अ से अभ्यास

आजही इतक्या वर्षांनी जानेवारी महिना उजाडला की नकळत कापरं भरतं. स्वप्नात यायला लागतं की, इकोनॉमिक्सचा पेपर आहे आणि आदल्यादिवशीही आपल्याकडे (पक्षी माझ्याकडे) नोटसच्या नावाखाली चिटोरंही नाही. किंवा वर्षभरात ओसीचं पुस्तक आणयाचंच राहून गेलेलं आहे. पेपर लिहायला बसल्यावर काही म्हणजे काही जाम आठवतच नाहीए आणि या सगळ्यावर वरताण स्वप्न म्हणजे काही वर्षांपूर्वी मला जे वाटलं होतं नां की मी पास बिस झालेय ते खरं नाहीच. अजून पिक्चर बाकी आहे. हे सगळं कमी म्हणून की काय असली सगळी हॉरर स्वप्नं मला पहाटेच पडतात. (पहाटेची स्वप्नं खरी होतात असं म्हणतात नां, माझा तसा काही विश्वास नाही पण...विशाची परिक्शा सांगितलिय कोणी नाही का?) स्वप्न पडून झोपेचं वाट्टोळं झाल्यावर दरदरून घाम येतो, प्रथम डोळे नुसतेच उघडतात मग हळूहळू जाणिव व्हायला लागते आधी स्वत:च्या शरीराची आणि मग आजुबाजुला पसरलेल्या अस्ताव्यस्त तीन शरीरांची. ही जाणिव झाल्यावर स्वत:लाच मग बाजावते की नाही नाही हे सगळं स्वप्न होतं आणि ते संपलं. वास्तव समोर पांघरूणात पसरलं आहे. (हे वास्तव/ वास्तवं, जागं/जागी झालं/झाली की चटाचट चटके. धरो तो चावेगा छोडो तो भागेगा समदाच लोच्या म्हणजे डोळे मिटून परत झोपावं तर उरलेला पेपर लिहावा लागणार आणि जागच रहावं तर आणखि एक छळकुटा दिवस असा फ़िदी फ़िदी हसत पहाटेपासून समोर उभा). तरिही स्वत:च्या टक्क उघड्या डोळ्यांवर जरासुध्दा विश्र्वास न ठेवता मी दूरवर पसरलेल्या नवर्‍याला गदागदा हलवून जागं करते (बिचारा हा इमानदार प्राणी इमानदारीत डिग्रीधारक झालाय तरीसुध्दा माझ्या स्वप्नांचा जाच सहन करतोय) गाढ झोपलेल्या नवर्‍याला जागं करणं हे महापातक असलं तरी ते करून जीव मुठीत घेऊन मी त्याला मला वाईट स्वप्न पडल्याचं सांगते. पूर्वी माझा भेदरलेला चेहरा पाहून तो बिचारा टकटकीत जागा व्हायचा आणि माझी समजूत घालून झोपवायचा. आता इतक्या वर्षांनंतर त्यालाही माझं हे दरवर्षी येणारं स्वप्न माहित झालंय. मी जग बुडल्यासारखं त्याला गदागदा हलवून जागं करते आणि मग तो हं असा हुंकार भरून काय झालं विचारून झोपुनही जातो. (मला भितीयुक्त शंका आहे की, आणखी एखाद दोन वर्षांनी तो, "झोप गं आता उद्या नोटस आणून देतो" असं सांगेल की काय?) आता हे सगळं आजच आठवायचं कारण काय? तर काल टिव्हीवर पारले जी, जी माने जिनियसच्या बिस्कुटांची जाहिरात पाहिली. ती पोट्टं खायला (गिळायला म्हणू?) तरास देतं ती नव्हे, दुसरी, रात्री रात्री जागून अभ्यास केलेली. तर ती जाहिरात आणि आम्ही डिट्टो म्हणजे अगदी सेम टू सेम. जून ते डिसेंबर हे महिने "अ‍ॅकॅडमिक कॅलेंडर"मधून आम्ही स्वच्छेनं हद्दपार केले होते. जे काय असेल ते जानेवारी उजाडल्यानंतर. नवं कॅलेंडर लागलं रे लागलं की आता अभ्यास सुरू हं, टीपी बास झाला असं एकमेकिंना बजावायचो. ग्रुप म्हणाल तर सहाजणिंचा. पण घट्ट मैत्री म्हणाल माझी आणि माझ्या एका जिवलग मैत्रिणिची. तर जानेवारी महिना सिरियसनेसचं बेअरींग घेण्यातच उलटायचा. फ़ेब्रुवारीत वह्या पुस्तकं साफ़सुफ़ व्हायची. फ़ेब्रुवारी संपत आला की कधितरी परिक्षांची चाहूल लागायची. मग चौफ़ेर वारू उधळायचा. नोटस जमव, पुस्तकात डोकं घालून महत्वाची टिपणं काढ, आणखि उत्साह असेल तर ती लिहून काढ असले लघुउद्योग सुरू व्हायचे. खरी गंमत यायची ती टाईमटेबल लागल्यावर. कोणाच्या घरी अभ्यासासाठी रात्री जमायचं यावर तासदोन तास खल केल्यावर एखादा निर्णय लागायचा आणि जेवणं बिवणं आवरून रात्री आपापली वह्या पुस्तकं घेऊन आम्ही जमायचो. आता जमल्या जमल्या लगेचच अभ्यासाला कसं लागणार? मग जरा गप्पा टप्पा झाल्यावर चहा घेऊन अभ्यासाला सुरूवात व्हायची. तोवर घड्याळानं दुसर्‍या दिवसावर टुककन उडी मारलेली असायची. जरा तास दोन तास जातायत तोवर कोणितरी पेंगायला लागायचं, मग पुन्हा एकदा चहा सोबतिला ऑल इंडियावरची जुनी गाणी, हळू आवाजातल्या गप्पा आणि खिदळणं झालं की कोणितरी एक दटावायची की पुन्हा पुस्तकात डोकं खुपसलं जायचं. जरा अर्धा तास सरला की कोणितरी मावळा धारातिर्थी पडलेलं असायचं. पुस्तक नाकावर घेऊन सपशेल आपटी. मग वातावरण निर्मिती व्हायची आणि एक एकजण हत्यारं खाली टाकून निद्रादेविला शरण जायची. सकाळी हळूच आपल्याला कोणी बघत नाहीए असं पाहून अंथरूणातच पुस्तकात डोकं खुपसून बसलं की नंतर उठणारीला वाटायचं बाप रे! ही रात्रभर जागीच आहे की काय? हे असं सगळं परिक्षेच्या दिवसापर्यंत चालायचं.प्रत्येक विषयासाठी सहा सहा दिवस केलेली विभागणी प्रत्येक विषयासाठी सहा तास या गतीवर यायची. परिक्षा सुरू झाली की आणखिनच धमाल. तीन गाड्यांवर सहाजणी जायचो तेंव्हाही गाडीवर मागे बसलेली एकजण जाता जाता महत्वाचं काही तरी वाचून दाखवायची. जिनं जिनं ते आधिच वाचलेलं असेल त्या मनात उजळणी करायच्या आणि ज्यांनी ते यापूर्वी नजरेखालून देखिल घातलेलं नसेल त्यांच्या पायाखाली ढुम्म्म!!! मग अगदी महत्वाचे दोन तीन मुद्दे उजळले जायचे. (हे मुद्दे लक्षात ठेवण्याचे आमचे असे काही युनिक मार्ग होते. त्यात मूळ मुद्दा बाजुला असायचा आणि भलत्याच उपमांनी तो लक्षात रहायचा. मला अजूनही एक मॉडेल आठवतं ज्याची डायग्राम कशी आहे हे सांगताना माझ्या बहाद्दर मैत्रिणिनं सांगितलं की, बियरचा ग्लास खिडकीत ठेवला तर कसं दिसेल? तशिच आहे डायग्राम. भले हो! इथे कोणाच्या बापसानं बियरचा ग्लास भरून खिडकीत ठेवला होता? पण इमॅजिनेशन असलं जबरी की विचारूच नका. तर त्यावर कडी म्हणजे हिच डायग्राम त्या दिवशी पेपरात विचारली. योगायोगानं आमची आडनावं एकाच अद्याक्षरापासून सुरू झालेली असल्यानं ही महान मैत्रिण माझ्याच वर्गात होती. पेपर वाचल्या वाचल्या तिन एक्सायटेड होऊन मला ग्लास ग्लास असं कुजबुजत्या स्वरात सांगितलं. तिची ही कुजबुज जवळपास अर्ध्या वर्गानं ऐकली आणि नंतरचा एपिसोड मी सांगायलाच नको. असो. तर मुद्दा काय की अभ्यास वगैरे लक्षात ठेवायची आमची आपली एक पध्दत होती) अशा पध्दतिनं इकॉनॉमिक्स म्हणू नका, अकाऊंटस म्हणू नका, ओसी म्हणू नका सगळ्या पाचच्या पाच वर्षांच्या विषयांची आपल्या परीनं वाट लावल्यावर आता अशी स्वप्न यावीत म्हणजे काय? असली स्वप्नं पडली की मला सकाळी सकाळी गाणं म्हणावसं वाटतं, "स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केंव्हा......"


असो. आता पोस्टमध्ये न बसलेला मुद्दा जो सांगितल्यावाचून दी एंड होणं शक्यच नाही.-एका वर्षी इकॉनॉमिक्सच्या पेपरच्या आदल्या दिवशी दिव्या भारतीनं उडी मारून जीव दिला आणि आम्ही अख्खी रात्र तिला श्रध्दांजली देत बसलो. पहाटे पहाटे कोणितरी दु:खद धक्क्यातून सावरलं आणि दहा वाजता पेपर द्यायला जाण्याची आठवण करून दिली. त्यानंतर आमचं जे रॉकेट झालेलं होतं ते आयुष्यभर विसरणं शक्य नाही.

मुद्दा क्रमांक दोन- या पोस्टसाठी "कोई लौटा दे...."चा टॅग चिकटवला असला तरी मला हे असले दिवस परत फ़िरून अजिब्बात नकोयत. हां त्यावेळेसची धमाल चालेल पण बाकिचं आता परत नको.