण गुप्तहेर बनल्या नंतर सिरियामधे ज्या पध्दतीचं काम त्यानं केलं, त्याची आहे. एखाद्या विशिष्ट ऑपरेशन पुरता मर्यादित नसल्यानं अनेक गोष्टी विस्तारानं येतात,म्हणूनच काही ठिकाणी पुनरावृत्ति वाटली आणि रेंगाळल्यासारखं वाटलं तरिही सेरीज पकड सोडत नाही . 
या सेरीजमधल्या अनेक घटना बातम्यांच्या रूपात तत्कालिन वृत्तपत्रातून जगभरात पोहोचल्या होत्याच त्या कथेतून समोर येतात तेंव्हा आणखिन थरारक वाटतं.
सेरीज एका विशिष्ट कालखंडातली असल्यानं ती मोनोक्रोममधे मांडली आहे.  त्या काळातलं रहाणीमान, घरं, शहरं, माणसांचं दिसणं वागणं हे खूपच  बारकाव्यानं मांडल्यानं ही कथा आपल्याला सहजपणे साठच्या दशकात घेऊन जाते .


सहा महिन्याचा तुटपुंज्या ट्रेनिंगआधारे Eli Cohen नं जो काही धुमाकूळ सिरियामधे घातला होता तो भल्या भल्यांना चकित करणारा आहे.
अजिबात चुकवू नये अशी ही सेरीज नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.
 

फसलेली ट्रीप


#सफरनामा

बरेचदा होतं काय, आपण खूप अपेक्षा ठेवून एखाद्या ठिकाणी जातो आणि तिथे पोहोचल्यावर, 'याचसाठी केला होता अट्टाहास?' असा प्रश्न पडतो.

अलिकडेच म्हणजे मे महिन्यात आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून बाजूला रहात असलेला डलहौसी, मॅकलाॅडगंज आणि खज्जरचा प्लॅन केला.
हे करतच होतो तर लगे हात अमृतसर आणि चंदीगढही यात करून घेऊ ठरलं.

अमृतसरचं सुवर्ण मंदिर बाघा बोर्डर चांगलं झालं. हाॅटेलही छान होतं. पण पुढे सगळी ट्रीप हळूहळू घसरतच गेली.

डलहौसीचं रिसाॅर्ट एक नंबर होतं, पण तिथे आम्ही संध्याकाळी पोहोचलो . छान सोसेल इतका म्हणजे आपल्या महाबळेश्वरला  मे महिन्यात असतो तितकाच थंडावा होता. रात्री शेकोटी पेटल्यावर दहा पंधरा मिनिटं मजा आली पण (नेहमीप्रमाणे) एक मोठा गुजराती ग्रुप आलेला असल्यानं बाॅलिवुड डीज्जे ओढणी, पतंग आणि ए हालो...त  अडकला. सुरवातीला जे हात पाय हलवले तेवढेच मग डिनरहाॅल गाठावा लागला .
 तेवढी एकच रात्र राहून पुढे खज्जरला गेलो. (खरंतर इथे जास्त दिवस रहायला हवं होतं ही चूटपूट लागली) खज्जरला बघण्यासारखं गुगलवर जितकं आहे त्याहून 50% टक्केही प्रत्यक्षात नाही. दोन तीन तासात हा प्रकार आटपून धरमशालाकडे निघालो.( थंडीच्या कपड्यांची घडीही मोडावी लागली नाही. मुंबईतले उघडेबाघडे कपडे तिथे चालले इतपत उकाडा होता)
एव्हाना बर्फाचा एखादा तरी सुळका बघायला मिळावा म्हणून जीव तरसला होता. धरमशालामधे रिसार्ट जरा बरं असावं आणि ज्यासाठी आपण मुंबईहून हिमाचल गाठतो तो उद्देश्य सफल व्हावा असं वाटत होतं. पण हाय रे कर्मा! स्टाईलिश नावाचं हे हाॅटेल चक्क एका बंद पडलेल्या माॅलमधे होतं.  तरिही आशा न सोडता चेक इन करून खिडकीचा पडदा उघडला तर बाहेर चक्क कचकच गर्दीची ऑलमोस्ट बकाल वस्तीचा नजारा. मी आणि मुलं उदासपणे बसलेले बघून नवरा जाऊन मॅनेजरशी काही बोलून आला आणि मग दू......रवर एक सुळका दिसणारी खिडकी असणारी रूम मिळाली. फार बरा नजारा नव्हताच पण जे आहे ते आहे म्हणत रूम बदलली. या हाॅटेलमधलं उत्तम जेवण वगळता काहीही चांगलं नव्हतं. अगदीच फ्लाॅप शो. संध्याकाळी सहज चक्कर मारायला बाजारही (मालरोड) नसावा?
दुसर्या दिवशी बहुचरूचित मॅकलोडगंज गाठलं पण यानं चांगलीच निराशा केली.  दुसर्या दिवशी तिथली माॅनेस्ट्री बघितली. एकूण परिसर अस्वच्छ, घाणेरडे खरकटे वास असणारा होता. नाही म्हणायला एक टिपिकल तिबेटी खानपान मिळणारं कॅफे सापडलं आणि जिभेचे चोचले तरी शमले. शिवाय इथलं मार्केटही नेत्रसुखद होतं. तांबा, पितळं आणि पंचधातूच्या छान छान गोष्टी इथे होत्या.
त्यानंतर चंदीगढ गाठलं. पूर्वीही एकदा चंदीगढला आलेलो असल्यानं इथल्या मुक्कामाबद्दल खात्री होती. पण जसजसं गाडीनं गावठाणासारखे रस्ते धरायला सुरवात केली तसं अवसान गळायला  लागलं. शेवटी एकदाचं हाॅटेल आलं (नेहमीप्रमाणे चकाचक नाव आणि तारांकित असलेलं) चेक इन करताना स्विमिंगपूलची चौकशी केली (हॉटेलच्या वर्णनात ते होतं म्हणून) तर असं सांगण्यात आलं की स्विमिंगपूल गोव्यातल्या रिसाॅर्टमधे आहे इथे नाही. रूमचा ताबा घेतला, सवयीनं व्ह्यु पहायला पडदा उघडला आणि उरलं सुरलं अवसान गळलं. छोटू  तर अपेक्षाभंगानं रडायला लागला कारण खिडकीपलिकडे खाली चक्क माॅलमधली शोरूम्स दिसत होती. म्हणजे प्रायव्हसी बोंबललीच. कहर अपेक्षाभंग केला या फाईव्हस्टारनं. वर कळस म्हणजे अत्यंत उर्मट स्टाफ (मराठी माणसांकडे तुच्छतेनं बघणारा एक उत्तरभारतीय वर्ग असतो तो) सर्व्हिसचेही बारा वाजलेले. दुर्दैवाने ट्रीपचा सगळ्यात जास्त मुक्काम याच हाॅटेलमधे होता. कधी एकदा आपलं गाव गाठतो असं झालं होतं. (नंतर इथे येऊन खर्याखुर्या स्टार सर्विस देणार्या आणि खरोखरच चकाचक हाॅटेलमधे राहिल्यावर जरा बरं वाटलं)

कबुलीजबाब😁
-वर उल्लेखलेली सगळीच रिसाॅर्टस, हाॅटेल ट्रॅव्हलट्रीपवर आहेत.
-बुकिंग दरम्यान गळयापर्यंत कामात बुडलेलो असल्यानं एजंट आणि ट्रॅव्हलट्रीपवर विश्र्वास ठेवून केलेली बुकिंग भोवली  होती.
- स्टार हाॅटेल्स ही अंधश्रद्धा आहे की काय? असा प्रश्न पडावा अशी वेळ या ट्रीपदरम्यान आली.
-अमृतसरचं रॅडिसन ब्लु आणि डलहौसीचं grand view एक नंबर. ज्यांना इथे रहायचंय त्यांनी डोळे झाकून बुकिंग करा.
   बुकिंग  टीप्स_ डलहौसी grand view- हे डोंगर उतारावर तीन मजली आहे. तळमजल्यावरच्या रूम्स जास्त चांगल्या आहेत.

तुमचे आहेत असे फसलेले अनुभव? कमेण्टमधे जरूर शेअर करा.
 

गल्ली गणपती आणि सिनेमा



गणपतीसमोर फ़िल्मी गाणीच वाजवायचा तो काळ होता. आतासारखी एका गल्लीत दहा बारा मंडळं नसण्याचा तो काळ होता. अवाढव्य दहा दहाफ़ुटी गणेशमूर्ती हा केवळ काही मंडळांचाच मक्ता असण्याचा तो काळ होता. घरचे गणपती गेले की आप्तेष्ट, नातेवाईकांसोबत सार्वानिक मंडळांचे देखावे बघण्यासाठी प्लॅनिंग करुन रात्र रात्र पायपिट करत ते बघण्याचा सोहळा साजरा करण्याचा तो काळ होता. दुपारी निवडणं टिपणं करत वाड्यातल्या बायका आणि संध्याकाळी ऑफ़िसहून आल्यावर चहा घेत गप्पा मारत शेजारपाजारच्या काकांचा देखाव्यांच्या चर्चेचा तो काळ होता. वर्गणी मागायला आलेल्या दादा लोकांना वडिल हटकून विचारत,”यंदा काय देखावा?” त्यावर दादालोक उत्साहानं माहिती पुरवत आणि वडिल लोक त्यांना तितक्याच उत्साहानं सल्ले देत. घरच्या बायापड्यांचा आणि चिल्लरपार्टिचा जिव्हाळ्याचा प्रश्न असायचा,” यावेळेस पिक्चर कोणते दाखवणार” यावर दादालोक कॉलर जरा ताठ करत यादी देत मग ती नावं ऐकून वर्गणी देणार्‍या गृहिणीच्या डोळ्यात चमक यायची.एका वर्गणीत चारपाच सिनेमे बघायला मिळणं ही चैनच होती.
गणपतीचं हे एक मेगा आकर्षण असायचं. गल्लीत व्हिसीआर वर दाखविले जाणारे सिनेमे. तेंव्हा चर्चेत असणारे, नविन आलेले पिक्चर बघायला मिळणं तेही फ़ुकटात ही सुखाची परमावधी असायची. दुसर्‍या दिवशी शाळेत पेंगुळल्या डोळ्यानं गेलं तरिही डबा खायच्या सुट्टीत, काल आमच्या गल्लीत अमूक पिक्चर दाखवला, आज तमूक पिक्चर आहे , अशा गप्पा रंगायच्या. काही गल्लीत अगदी लेटेस्ट पिक्चर असायचे तर काही गल्लीत जरा जुने. लेटेस्टवाले जरा हवेत असायचे, कॉलर टाईट करुन तर जुनेवाले बिचारे.पण एक होतं,कोणिही कोणाच्याही गल्लीत जाऊन पिक्चर बघू शकत असे. किंबहुना,  पाच दिवसातल्या गल्ली बोळातल्या सिनेमांचं टाईम टेबल बघून कोणत्या दिवशी कोणत्या गल्लीत पिक्चर बघायला जायचं याचं प्लॅनिंग व्हायचं. साधारण नऊ वाजता जेवणं खाणं पटापट आवरुन आधी आम्ही पोरं टोरं सतरज्या, तरट असं काखोटीला मारुन गल्लीत जाऊन मोक्याची जागा पटकावून बसायचो. मागून झांकपाककरुन येणार्‍या आया, मावशा,काकवांची जागा धरुन ठेवणं हा एक मोठा पराक्रम करावा लागायचा, तो वेगळाच. कारण एकतर या बायका कधीच वेळेत यायच्या नाहीत आणि मग दुसरी एखादि काकू येऊ बसायला लागली की,” ओ काकी आमच्या आईची जागा पकडलीय तिथं” असं सांगितलं की ती काकू हमखास चार शब्द सुनवायची. झेपेल तितका डिफ़ेन्स करुन शक्य होईल तितकी ही जागा पकडून ठेवणं हे फ़ारच मोठं पराक्रम करण्यासारखं काम होतं. सिनेमा जस्ट सुरु झाला की या बायका घाईत येऊन गर्दीत जागा करुन बसता बसता विचारायच्या,” कधी झाला गं पिक्चर चालू?” मग मघासची ती आपण जिच्याशी वादी प्रतिवादी खेळून दमलेलो असायचो ती काकू जरा सरकल्यासारखं करत आईला जागा देत म्हणायची,” फ़ार काय नाही, आताच पाट्या पडल्यात’ पण कधी कधी सिनेमा बराच पुढे गेल्यावर जर आई आली तर मात्र तिला आधीची स्टोरी कुजबुजत्या आवाजात सांगितलि जायची,” ही व्हिलनची बाई आहे बरं का… ती झिन्तमान आता येईल बघ… अमिताभच्चनची आई म्हणजे ती निरुपाराय आहे… असं धावतं वर्णन केलं जायचं.
एखादी कोणी आली नसेल तर दुसर्‍या दिवशी दुपारच्या वेळेत भाज्या निवडता निवडता, दुपारची शिवणा टिपणाची कामं करता करता स्टोरी सांगितली जायची. या दुपारच्या स्टोरी टेलिंगची एक मस्त आठवण आहे. झालं काय होतं की, सांगलीत तेंव्हा स्वरुप टॉकीज नव्यानं चालू झाल होतं. त्याकाळातलं ते टकाटक टॉकीज (टाकी) होतं. याचा लाल चुटूक मखमलीचा पडदा सिनेमा चालू होण्या आधी अलगद गोल गोल चुण्या होत वर जायचा आणि सिनेमा संपला की खाली यायचा.सिनेमापेक्षा त्या पडद्याचं आकर्षण जास्त असायचं त्यामुळे आम्हाला तो वर जाण्याआधी खुर्चीवर जाऊन बसायचं आणि तो जमिनीला टेकला की मगच खुर्चिवरुन उठायच असायचं. तर अशा या स्वरुपला लावारीस सिनेमा लागला होता आणि घरी दादांना न सांगताच आई मला घेऊन तो सिनेमा बघायला गेली होती. दादांकडे लुब्रेपणा करशिल तर बघ, अशी ताकीद दिल्यानं मी गप्प राहिले होते पण दादांना सगळं सांगायची सवय असल्यानं मी शेवटी म्हणलंच की, दादा आज आम्ही सिनेमा बघितला पण आईनं तुम्हाला सांगायचं नाही असं सांगितलंय (मुलं निरासग असतात, देवाघरची फ़ुलं असतात वगैरे ) झालं. दादांचे चष्म्यामागचे वटारलेले डोळे आणि आईचे खाली झुकलेले पण नंतर माझ्याकडे खाऊ की गिळू असं बघणारे डोळे मी कधीच विसरु शकणार नाही. दुसर्‍या दिवशी दुपारी अर्थातच लावारिसची स्टोरी हा बायकांचा टॉक ऑफ़ द डे. माझी आई प्रचंड भारी स्टोरी टेलर होती. तिची स्टोरी ऐकली की सिनेमा बघायचीच गरज रहायची नाही. (तेंव्हा स्पॉयलर वगैरे काही मानलं जायचं नाही, कारण मुळात बहुतेकांना सरसकट सिनेमे बघायला जमायचं नाही त्यामुळे दुधाची तहान ताकावर भागवली जायची) तिनं स्टोरी सांगायला सुरवात केली… अमताभच्चन हा जिव्हाळ्याचा विषय असल्यानं बायका हातातले गहू निवडायचे विसरून देहभान हरपून स्टोरी ऐकत होत्या… स्टोरी सुरू झाली आणि मी,” आई… ते सांग नं”…असं हळूच म्हणलं, माझ्याकडे दूर्लक्ष करत आईनं स्टोरी चालूच ठेवली…मी अधून मधून नेटानं, आई… ते सांग नं… असं म्हणत राहिले. शेवटी वैतागून आईनं विचारलंच, “काय?” मी उत्साहात (आईनं हे सांगितलं नाही पण माझ्या लक्शात होतं या रुबाबात) सांगितलं की,” अगं तो पडदा असा…खाली आला… ते राहिलंच नं सांगायचं?” यावर काल आईनं खाऊ का गिळू केलेले डोळे आज गुणाकार होत दहा बारा झाले होते. मला अजूनही कळलं नाहीए की आईसकट सगळ्या काकवांना का बरं त्या दिवशी माझा राग आला होता? तर ते एक असो. बॅक टू गणपतीतले पिक्चर, मिस्टर नटवरलाल पासून सदमा पर्यंतचे सगळे सिनेमे त्या छोट्या पडद्यावर आणि रस्त्यावर तरट पसरुन बघितलेत. ना महागड्या पॉपकॉर्नची फ़ुकटची ऐश न एसीतली गुबगुबीत खुर्ची. उलट बरेचदा गणपतीत थंडी असायची कारण त्यावेळेस ठरलेल्या नक्षत्रांना पाऊस पडायचा. आतासारखा अवेळी आणि उतावळा नसायचा तो. मग थंडी असली की घरुन चादर घेऊन जाऊन ती लपेटून तरटावर बसून नेटानं बघितलेले प्यार झुकता नहीं, परिंदा असे सिनेमे आठवले की आता गंमत वाटते. सिनेमा गल्लित आल्यावर लहानपणी गल्लीत पाहिलेले सिनेमे आठवले आणि लिहिल्यावचून रहावलं नाही

#random_cinematic_memories


 

सिनेमातलं गाव

बरेली की बर्फ़ी,  बद्री की दुल्हनिया, शुभमंगल सावधान, तन्नू वेडस मन्नू, मेरे ब्रदर की दुल्हन, शुध्द देसी रोमान्स या सगळ्या सिनेमात किंवा दिल्ली ६, बेवकुफ़ियां,  वेक अप सिद,  सत्या, मेरी प्यारी सुलू, कहानी  या सगळ्या सिनेमात काही साम्य वाटतंय का तुम्हाला? जरा नीट विचार केला तर लक्षात येईल की, या सगळ्या सिनेमांच्या कथानकातलं शहरही एक "कॅरेक्टर" आहे. महत्वाची भूमिका बजावणारं. त्या त्या शहराच्या लहेजासहित अवतरणारी पात्रं आणि म्हणून पडद्यावर साकारत जाणारं कथानक प्रेक्षक "रिलेट" करायला लागतात. गंमत म्हणजे शहरं त्यांची ओळख दाखवत कथानकात आली ती अगदी अलिकडे. नेमकेपणानं सांगायचं तर नव्वदीच्या दशकानंतर. आत तुम्ही म्हणाल वरच्या उदाहरणातला सत्या तर नव्वदमधलाच आहे. पण अपवाद वगळे तर सिनेमाची गोष्ट ही साधारणपणानं एखाद्या "आटपाट नगरात" घडायची. त्या गावाला, शहराला नाव नसायचं त्याही आधी म्हणजे साधारण सत्तरच्या दशकात तर ठरलेला साचा होता. सिनेमातला "गांव" हा उत्तरभारतीय पेहरावातला असायचा, पात्रांची भाषा उत्तरभारतीय हिंदीशी साधर्म्य दाखवणारी असायची. घागरा चोलीतली नायिका तर हिंदी सिनेमाचं प्रतिक बनली होती. गांव की गोरी म्हणलं की म्हणूनच आजही डोळ्यासमोर येते ती पत्थर के सनम मधली वहिदा, कारवांतली आशा किंवा मधुमतीमधली वैजयंती.
ऐंशीच्या दशकात गांव की गोरी शहरी बनली मात्र तरिही गोष्ट कोणत्या गावार, शहरात घडतेय हे गुलदस्त्यातच राहिलं.  यशचोप्रांचे सिनेमेही एखाद्या ला ला ला लॅण्डमधे घडायचे. (अजूनही त्याच्याच स्कूलमधे तयार झालेल्या करण जोहरचे सिनेमेही असेच अगम्य शहरात घड्त असतात. )  गाण्यातून, कथानकातून कश्मिर, शिमला, स्वित्झरलॅण्ड दिसायच मात्र ते केवळ एखाद्या चित्राची पार्श्वभूमी असावी असं. त्याचा कथानकाशी बरेचदा काही संबंध नसायचा.
नव्वदच्या दशकात तर सगळंच फ़ॅण्टासीलॅण्डमधे घडायला लागलं होतं. मागे एकदा एका मुलाखतीत मसानचा लेखक वरून ग्रोव्हरनं खूप छान सांगितलं होतं, की नव्वदीच्या दशकात बाहेरच्या शहरातून मुंबईत लेखक आले. याआधीही जे होते ते एकतर पार्टीशनच्या काळात आलेले होते, जे डिनायल मोडवरच होते. ज्यांना घडलेल्या घटनाच विसरायच्या होत्या. म्हणून त्यांनी काल्पनिक शहरं उभी केली जिथं बहुतांश सिनेमाची कथानकं घडली. नव्वद सरताना मात्र मुंबईबाहेरचा आणि आपल्या स्थानिक जाणिवा असणारा लेखकवर्ग मोठ्या प्रमाणात मुंबईच्या सिनेमा क्षेत्रात आला आणि येताना आपल्या कथानकांतून तिथली शहरं, तिथलं वातावरण, संस्कृती घेऊन आला. म्हणूनच सुधीर मिश्रा, अनुराग कश्यपचे रांगडे सिनेमे एकदम वेगळे दिसले, विशाल भारद्वाजच्या सिनेमांनी लक्ष वेधून घेतलं. कारण यांच्या कथानकातली गावं ही नावापुरती नव्हती तर ती एक चेहरा घेऊन कथानकांसोबत चालली.
उदाहरणच द्यायचं तर बरेली की बर्फ़ी मधे उत्तर भारतातली घरं, गल्ल्या, तिथले स्थानिक लोक आणि अगदी गाड्यांवर विकले जाणारे पदार्थही सिनेमाच्या रंगात भर घालणारे होते. तर कहानी मधे विद्या बागची कोलकत्त्यात मिशनसाठी येऊन पोहोचते आणि ट्राम पासून मेट्रोपर्यंतचं, दुर्गापूजेसाठी सज्ज असलेलं कोलकता बघताना कथानकाची ऑथेण्टिसिटी वाढवतं.
कथानक नेमकं कुठे घडतंय हे दिसणं फ़ार महत्वाचं आहे. सेटवरच्या बंदिस्तपणापेक्षा जिवंत लोकेशन्सवरचं कथानक जास्ती खुलून येतं. म्हणूनच आजा नच ले मधला नायिकेचा संघर्ष बेगडी वाटतो. कारण असं गावच रिलेट करता येत नाही. माधुरीसारखा हुकमी एक्का असूनही चित्रपट पडण्यामागे जी अनेक कारण आहेत त्यातलं हे एक आहे, कारण संपूर्ण कथानक ज्या गोष्टीभोवती घडतं ते गाव आणि त्यातलं सांस्कृतिक केंद्रच खोटं वाटत रहातं.
तलाशमधली रेडलाईट मुंबई खरी खुरी मुंबई वाटते आणि म्हणूनच तिथल्या मुलिंचं आयुष्यही अंगावर येतं. वेक अप सिद मधे मुंबईत लाईफ़ बन जाएगी असं स्वप्न घेऊन बाहेरचे आणि त्यांच्या नजरेतून दिसणारी मुंबई इतकी सुंदर दिसते की आपल्याच शहराच्या पुन्हा एकदा प्रेमात पडायला होतं.
दिल्ली, मुंबई असो की वाराणसी, बनारस, लखनौ हिंदी सिनेमात ही शहरं, इथल्या  गजबजलेल्या जिवंत गल्ल्या, गर्चीचा भाग असणारे चेहरे, लोकांची बोलायची, जगायची पध्दत सगळं प्रतिबिंबीत होतंय. आठवा तुम्हारी सुलू मधल्या सुलूचं  मुंबईच्या उपनगरातलं अगदी टिपिकल मध्यमवर्गीय घर. छोट्याशा बाल्कनीत झोपाळ्यापासून कुंडितल्या बगिच्यापर्यंतची पूर्ण केलेली हौस. सेफ़्टी डोअरपासून कुकरपर्यंत सगळं कथानकाची पार्श्वभूमी देणारं आणि म्हणूच सुलूचं मध्यमवर्गीयपण ओघात येत जातं आणि पटतंही. एरवी मधल्या काळात एकता कपूरनं मध्यमवर्गियांची संकल्पनाच बदलून टाकली होती.
तर थोडक्यात काय तर आजचा सिनेमा अधिकाधिक लोकांच्या जवळ जाणारा होत चाललाय. एकिकडे यश चोप्रा, करण जोहर सारखे निर्माते ला ला लॅण्डवर वर्चस्व राखून आहेत तर दुसरीकडे वास्तव शहरं मोठ्या प्रमाणात कथानकांतून दिसायला लागली आहेत.

 

खट्टा मिठा

बिंदिया गोस्वामी. ऐंशीच्या सिनेमांतलं एक मॅटिनीस्टार नाव. येता जाता आवर्जून दखव घ्यावी असं काही तिच्या नावार फ़ार नाही, पण तिचा उल्लेख केल्याविनाच ऐंशीच्या दशकाचं पान उलटावं अशिही परिस्थिती नाही. तिचे सगळे सिनेमे अगदी निखळ मनोरंजन करणारे होते. हलके फ़ुलके विषय, खुसखुशित मांडणी असलेले. बच्चन-विनोद खन्ना छाप मसाला सिनेमातही ती दिसली मात्र अभिनेत्री म्हणून खुलली ती मध्यमवर्गाला डोळ्यासमोर ठेवून बनवलेल्या सिनेमांमधे. बिंदिया गोस्वामी ही हेमा मालिनिच्या आईचं फ़ाईंड आहे. झालं असं की, एका पार्टीत त्यांनी बिंदियाला पाहिलं आणि त्यांना वाटलं की अरे ही तर अगदी डिट्टो आपल्या हेमाचं रूप आहे. चौदा वर्षाची बिंदिया सिनेमात चांगलं काम करू शकेल असं त्यांना वाटलं आणि त्यांनी तिची शिफ़ारस केली. बिंदियाचा पहिला सिनेमा जिवन ज्योती (१९७५). यात विजय अरोरा तिचा नायक होता. सिनेमा अर्थात फ़्लॉप झाला पण बिंदिया मात्र निर्माता-दिग्दर्शकांच्या नजरेत आली. तिचा दुसरा सिनेमा खट्टा मिठा (१९७८) आणि इथून तिला सूरही सापडला आणि तिच्या टाईपच्या भूमिकांची जागाही.
काल रात्री एफ़एम वर अभिमन्यूनं खट्टा मिठा मधलं तुमसे मिला था प्यार गाणं लावलं आणि पुन्हा एकदा बिंदीयाची आठवण झाली. टिपिकल रेट्रो लूक असणारी बिंदिया फ़ार उच्च प्रतिचा अभिनय वगैरे करायची नाही पण तिच्या भूमिकंत एक साधेपणा असायचा आणि ती त्या भूमिक तितक्याच साधेपणानं करायची. बासू भट्टाचार्यांचे दोनही सिनेमे मला बिंदियासाठी आवडतात पैकी एक खट्टा मिठा आणि दुसरा हमारी बहू अलका. 
बासूदांनी ह्रषिकेश मुखर्जींकडे उमेदवारी केलेली असल्यानं बासूंदांच्या सिनेमांवरही ह्रषिदांची एक छाप आहेच. पिया का घर, हमारी बहू अलका तर अगदी ह्र्षिदा स्कूलची छाप असलेले बासूदांचे सिनेमे आहेत. 

एक पारसी विधुर आणि पारसी विधवा यांच्या लग्नाची गोष्ट असलेला खट्टा मिठा (१९७७) खट्टा कमी आणि मिठा जास्त होता. लग्नाच्या वयातली मुलं असणारं हे जोडपं भावनिक आधारासठी लग्न करतं. नवपरिणीत जोडपं आणि त्यांची लग्नाळू वयातली मुलं यांच्यातली गोड नोंकझोक म्हणजे खट्टा मिठा सिनेमा इंग्रजी  Yours, Mine and Ours वर आधारीत होता. (याच प्लॉटवर आधारीत गोलमाल रिटर्नस-करिना, अजय देवगण, मिथून- रत्ना पाठक यांचा अलिकडेच आलेला सिनेमाही सुपरहिट ठरला)  खट्टा मिठा मधली दोन गाणी हिट झाली. थोडा है थोडे की जरूरत है आणि तुमसे मिला था प्यार. संगीत होतं राजेश रोशन यांचं अआणि गीतं गुलझार यांची होती.


 ...पूछेंगे एक बार कभी हम तुमसे रूठकर
हम मर गये
हम मर गये अगर तो आप कैसे जियेंगे
वो ख़्वाहिशें अजीब थीं सपने अजीब थे
जीने को तेरी प्यार की दौलत मिली तो थी
जब तुम नहीं थे उन दिनों हम भी ग़रीब थे
तुमसे मिला था प्यार कुछ अच्छे नसीब थे
हम उन दिनों अमीर थे जब तुम क़रीब थे

हे असलं केवळ गुलझारच लिहू जाणे. एकुणात गोडवा ठासून भरलेलं हे गाणं आजही ऐकायला तितकंच फ़्रेश वाटतं.




 

कच्ची धूप

ऐंशीचं दशक हे टीव्हीचं नव्हाळीचं दशक होतं. नुकता रूजलेला इडियट बॉक्स मनोरंजनाचे मोजके तास घेऊन यायचा आणि ते तास दोन तास मुलं टिव्हीला चिकटलेली बघून घरातले मोठे टीव्ही ला इडियट बॉक्स म्हणून हिणवायचे. (तेच मोठे आता आज्जी आजोबा झालेत आणि अहोरात्र डेलीसोपचा रतीब पहातायत हा भाग अलहिदा 😜).  रविवार हा सुट्टीचा आणि म्हणूनच मनोरंजनाचा दिवस असायचा. खास सुट्टीच्या दिवशी प्रसारीत होणार्‍या मालिका असत. त्यापैकी एक होती "कच्ची धूप". सकाळी प्रसारीत होणारी ही मालिका सुरवातीला चर्चेत होती ती अमोल पालेकर या नावामुळं. हिंदी चित्रपटात मॅटिनीस्टार म्हणून ख्याती मिळवलेल्या पालेकरांची ही मालिका. लिहिली होती त्यांचीच पत्नी चित्रा पालेकर यांनी. या मालिकेची कथा सुप्रसिध्द इंग्रजी कांदंबरी "लिटिल वुमन" वर आधारलेली होती. या कादंबरीनं वाचकांवर गारूड केलं  होतं (आहे) त्यामुळे यावर आधारीत मालिका करणं धाडसाचंच म्हणलं पाहिजे.
एक सिंगल मदर आणि तिच्या तीन मुली , या कुटुंबाच्या अवती भवती असणारे शेजारी. यांचे आपापसातले संबंध यावर हे कथानक बेतलं होतं.
बालपण सरत असतं, तारूण्य येऊ घातलेलं असतं आणि सगळं आयुष्य रंगीबेरंगी आणि त्याचवेळेस प्रचंड गोंधळलेलं असतं अशा अडनिड्या वयातल्या मुलांचं भावविश्र्व म्हणजे कच्ची धूप. लहान मुलांत तर ही मालिका विशेष लोकप्रिय झाली होती. अशा प्रकारच्या अनेक मालिका त्यानंतर आल्या. अगदी जस्ट मुहब्बत असो किंवा अलिकडेच आलेली परवरीश असो  पण नव्वद्च्या दशकातली कच्चीधूप तिचं स्थान टिकवून आहे.
तारूण्यात पदार्पण केलेल्या मुलांचं भावविश्र्व, त्यांची प्रेम या भावनेशी ओळख होण्यातली नव्हाळी, त्यांचे छोटे छोटे त्याग,   त्यांचे आनंद, जगाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टीकोन या सगळ्यावर अगदी सहज आणि सोप्या भाषेत या मालिकेनं भाष्य केलेलं होतं.
 पौगंडावस्थेतली मुलं आणि  सिंगल मदर पेरेंटिंग हा विषय हाताळलेली ही मालिका लोकप्रिय होण्याचं कारण म्हणजे प्रेक्षकांनी ती कथा, पात्रं "रिलेट" केली. आजही सिंगल पेरेंटिंग हा टास्किंग जॉब आहे.
दूरदर्शनच्या काळात मालिकांचे डेलिसोप झाले नव्हते त्यामुळे कथानक ठरलेलं असायचं आणि त्यातले टप्पेही, विशिष्ट भागांत मालिका संपत त्यामुळे कथानक जेवढ्यास तेवढं असायचं. लांबवणं, वाढवणं हे प्रकार नव्हते. त्यामुळे मालिका क्रिस्प होत. दर भागात काहीतरी घटना घडायची आणि कथानक पुढे सरकलेलं असायचं. म्हणूनच एखादा भाग बघायचा चुकला तर एकमेकाला विचारून स्टोरी अपडेट व्हायची. कच्ची धूपचेही चौदा भागच होते.
 चित्रा पालेकरांनी कथा लिहिली होती आणि अमोल पालेकरांनी दिग्दर्शन केलं होतं. अमोल मालेकर हे ऐंशीच्या दशताकलं मॅटिनी प्रेमींचं सुपरस्टारडम लाभलेलं नाव होतं.
या मालिकेतून भाग्यश्रीनं पदार्पण केलं होतं. शुटिंगच्या आदल्या दिवशी तिचं कास्टिंग झालं आणि ती या भूमिकेसाठी निवडली गेली.  अमोल पालेकर आणि पटवर्धन कुटुंबियांचे घरोब्याचे संबंध असल्यानं तिची या भूमिकेसाठी निवड केली गेली. तिच्यासोबत या मालिकेत तिची लहान बहिण पौर्णिमा पटवर्धन आणि अमोल-चित्रा पालेकरांची मुलगी शाल्मली पालेकरही होती.
या मालिकेनं लोकप्रियतेचा इतका उच्चांक गाठला होता की बडजात्या फ़िल्मसचा नव्या पिढीचा निर्माता सुरज यानं ही मालिका पाहून भाग्यश्री- आशुतोष ही जोडी मैने प्यार किया साठी निश्चित केली होती मात्र नंतर भाग्यश्रीचं नाव टिकून राहिलं आणि आशुतोषची जागा सलमाननं घेतली.
दूरदर्शनवरच्या कोणत्या जुन्या मालिका पुन्हा यायला हव्यात? असा प्रश्न विचारला तर कच्ची धूपचं नाव खूप वर असेल हे निश्चित.

 

प्रपंच

झी मराठीचा सुरवातीचा काळ. झी आणि ई अशा दोनच मराठी वाहिन्या त्यावेळेस फ़ॉर्मात होत्या. स्टारचा 'तारा' म्हणावा तसा चमकत नव्हता. ई वरच्या मालिका किंचित बटबटीतपणाकडे झुकलेल्या, मेलोड्रामा असलेल्या होत्या तर झीवरच्या मराठी मध्यमवर्गाची नस समजलेल्था्य ाणि पकडलेला .

आयुष्यभराचं गारूड करणारी मालिका प्रपंच.  ज्यांनी ज्यानी बघितलीय त्यांना ती कधिही विसरता येणं शक्य नाही. यातलं कुटुंब हे मागच्या शतकातलं प्रातिनिधिक होतं. आज  जी चिटकू पिटकू मंडळी आहेत म्हणजे माझ्या पिढीची मुलं त्यांना एकत्र कुटुंब ही एक कवी कल्पना वाटावी अशी परिस्थिती आहे. माझी पिढी मात्र सुदैवी होती. बर्‍याचजणांनी एकत्र कुटुंबाचा अनुभव घेतला. काही कुरबुरी,  रूसवे फ़ुगवे मात्र एकत्र असण्यातली धमाल माझ्या पिढीनं अनुभवलीय. मोबाईल नसण्याचा आणि टेलिव्हिजन हा दिवसभरात केवळ दोन मालिका आणि सात आणि साडे नऊच्या बातम्या बघण्यापुरताच होता. बुधवारचं छायागीत, रविवारची रंगोली, शनिवारचं विक्रम वेताळ, हमलोग पुरतं टिव्हीपुढं बसणारी माझी पिढी. बाकिचा वेळ अभ्यास आणि भावंडं, मित्र मैत्रीणींसोबत विट्टीदांडू पासून गल्लीभर चालणार्‍या लपंडावानं भरगच्च. हा सगळा फ़िल देणारी, "प्रपंच". १९९९. माया कम्युनिकेशन्सची निर्मिती आणि प्रतिमाताई कुलकर्णींचं दिग्दर्शन.
एक छान एकत्र कुटुंब आणि त्या कुटुंबातल्या छोट्या मोठ्या घटनांची गोष्ट म्हणजे प्रपंच. डोळे ताणून बघावे लागणारे ढिंकचाक सिन नाहीत. कानठळ्या बसणावं संगीत नाही की आक्रस्ताळेपणा करणारी पात्रं नाहीत.  सगळी पात्रं छान पॉझिटिव्ह तरिही अधून मधून होणार्‍या कुरबुरी.  अण्णा देशमुख (सुधिर जोशी) हे कुटुंब प्रमुख,  त्यांची पत्नी माई (प्रेमा साखरदांडे) या दोघांची दोन मुलं प्रभाकर देशमुख (संजय मोने) त्याची बायको  प्रमिला (सुहास जोशी) , बाळ देशमुख (बाळ कर्वे) आणि त्याची बायको शालिनी (अमिता खोपकर) अण्णांची आई - अक्का (रेखा कामत) आणि मुलं- प्रशांत (सुनिल बर्वे), अलका (रसिका जोशी), आनंद (भरत जाधव),  लतिका (सोनाली पंडीत),  कलिका (शर्वरी पाटणकर), भार्गवी चिरमुले , आनंद इंगळे

यातली बरीच मंडळी तेंव्हा तशी नविनच. पण नंतर छोट्या मोठ्या पडद्यावर गाजलेली. भरत जाधव, रसिका यांच्या भूमिका आजही आठवतात आणि नैसर्गिक अभिनय शिकण्यासाठी इतकं पाहिलं तरिही नविन पुढीला पुरेसं आहे.

करेक्ट कास्टिंग हे या मालिकेचं वैशिष्ट्य.  पेटी ओढून गाणं म्हणणारा काका, कुरबुर करणारा काका, ओल्या नारळाच्या करंज्या करणारी काकू. सख्खं-चुलत न मानणारी मुलं. कोणी हुशार तर कोणी ऍव्हरेज. खरंतर तसं या घरात खूप काही नाट्यमय घडत होतं असं नाही. अगदी तुमच्या माझ्या घरातलीच गोष्ट पण तरिही या मालिकेनं पकडून ठेवलं होत. कदाचित याचं कारण हे असेल की माझी पिढी विशीत असतानाच हळूहळू एकत्र कुटुंब विभक्त होत चालली होती. एकत्र रहाण्यातली मजा जशी होती तशीच स्वत:ची "स्पेस" न मिळण्याची घुसमट लक्षात येत वाढत चालली होती. अमेरिकेची दारं खुली झाली होती. एकाडएक घरातला तरूण मुलगा सॉफ़्टवेअर क्षेत्रात डिग्री घेऊन एचवन मिळवून चालता झाला होता. तिकडच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा विचारांची हवा इकडे जोरात पसरू लागली होती. प्रत्येकाला अगदी भाजी कोणती करायची ते आर्थिक निर्णयांपर्यंतचे स्वातंत्र्य हवे होते. एक पाय उंबर्‍याबाहेर पडला असला तरिही मागे काहीतरी बंध शिल्लक राहिले होते. पुढचं दिसत असताना, खुणावत असताना मागचं विसरता येत नाही अशी काहीतरी विचित्र गोची झाली होती. म्हणूनच तुमची माझी भावनिक गोची या मालिकेनं मांडली आणि ती खूप लाडकी झाली. त्यावेळेस टीआरपी नावाचा राक्षस अजून आला नव्हता म्हणून कथानकावर भर देत मालिका बनत आणि सांगायची गोष्ट संपली की मालिका चुटपूट लावत निरोपही घेत.
प्रपंचमधेही लतिकाला अमेरिकेचा नवरा मिळतो. मोठा मुलगा प्रशांतही त्या वाटेने निघतो. अलका घरच्याना एनएसडीमधे जाण्यासाठी मनवते. एक एक मूल घराबाहेर पडतं. देशमुखांचं घरही त्यावेळच्या रितिला धरून रिडेव्हलप करण्याचा निर्णय घेतला जातो आणि मग एका गुडीपाडव्याला गुडी उभी करून देशमुख कुटुंबियानी घराचा आणि प्रेक्षकांचा भरलेल्या डोळ्यानं निरोप घेतला.

या मालिकेतला मला सगळ्यात आवडणारा भाग म्हणजे, कलाकारांचं प्रचंडच सहज भूमिका करणं.  अगदी आपल्या घरातलंच समोर घडतंय असं वाटायचं.

दुसरी आवडलेली गोष्ट म्हणजे देशमुखांचं बैठं घर. अप्रतिम. ती वास्तूच सुंदर होती. मागच्या दारानं बाहेर पडलं की थेट समुद्रकिनार्‍यावर जाता यायचं. देशमुखांची मुलं या छोट्या दाराशी बसून कधी गंभीरपणे तर कधी मजा करत गप्पा मारायची.

आता अशी मालिका बनणं जवळपास अशक्य आहे. कारण काहीच मेलोड्रामा नसणारी मालिका अलिकडे प्रेक्षकच नाकारतात मग बनवेल तरी कोण? कशाला?

म्हणूनच आता केवळ आठवणीतच राहिलेली "प्रपंच".
दुर्दैवानं इतक्या सुंदर आणि सुपरहिट मालिकेचे भाग आता इंटरनेटवर उपलब्ध नाहीत (मला तरी मिळाले नाहीत. कोणाला माहित असतील तर जरूर शेअर करा)केवळ टायटल ट्रॅक युट्युबच्या कृपेनं मिळाला तोच या पोस्टसोबत शेअर करते.  हे म्हणजे दुधाची तहान ताकावर आहे पण नाईलाज आहे.

त.टी.- तुम्हीही माझ्यासारखे या मालिकांचे चाहते असाल. तर तुमच्या आठवणी कमेण्टमधे जरूर शेअर करा.

 

सोडून द्यायच्या गोष्टी: तिची डायरी


मी अम्माची सून, आजपर्यंत कोणाला काही बोलले नाही. कारण बोलण्यात काही अर्थच नव्हता.
  कसंय की, इतरांना  लहान सहान वाटणार्‍या गोष्टी आपल्यासाठी खूप मोठ्या असू शकतात की नाही? पण होतं काय की लग्न करून आपण सासरी आलो की मंगळसुत्रासोबत फ़्री मिळणारी गोष्ट म्हणजे आपल्याला गृहित धरलं जाणं. सून म्हणजे अमूक गोष्ट तिनं केलीच पाहिजे. बायको म्हणजे तमूक गोष्ट तिनं केलीच पाहिजे , कर्तव्यच नाही का तिचं? या तर दोन बाजू पण अनेक नाती मिळतात आणि त्या नात्यांतल्या अपेक्षा, गृहित धरणंही वाढतं...एका लग्नानं.  आता माझंच बघा, माझी सासू, अम्मा, अगदी रीतसर खाष्ट म्हणता येण्याइतपत तिखट स्वभावाची. लव्ह मॅरेजला परवानगी दिली ही केवळ एकच गोष्ट ती हुकमी पत्त्यासारखी गेली वीस वर्षं वापरतेय. मुळात तिचा हा हुकमाचा पत्ता अजूनही चालतोय याचीच मला कधी कधी गंमत वाटते. लग्नाला परवानगी दिल्यामुळे अनेक गोष्टीत मला गृहित धरलं गेलं आणि मुख्य म्हणजे मी धरू दिलं कारण विचाराल तर लहानपणापासूनचे संस्कार, "सोडून द्यायचं गं. ताणलं की तुटतं" तर ताणून तुटू नये म्हणून अनेक गोष्टी सहन...हो सहनच... करत गेले आणि मग तो पॅटर्न बनला. कधी मधी संयम सुटून बोललं गेलं तर फ़टकळपणाचा शिक्का बसला. वर आजूबाजूचे समजूत घालणारे होतेच,"सोडून दे गं" वाले. असं सोडून देता देता एक मात्र झालं की मी माझ्या सासूला शांतपणानं स्विकारलं. ती तशीच आहे आणि तशीच रहाणार हे सुरवातीला तणतणत मग नाईलाजापायी आलेल्या थंडाव्यानं स्विकारलं. आता असं झालंय की बर्फ़ाच्या लादीसारखं थंडगार पडलंय आमच्यातलं नातं. ना कौतुकाचं कौतुक ना राग रुसवा. मनाची तडफ़ड कमी झाली. मग आता परिस्थितीनं कुस पालटली आणि चार दिवस सासूचे संपत आल्याची जाणीव तिला झाली. माझ्याबाबतीत वाईट वागलेल्याचा पश्चात्ताप झाला म्हणून नव्हे तर आता या उतारवयात आपलं कोणीच नाही मग आपलं काम काढून घ्यायचं तर माझ्याशी संबंध चांगले ठेवले पाहिजेत या उपरतीनं खोटं का होईना पण ती चांगली बोलायला लागली.  एम्पथी नावाची गोष्ट माहेरून संस्कारांच्या गाठोड्यातून सोबत आल्यानं  उतारवयातली  बापुडवाणी भासणारी सासू तोडता आली नाही. फ़क्त कसं झालंय नां की आयुष्यभर "सोडून द्यायचं असतं" हे इतकं अंगात भिनलंय की आता तिचं बरं वागणंही सोडूनच द्यायला होतंय.  ताणलं की तुटतं हे ऐकून ऐकून आता ताणण्यासाठी मुळात काही पकडलंच जात नाही.
म्हणणारे म्हणतात की जग बदललंय, आता पूर्वीसारखं सासू सुनेचं कुठं असतं? आपल्याला किती स्वातंत्र्य आहे, नवरे आपल्याला किती समजून घेतात वगैरे वगरे पण कुठेतरी काहीतरी साखरेत घोळवलेलं कचकचत असतंच. नाही का? पण काय नं विचार नाही करायचा....सोडून द्यायच्या अशा गोष्टी!

#तिच्या डायरीतलं पान.
 

सुहानाचं सासर

सिनेमाबद्दल बरेचजण लिहितात. सिरियल्सवर मात्र तुरळक, तुटक त्यातल्या त्यात हिंदी मराठीतल्या मालिकांबद्दल विशेष  नाहीच, म्हणूनच मला आवडलेल्या काही मालिकांवर लिहिण्याचं मी ठरवलंय, मला माहितीय की यातल्या बर्याच मालिका नंतर नंतर पाणी घालून वाढवलेल्या होत्या तरिही त्यावर मला लिहायचंय. मला स्वत:ला नातेसंबंध उलगडणार्‍या साध्या सुध्या कौटुंबिक मालिका फ़ार आवडतात. मग त्या देख भाई देख सारख्या खुसखुशीत विनोदी असोत की आभाळमायासारख्या थोड्या गंभीर धाटणीच्या.

हमलोग आणि बुनियादपासून मी सिरियल्स बघायला लागले, त्यामुळे तिथंपासून ते इथंपर्यंतच्या माझ्या आवडत्या सिरियल्सवर मी लिहिणार आहे. याला काही सुसुत्रता असेलच असं नाही. अडम तडम करत ज्या सिरियलचं नाव मनात येईल त्यावर लिहिणार आहे.

तर, आज अडम तडम अडकलाय स्टार प्लस अगदी अलिकडे म्हणजे चार पाच वर्षांपूर्वी प्रसारित झालेल्या "ससुराल गेंदा फ़ूल" या सिरियलवर. २०१२ म्हणजे सासबहू सिरियलनी कळस गाठलेला काळ. तरिही विशेषत: या दोन तीन वर्षांत काही खरंच हटके मालिका आल्या होत्या. स्टार प्लसनं रिश्ता वो ही सोच नयी ची ग्वाही देत काही खरोखरच चांगले शो आणले. त्यापैकी एक एसजीबी अर्थात ससुराल गेंदा फ़ूल

हिंदी मालिकांनी सास बहू ड्रामा लोकप्रिय केला. एक वाईट सास आणि बिचारी बहू अशा साच्यातून अनेक चकल्या पडत होत्या आणि त्याचवेळेस अगदी नावातच ससुराल असणारी एक मालिका आली. चेहरे सगळेच परिचित. 
रागिणी खन्ना (राधा की बेटियां मधून पदार्पण केलेली) , जय सोनी, सुप्रिया पिळगावकर अशी एकाहून एक नावं या सिरियलशी जोडलेली होती. सुप्रियाचं वैशिष्ट्य हे की, मोठ्या पडद्यावरून लहान पडद्यावर आल्यावरही तिनं उगाचच करायच्या म्हणून सिरियल्स मधीच केल्या नाहीत. तिच्या प्रत्येक सिरियलमधलं प्रत्येक पात्र लक्षात रहावं असंच आहे. सगळ्या भूमिका साधारण एकाच साच्यातल्या असूनही त्यात तिनं राखलेलं वैविध्य खरंच कौतुक करण्यासारखं आहे.

यातही तिनं सासूची म्हणजेच बडी मां ची भूमिका इतकी क्युट साकारलीय की प्रत्येक लग्नाळू मुलिला वाटावं असं सासर आणि अशी सासू मिळावी. 

या सिरियलची मला सर्वात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे यातले संवाद. शुध्द उर्दू मिश्रीत हिंदी वापरणारी बहुतेक ही शेवटची सिरियल. यानंतर मालिकांत युपीवाल्या भाषेची चलती सुरू झाली. दिल्लीतलं हे कुटुंब अत्यतं सुंदंर भाषा आणि लहेजा वापरायचं. बडी मां चे रिश्तों की समझ देणारे खरं तर एरवी पुस्तकी वाटू शकणारे संवाद इतके सहजपणानं यायचे की ऐकून वाह! असं  वाटायचं. तिचं ते हळूवार पणे समजून सांगणां आणि समजून घेणं प्रचंड क्यूट होतं.

या सिरियलमधली दुसरी छान गोष्ट म्हणजे यातले कपडे. एरवी हिंदी सासबहू मालिकांत कचकच काचा लावून चमचम करणार्या बेगडी साड्या आणि घाण दिसणारे खोटे दागिने बघून वीट आला होता. यातल्या सगळ्या बायकांच्या साड्या साध्या पण क्लासी होत्या. तुमच्या आमच्या घरात जशा दिसतात तशाच या सगळ्याजणी दिसायच्या. अगदी नायिका सुहानाचं उच्चभ्रुपणही तिच्या क्लासी साड्यांतून जपलं होतं. शिवाय बहुतेक पहिल्यांदाच मालिकेतली सून गुडघ्यापर्यंतच्या वनपीसमधे, ऑफ़ शोल्डमधे आणि पारदर्शक नायट्यांमधे दाखवली असावी, असं असूनही त्यात कुठेही ती निगेटिव्ह होत नव्हती. एरवी पाश्चात्य कपडे घालणं हा मालिका विश्र्वात व्हॅम्पिशपणा ठरतो. इथे सुहाना तिला हवं ते बिनधास्त घालताना दाखवलीय तरिही ते सगळं सहज खपून जातं. उलट तिनं हट्टान आपल्या जावांनाही वनपीस घालायला लावणंही प्रेक्षक सहज स्विकारतात.

तिसरी छान गोष्ट म्हणजे कश्यपांचं चावडी बाजाराच्या गल्लीत असलेलं पुश्तैनी असरटपसरट घर. मालिकांतली खोटी खोटी दिसणारी, भासणारी चकाचक घरं आणि कश्यप कुटुंबाचं हे टिपिकल उत्तरेकडचं दिसणारं साधं पण रूबाबदार घर. घराचा भक्कम आणि सदा उघडा मोठा लाकडी दरवाजा, अख्खं कुटुंब बसून गप्पा मारणारा हॉल, डायनिंग टेबल, स्वयंपाकघर, चौसोपीतला हातपंप, कॉमन बाथरूम, खालच्या मजल्यावरच्या दादा दादी, इंदर-राधा, इलेश-दीशा यांच्या खोल्या, वरच्या मजल्यावरच्या सुहाना-इशान, बडी मां, राधा, अलोक-रानो, इशिताच्या खोल्या, त्याच्या बाजूला आसणारी प्रशस्त गच्ची आणि हे दोन्ही मजले जोडणारा लालचुटूक गेरूचा जिना. घराचा प्रत्येक कोपरा कथानकात वापरला गेला. इतका सहजपणानं की तो स्क्रिनप्लेचा भागही न वाटावा. प्रत्येक कोपर्यातून कॅमेरा इतक्या सफ़ाईनं फ़िरला की दोन वर्षं प्रेक्षक आपल्याच घरात वावर्ल्यासारखे या खोल्यांमधून वावरले.  बहुतेक सिन मधे, फ़्रेममधे चार चार पाच पात्रं आणि त्यांच्या सततच्या हालचाली यानं फ़्रेम जिवंत वाटायच्या, इतर मालिकांत असायचे तसे डिशक्यॅंव टाईट क्लोज अप चे चेहरे बघण्याचं  टॉर्चर या मालिकेनं कधीच माथी मारलं नाही.


सुहाना बडे घर की बिगडी, नकचढी मुलगी दिल्लीच्या उच्चभ्रू वसाहतीत रहाणारी पण योगायोगानं लग्न करून ईशान   कश्यपच्या चावडी बाजारच्या अगदी टिपिकल मध्यमवर्गिय एकत्र कुटुंबात येते. ईशान पहिल्याच भेटीत सुहानाच्या प्रेमात पडलाय, सुहानाच्या वडिलांना कश्यप कुटुंब प्रचंड आवडलंय. पण सुहानाला मात्र हे घर आणि लग्न दोन्हीतून सुटका हवीय. अगदी पहिल्याच रात्री ती ईशानला सगळं खरं सांगून टाकते. समंजस ईशानही तिला नात्यातून मुक्त करतो. मात्र घटनाच अशा घडत जातात की सुहानाला या घरात थांबावच लागतं. हळूहळू सुहाना कश्यप कुटुंबात रूळते. ती या कुटुंबाच्या आणि विशेषत: बडी मांच्या प्रेमात पडते. ईशानवर प्रेम नसूनही ती या घरात रहाते. हळूहळू बडी मां आणि दादाजी तिला तिच्याही नकळत तिचं ईशानच्या प्रेमात पडलेलं असणं दाखवून देतात. हे सगळं करताना सुहानाला नात्यांची नव्यानं ओळख होते. ती आधी कुटुंबाच्या प्रेमात पडते आणि मग ईशानच्या. लग्नानंतर तब्बल एक वर्षानं ती ईशानजवळ प्रेमाची कबुली देऊन खर्या अर्थानं सुहाना ईशान कश्यप बनते. 
इथंपर्यंत मालिकेचा सिझन एक होता. जो बहुतेक ओरिजिनल कथेचा प्लॉट असावा.
इथून प्रवास सुरू होतो सुहाना आणि ईशानच्या संसाराच्या आणि मग त्यात येणार्या चढ उतारांचा. मग सुहानाचा ब्रेन ट्युमर, त्यातून तिचं बाहेर येणं आणि ईशानचा अपघात त्यात त्याची स्मृती जाणं. त्यानं केवळ सुहाना सोडून बाकी सगळ्यांना ओळखणं आणि सुहानाचं शशीकला बनून त्या घरात रहाणं पुन्हा नव्यानं ईशानच्या प्रेमात पडणं आणि यावेळेस ईशानला सुहानावरचं प्रेम ओळखायला कुटुंबियानी मदत करणं.
हा होता मालिकेचा सिझन टू
मालिकेनं इथंपर्यंत पकड ठेवली होती. आणि लोकप्रियतेच्या कळसावर होती. अर्थात बंद करण्यात काहीच अर्थ नव्हता. मोह आवरता न आल्यानं मग सुहाना आणि ईशानला मुंबईत कामानिमित्त आणणं. एकत्र कुटुंबाची सवय झालेल्या सुहानाचं मुंबईतलं एकटेपण आणि मग यथावकाश पुन्हा दिल्लीला आपल्या कुटुंबात जाणं. त्यानंतर तिचं हिंदी मालिकेची नायिका बनणं आणि एका मध्यमवर्गिय घरातली सून जर या वरवर ग्लॅमरस दिसणार्या क्षेत्रात आली तर काय काय होऊ शकतं याची गोष्ट सांगणारा सिझन तीन आणि मालिकेचा शेवट.
प्रेमापोटी चाहत्यानी हा सिझनही पाहिला असला तरिही पहिल्या दोन सिझननंतर हळूहळू सिरियलची पकड ढीली होत चालली होतीच. मात्र एक कौतुकाची गोष्ट ही की अती न करता सिरियलनं निरोप घेणं. शेवटच्या सिनमधे अलोक म्हणतो की,"चलो जी कहानी खतम. अंत तो अच्छाही हुवा " यावर  शैलजा म्हणजेच बडी मां म्हणते, "नहीं अलोक, जब तक जीवन है, कहानी खतम नहीं होती. जब जब हालात करवट बदलते है, जीवन में नयी कहानियां जनम लेती है, कहानी अभी खतम नहीं हुई" तिच्या या शेवटच्या संवादामुळे ही मालिका नवा सिझन आणि नवा ट्रॅक घेऊन येणार याची खात्री होती. मात्र आज पाच वर्षं उलटली तरिही या मालिकेचा नवा सिझन आला नाहीए. अजूनही या सिरियलचे चाहते (माझ्यासारखे) हॉटस्टारवर ही सिरियल भक्तीभावानं बघतात. अजूनही वाटतं की एखाद्या दिवशी या मालिकेच्या नव्या सिझनची घोषणा होईल. रागिनी खन्नाला इस्टावर अजूनही चाहते या सिरियलविषयी विचारत असतात. मध्यंतरी ती गुरगावच्या निमित्तानं लाईव्ह आली होती त्याहीवेळेस चाहत्यांनी हाच प्रश्नं वारंवार विचारला होता. तसंही सध्या जुन्या मालिकांचे नवे सिझन यायचा सिझन चालू आहे, तर, फ़िंगर्स क्रॉस फ़ॉर ससूराल गेंदा फ़ूल 


 

...तो क्या हुवा था कल रात को?



एखाद्या जुन्या सिनेमाचा रिमेक आला की जुन्यापेक्षा नवा वेगळा आहे का? जमलाय की फसलाय? ही तुलना अनिवार्य असते.
1969 च्या इत्तेफाक चा रिमेक येणार म्हटल्यावर उत्सुकता हीच होती की नेमका काय बदल असेल नव्यात?
69 मधे नायिका ग्रे शेडमधे दाखविण्याचं धाडस यश चोप्रानी दाखवलं हेच खूप. शिवाय ज्या काळात सिनेमातली गाणी जास्त गाजत त्या काळात गाणं विरहीत कथानक सादर करणंही धाडसाचंच होतं.
सर्वात मोठं धाडस म्हणजे या हटके कथानकासाठी निवडलेली स्टारकास्ट.
आता एव्हाना अशी कथानकं, ग्रे शेड असणार्या नायिका/नायक, अॅण्टिहिरो सगळं लोकमान्य झालंय. त्यामुळे प्रेक्षकाना धक्के देणं सोपं राहिलं नाही.
नविन इत्तेफाकबद्दल सांगायचं तर, अशा प्रकारच्या सिनेमाचं कथानक जर आधीपासूनच माहित असेल तर आणखिनच कठीण परिक्षा.
आणि या सगळ्या परिक्षांत नवा इत्तेफाक अव्वल गुण घेत पास झालाय.
कथानक माहित असूनही कथेत आपण गुंतत जातो हे सगळ्यात जास्त कौतुकास्पद आहे.
69 चा काळ आणि 2017 मधे प्रचंड फरक आहे. सामाजिक, आर्थिक, तांत्रिक अनेक बाबतीत बदल झालेत या सगळ्याचं प्रतिबिंब नव्या सिनेमात आहे.
अट्टाहासानं जुनं धरून न ठेवता त्यात जे आवश्यक ते बदल केलेत, कथानकाच्या गाभ्याला न हलवता हे जे बदल केले आहेत त्यानं नाविन्य आलंय.
इस कहानी के तीन पेहेलू है... हा जुन्या इत्तेफाक मधला संवाद नव्यात आहे . पण इथे अक्षय बाजी मारतो.
जुन्यात इफ्तेकारला किंचीत वायाच घालवलाय असं अक्षयचा नवा पोलिस अधिकारी बघताना वाटतं.
नवा जास्त क्रिस्प बनलाय, अधिक तर्किक वाटतो. उदा. जुन्यामधे वेड्यांच्या हाॅस्पिटलमधला डाॅक्टर नेमका नायिकेच्या ओळखिचा (का? याचं उत्तरही नाही) , नायक नेमका तिच्या घरात घुसतो. (का चं उत्तर नाही) असे अनेक सुटलेले धागे नव्या कथानकात मस्त गुंफलेत आणि आपण त्यात अडकत जातो.
जुन्यामधे क्लायमॅक्सला या सगळ्या इत्तफाकचं वर्णन नायक करतो
तसाच नव्यातही करतो पण नव्यातल्या नायकाचं ऐकताना सॅल्यूटच ठोकायला होतं.
अर्थात नव्यातही काही गडबडगुंडे झालेत पण ते दूर्लक्ष करता येतात.
अक्षय खन्नाचा पोलिस अधिकारी आणि सिध्दार्थचा नायक यांच्यासाठी बघायलाच पाहिजे असा सिनेमा.
#ittefaq
 

फ़णसाचे गरे

लहानपणी झोपायच्या आधी रोज दादां सोबत (वडिल) मी आणि भैया जरा मस्ती करायचो. दिवसभरातला अहवाल देऊन झाला की मग घोड्याला पाणी घाल किंवा बटोबटो सारखे खेळ खेळायचो. तेल लावू तूप लावू करत दादा जेंव्हा हात हातात घेऊन त्यावरून त्यांचे हात फ़िरवायचे तेंव्हा हात छान रगडून निघायचे. त्या आनंदात बटुला म्हणजे मला फ़णसाचे गरे खायलाच मिळायचे नाहीत हे लक्षातच यायचं नाही (बादवे, जाता जाता, हे बटू प्रत्यक्षात भटू असावं का?)  मुळात फ़णसाचे गरे मला फ़ारसे आवडायचे नाहीत त्यामुळे असावं कदाचित, पण गरे न मिळाल्याचं दु:ख कधी झालंच नाही...

कट टू-
२०१७



वेळ रात्रीची.
गोष्टी बिश्टी सांगायची.
जरा हलकी दांडगाई करायची
काल मूड आला बटूबटू खेळायचा. मधे एक दोन वर्षं हा खेळ खेळलोच नव्हतो.
आधी खेळायचो तर शेवटी,'तुम्ही खा सालपट' म्हणलं की नाकाचा शेंडा आणि ओठाचा चंबू एक व्हायचा. 'कट्टी' म्हणून निषेध व्हायचा. मग बट्टी करायला बटूला पुन्हा कोकणात पाठवावं लागायचं. यावेळेस बटू फणसासोबत आंबेही आणायचा आणि हे दोन्ही शमी एकटा खायचा. आईला टुकटुक. सगळं खोटंखोटं पण रूसवा आणि नंतरचं खट्याळ हसणं अगदी खरं ...
तर खूप दिवसानी बटू कोकणातून फणस घेऊन आला. रितीप्रमाणं सगळ्यांना गरे वाटून झाले आणि शर्मनला सालं मिळाली.
पुन्हा एकदा नाकाचा शेंडा गोलगोल झाला. पण यावेळेस ओठाचा चंबू न करता खणखणीत जाब विचारला गेला,' वा गं. एक तर इतक्या मेहनतीनं मी फणस आणला आणि मलाच गरे नाहीत?'
'बरं मग पुन्हा आण फणस'
'मी नाही जाणार आता'
'का?, जा की. यावेळेसचा फणस तू एकटा सगळा खा'
'पेट्रोल वेस्ट होईल. नेक्स्ट टाईम खातो आता'


मी नेहमीप्रमाणेच स्पिचलेस आई.  आणि रिश्ता वोही सोच नयी वगैरे.😀
 

गोष्ट मला सांग आई भुताची

आई नावाच्या बाईला सर्वगुण संपन्न असावच लागतं. नसलं तरिही तसं असल्याचं भासवावं लागतं. गोष्टी सांगणे हा आईच्या सिलॅबस कंपलसरी भाग आहे. हरतर्हेच्या गोष्टी याव्याच लागतात. 



वेळ रात्रीची
गोष्टी बिश्टी सांगायची
'आई आज भूताची गोष्ट सांग'
'कशी सांगू?'
'एकदम स्पायसी 6D'
(स्पायसी 6D= एकदम ड्रामासहित म्हणजे तोंडानं डरावने आवाज आणि भिती वाटतील असे हातवारे, हावभाव करत
मिडियम= नुसतेच डरावने आवाज
साधी= नुसतीच गोष्ट सांगायची. भीती वाटता कामा नये)
मी- नको रे साधीच सांगते आज
शमी- नाही एकदम डरावनी सांग ना प्लिज
मी-(मनातल्या मनात)- लेकरा आधीच हा वादळी पाऊस, त्यात शूरवीर बाबा घरी नाही तुला गोष्ट सांगू कशी? कारण मीच घाबरलीय (वरकरणी) - नको रे उद्या बाबा आला की सांगते नं. आज साधी ऐक
शमी- नाही नं मला आजच ऐकायचीय
मी आपली मन घट्ट करून गोष्ट सुरू करते .... आणि.... इतक्यात.... मेली लाईट जाते...वैताग इन्व्हर्टरही बंद पडतो....वातावरण एकदमच entertaining होतं....आणि मग.....
मग काय नाही मी दामटून रामायणातली गोष्ट सांगून आई असल्याचा गैरफायदा घेत दामटवून झोपवते.
.....
पोर पाच मिनिटात घोरायला लागतं...
पण आता मनातल्या मनात तयार केलेली ती स्पायसी भयानक डरावनी गोष्ट चलत् चित्र बनून माझ्याच डोळ्यासमोरून सरकायला लागलेली असते.. .
फिलिंग रामरामरामरामराम वगैरे 😀😉
 

गोष्ट छोटी, अम्माच्या संसाराची: तिची डायरी

म्हणलं तर साधीच गोष्ट, पण ती टोचायला लागली की ... किती छोटी मागणी होती माझी की, घरातला जुना झालेला सोफ़ा बदलून नवा घेऊया. पण रामायण-महाभारत केलं अम्मानी. का? तर म्हणे भाईनी, म्हणजे माझ्या सासर्‍यांनी, त्यांच्या पहिल्या पगारात घेतलेला तो सोफ़ा होता. ठीक आहे त्यामागे त्यांच्या इमोशन्स वगैरे आहेत पण मग माझ्या संसारात मी नविन काही घ्यायचंच नाही? खरंतर किती जुना झालाय तो सोफ़ा आणि अगदी ओल्ड फ़ॅशनचा वाटतो. आमच्या फ़्लॅटला तर अगदीच न साजेसा आहे. अम्मांच्या गावच्या बंगल्यात तो खपून जायचा पण इथे, मुंबईत?  अवाढव्य वाटतो तो.  शंतनू म्हणजे माझा नवरा मुंबईत शिकायला म्हणून आला आणि भाई अचानक हार्ट अटॅकनं गेले. अम्मानी फ़क्त बंगला ठेवला आणि गावची शेतीवाडी सगळं विकून इथं मुंबईत फ़्लॅट घेतला. सगळं विकलं असलं तरिही किचन आणि हा सोफ़ा मात्र अम्मांच्यासोबतच ट्र्कमधून मुंबईत आले. त्यांच्या सुरवातीच्या वनबीएचके मधेही हा सोफ़ा अर्धा हॉल अडवून होता. मी शंतनूसोबत पहिल्यांदा त्याच्या घरी गेले होते तेंव्हाही तो मला खटकला होता. मग आमचं लग्न झालं, आम्ही तो फ़्लॅट सोडून या मोठ्या फ़्लॅटमधे आलो तरिही अम्मांचं किचन आणि सोपा ट्रकमधून आलेच. खरंतर मला या नव्या घरात माझ्या मनासारखं फ़र्निचर करायचं होतं. पण अम्मानी इतका इमोशनल ड्रामा केला की शंतनू मला म्हणाला एक सोफ़ा तर आहे. काय फ़रक पडतो? मला आतून रडायलाच येत होतं. म्हणावसं वाटत होतं की. शंतनू फ़रक पडतो. खूप फ़रक पडतो. माझं अस्तित्वच मला या घरात जाणवत नाही. अम्मांचा टिव्ही, अम्मांचा सोफ़ा, अम्मांच्या कढया आणि झारे...मी कुठं आहे? माझ्या आवडीचा चमचाही नाही या घरात..आणि आमच्या घरी येणारा प्रत्येकजण अम्मांचं तोंड भरून कौतुक करतो,"अम्मा तुम्ही तुमचा सगळा संसार सूनेच्या हातात दिलाय. आपल्या वस्तूतली आशा काढून सुनेच्या हातात वापरायला द्यायला खूप मोठं मन लागतं" कोणी असं म्हणलं की अम्मांच्या चेहर्यावर जिंकल्याचं एक तुपकट स्माईल येतं. ते बघून तर आणखिनच चिडचिड होते. म्हणून म्हणलं नं की, गोष्ट तशी छोटीच आहे, साधीच आहे, पण त्रास होतो....खूप त्रास होतो.


#तिच्या डायरीतलं पान.



 

ऐ मुंबई की बारिश

सोच रही हूं इस साल मुंबई की बारिश का मजा ले लूं
इससे दोस्ती नहीं थी
कमसे कम हाय हॅलो ही कर लूं
बारिश मेरे गांव की याद अब तक आती है
आंगन में पानी और कागज की कश्तियों की यादे उमड आती है
आंगन की तपी मिट्टी पर बारिश यूं छम से गिरती थी
वो सौंधी सी खुशबू
अब तक दिलों दिमाग में है

छत से गिरता दौडता बारिश का पानी
खिडकी से गुजरता हुवा बगिचे में भागता
गुलाब का झुमझुमकर भिगना अभी भी याद आता है

उसे देखते घंटो गुजर जाते थे
अद्रकवाली चाय मां के हाथ की
और प्यारी सी खामोशी
अब भी याद आती है

गांव छुटा तो लगा साल में अब दो ही मौसम आते है
बारिश पिछे छुट गयी
अब आसमां से पानी बरसता है

ऐ मुंबई की बारिश तू मुझे पसंद तो नहीं
लेकिन सोच रही हूं
इस साल तुझसे दोस्ती कर ही लूं
क्या पता तू भी शायद प्यारी लगे
गांव जितनी नहीं थोडी तो अपनी लगे
ऐ मुंबई की बारिश !

- नेहा
 

गृहित

आपण कुठेतरी बाहेर जाण्यासाठी अगदी छान वेळ घेऊन तयार झालेलो असतो. बर्‍याच दिवसांनी आरशासमोर वेळ घालवलेला असतो, कपाट उघडून एरवी हाताला येईल तो ड्रेस घालणं सोडून आज कपाटात शिरून आवडीची, बरेच दिवसांत न नेसलेली साडी आपण काढतो. मायेनं त्या इस्त्रीत घट्ट बसलेल्या मऊ घडीवरून हात फ़िरवतो. मॅचिंगचं ब्लाऊज आणि गळ्यातलं घालून अगदी तब्येतीत तयार होतो. डोळ्यात काजळाची स्टिक फ़िरवत असतानाच डोअरबेल वाजते. घाईत जाऊन दार उघडतो तर बाहेर पाहुणे उभे असतात.
“काय येऊ का?” कृत्रिम आपुलकीनं कोलगेटचे दात विचकत केलेलं एक स्माईल आपल्याला सेफ़्टी डोअरच्या डिझाईन पलिकडे दिसतं
आपण सेफ़्टी दार उघडून त्यांना आत घेतो. मघासचा तयार होतानाचा फ़सफ़सलेला मूड आता किंचीत डाऊन झालेला असतो
पाहुणा सोफ़्यात रूतून बसतो त्यावरूनच आपण अंदाज लावतो की किमान तासभर तरी इथे जाणार आहे.
“अगं इकडून चाललो होतो, म्हणलं चक्कर टाकावी तुझ्याकडे”
“कशाला? आणि येण्याआधी किमान फ़ोन तरी करायचा” असं काहिसं कुजकट बोलायचा आपला मनापासून मूड असतो मात्र तरिही वरवर बुळबुळीत हसत आपण कसंनुसं म्हणतो,
“हो का? चांगलं झालं की”
“अगं मी मुद्दामच फ़ोन नाही केला. म्हणलं तू काय घरीच असतेस, तुझी गाठ पडणारच”
आपण घरात असतो हा आपण सोडून इतर सगळ्यांसाठी नेहमीच सोयीचा आणि गहित धरण्याचा मुद्दा असतो. नोकरदार माणसाकडे अचानक टपकता येत नाही कारण दाराला कुलूप दिसण्याच्या शक्यता असतात. घरीच रहाणीरीकडे तसं नसतं नं.
आपण घरात रहातो याचा अर्थ पाहुणेरावळे, आप्तेष्ट आणि कुटुंब या सगळ्यांनी आपला चोवीसच्या चोवीस तासांचा वेळ गृहितच धरावा असं असतं का? घरात रहाणारीला तिचे म्हणून काही उद्योग नसतात?
आपणा छान तयार झोलोय याचा अर्थ आपली बाहेर जायची तयारी चालू आहे, हे सरळ दूर्लक्ष करत समोरचा ऑर्डर सोडतो,
“मस्त आलं घालून चहा कर. बरेच दिवसांत तुझ्या हातचा चहा नाही प्यायलो.”
आपण किचनमधे जाऊन चहा करतो आणि मनातून कितिही चरफ़डलो असलो तरिही गृहिणीधर्माला, अतिथीधर्माला जागत बिस्किटांसोबत चहाचा वाफ़ाळता कप समोर आणून ठेवतो.


चिक्कार डोकं खाणारी मिटिंग करून आपलं डोकं ठणकत असतं आणि बसमधल्या कलकलाटात आपण डोळे मिटून डोक्याला आराम देण्याचा प्रयत्न करत असतो. जरा बरं वाटावं असं फ़िलिंग येतच असतं की फ़ोन वाजतो. घरचा नंबर बघून आपण तात्काळ उचलतो कारण पिल्लं घरात सोडून कामं करणारीचं अर्धं लक्ष घरात असतंच. फ़ोन टाळणं सिस्टिममधेच नसतं कारण नेमका टाळलेला फ़ोनच काहीतरी इमर्जन्सी सांगणारा निघालेला असतो कधीतरी. आपण फ़ोन घेतो,
“आई गं, येताना माझं उद्याचं प्रोजेक्टचं सामान आणशिल?”
या प्रश्नाला उत्तर होच असतं.
मात्र तो होकार देताना आपली चिडचिड होते कारण एक स्टॉप आधी उतरून स्टेशनरीचं दुकान गाठावं लागणार असतं. मग आता आलोच आहोत तर म्हणत घरात संपलेल्या भाज्या वगैरे घेतलं जातंच. बरं अंतर इतकं अडनिडं की रिक्षावाले यायला सहजी तयार होत नसतात. आपण ठणकतं डोकं आणि हातातल्या पिशव्या सांभाळात रस्त्यावर रिक्षा शोधत फ़िरत रहातो. खरं तर या क्षणाला आपल्याला घरी जाऊन एक कप कडक चहाची आणि उशीवर डोकं टेकायची फ़ार गरज असते.

लग्न ठरलेलं असतं, आपण रजा वगैरेचं प्लॅनिंग करतो. नवे दिवस असतात. त्यामुळे कोणत्याच गोष्टीला पटकन नकार  देता येत नाहीत. रूटीन सुरू झालेलं असतं. आपणा ऑफ़िसच्या गडबडीत आवरत असतो आणि आपली सासू आपल्याला सहजपणानं येऊन सांगते,
संध्याकाळी जरा लवकर ये. माझ्या भजनीमंडळातल्या बायका घरी बोलवल्यात मी. घरातच खायचं करायचं म्हणतेय, जरा मदतीला ये
खरं तर अशा सवलती आता ऑफ़िसमधे मागायचिही चोरी झालेली असते कारण ऑलरेडी लग्नाच्या शॉपिंगच्यावेळेस, होणार्‍या नवर्‍याला भेटायचं म्हणून बरेचदा या सवलती घेऊन झालेल्या असतात. आता खरं तर जास्त वेळ थांबून ते कॉम्पेनसेट करायची वेळ आलेली असते. पण आपण हे काही बोलू शकत नाही. चरफ़डत, शेलक्या नजरा झेलत ऑफ़िसमधून निघतो आणि घरी येऊन धुसफ़ुसत सासूच्या हाताखाली कामं करायला लागतो.

मैत्रिणीसोबत मुव्ही प्लॅन होत असतो. मुलांची सोय बघत, सगळ्या लेकुरवाळ्यांना सोयीची पडेल अशी एक वेळ अगदी मुश्किलीनं निवडलेली असते. प्रचंड ऍडजेस्टमेंट करत आपण हे सगळं जमवून आणतो. संध्याकाळच्या शोला जाण्यासाठी दुपारपासून घरच्यांच्या खाण्याची व्यवस्था किचनमधे करत असतो आणि नवर्‍याचा फ़ोन येतो.
“अगं भूषण आलाय ऑस्ट्रेलियाहून. आज यायचं म्हणतोय घरी. एक काम कर भाज्या अआणि बिर्याणी घरातच कर. मी पोळ्या आणि स्वीट बाहेरून घेऊन येतो”
भराभर प्लॅनिंग केलेल्या नवर्‍याला आपण आपल्या मुव्हीप्लॅनची आठवण करून देण्याचा क्षीण प्रयत्न करतो. त्यावर तो सहजच म्हणतो
“आज जाणार होता नाही का तुम्ही? माझ्या डोक्यातूनच गेलं बघ. काय करूया आता? मी तर त्याला ये म्हणून बसलोय. तू जा, आम्ही बाहेरच भेटतो डिनरला कुठेतरी”
हा पर्याय मनापासून दिलेला नाहीए हे कळण्याइतके आपण संसारात मुरलेलो असतो. शिवाय हा डिनरला गेला तर मुलं घरात एकटीच रहाणार असतात. सगळा विचार करून आपण म्हणतो
“असूदेत. मी परत कधीतरी जाईन तू बोलवलयंस तर असूदे. तो काय रोज रोज येतो का?”

अचानक एक दिवस एखादा फ़ोन येतो फ़लाण्या नातेवाईकाचा
सुरवातीला अगदी गोड शब्दात आपली विचारपूस होते. काहीही कारण नसताना कौतुक होतं.
“ऐक नां, शिशिरला अगं तिकडे एण्टर्नशिप मिळतेय. सहा आठ महिने आहे. आणि जर सगळां नीट झालं तर तिथेच जॉब लागण्याचिही शक्यता आहे. मी म्हणलं परक्या शहरात एकटा नको राहूस. मावशी आहे आपली. तिच्याकडेच रहा. तुझ्याकडे तो असला की मला काळजी नाही गं”
या विचारण्यात आपल्या नकाराची शक्यताही गृहित धरलेली नसतेच हे उघडच असतं. शिवाय हे सहा आठ महिने वर्षं दोन वर्षं होण्याच्या शक्यता आपल्याला ठळकपणानं दिसत असतात. आपली चिडचिड होते. घरातले मात्र आपलीच समजूत घालतात.
“असूदेत गं. उद्या आपली मुलं अशी कुठे पाठवायची वेळ आली तर?”
“मी नाही माझ्या मुलांना कोणत्याही नातेवाईकाकडे ठेवणार. त्यांनी त्यांची सोय स्वत:च केली पाहिजे. टक्के टोणपे नाही खाल्ले तर तयार कशी होतील?”
“हो, अगं पण हे तुझे विचार झाले. प्रत्येकाचे तसे नसतात आणि मोठा मुलगा आहे. तुला काय करायचं आहे त्याचं? जास्तीच्या चार पोळ्या फ़क्त”
जास्तीच्या चार पोळ्यांचा प्रश्न असतो का फ़क्त?आणि मुळात पोळ्या वगैरे करावं लागणं हा मुद्दाच नाहीए. त्या जास्तीच्या चार पोळ्या लाटायची माझी तयारी आहेच हे तुम्ही गृहित धरता त्याचा जास्त त्रास होतोय हे दिसत नाहीए का तुम्हाला?

किती अनावधानांन आणि बरेचदा कळून सरून न कळल्यासारखं दाखवत लोक आपल्याला गृहित धरत जातात. पूर्वी म्हणजे वीशी पंचविशीत असताना याचा खूप त्रास व्हायचा. “मला होकार नकाराचं स्वातंत्र्य आहे की नाही?” असं ओरडून विचारावसं वाटायचं. पण पस्तिशीच्या अलिकडं पलिकडं, चार पावसाळे वगैरे बघितल्यावर आता या गृहित धरण्याचा त्रास बोथट मात्र झालाय. पूर्वी होणारी तडतड, मनातल्या मनात शेकडो वेळा केलेली चिडचिड, त्रागा आता थंडावलाय हे खरं! वायानुरूप येणारी समज म्हणायचं, समंजसपणा म्हणायचा की, कशाचंच काही न वाटण्याचा बधिरपणा? की, आपल्याला गृहित धरलं जातंय, जाणारच हे आपणही आता गृहित धरायला शिकलोय?



 

अबोला

"तुला माझं काही ऐकायचंच नसतं"
"याला काय अर्थ आहे?"
"सगळ्यात अर्थच काढत बैस तू"
"आता हे काय, कुठून कुठे विषत नेतेस"
"मी?"
"नाहीतर कोण? मी?"
"मग काय प्रश्नच मिटला"
"नेमका काय प्रश्न आहे?"
"हे ही मीच सांगयचं?"
"नाहीतर मला कळणार कसं?"
"कळत नाहीए तेच बरंय"
"नेमकं काय हवंय तुला? मला कळायला हवंय की नको?"
"तुझ्याशी  बोलणं म्हणजे नं..."
"काय?"
"काही नाही"
"असं कसं काही नाही? मग मघासपासून चाललं होतं ते काय होतं?"
"तेही मीच सांगू?"
"मग कोण सांगणार?"
"शी: मला नं,कंटाळाच आलाय आता"
"तुला कंटाळा आलाय, तर मला काय उत्साह फ़ुटलाय?"
"सोड नां...जाऊ दे"
"असं कसं सोड?"
"जसं जमेल तसं सोड"
"हे बरंय तुझं...मी सोडलं की परत म्हणशिल तुला काही कळतच नाही"
"नाही म्हणणार...आता काहीच नाही म्हणणार...कधीच...बास?"
"बघ हे असं असतं...मी एक म्हणतो, तू दुसरंच ऐकतेस आणि तिसरंच समजतेस.."
"मी?"
"हो."
"बरं."
"काय?"
"...."
"...कॉफ़ी घेणार?..."
"..."
"तुला आवडते तशी करतो...कडक"
"..."
"घेणार का? घे थोडी "
"..."
"बघ मग पुन्हा म्हणाशिल की ..."
"..."
"अच्छा म्हणजे आता तू काहीच बोलणार नाहीएस का?"
"..."
"नक्की?....मग जाऊ मी?..."
"..."
"ओके देन,...बाय..."
....

 

निरोप

"आठवतं अजून तुला?"
"न आठवायला काय झालं?"
"मला वाटलं एव्हाना तू विसरली असशिल"
"हम्म......"
"आता या दीर्घ हम्म....आणि त्या नंतरच्या या पॉजचं मी काय करायचं?"
"...."
"जाऊ दे, तेंव्हाही हा हम्म् आणि दीर्घ पॉज जीवघेणा वाटायचा....इतक्या वर्षांनंतरही....तेच...तसंच...."
"तेही आठवतं तुला?"
"सगळंच..."
"सगळं?"
"अगदी सगळं"
"अगदी सगळं...?"
"हो"
"आता वाटतं ते दिवस किती छान होते...."
"....हम्म .... होते"
"हम्म ....होते...मग, बाकी?"
"शून्य...असं म्हणायला आवडलं असतं, पण...."
"पण काय?...."
"काही नाही...."
"खरंच?....आता काहीच नाही?.....बाकी?...."
"नसावं...नाहीच....म्हणजे नसायलाच हवं नं....."
"नसावं असं तुला वाटतं....वाटतं?...अजूनही?...का हसलास असा?"
"आता दीर्घ पॉज माझा....निरोपाचा...."