शिमला-२



......टिम्बर ट्रेलवरुन निघालो आणि हवेतला गारवा वाढतच चालला. हिमाचलमध्ये आलो आहोत हे जाणवायला लागलं. शेवटी तर बॆगमधून शाली आणि स्वेटर निघालेच. आम्ही गेलो त्याच्या दोन दिवस आधी शिमल्यात पाऊस हजेरी लावून गेला होता त्यामुळे तर नेहमिपेक्शा जास्तच गारठा जाणवत होता. एव्हाना रात्र म्हणावी असा अंधार पडला होता. गच्च झाडांची गर्दी अंधारात जास्तच भितीदायी वाटत होती. अधून मधून घरं दिसायला लागली, मग रस्त्याकडेला लावलेल्या गाड्या दिसायला लागल्या आणि शिमल्यात पोहोचल्याचं समजलं. हिमाचलमध्ये जिथे जिथे गेले तिथे अगदी ठळकपणानं दोन गोष्टी दिसल्या एक हिमालयाची शिखरं आणि दुसर्या प्रचंड संख्येत असणार्या गाड्या. रस्त्याच्याकडेला कठड्याप्रमाणे गाडया ओळित लावून ठेवल्या होत्या. आम्हाला पोहोचेपर्यंत बराच उशिर झालेला असल्यानं शिमलावाले डाराडूर झालेले होते. एव्हाना रात्रिचे अकरा वाजले होते, आमचं हॊटेल एजंट नक्की कोणत्या भागात केलंय काही माहित नव्हतं. अशा किर्र रात्री पावसानं धुतलेल्या आणि गारठून रजईत गुडूप झालेल्या शिमल्यात आम्ही आमचं थोर हॊटेल शोधत होतो. एखादा माणूस दिसतोय का पहात होतो. आत्तापर्यंत एक गोष्ट स्वच्छ समजली होती की ज्या ड्रायव्हर महाशायांवर आम्ही माहितगार म्हणून विसंबलो होतो ते ही आमच्याइतकेच नवखे होते. त्यामुळे पत्ता शोधण्याची जबाबदारी आमच्यावर आली. आणि अखेर त्या थंडगार रात्री आम्हाला समोरुन एक अख्खा माणूस येताना दिसला, तो टप्प्यात आल्या आल्या झप झप सगळ्यांनिच काचा खाली करुन त्याला एकाचवेळेस शंभर एक प्रश्न विचारले. तो बिचारा थंडित पटपट पावलं उचलत हात चोळत घर गाठायला चालला होता आणि आमच्या कचाट्यात सापडला. अखेर त्याला सगळ्यांच्या प्रश्नातला एकच कॊमन शब्द समजला "कुफ्री रोड". बहुदा तो हुशार असावा त्यानं सांगितलं की आगे सिध्दे जाके लेफ्ट मारो जी. सुटलो एकदाचे म्हणत पुन्हा एकदा गाडी चालली. सिध्दे जात असतानाच ड्रायव्हरनं दिलेल्या सुचनेप्रमाणे सगळ्यांची डोकी डाव्या बाजुला वळून हॊटेलचा बोर्ड कुठे दिसतोय का शोधत होती. सगळा लेफ्ट संपला, तुरळक दिसणारी हॊटेल संपली, रस्ता खाली उतरला तरी काही दिसेना. अखेर एका चौकात आल्यावर ड्रायव्हरनं अधिकृतरित्या जाहिर केलं,"ओ सरजी मुझे डाऊट है की हम रस्ता भुल गये....शायद. अब आगे जाने का मतलब ही नही है. आप एक काम करो जी वु हॊटलवाले को फोन करके पता पुछो". आमच्यापैकी बुकिंगवगैरेची जबाबदारी ज्याच्यावर होती त्याच्याकडे सगळे अपेक्शेनं पहायला लागले. तर चष्म्याच्या आडून लुकलुकत्या निष्पाप डोळ्यानं त्यानं सांगितलं की,"होटल का नंबर तो नहीं है. उसने बताया कुफ्री रोड बोलेगे तो ड्रायव्हर समझ जाएगा". सगळेजण त्याच्या या बोलण्यावर जितक्या संयमात त्याच्यावर डाफरता येईल तितक्या संयमात डाफरले. मग आता काय याचा खल चालू झाला. येण्यापूर्वी मी त्या होटेलची साईट पाहिली असल्यानं मला हॊटेलचा नसला तरी साईटचा पत्ता पाठ होता. तेव्हढ्या रात्री थंडितही मला कल्पना सुचली की मित्रमंडळिंपैकी रात्री हमखास ऒनलाईन असणार्या कोणालातरी साईटचं नाव सांगून ती साईट उघडायला लावून किमान फोन नंबर तरी मिळवावा. किमान माझ्या कल्पनेप्रमाणे तरी ही अगदी वर्ल्ड बेस्ट आयडिया होती पण ही कल्पना मांडल्या मांडल्या नवर्याचा जो "लूक" मिळाला त्यावरुन सुद्न्यास अधिक सांगणे न लगे समजून मी गप्प राहिले. आमचं हे सगळं मागे चालू होतंच तोपर्यंत ड्रायव्हर महाशयांनी गाडी वळवून परत पावली जायला सुरवातही केली होती. येताना ज्या ठिकाणी तुरळक हॊटेल दिसली होती तिथे परत एकदा नीट पहायचं ठरवलं तर यंदा आम्हाला आमच्या डाव्या बाजुला ते हॊटेल चक्क सापडलं. हॊटेलचं मूळ नाव मध्यात लहान अक्शरात आणि वर खाली इतर काही असल्यानं आमच्या नजरेतून ते सुटलं असावं आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे मघाशी तो जो थंडिनं काकडलेला मनुक्श होता त्यानं बरोब्बर उलट्या बाजुला वळायला सांगितलं होतं. अंत भला तो सब भला म्हणत आम्ही होटेलकडे जाणार्या रस्त्याकडे वळलो. रस्ता संपेना आणि हॊटेल दिसेना म्हटल्यावर वैतागलेल्या ड्रायव्हरनं विचारलच "सरजी ये होटेल आपको किसने सुझाया"? म्हटलं कप्पाळ आमचं. इतक्यात आम्ही अगदी हॊटेलच्या दारातच आलो. फटाफट उड्या मारत सगळेजण खाली उतरले. होटेलच्या रिसेप्शनमध्ये झोपलेली मंडळी बिचारी उठून बसली आणि हसतमुखानं आम्हाला सामोरी आली. तोंडानं काही म्हणत नसली तरी मनात त्यांच्या काय आहे वाचायला येतच होतं. दार उघडून आत आलो आमच्या मागोमाग होटेलचा केयरटेकर कम मॆनेजर जो कोणी होता तो स्वत: सामान घेउन आला. त्याला विचारलं, "खाने को क्या मिलेगा"? तो म्हणाला,"किचन तो कब का बंद हो गया मॆडमजी, चाहिए तो सॆंडविच बन सकता है" मनात म्हटलं"ई मध्यरात्री सॆंडविच कोण तोडणार"? कल्पनेनंही अंगावर काटा आला. पण वरुन साळसूदपणानं म्हटलं,"भैय्या साथ में चोटे बच्चे है, कम से कम उनके लिए तो चावल घी दो" त्यानं फारसा भाव दिला नाही. म्हटलं नाही तर नाही पण खडा तर मारुन पाहिला. एव्हाना परत एकदा नवर्यानं त्याचा वर्ल्ड फेमस तुच्छ ’लूक’ देउन झाला होता. मिही सराईतपणानं त्याला उलट लूक दिला. इतक्यात दार वाजलं आणि तो केयरटेकर कम मेनेजर आत आला आणि प्रचंड अपराध केल्यासारखा चेहरा करुन म्हणाला, ’मॆडमजी अभी आपको हम सिर्फ तवा रोटी, दाल, मिक्स सब्जी और सादा राईस दे सकते है, चलेगा’? त्याला म्हटलं,’चलेगा? दौडेगा’. त्या बोलण्यानंतर अर्धा पाऊण तासानं आम्ही सगळे जेवायला बसलो होतो मध्यरात्री बाराच्याही पुढे कितीतरी वाजले होते, आजुबाजुला हुडहुड थंडी होती आणि त्या तशा थंडित आमच्यासमोर गरमागरम पहाडी जेवणाची भांडी होती. व्वा व्वा! स्वर्गिय सुख यालाच म्हणतात की काय कोण जाणे. मघाशी,"आधी रात को खाना क्या खाएंगे? ब्रेड जाम खाके सोते है" म्हणणारी मंडळी भक्तिभावानं रोट्या चापत होती. ज्या अर्ध झोपलेल्या लेकिच्या नावावर हा घाट जमवून आणला होता तिनंही जणू माझी लाज राखण्यासाठी अगदी न कुरकुर करता व्यवस्थित जेवण केलं. त्यावर तिच्या बाबाकडे मी विजयी नजरेनं बघत आणि इतरांना मराठी समजत नव्हतं याचा ऎडव्हानटेज घेत तिथल्या तिथे म्हटलंच की बघ केवळ माझ्यामुळे तुझी भुकेली मुलगी ब्रेड जाम न खाता गरम गरम जेवण जेवतेय. यावर त्यानंही माझा आगावुपणा मान्य करत सगळ्यांच्यावतिनं जोरात म्हटलं, ’थॆंक्यु मॆडमजी, आपकी वजह से ये खाना नसिब हुवा’ यावर सगळ्यांनी संमतिची मान डोलवायचे कष्ट घेतले आणि पोटभरल्याचे ढेकर देत, कल सात बजे मिलेंगे म्हणत गुड नाईट केलं......
(अपूर्ण)
 

शिमला-१



यंदा सुट्टीत शिमल्याला जायचं जायचं जपत असताना अगदी जायचा दिवस येउन ठेपला. पॆकिंगचा गदारोळ, निरोपाचे फोन उचलतच पहाटे पहाटे विमानतळ गाठलं. शेवटच्या क्शणापर्यंत कसलं गं पॆकिंग करता नेहमी नेहमी ची कटकट ऐकतच घर सोडलं. वेळ गाठली आणि हुश्श झालं तर विमान तब्बल पंचेचाळीस मिनिटं उशिरानं उडलं. दिल्लीत उतरल्या उतरल्या घाणेरड्या वासानं डोकं उठलं कदाचित ही पुढच्या वैतागाची नांदी होती. बाहेर आलो तर हातात फलक घेउन आमचे सारथी महाशय उभे होते. त्यांच्यासोबत गाडीपाशी आल्यावर लक्शात आलं की माणसांच्या तुलनेत गाडी लहान आहे. इथुन पुढे दीड तास एजंट, सारथी अशा फोनच्या फैरी झडल्या. ही गाडी रहित करुन सरळ दोन स्वतंत्र गाड्या कराव्यात का? अशिही व्यापक चर्चा झाली. अखेर जाऊदे आता वेळ नको घालवायला असं म्हणून पदरी पडलेली गाडी पवित्र करुन घ्यायचं ठरलं. एक पिल्लू मांडिवर आणि दुसरं दोन सिटच्यामध्ये बॆग ठेवून त्यावर विराजमान करण्याचं सर्वानुमते ठरलं. बांधाबांध होउन अखेर निघालो. आमचे सारथीमहाशय फारच सावधपणानं गाडी चालविणारे निघाले. डिचक्यांव डिचक्यांव करत आमचा प्रवास चालू झाला. मध्ये कधीतरी कंटाळवाण्या प्रवासात जेवायला थांबलो तर ते हॊटेल चक्क अती उत्तम निघालं. क्या बात है! म्हणत जेवणावर तुटून पडलो. आता पुढचा प्रवास चालू झाला. मजल दरमजल करत पिंजौर गार्डनला पोहोचलो. प्रथम दर्शनी ताजमहालसारखं वाटत होतं. तिथे तासभर काढून पुन्हा एकदा गाडीला स्टार्टर दिला. शिमल्यातली पाईन झाडांच्या गर्दितली हिमशिखरं कधी एकदा पहातोय असं झालं होतं. पण गाडी तर आपल्याच नादात चालली होती. एरवी गाडिचा वेग कबूत ठेवावा अशा मताची मी आज मात्र चालक फारच हळू गाडी चालवतोय म्हणून कुरकुरत होते. माझ्या या कुरकुरीवर पतिराजांनी नजरेनच स्पिडॊमिटरकडे बघ असं सांगितलं. काटा शंभरच्या मागेपुढे झुलत होता. श्शी! शंभरच्या वेगाला गाडी इतकी हळू? आता तर हळू हळू सूर्यदेवही कलटी मारायच्या तयारिला लागले होते. त्यांची अशी आवरा सावर चालू असतानाच आम्ही काल्कात प्रवेश केला. आता कुठे शिमल्याच्या बोटावर आल्यासारखं फिलिंग यायला लागलं. हवेतला फुफाट्याचा कोरडेपणा जाऊन थंडावा यायला लागला. हिमाचलमध्ये आल्याचं जाणवायला लागलं. काल्काच्या बाजारपेठेतून गाडी जात असताना तिथली निवांत रेंगाळलेकी संध्याकाळ पहाताना एक प्रकारची गंमतच वाटायला लागली. काय मस्त निवांत संध्याकाळ होती त्या लोकांची, माणसांचे घोळके घराच्या, दुकानांच्या समोर निवांत बसले होते, कोणालाही कसलिही गडबड किंवा घाई दिसत नव्हती. एव्हाना आम्ही टिंबर ट्रेलपाशी आलो होतो. नवरा यापूर्वी तिथे जाउन आल्यानं त्याचा अगदी हट्टच होता की हा अनुभव घ्यायलाच हवा. म्हटलं चल बाबा! तिथे गेलो तर तिथल्या माणसानं विचारलं की "आप सचमुच जाना चाहते हो"? म्हटलं ही काय भानगड? असं का विचारलं यानं? नवर्र्याचं डोकं पोखरत केबलकारपाशी पोचलो. तिकिटं काढली आणि वाटपहायला लागलो. फोटो काढून होईपर्यंत ती आलिच आणि मग तिच्यात बसलो. बंदुकितून गोळी सुटावी तशी ती निघाली सुरवातिला जाणवलं नाही पण मध्येच खाली पाहिलं आणि पोटात गोळ्याचं गाठोडंच आवळलं. बाप रे! आम्ही दोन दर्यांच्यामधोमध लटकत होतो. मनात नाही म्हटलं तरी एका सेकंदासाठी विचार आलाच की, आत्ता या क्शणाला जर काही झालं, म्हणजे वायर वगैरे तुटली तर? कसलं सिमला आणि कसलं बर्फ. इथेच आटोपणार सगळं. हा विचार करेपर्यंतच टॊवर आला आणि डोळेच मिटून घेतले. म्हटलं आता या टॊवरवर जाउन आपण आदळणार....पण त्याला बगलेत घेत ज्या वेगानं केबल सुटली होती त्याच वेगानं ती पलिकडच्या तळावर आली आणि डुलत डुलत स्थिरावली. त्यातून टुण्णकन खाली पहिली उडी मारणारी मिच होते हे काही वेगळं सांगायला नको. आता इथं काय बघायचं असं वाटत असतानाच अंगावर छान थंडगार हव्या हव्याशा वार्याची शाल पांघरली गेली. हॊटेलच्या टोकावर जाउन सूर्यास्त पहात असताना मनात आलं नंतर कधीतरी फक्ता या हॊटेलमध्ये निवांत रहायला यायचं. अशा ठिकाणी हॊटेल बांधणार्याचं मला मनापासून कौतुक वाटलं. मधुचंद्रासाठी जाणार्या जोडप्यासाठी तर हे हॊटेल म्हणजे अगदी आयडियल ठिकाण वाटलं. सारी दुनियासे दूर....हवा तितका एकांत....कोणाची कटकट नाही...कोलाहल नाही..नजर जाईल तिकडे फक्त डोंगररांगा आणि शिरशिरी आणणारा थंडगार वारा....गरजेला हायफाय हॊटेल...उत्तम जेवण...रहाणं उत्तम...मधुचंद्रासाठी जाणार्या जोडप्याला यापेक्शा वेगळं आणखी काय हवं असतं?......हम्म....फारच रोमॆंटिक वगैरे वाटायला लागून पुढची ट्रिप कॆन्सल होण्याआधीच आम्ही पुन्हा एकदा केबलराणीत बसून परतलो. परतिचा प्रवास जरा कमी भितिचा झाला. गाडीत बसून चलो सिमला म्हणत किल्ली फिरवली.....

(अपूर्ण)
 

झम्या

अम्या आणि झम्या दोघे घट्ट मित्र
एकदा काय झालं,
अम्या म्हणाला झम्याला
चल लेका सायबर कॆफेत जाऊ
झम्या म्हणाला,
पण लेका काय करायचं जाऊन?
अम्या म्हणाला, लेका चॆटिंग!
झम्या म्हणाला,बास काय!
पैसे देउन गप्पा? नाय बा!
आपल्याला नाही पटत
अम्या म्हणाला, लेका
ऒर्कुटवर जाऊ फ्रेंडलिस्ट बनवू
गप्पा मारायला चांगली ’कंपनी’ शोधू.....
झम्या म्हणाला नको बाबा नस्ती भानगड
अम्या म्हणाला, हात लेका भित्रं घुबड!
झम्या गेला लगोलग टांग टाकून सायकलवर
अम्याही गेला मग गप्पा हाणायला अड्ड्यावर
अम्यानं गुपचुप लॊग इन केलं
फ्रेंडलिस्टचं शेपूट वाढतच गेलं
टाईमपास तर आता कॆफेतच होउ लागला
झम्यालाही मग रागच आला
मग काय झालं नविनच कोणितरी प्रोफाईल व्हिजिट देउन गेलं
सहजच यानंही मग "ते" प्रोफाईल पाहिलं
व्हिजिट करता करता असं चॆटिंग चालू झालं
आता तर अम्याला ऒर्कुटचं व्यसनच लागलं
"त्या" प्रोफाईलला व्हिजिट तर रोजचीच झाली
करता करता दोघांनाही भेटिची ओढ लागली
शेवटी एकदाची "डेट" ठरली
अम्याला आता कुठं झम्याची आठवण आली
अम्या म्हणाला झम्याला, लेका काय करु?
भेटायला तिनं बोलवलंय....
झम्या म्हणाला मी काय सांगू?
माझंपण सेमच झालंय
मलाही तिनं आवतण धाडलंय
दोघांनाही एकमेकाला ऒल द बेस्ट केलं
डिओ वगैरे जय्यत तयारीनिशी
संकेतस्थळी कूच केलं.....
कॊफीशॊपमध्ये अम्या पोहोचला वेळेआधीच
शोधत होता...
त्या जीन्स आणि व्हाईट टी शर्टला
इतक्या सुंदर मुलिंत "ती" काही दिसेना
जावं परत म्हटलं तर पायही उचलेना
वाट पहायचिही आता हद्दच झाली
अम्यानं सरळ घराची वाट धरली
कॊफी शॊपबाहेर दिसला त्याला झम्या
....उदास....बापुडवाणा.....
चेहरा पाडून बसलेला.....
अम्या म्हणाला काय झालं लेका?
झम्या म्हणाला झालाय खरा लोचा
नाही म्हणालो पण मिही ऒर्कुटवर लॊग इन झालो
चारच दिवसात एका प्रोफाईलच्या प्रेमात पडलो
आज माझिही "डेट" होती....
अम्या म्हणाला, भारिच की लेका
मग माशी कोठे शिंकली?
झम्या म्हणाला, अरे पण ती नाहिच नां आली
अम्या म्हणाला, नाव तरी सांग लेका
झम्या म्हणाला, कसलं नाव अन कसलं काय
प्रोफाईलमध्ये खरं काही सांगतात काय?
तरी पण काहि तरी असेलच नां? अम्या म्हणाला
"ओन्ली फॊर यू".....झम्या सुस्कारला
आता फेपरं यायची वेळ अम्याची होती....
अम्या म्हणाला आणि तू कोण?"फॊर एव्हर युवर्स"?
दोघांनिही मग झम्याकडे पाहिलं
जीन्स आणि व्हाईट टी शर्ट????
लेका तुझी माझी डेट? काय डोकं फिरलंय काय?
अख्खं ऒर्कुट सोडून तुला मिच सापडलो काय?
च्यामारी इतके दिवस आपण एकमेकांशिच बोललो
समोर मुलगी आहे हेच ग्रुहित धरुन चाललो
चल आता आलोच आहोत तर कॊफी तरी घेउ
पहिली वहिली डेट तर साजरी करु!!
परत आता शी घोड चूक करायचीच नाही
मुलगी असल्याची खात्री केल्याशिवाय
डेट ठरवायचीच नाही.....
अम्या आणि झम्या दोघे सायबर कॆफेमध्ये
दोघांनिही आता वेगळं लॊग इन घेतलं आहे
त्याच्या लिस्टमध्ये वेटिंग फॊर यू
आणि याच्या लिस्टमध्ये समवन फॊर यू!
पुन्हा एकदा चॆटिंग जोरात चालू आहे
यावेळसचा धक्का कॊफी शॊपमध्ये नाही
ऒनलाईनच बसणार आहे!!
 

वठलेला प्रवास


गेल्या उन्हाळ्यात
माझ्या दारासमोरचं झाड वठलं,
म्हटलं आता याचं आयुष्य सरलं
वठलेला परतिचा प्रवास
त्यानं मूकपणे चालू केला
ना तक्रार ना खंत
ना पिलांची ओढ....
म्हटलं याला लागली बहुदा
पैलतिराची आस...
अचानकच एक दिवस मग
मेघ बरसून गेले
उन्हाळाही सरून आता बरेच दिवस झाले
सहजच परवा माझं लक्श त्याच्याकडे गेलं
तर याच्या अंगावर शेवाळलेला कोट!
वठलेल्या झाडाच्याही चार दोन फांद्या
होत्या अजुनही ओल्या
किलबिलणार्या पाखरांनी घट्ट धरून ठेवलेल्या....
 
या लेखाच्या टंकलेखनादरम्यान बरहा पॆडवर काही कळा उमटत नव्हत्या त्यामुळे लेखन सदोष आहे. क्रुपया कथेचा आनंद घेताना त्याकडे दूर्लक्श करा.
 
आशापुर्णादेवी या बंगाली सिध्दहस्त लेखिका. वेगळ्या वाट्वरचं त्यांचं लिखाण नेहमीच मनात खोल रुतून बसतं. त्यांची मला आवडलेली ही कथा, "सिमारेषेची सिमा रेषा". त्याचा काही अंश देत आहे. आवडली तर जरुर कळवा.
 

सीमारेशेची सीमा

सीमारेशेची सीमा

सर्वजण परत आले. सर्वांनी हात टेकले. अखेर सतीनाथ स्वत:च तिसरया मचल्यावर गेले. तीव्र स्वरात म्हणाले,"उध्दटपणालाही काही सीमा असायल हवी छवी, पण पाहुण्यांनी भरलेल्या या लग्नघरात तु जो असभ्यपणा करत आहेस त्याला सीमा नाही! नात्यागोत्याच्या सगळ्यांसमोर तू माझी अब्रु तर धुळीला मिसळवलीसच, पण स्वत:च्या तोंडालाही काळं फ़ासलस. आता मेहेरबानी करुन खाली चल." दाराला टेकुन छवी उभी होती, तीच्या चेहेरयावरचा भाव समजु शकत नव्हता, ती अजुनही तशीच ताठर आहे की थोडी झुकली आहे हे कळायला मार्ग नव्हता. खुद्द सतीनाथांनी वर येउन आग्रह केला तरीही ती पहिल्यासारखाच हट्ट धरुन बसली तर मात्र मान्य करावं लागेल की छवीदेखिल आपल्या नवरयासारखीच वेडी झाली आहे.


पण परिस्थितीत फारसा फरक दिसेना, विलक्शण शुश्क कंठने छ्वी म्हणाली, "दादा तू इथे यायचा त्रास काघेतलास? मी तर आधीच सर्वांना सांगितलय......""ठाऊक आहे." सतीनाथ क्रुध्द स्वरात म्हणाले,"ठऊक आहे, एकेकजण करुन घरचे सगळेजण येउन तुझी मनधरणी करुन गेले आणि तू सगळ्यांना जेवायचं नाही म्हणुन घालवुन दिलंस तुझी वहिनी तर तुझ्या पाया पडुन गेली तरीसुध्दा तू........" भाचीच्या लग्नघरात पहिल्यापासूनच पुढकार घेउन सगळं हौसेनं करणारी छवी ऎन जेवणाच्या वेळेसच गायब झाल्याने मांडवात चर्चेला उत आला होता. सगळेचजण तीला दोषी ठरवत होते. सर्वांना वाटत होतं की आपल्या धमकावल्या गेलेल्या वेड्या पतीची मनधरणी करायला ती अशी निघुन गेली. बडं प्रस्थ असणारे सतीनाथ स्वत: आपल्या लाडक्या बहिणीला मनवायला आले तरिही तिचा हेका एकच होता जेवायचं नाही डोकं दुखतंय. आता सतीनाथानाही त्यांच्या चुकीची जाणीव होऊ लागली. त्यांनी तिच्या नवरयाला असं चारचौघात बोलायला नकोच होतं पण तो भर मांड्वातच अगदी कन्यादानाच्यावेळेसच मांडवात पटकुरं टाकुन त्यावर पुरया, मिठाई, अन्नाचा ढीग लावुन जेवायला बसला म्हणल्यावर सतीनाथांनी चिडुन त्याला हकलुन दिला होता.


..........आणि आता ऎन जेवणाच्यावेळेस छवी बहुदा याचाच राग येउन जेवायला येत नव्हती. पंगत वाढुन ताटकळत होती पण त्याचं तीला काहीच नव्हत? शेवटी रागारगात सतीनाथ ईतकच म्हणाले की..."बेईमान असेच वागतात...." आणि निघुन गेले. याचवेळेस त्यांचा शेजारी असणारा अमल वर काय प्रकार घडलाय ते पहायला आला. पंगत वाढायची जबाबदारी त्याने आपल्यावर घेतली होती आणि एका स्त्रीच्या दुरग्रहामुळे ती खोळंबुन बाराचा काटा १ वर गेला होता. एकेकाळी अमलचं तिच्यावर अव्यक्त प्रेम होतं. पण परीस्थितीवश ते सफल झालं नाही. दुसरीकडे छवीच्या लग्नात तीची फसगत झाली, एका वेड्याशी तिच लग्न लागलं पण तिन १ शब्दाने तिच्या दादा विरुध्द तक्रार केली नाही उलट त्याच्या फुलत्या संसारात तिने तिचं सुख शोधलं असं सगळं असताना आजच असं काय झालं? अमलला प्रश्न पडला.


.........नवरयाच्या वेडेपणाची कोणी थट्टा केली तर ती हसुन उड्वुन लावणारी छ्वी आज जरा विक्शिप्तासारखीच वागत होती हे निश्चित. कदाचित तिला हा सोहळा पाहुन मत्सर वाटत असेल, कोणी सांगावं? छवीनं दार बंद करण्यापुर्वीच अमल दारात आला. चल पाहु आता बास झाला वेडेपणा. तुझं ठिक आहे पण क्शितिजबाबुंना (छवीचा पती) तर जेवायला दे. बिचारे कधीचे भुकेजले आहेत. झालं गेलं संपलं, आता चल पाहु. रागाच्या भरात आज एकवेळ तु त्यांना जेवु देणार नाहिस पण उद्या तर त्यांना जेवावंच लागेल नां? छवी हसली, खरंच हसली. भकासपणे हसली. म्हणाली, " नाही अमल ते आज जेवणार नाहीत. आज नाही, उद्या नाही, परवा नाही कधीच नाही"

छवीच्या या साध्या बोलण्यालाही अमल घाबरला, "छ्वी" तो जोरात किंचाळला. त्याने तिचा दारावरचा हात बाजुला काढुन आत घुसला आणि आत बघुन त्याचा थरकाप उडाला. छवीच्या उध्द्टपणाचे, वेडसरपणाचे कारण पाहुन..........त्याला भान आल्यावर त्याने विचारलं, हे कसं झालं? छवी म्हणाली वेड्याचा वेडेपणा दुसरं काय? साल्याने मला जेवायला दिलं नाही म्हणुन आपल्याच हाताने डोक्यात खिळा मारुन घेतला. अगं पण हे सतीनाथांना सांगायला हवं."नको अमल. आता नको. त्यांचा हा दिवस बरबाद करु नको" "छवी अगं तु रात्रभर एकटीच ईथे बसणार अशीच? तु फथ्थराची बनलेयस का? कसं हे सारं सहन करतेस" " सहन करायलाच हवं अमल. सीमारेषा विसरुन कसं चालेल? त्यांच्या आनंदाच्यावेळी काय मी आपलं..........मी झोपेन आता बहुदा झोप लागेल मला" असं म्हणुन असभ्य आणि उध्दट छवीनं दार धाडकन लावुन घेतलं हो, दार बंद केल्याशिवाय ती राहु शकत नव्हती. सतीनाथांचं बोलणं तिला पटतंय. प्रत्येक गोष्टीला सीमा असते, असायला हवी!

(आशापूर्णा देवी)
 

काचाकवड्या


उन्हाळ्याची सुट्टी आणि काचाकवड्यांचं माझ्या द्रुष्टिनं एक खास नातं आहे. सुट्टी लागली की अगदी पहिल्या दिवशी पहिलं काम करायचं ते म्हणजे मोठ्ठा लाकडीपाट काढायचा तो स्वच्छ करायचा आणि खडूनं त्याच्या मागे चौकटी आखायच्या. चिंचोके मधोमध फोडून त्याच्या दान पाडायच्या सोंगट्या बनवायच्या. बांगड्यांच्या रंगीबेरंगी काचांचे तुकडे शोधायचे किंवा बांगड्या फोडून बनवायच्या. त्यासाठी वर्षभर अशा एकेकट्या बांगड्या साठवायच्या. लाल रंगाच्या बांगडिचे तुकडे मला खास आवडायचे कारण पाटाच्या पार्श्वभुमीवर ते खुप देखणे दिसायचे. लाल रंगाच्या बांगडिचे तुकडे खास माझे असायचे बाकी कोणी त्या रंगाचे काचेचे तुकडे घेतले की आमची भांडणं ठरलेली. मोठा भाऊ नेहमी ब्लॆकमेल करायचा म्हणायचा मला तुझ्या चिंचोतले दोन बटुके दिलेस तरच या लाल काचा तुला देणार. काय करणार? त्यासाठी गांभुळलेल्या आंबटगोड चिंचेच्या तब्बल दोन बटुकांचा मला त्याग करावा लागायचा. चिंचोके पाटिवर पदले तर आठचं दान आणि पोटावर पडले तर चारचं दान असायचं. मनात देवाचा धावा करत करत हातात चिंचोके खुळखुळवताना देवा आठ देवा आठ असा जप चाललेला असायचा. मनासारखं दान पडलं तर मग उडीच माराविशी वाटायची आणि नाही पडलं तर राग यायचा. नाकाचा शेंडा फुरफुरायचा. भाऊ चिडवायचा ’चिडका बिब्बा चिडला’ की जास्तच राग यायचा. अशी चिडवाचिडवी करत एकमेकाला काटत काचाकवड्या दिवस दिवस रंगायच्या. जोडिला गांभुळलेल्या चिंचा, जांभळं, करवंद किंवा खोबरी कैरी आणि खड्याचं रगडलेलं मीठ-तिखट असायचं. किती फस्त व्हायचं याची गणतीच केली जायची नाही. घरातले अधून मधून ओरडायचे. अरे किती आंबट चिंबट खाता म्हणायचे. आम्ही खाली मान घालून तेव्हढ्यापुरतं ऐकून घ्यायचो. परत चालूच रहायचं. या सगळ्या मेव्याचा हिशेबही चोख ठेवला जायचा. काल आमच्या बागेतल्या कैर्या होत्या आज तुमच्या बागेतले पेरु आण असं सरळ सरळ फर्मानही सोडलं जायचं. आळीपाळीनं सगळे खेळायचे. चारजण खेळत असताना बाकिचे आपापले भिडू पकडून जोशा वाढवत असायचे. रोज कोणाचं तरी नशिब साथ द्यायचं नाही, त्याला सगळे जाम पिदडवायचे. दुपार कलायला लागल्यावर मग पांगापांग व्हायची. म्हणून उन्हाळ्याच्या उकाड्याबरोबर, दमटपणाबरोबर मला काचाकवड्यांत रमलेली ती आंबट दुपारच आठवते.
 

टि व्ही चे भन्नाट किस्से

परवा मावशी आली होती. टि व्ही कोणती सिरियल पहायची यावरुन माझा आणि लेकिचा वाद चालू होता. तर तिनं दोन भन्नाट किस्से सांगितले. त्यांचे एक स्नेही आहेत एस के मामा म्हणून त्यांच्याकडे एक भाडेकरु कुटुंब होतं. नवरा बायको दोघेच रहायचे आणि त्यांच्यातही काय पहायचं यावरुन भांडणं व्हायची. या भांडणाला कंटाळून त्यांनी एक दिवस टि व्ही उचलला आणि सरळ एसकेमामांकडे नेउन ठेवला. ज्याला त्याचा कार्यक्रम पहायचा त्यानं त्या वेळेत शेजारच्या घरात जाउन टिव्ही पहायचा असं ठरलं. यापे़क्शा दुसरा किस्सा मस्त आहे. रामायण चालू होतं तेव्हा. गावी एका माणसाचं छप्पर गळत होतं म्हणून तो कर्ज मागायला बॆंकेत गेला तर त्याला सांगितलं की असल्या कारणासाठी कर्ज मिळत नाही. याला तर नड होती. मग बॆंकेतल्याच एका माणसानं सांगितलं की असं कर टि व्ही साठी कर्ज मिळू शकतं तेव्हा तू त्यासाठी अर्ज कर मग टि व्ही विकून छप्पर दुरुस्त कर. पावसाळा तोंडावर आल्यानं त्यानं नाईलाजानं कर्ज काढलं आणि टि व्ही घेतला. त्यावेळेस टि व्हीवर रामानंदसागर यांचं रामायण लागायचं. हा शेतावर गेलेला असायचा आणि निम्मा गाव याच्या घरात भक्तीभावानं रामायण बघत असायचा. अशानं त्याला टि व्हीही विकता येईना. यावर कळस म्हणजे एक दिवस तो घरात होता आणि रामायण चालू झालं. नवरा बायकोत कशावरुन तरी भांडण चालू झालं. लोकांनी दोघांनाही सरळ घरातून बाहेर जाउन भांडायला सांगितलं. सिन असा होता की गावातल्या मारुतिच्या देवळात हे जोडपं तावातावानं भांडत होतं आणि गाव शांतपणानं-भक्तीभावानं यांच्या घरात रामायण बघण्यात तल्लीन झालं होतं.