नमकीन



काही काही सिनेमे कादंबरी वाचल्याचा फिल देतात. असाच छान अनुभव देणारा सिनेमा म्हणजे  १९८२ साली प्रदर्शित झालेला गुलजार दिग्दर्शित "नमकीन". #namkeen

चित्रपटात मुख्य भूमिकांत वहिदा रेहमान,  शर्मिला टागोर, शबाना आझमी, किरण वैराळे आणि संजीव कुमार आहेत.

गुलजार यांच्या शायरीमधे नेहमी "भेटणारं" , दूर कहीं टिमटिमाती रोशनी से खामोश पहाडी गांव या गोष्टीत मुख्य सहाय्यक भूमिकेत आहे.

यातली गोष्ट, यातली पात्रं आणि प्रसंग फिल्मी नाहीत. ती वास्तवात असूच शकतात म्हणून ही गोष्ट एक चूटपूट लावत मनात घर करते.

ही गोष्ट जिथे घडते ते एक छोटसं, शांत, निवांत पहाडी गाव आहे. इथले शेळ्या चरायला नेणारे लोक मनानं निरागस आहेत. डोक्यावर ओढणी असणाऱ्यां स्त्रिया असण्याचा  तो काळ.  आजच्यासारखा सहा पदरी हायवेंचा आधुनिक काळ नाही. तेंव्हा डोंगरातून नागमोडी वळणं घेत रस्ते गावं जोडत जात. अशाच एका रस्त्यावरचं हे गाव. रहदारीतला एक ट्रक आणि त्याचा ड्रायव्हर  गेरूलाल (संजीव कुमार). रहायला घर शोधत या गावात येतो. सिनेमाची सुरवातच या शोधातून होते. त्याला घर दाखवणारा धनीराम त्याला म्हणतो,"कौन सा तुम शादी के लिए घर देखने जा रहे हो, चार दीवार खड़ी कर उस पर छत डालो, हो गया मकान तैयार।" त्याच्या अशा सांगण्याला कारण आहे ज्या घरात गेरूलाल रहाणार आहे त्या कुटुंबाची परिस्थिती. या कुटुंबात चार स्त्रियाच रहातात. एका जुनाट जीर्ण घरात ज्योती अम्मा (वहिदा) आणि तिच्या तीन तरूण मुली, निमकी, मिठ्ठू, चिनकी रहातात. कोणे एके काळी ज्योती नर्तकी असते आणि सारंगीवादकासोबत लग्न करून तीन मुली पदरात घेऊन  या पहाडी गावात गरिबीत रहात असते. तीन तीन तरूण मुली असणारी आई जशी असू शकते तशीच ती आहे. सगळा गाव या चार स्त्रियांच्या कुटुंबाला चोच मारायला टपलेला असताना धनीसारखा सज्जन मात्र त्यांच्या पोटपाण्यासाठी एखादा चांगला भाडेकरू शोधत असतो. योगायोगानं गेरूलाल या घरात येतो आणि हळूहळू या कुटुंबात मिसळून जातो.  त्याचं निमकीवर (शर्मिला) प्रेम जडतं मात्र वयानं आणि अनुभवानं वडील असलेली निमकी गेरूलालला मिठ्ठूशी (शबाना) लग्न करायचा सल्ला देते. बहिणीचं आयुष्य मार्गी लागावं आणि तिला आवडणारा मुलगा तिला मिळावा हा उद्देश. मात्र गेरूलाल याला मान्यता देत नाही आणि या कुटुंबाच्या आयुष्यातून, त्या गावातून निघून जातो. पुढे काही वर्षांनंतर एका नाटक मंडळीत त्याला नाचणारी चिनकी भेटते. ती आता वडिलांसोबत नाचून पैसा कमवत असते. तिच्याकडून उरलेल्या तिघींबाबत अर्धंमुर्धं कळल्यानं गेरूलाल पुन्हा एकदा त्या गावी जातो. त्या आणखिनच पडक्या झालेल्या जुनाट घरात आता उरलेली असते एकाकी निमकी. 


काळ बदलला असेल, वरवर बघता बर्‍याच सुधारणाही झालेल्या असतील मात्र आजही तीन तरूण पोरींच्या आईचा जिवाचा घोर तोच आहे. आजही अशा वय वाढलेल्या अविवाहित मुली समाजाला चोचा मारायला आवडतात. 

माझ्या आजीला सात मुली त्यामुळे तिचा तो घोर मला ज्योतीच्या जवळचा वाटतो. पटकथा, संवाद, गीतं आणि दिग्दर्शन गुलजार यांचंच आहे आणि त्याकाळी हा काळाच्या पुढचा सिनेमा होता. यातल्या चारही वुमनिया मनानं कणखर आहेत, विचारानं स्वतंत्र आहेत. स्त्रीमुक्तीचे ढोल न वाजवताही आयुष्यानं दिलेल्या अनुभवातून शिकत आपापल्या मार्गांवरून जाणाऱ्या आहेत.


सहसा पोस्टला पोस्टर लावायचा रिवाज असला तरिही मला गाणं जोडण्याचा मोह आवरता येत नाहिए. याचं कारण यातली गाणी खूप सुंदर आहेत आणि दुसरं म्हणजे पोस्टसोबतचं जे गाणं आहे त्यातला निरागस अस्सल ग्रामीण मूड मला फार आवडतो. तुम्हालाही. नक्की आवडेल.

https://youtu.be/slveXAZ4Jzc


#sharmila

#shabana

#kiranvairale

#sanjeevkumar

#gulzar



 

1 comments:

मिलिंद कोलटकर said...

व्वा! आवडलं. संजीव कुमार अन गुलझार. दोघांचा एवढा पंखा असूनही या कलाकृतीबद्दल माहित नव्हतं. गाण तर पाहिलंच. चित्रपट ही मिळालाय. नक्की पाहीन. धन्यवाद!